महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीसह सातारा, सोलापूर जिल्ह्य़ातील खरिपाचा पेरा अडचणीत आला आहे. तीव्र उष्णता, जोरदार वारे यामुळे माळरानावरील पिके वाळली असून, निदान रब्बीसाठीची तयारी म्हणून शेतकऱ्यांनी उभ्या पिकात कुळव घातले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत या हंगामात केवळ ४० टक्के पावसाने हजेरी लावली असून, दुष्काळाची छाया या भागावर यंदा दिसत आहे. सिंचन सुविधा असलेल्या ठिकाणची पिके तग धरून, असली तरी पोषक वातावरण नसल्याने वाढ खुंटली असून उत्पन्नात घट होण्याची साधार भीती व्यक्त होत आहे. यंदा कोयना, चांदोली, राधानगरी, दूधगंगा, धोम, कण्हेर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सरासरीपेक्षा जादा पाऊस झाला असला, तरी पश्चिम घाटालगतचा डोंगराळ प्रदेश वगळता पावसाने गेल्या महिन्यापासून दडी मारली आहे. या भागातील धरणातील पाणीसाठा ८० टक्क्यांवर पोहोचला आहे. सोलापूर जिल्ह्यात तर पावसाचे दमदार आगमन झाल्याने खरिपाच्या पेरण्या २०० टक्के म्हणजे ३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. तर सांगली जिल्ह्यात ९३ टक्के म्हणजे २ लाख ७१ हजार ५५४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कोल्हापूरच्या पश्चिम भागात पावसाने सरासरीत सातत्य ठेवल्याने भाताची स्थिती आजच्या घडीला चांगली आहे. सातारा जिल्ह्यात यंदा कायम दुष्काळी गणल्या जाणाऱ्या खटाव तालुक्यात या वर्षी चांगला पाऊस आहे. याचबरोबर कोयना परिसरातील पाटण, महाबळेश्वर या तालुक्यांत पिके बरी आहेत, मात्र अन्य वाई, खंडाळा, फलटण, माण, कोरेगाव, कराड, सातारा, जावळी या तालुक्यात पावसाने हात आखडता धरल्याने पिकाची स्थिती चिंताजनक झाली आहे. सांगली जिल्ह्यात मिनी कोकण समजल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यात पावसाचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असले तरी भाताची स्थिती चांगली आहे. मात्र वाळवा, मिरज पश्चिम भागातील कृष्णा, वारणा नदीकाठचा भाग वगळता पिकांची अवस्था बिकट झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र खरिपाच्या पेरण्या जोरदार, आता प्रतीक्षा परतीच्या पावसाची भाताची स्थिती काही ठिकाणी चांगली सिंचन सुविधांमुळे पिके तग धरून