वर्षांची अखेर आणि नववर्षांरंभ हा साहित्यक्षेत्रासाठी चैतन्याचा काळ असतो. साहित्य संमेलनाची धामधूम, भैरूरतन दमाणी, महाराष्ट्र फाउंडेशन, साहित्य अकादमी, पद्मश्री-पद्मभूषण-पद्मविभूषण असे विविध पुरस्कार मागेपुढे जाहीर होतात. त्यामुळे साहित्यविश्वामध्ये नव्या उत्साहाला सुरुवात होते. पुरस्कारविजेत्या साहित्यिकांबद्दल प्रसारमाध्यमांत लेख लिहिले जातात, त्यांच्या मुलाखती येतात. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने वाद-प्रतिवाद होतात. नव्या वर्षांचा हा माहोल कमी-अधिक फरकाने वर्षभर सुरू राहतो. कारण वर्षभर महाराष्ट्रात विविध संमेलनं, चर्चासत्रं, उपक्रम होतात. या सर्वाची दखल प्रसारमाध्यमांतून फारशी घेतली जात नसली तरी साहित्यविश्वात त्याविषयी चर्चा होत राहते. या सर्वातून साहित्याचा मुख्य प्रवाह सळसळत राहायला मदत होते.

साहित्य केंद्राचं सरकणं.. गेल्या वीस वर्षांत भारतात सर्व पातळीवर जी बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे, त्याला साहित्यही अपवाद नाही. जागतिकीकरणाच्या बाजूने महाराष्ट्रात बोललंच जात नसल्यानं लिहिलंही जात नाही. त्यामुळे आजूबाजूचं वास्तव नीटपणे पाहिलंही जात नाही. पण जागतिकीकरणामुळे जे काही चांगले बदल झाले आहेत, त्यांपैकी एक म्हणजे त्याने मराठी साहित्याचं केंद्र बदलू लागलं आहे. बहुजन समाजातल्या लेखकांची संख्या वाढताना दिसते आहे. हे लेखक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे असल्याने त्यांचे जीवनानुभव अतिशय रोचक आणि लक्षवेधी ठरू पाहत आहेत. या उलट शहरी मध्यमवर्गीय लेखकांच्या अनुभवविश्वाला साचलेपणाची आणि तोचतोचपणाची मर्यादा पडू लागली आहे. ही पोकळी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील आणि तंत्रज्ञान, व्यापार, कॉपरेरेट अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आपापल्या परीने भरून काढायचा प्रयत्न करत आहेत. उदा. कृष्णात खोत, दासू वैद्य, अशोक कोळी, विजय जावळे इ.

‘ललित’चा सुवर्णमहोत्सव
मराठीतलं पहिलं आणि एकमेव ‘बुक ट्रेड जर्नल’ म्हणवलं जाणारं ‘ललित’ हे मासिक जानेवारीपासून सुवर्णमहोत्सवी वर्षांत पर्दापण करत आहे. त्यानिमित्ताने पुढील वर्षभर ‘ललित’चा दर महिन्याचा अंक विशेषांक म्हणून प्रसिद्ध होत आहे. शिवाय गेल्या पन्नास वर्षांतील मराठी साहित्याचा समालोचक आढावा घेणारा द्विखंडी ग्रंथ प्रकाशित होणार आहे.

हक्काची गोष्ट
गतवर्षी व्यंकटेश माडगूळकर यांच्या समग्र साहित्याचे हक्क मेहता पब्लिशिंग हाऊसने एकरकमी विकत घेतले. त्यावरून मराठी प्रकाशन व्यवहारात बऱ्याच उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. पण त्यातून लेखकांच्या मानधनाचा मुद्दाही प्रकर्षांने पुढे आला आणि त्याबाबत बऱ्यापैकी सहमती होत असल्याचं वातावरण तयार झालं. ते आश्वासक आहे. आता मेहताने कादंबरीकार शिवाजी सावंत यांच्या सर्व पुस्तकांचेही हक्क विकत घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. ही एकंदर मराठी प्रकाशन व्यवहाराच्या दृष्टीने उपकारक म्हणावी अशी घडामोड आहे.

लवकरच येत आहेत..
 * डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या बहुचर्चित ‘हिंदू’चा दुसरा भाग ठरल्याप्रमाणे ‘केवळ वंशवृक्षपारंबी’ या नावाने प्रकाशित होईल (अशी आशा आहे!)
* नाटककार सतीश आळेकर नवं नाटक लिहीत आहेत. त्याचे पुस्तकरूपाने प्रकाशनही या वर्षभरात होईल.
* प्रा. शेषराव मोरे यांच्या ‘गांधीजी आणि काँग्रेसने अखंड भारत का नाकारला?’ या ग्रंथावर उलटसुलट प्रतिक्रिया येताहेत हे पाहून या ग्रंथाची समीक्षा करणारा ‘प्रतिवाद ग्रंथ’ राजहंस प्रकाशनच्या वतीने प्रकाशित होतो आहे. हा मराठीतला अभिनव म्हणावा असा प्रयत्न आहे. भारतीय विद्या भवनने इंग्रजीमध्ये प्रकाशित केलेल्या महाभारताचं मंगेश पाडगावकर यांनी केलेलं मराठी रूपांतर आणि ज्येष्ठ नाटककार गिरीश कार्नाड व रत्नाकर मतकरी यांची आत्मचरित्रंही राजहंसच्या वतीने प्रकाशित होत आहेत.
* हिंदीमधील प्रख्यात कथालेखक दांपत्य राजेंद्र यादव-मन्नू भंडारी यांच्या बहुचर्चित आत्मचरित्रांचा मराठी अनुवाद मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसच्या वतीने येतोय.
* ज्येष्ठ समाजसुधारक        डॉ. असगरअली इंजिनीअर यांच्या ‘अ लिव्हिंग फेथ’चा मराठी अनुवाद, राम बापट यांच्या लेखांचे दोन संग्रह आणि दिग्दर्शक अरुण खोपकर यांची तब्बल पाच पुस्तके लोकवाङ्मय गृहाच्या वतीने प्रकाशित होतील.
* ज्येष्ठ समाजवादी नेते जॉर्ज फर्नाडिस यांच्यावरील लेखसंग्रह आणि डॉ. यशवंत सुमंत यांचं पहिलंवहिलं पुस्तक पुण्याच्या हर्मिस प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित होत आहे.
* श्रीराम लागू यांचे लेख आणि मुलाखती यांचा संग्रह ‘रूपवेध’ या नावाने लवकरच पॉप्युलरच्या वतीने येतोय.
* ‘असा घडला भारत’ हा भारताच्या ६५ वर्षांचा आढावा घेणारा ग्रंथ मिलिंद चंपानेरकर-सुहास कुलकर्णी संपादित करत असून तो रोहन प्रकाशन छापत आहे.
* ‘ललित’मधील ‘आनंदीआनंद’ आणि ‘टप्पू सुलतानी’ या दोन गाजलेल्या सदरांचीही पुस्तकं साधना प्रकाशन काढत आहे.

* ५ जानेवारी : श्री. ना. पेंडसे जन्मशताब्दी सांगता
* ११, १२, १३ जानेवारी : अ.भा.मराठी साहित्य संमेलन, चिपळूण.
* ११, १२, १३ जानेवारी : बृहन्महाराष्ट्र संमेलन, बेळगाव.

* २७ फेब्रुवारी : कुसुमाग्रज जन्मदिन, ‘मराठी भाषा दिन’
* २३ एप्रिल :   जागतिक पुस्तक दिन.
* ११ मार्च : सयाजीराव गायकवाड शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षांला सुरुवात.
* १३ मार्च : यशवंतराव चव्हाण  जन्मशताब्दी वर्षांची सांगता.
* ३० मार्च : ज्येष्ठ समीक्षक वसंत आबाजी डहाके वयाच्या सत्तरीत.
* २३ एप्रिल : धनंजय कीर जन्मशताब्दी वर्षांची सांगता.
* १० मे :  कवी ग्रेस यांचा पहिला स्मृतिदिन
* १३ मे :  डॉ. भालचंद्र नेमाडे वयाची पंचाहत्तरी पूर्ण.
* ७ जून :  समीक्षक मं. वि. राजाध्यक्ष जन्मशताब्दी सुरुवात.
* १५ जून :  ज्येष्ठ कथाकार शांताराम (के. ज. पुरोहित) यांचे नव्वदीत पदार्पण.
* १९ जुलै :  ज्येष्ठखगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचा पंचाहत्तरीत प्रवेश.
* १. नोव्हेंबर :  ‘मराठी साहित्यावर क्ष-किरण’ असा लेख लिहून अशोक शहाणे यांनी मराठी साहित्याचे ऑडिट केले होते, त्याला नोव्हेंबरमध्ये पन्नास र्वष पूर्ण.
* २६ डिसेंबर : बाबा आमटे जन्मशताब्दी वर्षांला सुरुवात.