संपदा सोवनी घराच्या भोवती भरपूर झाडे असणे ही आनंददायी गोष्ट असली तरी वाळलेल्या पानांच्या विल्हेवाटीचा मोठाच प्रश्न उभा राहतो. ही पाने जाळावी तर त्या पानांमधील अन्नद्रव्ये फु कट जातात, शिवाय धुरामुळे प्रदूषण निर्माण होते ते वेगळेच. म्हणूनच देशात एकही वाळलेले पान जाळले जाऊ नये, हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून पुण्याच्या आदिती देवधर यांनी २०१६ मध्ये ‘ब्राऊन लीफ’ हे व्यासपीठ सुरू के ले. आज चार हजारांच्या वर लोक त्यात जोडले गेले असून एक चळवळ तयार झाली आहे. हा उपक्रम सुरू झाल्यापासून २०१९ पर्यंतच्या तीन वर्षांत ५० हजार पोती वाळलेली पाने जाळली जाण्यापासून वाचवण्यात ‘ब्राऊन लीफ’ला यश आले आहे. पर्यावरणासाठी जनजागृती करणाऱ्या आदिती आहेत आजच्या दुर्गा. आदिती देवधर पुण्याच्या आदिती देवधर यांचे शिक्षण खरे तर गणित या रूक्ष समजल्या जाणाऱ्या विषयातले. उच्चशिक्षणानंतर आदिती यांनी सहा वर्षे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम के ले आणि नंतर तीन वर्षे एका सामाजिक संस्थेत याच विषयातील सल्लागार म्हणूनही काम के ले. उत्सुकता म्हणून आदिती यांनी २०१२-१३ मध्ये प्रकाश गोळे यांच्या ‘इकॉलॉजिकल सोसायटी’ संस्थेतून नैसर्गिक संसाधनांच्या व्यवस्थापनासंबंधीचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण के ला. निसर्ग संरक्षणाविषयीच्या आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या अनेक गोष्टी त्यानंतर त्यांच्या विशेषत्वाने लक्षात येऊ लागल्या, काही गोष्टी खुपायला लागल्या. शहरातील नद्यांची स्थिती आणि वाळलेली पाने ठिकठिकाणी जाळली गेल्यामुळे होणारे प्रदूषण या दोन प्रश्नांनी त्यांचे लक्ष वेधून घेतले. आणि त्यांनी त्यालाच आपल्या कामाचे लक्ष्य बनवून वाळलेल्या पानांचे सोने बनवणारी ‘ब्राऊन लीफ’ ही संस्था स्थापन के ली आणि त्या माध्यमातून आत्तापर्यंत ५० हजार पोती वाळलेली पाने जळण्यापासून वाचली आहेत. आदिती यांच्या इमारतीच्या आवारात एक मोठा ‘वावळ’ वृक्ष होता. त्याच्या गळालेल्या पानांचा मोठा ढीग साचतो हे पाहून आदिती यांनी तो जाळू नका, म्हणून संबंधितांना सांगितले. पण जाळले नाही, तर या पानांचे काय करता येईल, याचे उत्तर त्या वेळी त्यांच्याकडेही नव्हते. मग त्यांनी समाजमाध्यमांवर यासंबंधी मदत मागितली आणि अनेकांनी अनेक पर्याय सुचवले. त्यातच घरच्या घरी सेंद्रिय भाजीपाला पिकवणाऱ्या सुजाता नाफडे यांनी ही वाळलेली पाने आपण खत म्हणून वापरू शकू , असे सांगितले. नाफडे यांनी फु लवलेली बाग पाहून आदिती यांच्या विचाराला दिशा मिळाली आणि त्यांनी बागकाम करणाऱ्या इतर लोकांशीही बोलून माहिती घ्यायला सुरुवात के ली. गच्चीवर बाग करणाऱ्यांना मातीची कमतरता भासत असल्यामुळे वाळलेल्या पानांचा त्यांना चांगला उपयोग करून घेता येतो. मात्र रस्त्याच्या कडेला ढिगाने आढळणाऱ्या वाळलेल्या पानांमध्ये गुटख्याच्या पुडय़ा आणि प्लास्टिकसारखा कचरा असल्याने के वळ स्वच्छ वाळलेली पाने कु ठे मिळतील, हा प्रश्न असतोच, हे आदिती यांच्या लक्षात आले. मग आदिती यांनी वाळलेल्या पानांची विल्हेवाट लावू इच्छिणारे आणि वाळलेली पाने हवी असणारे अशा लोकांचे व्हॉटसअॅप ग्रुप के ले, तसेच एक संके तस्थळ आणि फे सबुक पानही सुरू के ले. आदिती यांना अनपेक्षितरीत्या प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि व्हॉटस्अॅपवरून वाळलेल्या पानांच्या माहितीची देवाणघेवाण ठरू लागली. यात आर्थिक व्यवहार नसून वाळलेली पाने साठलेल्यांनी ती पोत्यांत भरून ठेवायची आणि पाने हवी असलेल्यांनी ती घेऊन जायची असे काम सुरू झाले आणि ‘ब्राऊन लीफ’ हे व्यासपीठ तयार झाले. ज्या लोकांनी बागेसाठी इतरांकडून वाळलेली पाने नेली होती, त्यांनी आपल्या बागेतील फळाफु लांचे फोटो समाजमाध्यमांवर टाकायला सुरुवात के ली आणि त्यातून इतर मंडळींना प्रेरणा मिळत समविचारी लोकांची ‘ब्राऊन लीफ कम्युनिटी’ घडू लागली. त्यात बागकामाचा अनुभव असलेल्या लोकांबरोबरच वनस्पतीशास्त्रातील काही तज्ज्ञ सहभागी झाले. त्यांचा सल्लाही नवीन लोकांना मिळू लागला. साठलेली वाळलेली पाने दुसऱ्यांना देणे, या पानांपासून स्वत:च खत बनवणे आणि जमिनीत ओलावा राहावा यासाठी त्यावर वाळलेल्या पानांचा थर पसरवून ‘मल्चिंग’ करणे या तीन गोष्टींबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्यास आदिती यांनी सुरुवात के ली. त्यासाठी त्यांनी एक मार्गदर्शनात्मक ‘गाइड’ तयार के ले. ते अनुभवी व्यक्तींकडून तपासून घेऊन संके तस्थळावर ‘पीडीएफ’ स्वरूपात मोफत उपलब्ध करून दिले. याच गाइडमधील विषय घेऊन एक व्हिडीओ मालिका तयार करून तीही संके तस्थळावर पाहायला मोफत उपलब्ध के ली. घरच्या घरी किं वा सोसायटीत खत तयार करण्याबद्दल लोकांच्या मनात खूप शंका असतात. अनेकदा काही तरी चूक होते, कचऱ्याचा वास येतो आणि अशा कारणांनी अनेक लोक त्याकडे वळत नाहीत. त्यांच्यासाठी ‘ब्राऊन लीफ’च्या गाइड आणि व्हिडीओज्मुळे शंकानिरसन होऊ लागले. कचऱ्यापासून खत करताना पिंजऱ्यासारखी रचना वापरण्यासारखे काही उपयुक्त पर्याय या गाइडमुळे लोकांसाठी सोपे झाले. पर्यावरणपूरक बागकामाची नुकतीच सुरुवात के लेल्या लोकांना प्राथमिक स्वरूपात पावले टाकताना या मोफत साहित्याचा उत्तम उपयोग होतो. सध्या ‘ब्राऊन लीफ’चे तीन व्हॉटस्अॅप ग्रुप सुरू असून पुण्यात या व्यासपीठाद्वारे ६५० सदस्य एकमेकांच्या संपर्कात असतात, तर फे सबुकवर ३,५०० लोक संपर्कात आहेत. पुण्याबाहेरीलही काही उत्साही मंडळी या उपक्रमात सहभागी झाली आहेत. फे ब्रुवारी २०१६ मध्ये उपक्रम सुरू झाल्यापासून २०१९ पर्यंतच्या तीन वर्षांत ५० हजार पोती वाळलेली पाने जाळली जाण्यापासून वाचवण्यात ‘ब्राऊन लीफ’ला यश आले आणि त्यानंतरही उपक्रम सुरूच आहे. या उपक्रमाबद्दल आदिती व्याख्याने, वेबिनार्स आणि स्वतंत्र मार्गदर्शनही देतात. ज्या लोकांना गाइड आणि व्हिडीओ मालिका पाहिल्यानंतरही आणखी वेगळे मार्गदर्शन हवे असते, त्यांच्यासाठी आदिती या सशुल्क अभ्यासक्रमही घेतात. पुण्याप्रमाणेच इतर शहरांमध्येही लोकांनी त्यांच्या स्तरावर ही संकल्पना राबवावी यासाठी आदिती जनजागृती करतात. वाळलेल्या पानांचा निसर्गातच वापर करून घेण्यासाठी समविचारी लोकांचे गट करून कसे व्यासपीठ उभारावे आणि ते कसे उत्तम चालवता येईल, याविषयी सध्या आदिती आणखी एक गाइड लिहीत असून भविष्यात या विषयीचे प्रारूप उभे करण्यासाठी त्या सध्या प्रयत्नशील आहेत. पर्यावरण रक्षणात हातभार लावण्यासाठी फार मोठी पावले टाकणे सर्वाना शक्य नसले, तरी नागरिक आपल्या कु टुंबाच्या स्तरावर वाळलेल्या पानांची योग्य विल्हेवाट नक्की लावू शकतील किं वा त्यापासून खतही करू शकतील. सोपेपणा आणि सर्वसमावेशकता असलेले आदिती देवधर यांचे ‘ब्राऊन लीफ’ व्यासपीठ वाढावे आणि त्यामुळे अनेकांना पर्यावरणपूरक बागकामाची प्रेरणा मिळावी, हीच सदिच्छा. ग्रॅव्हिटस फाऊंडेशन प्रस्तुत लोकसत्ता दुर्गा सहप्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पॉवर्डबाय : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. यश कार्स राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलाइजर्स लि. संपर्क - आदिती देवधर ‘ब्राऊन लीफ’, पुणे ईमेल - pune.brownleaf@gmail.com दूरध्वनी -७३५००००३८५