एम. करुणानिधी कलैनार या टोपणनावाने सुपरिचित होते. कलाइग्नार म्हणजे लेखक आणि कलाकार. करुणानिधी केवळ मुरलेले राजकारणी आणि दीर्घकाळ सत्तेवर राहिलेले मुख्यमंत्री नव्हते. त्यांची राजकीय कारकीर्द विविध कारणांनी गाजली. राज्य सरकारांचे अधिकार, राज्य सरकारांची स्वायत्तता, भारताची संघराज्यात्मक चौकट यांसाठी त्यांनी अनेकदा संघर्ष केला.

* दोन वेळा ज्यांचे सरकार बरखास्त केले गेले, असे करुणानिधी हे एकमेव मुख्यमंत्री. १९७६ मध्ये आणीबाणीच्या काळात आणि १९९१ मध्ये कलम ३५६ अन्वये त्यांचे सरकार बरखास्त केले गेले.

* १९५७ पासून त्यांनी लढवलेल्या सर्व १३ विधानसभा निवडणुकांमध्ये ते विजयी ठरले. १९८४ मध्ये ते विधान परिषदेचे सदस्य होते.

* स्वातंत्र्यदिनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ध्वज फडकवण्याचा मान त्यांनीच मिळवून दिला. तमिळनाडू राज्यासाठी स्वतंत्र गौरवगीतही त्यांनीच बनवले.

* आणीबाणीच्या काळात क्षेत्रीय अस्मितेवर आधारित पक्षांची गळचेपी होणार, हे स्पष्ट झाले होते. द्रविड मुन्नेत्र कळघममधील ‘द्रविड’ हा शब्द काढावा, यासाठी करुणानिधींवर दबाव येत होता. पण करुणानिधी त्या दबावाला बधले नाहीत.

* बंडखोरी करुणानिधींमध्ये लहानपणापासूनच मुरलेली होती. त्यांचा जन्म संगीतकार घराण्यात झाला. त्यांचे वडील नागस्वरम हे वाद्य वाजवायचे. करुणानिधी यांनाही संगीतशाळेत पाठवण्यात आले. पण नागस्वरम वादकांना त्या काळात शर्ट किंवा अंगवस्त्रम (उपरणे) घालण्याची परवानगी नव्हती. या कारणात्सव करुणानिधींनी त्या वाद्याकडेच पाठ फिरवली!

* शाळेत प्रवेश मिळाला नाही म्हणून संतप्त होऊन त्यांनी गावातल्या मंदिरातील टाकीत उडी मारण्याची धमकी दिली होती. वयाच्या अवघ्या १४व्या वर्षीच त्यांनी हिंदी सक्तीविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन घडवून आणले होते.

* उमेदीच्या काळात करुणानिधी यांच्या पूर्व तंजावर जिल्ह्य़ावर कम्युनिस्ट चळवळीचा प्रभाव होता. पण तमिळवरील प्रेमामुळे करुणानिधी पेरियार ई. व्ही. रामस्वामी, जस्टिस पार्टी, सी. एन. अण्णादुराई यांच्याकडे ओढले गेले. वास्तविक कट्टर निरीश्वरवादी करुणानिधी कम्युनिस्ट चळवळीतही रमू शकले असते.

* प्रथम मंत्री म्हणून आणि नंतर मुख्यमंत्री या नात्याने करुणानिधी यांनी अनेक सुधारणा घडवून आणल्या. तमिळनाडूतील बससेवेचे सार्वजनिकीकरण केले. जमीन सुधारणा घडवून आणल्या. त्यामुळे राज्यातील कम्युनिस्ट गमतीने म्हणू लागले, की रक्ताचा थेंब सांडून इतकी वर्षे आम्हाला जे जमत नाही, ते करुणानिधी शाईचा थेंब सांडून करतात!

* आणीबाणीच्या काळातही त्यांनी ‘मुरासोली’ हे पक्षाचे नियतकालिक हिमतीने काढले. करुणानिधींच्या काही सहकाऱ्यांना अटक झाली होती. त्यांची नावे कशी द्यायची, असा प्रश्न होता. त्या वेळी करुणानिधींनी अफलातून क्लृप्ती लढवली. ही सर्व मंडळी अण्णादुराईंच्या श्रद्धांजली सभेला उपस्थित नव्हती, असे त्यांनी छापून टाकले! कार्यकर्त्यांना सारे समजून गेले.

करुणानिधींचे राजकीयकुटुंबीय..

करुणानिधी यांचे पुत्र व द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टालिन हेच आता या पक्षाची धुरा सांभाळणार हे जवळपास निश्चित असले, तरी यापूर्वी त्यांचेच ज्येष्ठ पुत्र एम. के. अळगिरी हेदेखील राजकारणात आहेत. द्रमुकने केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीला साथ दिली, तेव्हा जून २००९ ते मार्च २०१३ या काळात हे अळगिरी खते व रसायने खात्याचे मंत्री होते, तर कन्या कनिमोळी यादेखील याच काळात संसदेच्या सदस्य होत्या. कनिमोळी यांच्या राजकीय आकांक्षांना ‘दूरसंचार घोटाळय़ा’त त्यांना अटक झाल्यामुळे खीळ बसली. मात्र, त्याआधी दयानिधी मारन हे केंद्रात २००४ ते २००७ पर्यंत मंत्रिपदी होते. दयानिधी मारन हे करुणानिधींच्या भाच्याचे- मुरासोली मारन यांचे पुत्र. मुरासोली मारन यांनीही मामा करुणानिधी यांच्याप्रमाणेच राजकारणात बस्तान बसवले होते, ३६ वर्षे खासदारकी, तीनदा केंद्रीय मंत्रिपदे त्यांनी मिळविली होती.