|| दिल्लीवाला

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींची गळाभेट घेतल्यापासून पत्रकारांना ते भेटलेच नव्हते. त्या आलिंगनाने मोठीच राजकीय फटाकेबाजी झाली. त्यानंतर अनेक घडामोडी दणक्यात झाल्या. ममतांनी ‘संसद’ही गाजवली. पण राहुल यांच्या मनात काय चाललंय याचा पत्ता पत्रकारांना लागत नव्हता. बैठकांमध्ये व्यस्तच असत ते. अखेर परवा ते पत्रकारांशी हितगुज करायला तयार झाले. अनौपचारिक गप्पाटप्पाच होत्या. त्यामुळे सगळेच भन्नट मूडमध्ये होते. एकाने गमतीत विचारलं, ‘राहुलजी, छाती खरोखरच ५६ इंच होती का?’ याला संदर्भ होता अर्थातच मोदींच्या गळाभेटीचा. पण त्या सलगीतल्या प्रश्नावर काय बोलावं हेच राहुलना क्षणभर समजेना. दोन क्षण थांबून ते म्हणाले, ‘मला कसं माहिती असणार? मी मोजली कुठं?’ या बैठकीत पत्रकार तसे ‘सुटले’च होते. ती संधी त्यांना अन्यत्र मिळत नाही ना, म्हणूनही असेल कदाचित. एका पत्रकाराने प्रश्न विचारता विचारता, काँग्रेसने शेतकरी प्रश्नावर काय काय केलं पाहिजे यावर लांबलचक सल्लाच दिला. तीन-चार मिनिटं बोलत होता तो. विशेष म्हणजे राहुलही ते लक्षपूर्वक ऐकत होते. तो भाषणवजा प्रश्न संपल्यानंतर ते म्हणाले, ‘वा भाऊ, तुम्ही जबरदस्त भाषण केलंत. तुम्ही तर राज्यसभेची सीट पक्कीच करून टाकलीत.’ ते ऐकताच हास्याचे फुलबाजेच उडाले तेथे. दुसऱ्या पत्रकारानेही बराच वेळ ‘भाषण’ केलं. तेही राहुलनी ऐकून घेतलं. मग शांतपणे त्याला गुगली टाकली, ‘पण तुमचा प्रश्न काय होता?’.. दीड-दोन तास राहुल पत्रकारांशी दिलखुलास गप्पा मारत होते. एखादा नेता पत्रकारांच्या टोप्या उडवू लागला, त्यांना चिमटे काढू लागला आणि त्याच्यातून त्याचा ‘सेन्स ऑफ ह्य़ूमर’ दिसू लागला, की समजावं तो राजकीयदृष्टय़ा ‘वयात’ आलाय. थोडक्यात काय, तर पप्पू आता पप्पू नाही राहिला!

भाजप विरुद्ध भाजप

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आसामप्रश्नी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांनी भाजपच्या दिल्लीतील खासदार मीनाक्षी लेखी यांना प्रतिक्रिया विचारली. लेखींनी भाजपचं म्हणणं अत्यंत शांतपणे मांडलं. दुसराच प्रश्न दिल्ली भाजपचे प्रमुख मनोज तिवारी यांच्याबद्दल होता. दिल्लीतही बांगलादेशी आणि रोहिंग्या बेकायदा राहात आहेत. त्यांच्याबाबतही दिल्लीतील ‘आप’ सरकारने निर्णय घेतला पाहिजे अशी मागणी केलेली होती. त्यावरही लेखींची प्रतिक्रिया विचारली गेली. तिवारींचं नाव घेताक्षणी लेखीजींचा पाराच चढला. ‘मी काय तिवारींची प्रवक्ता आहे का? तिवारींबद्दल मला पुन्हा प्रश्न विचारू नका..’ असा ‘आदेश’ देऊन त्या तरातरा निघून गेल्या. लेखी इतक्या का संतापल्या हे कुणालाच कळेना. हे सभागृहाबाहेरचं दृश्य. सभागृहात भाजपचे खासदार राजीवप्रताप रुडी यांनी आपल्याच मंत्र्याला धारेवर धरलं. ग्रामीण विकास मंत्रालयाकडून बिहारमध्ये कामे होत नाहीत, असं रुडी यांचं म्हणणं होतं. त्यासंदर्भात त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला या खात्याचे राज्यमंत्री रामकृपाल यादव यांनी उत्तर दिलं. पण रुडींनी मंत्र्यांनाच ठणकावलं. मंत्र्यांनी दिलेली माहिती पुन्हा तपासून घेतली पाहिजे, असे रुडी म्हणाले. मंत्री सपशेल चुकीची माहिती देत असल्याचा थेट आरोपच होता त्यांचा. भाजपच्या खासदारानंच खोटं पाडल्यानं मंत्रिमहोदय एकदम हडबडले. लोकसभा अध्यक्षांनी -देखील बिहारकडं लक्ष द्या, अशी सूचना त्यांना केली. शेवटी यादव यांच्या मदतीला या खात्याचे केंद्रीय मंत्री धावून आले आणि त्यांनी रुडींना शांत केलं.

डर गये, डर गये..

आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणी यादी सोमवारी प्रसिद्ध झाल्यापासून संसदेत ती गाजतेय. राज्यसभेत तर हंगामाच झाला त्यावरून. लोकसभेत अध्यक्षांनी शून्यप्रहरातही एखाद-दुसऱ्यावेळा हा विषय मांडण्याची परवानगी दिली. शुक्रवारी मात्र तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांचे ऐकलेच नाही. हे खासदार मोदी सरकारवर अतिशय भडकलेले होते. तृणमूलचे सहा खासदार आसामला गेले होते. तिथे त्यांना विमानतळावरच अटक करण्यात आली होती. पोलिसांनी महिला खासदारांशी केलेल्या वर्तवणुकीवर सभागृहात घोषणाबाजी करत आक्षेप नोंदवला. सहा खासदारांना मोदी सरकार घाबरलं.. ‘डर गये डर गये, प्रधानमंत्री डर गये’ असा घोष प्रश्नोत्तराच्या तासात सुरू होता. त्यांचा आवाज इतका टिपेला गेला की, लोकसभा अध्यक्षांना मंत्र्यांचं उत्तरही ऐकू येईना. त्यामुळे त्यांना सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. घोषणाबाजी थांबली. पण या घोषणाबाजीत एका ज्येष्ठ खासदारांची एवढी दमछाक झाली की त्यांचा रक्तदाबच वाढला. त्यांना चक्कर येऊ लागली. सभागृहातच त्यांना झोपवलं गेलं. डॉक्टर आले. तपासणी केली. काही वेळाने ते तरतरीत होऊन सभागृहात परतलेही. खासदार संसदेत आरडाओरडा करतात, पण तोही सोपा नसतो हे या निमित्ताने अनेकांना कळलं.

भाषण लांबवा!

मागासवर्गीय आयोगासंदर्भातील विधेयकावर पाच तासांहून अधिक काळ लोकसभेत चर्चा सुरू होती. कटकमधले बीजेडीचे खासदार भतृहरी माहताब यांनी सुधारणा सुचवल्या होत्या. विधेयक आणि त्यावरील सुधारणा अशा सगळ्यावर चर्चेनंतर मतदान होणार होतं. विविध पक्षांनी आपापली बाजू मांडली. नियमानुसार सामाजिक न्यायमंत्र्यांनी उत्तर देणं अपेक्षित होतं. त्यानुसार थावरचंद गेहलोत यांनी उत्तर द्यायला सुरुवात केली. खासदारांनी मांडलेल्या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर आणि शंकांवर त्यांनी सयुक्तिक उत्तरं दिली. त्यांचं भाषण संध्याकाळी सहाच्या सुमारास संपणार होतं. वेळेचं गणित मांडून गेहलोत यांनी भाषण आटोपशीर केलं. गेहलोतांचं उत्तर झालं की मतदान होणार होतं. उत्तर संपत आलं, तरी पंतप्रधान मोदी लोकसभेत आलेले नव्हते. संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांची चलबिचल सुरू झाली. त्यांना एकदम उपाय सुचला. गेहलोतांना अनंतकुमार यांनी सांगितलं, भाषण चालू ठेवा!.. माइक सुरू असल्यानं त्यांचं हे वाक्य सगळ्या सभागृहाला ऐकू गेलं. सत्ताधाऱ्यांची झालेली गोची बघून विरोधकांनाही विनोदाच्या उकळ्या फुटल्या. त्यांनी एकच गलका केला.. ऐकलं आम्ही, ऐकलं आम्ही! तेवढय़ात माहताब उभे राहिले. ‘हे तर न्यायालयातील युक्तिवादासारखं झालं. कधी कधी वकील नाहक इतका लांबलचक युक्तिवाद करत राहतात की न्यायाधीश कंटाळून जातो.. मंत्र्यांनी ताबडतोब भाषण संपवलं तर मी सुचवलेल्या सुधारणा मागे घेतो’, असं ते विनोदानं म्हणाले. तरीही गेहलोतांनी भाषण पंधरा मिनिटं रेटलं. अखेर मोदी सभागृहात आले आणि विधेयक मतदानाला गेलं.