अटलबिहारी वाजपेयी यांनी २७ ऑगस्ट १९७३ रोजी पुणे येथे रवींद्र भट लिखित ‘सागरा प्राण तळमळला’ पुस्तक प्रकाशन समारंभामध्ये  केलेल्या भाषणाचा संपादित भाग.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मला आठवते हिंदीचे एक महान कवी मैथिलीशरण गुप्त यांनी भगवान श्रीरामाशी संबंधित ‘साकेत’ नावाचे महाकाव्य लिहिले, तेव्हा त्यामध्ये त्यांनी दोन ओळी लिहिल्या. ‘साकेत’ त्यांनी श्रीरामालाच समर्पण केले आणि त्यानिमित्ताने लिहिले –

‘राम तुम्हारा चरित ही, स्वयं महाकाव्य है।

कोई कवि बन जाय, सहज संभाव्य है॥’

यामध्ये गुप्ताजींची विनयशील वृत्ती दिसून येते. पण ज्याप्रमाणे श्रीरामाचे चरित्र एक काव्य आहे, तसेच सावरकरांचे जीवनही एक महाकाव्य आहे. ते अग्निपरीक्षेमध्ये तावून – सुलाखून निघालेले जीवन आहे, ते काटय़ांच्या शय्येवर  उमलणारे जीवन आहे, ते  स्वत:ला तीळतीळ झिजवून काळोखाने भरलेल्या राष्ट्रामदये प्रकाश पसरविणारे जीवन आहे.

सावरकरांना जिथे ठेवले होते, ती अंदमानाची काळकोठडी मी पाहिली आहे. अंदमानचा तुरुंग त्यामध्ये बनलेल्या वेगवेगळ्या कोठडय़ा, प्रत्येक कोठडीचा वेगळा दरवाजा, पण सावरकर शेवटच्या कोठडीत होते  आणि त्यांना बंदिस्त करण्यासाठी दोन दरवाजे बनविले गेले होते. ते तुरुंगातील कैदी  होते, एका कोठडीच्या गजाआड जखडलेले होते. पण त्याने इंग्रजांचे  समाधान झाले नाही.  त्या कोठडीमध्ये उभे राहिल्यावर हृदयात ज्या भावना उचंबळून आल्या, त्या व्यक्त करण्याचे सामर्थ्य शब्दांमध्ये नाही. त्या तर एखादा सावरकरच व्यक्त करू शकतो, जे कोठडीच्या भिंतीबरोबर बोलत असत.

एका कोठडीतून जेव्हा दुसऱ्या कोठडीत हलविले गेले तेव्हा तिथून चंद्रकोर दिसत असे. त्या चंद्राबरोबरही त्यांनी चर्चा केली. तेही त्यांच्या कवितासंग्रहात आहे. सागराबरोबरचा त्यांचा संवाद हा तर आजच्या  कादंबरीचा मुख्य विषयच आहे. ‘सागरा प्राण तळमळला!’ कधी कधी मी विचार करतो, जे कोणी  सावरकरांना नास्तिक म्हणतात ते सावरकरांना ओळखण्यात गफलत करतात. जे सागराला सजीव स्वरुपात पाहतात, जे चंद्राबरोबर  संवाद करतात, जे तुरुंगातील वास्तवतेच्या  माध्यमातून आपले मनोगत व्यक्त करतात, जे ‘अनादि मी अनंत मी’ अशा प्रकारे भावना व्यक्त करतात, त्यांचा एका असीम अशा सत्तेवर विश्वास आहे, ते आस्तिक आहेत हे कोणीही नाकारू शकणार नाही. सावरकारंचे  व्यक्तिमत्त्व, व्यक्तिमत्त्वापेक्षा कर्तृत्व आधुनिक भारताच्या इतिहासात अतुलनीय  आहे. भारतमाता – जगज्जननी बहुरत्नप्रसवा आहे, बहुतरत्नगर्भा आहे, इथे महापुरुषांची मालिका झगमगत राहिली. परंतु गेल्या शंभर वर्षांमधील सावरकरांसारखे व्यक्तिमत्त्व असामान्य आहे, अजोड आहे, अलौकिक आहे. असे म्हणतात की, महापुरुषांची तुलना करू नये, मीही तुलना करू इच्छित नाही. तरीही जर तुलना करायचीच झाली तर सावरकरांचे पारडे जड राहील यात मला शंका वाटत नाही. ते क्रांतिकाकर होते, सशस्त्र लढय़ाचे पुरस्कर्ते होते. सशस्त्र लढय़ाशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही असे त्यांचे मत होते. आणि ते मत योग्य असल्याचे सिद्ध झाले. राष्ट्राचे स्वातंत्र्य जवळ आणण्यामध्ये असहकार आंदोलनाचा काहीही भाग नाही असे मानणाऱ्यांमधला मी नाही. इतिहासात त्याचेही आपले महत्त्व आहे, पण  भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये निर्णायक सिद्ध झाली ती ‘आझाद हिंद सेने’ची संघटना.

इंग्रजांना असे वाटले नव्हते की, भारतीय जनता शास्त्राने प्रतिकार करेल. नाविक दलाने जे बंड केले, त्यामुळेसुद्धा इंग्रजांना भारतातून निघून जाण्याचा निर्णय लवकर घेणे भाग पडले. नंतर आपण पाहिले की, गोव्याची मुक्ती ही शस्त्रांच्या वापरानेच झाली. काश्मीरच्या  रक्षणासाठीही  आपल्याला शस्त्र उचलावेच लागेल. बांगलादेशला पाकिस्तानी पकडीतून सोडवण्यासाठीही आपल्याला लष्करी बळच वापरावे लागले. त्याचसाठी सावरकरांनी  सैनिकीकरणाची घोषणा केली होती. राष्ट्र  लष्करीदृष्टय़ा बलवान असावे हे ते जाणत होते. खेदाची बाब आहे की सध्या सशस्त्र क्रांतिकारकांचे महत्त्व योजनापूर्वक कमी लेखण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अत्यंत दु:खाने, व्यथित अंत:करणाने मी हे सांगत आहे. नवीन इतिहास लिहिण्याचा प्रयत्न होत आहे. नवीन इतिहास  बनवण्याचा प्रयत्न होत आहे. इतिहास काय कधी बनविला जाऊ शकतो? इतिहास काय कारखान्यात बसून उत्पादित केला जातो? इतिहास शाईने लिहिला जात नाही. इतिहास रक्ताने लिहिला जातो. आणि ज्या क्रांतिकारकांनी स्वत:च्या  रक्ताने इतिहास लिहिला, आज काळ्या शाईने इतिहास लिहून तो इतिहास पुसून टाकण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

सावरकर जेव्हा ग्वाल्हेरला आले होते तेव्हा किशोरवयात मला त्यांचे प्रथम दर्शन घडले.  त्यांचे भाषण ऐकूण असे वाटले की, जणू ज्वालामुखी पेटला आहे. जणू काही ते धूम्ररहित अग्नीवरून पुढे जात आहेत. वेदांमध्ये धूम्ररहित अग्नीचे वर्णन आहे, अशी आग की जिच्यात तेज आहे, पण धूर नाही, अशी आग जिच्यात प्रकाश आहे पण काजळी नाही. अशा आगीचे धगधगते रुप! त्यांच्या हातात छत्री होती. दोन्ही हात छत्रीवर ठेवलेले होते. वाणीचा प्रवाह खोल होता, पण शब्द गळ्यातून उमटत नव्हते – तर हृदयातून उमटत होते. अशा महान वक्त्याला मी आजपर्यंत  ऐकले नाही. ते क्रांतिकारक होते,  जाज्वल्य वक्ते होते, महाकवी होते,  श्रेष्ठ लेखक होते, कादंबरीकार होते. त्यांनी नाटके लिहिली. त्यांचा तानाजी संबंधातला पोवाडाही मी ऐकला. किती विविधतेने नटलेले असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. साहित्य क्षेत्रात जर त्यांनी आपली सारी शक्ती लावली असती, तर जगातील साहित्यिकांमध्ये त्यांना श्रेष्ठ असे स्थान मिळाले असते.

रवींद्र भटांनी एका कवीच्या हृदयाची एक कादंबरी लिहिली. ‘सागरा प्राण तळमळला’ ही कादंबरी मी वाचली आहे आणि मी सांगू इच्छितो की,  भटांनी स्वत: सांगितल्याप्रमाणे समाजाच्या एका ऋ णातून  उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे. सावरकर आपल्यामध्ये नाहीत, पण सावरकर  आपल्यामध्ये सदैव  राहतीलच. सावरकर म्हणजे एक व्यक्ती नव्हती, ते एक संस्था होते, एक विचारसरणी होते, संघर्षांचे एक महापर्व होते, आत्मबलिदानाचे जणू प्रेरणास्वरूपच होते, कष्ट सहन करण्याची एक परिसीमाच जणू होते. सागराच्या उत्तुंग लाटांवर त्यांनी जेव्हा स्वत:ला झोकून दिले, जणू काही ते प्राणांवर खेळणेच होते, परंतु त्यांनी अमृत प्राशन केले होते. चाफेकरांनी  आत्मर्पण करताना म्हटले ‘मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले’ त्यामध्ये सावरकरांनी थोडा बदल केला. मी आयुष्यभर मरेन, मरता – मरता स्वातंत्र्य मिळवीन;  आणि आयुष्यभर ते लढत राहिले.

सावरकरांचे आणखी एक रूप आहे, जे मला खूप आकर्षित करते, ते म्हणजे –  सामाजिक क्रांतीचा शंख फुंकणाऱ्या एका नेत्याचे रूप. हिंदू समाज संघटित व्हावा, बलशाली व्हावा अशी त्यांची इच्छा होती. हिंदुराष्ट्र विजिगीषु वृत्तीने भारलेले असावे. परंतु सामाजिक कुरीती, रूढी, अस्पृश्यता, पोथीवाद, जातीभेद- ते यांना जन्मगत मानत नव्हते, पोथीगत मानत होते, त्याच्यामुळे समाज दुबळा झाला आहे, क्षीण होत आहे. आपण आपल्या बांधवांना परके बनवीत आहोत. जन्माच्या आधारे त्यांना लहान मानून स्वत:पासून दूर लोटत आहोत. हे मोठे दु:ख देणारे दृश्य आहे. सावरकरांना हे पाहवले नाही. त्यांनी समाजसुधारणेचा शंख फुंकला. त्यांनी अस्पृश्यता समूळ नष्ट करायचे आवाहन केले. ते म्हणाले- व्यक्तीची किंमत जन्माच्या आधारे नव्हे तर गुणांच्या आधारे झाली पाहिजे. ही त्या काळातली गोष्ट आहे- पन्नास वर्षांपूर्वीची. एका भविष्यद्रष्टय़ाच्या नजरेने सावरकरांनी पाहिले- समाजामधील दोष असे दूर होणार नाहीत. जन्माच्या आधारावर लहान-मोठा मानण्याचा क्रम जर असाच चालू राहिला तर समाज कधी बलवान होणार नाही. त्यावेळी सावरकरांनी त्या रूढींवर वज्रासारखा प्रहार केला. समाजामध्ये ज्या विकृती आहेत त्यांना दूर करण्यासाठी आपली लेखणी धारदार बनवून समाजाच्या सर्व अंगांवर निग्रहाने चालवली. या सर्व संदर्भातील त्यांच्या कार्याच्या स्वरूपाबाबत मतभेद होऊ शकतात. तसे त्या काळातही मतभेद होते. कर्मठ लोकांनी सावरकरांना त्या स्वरूपात आनंदाने स्वीकारले नाही. आजही स्वीकारत नाहीत. परंतु आज जर सर्वात अधिक आवश्यकता कोणती असेल तर ती ही की समाजसुधारकाचे सावरकरांचे रूप नवीन पिढीसमोर सादर करण्याची आहे. कारण जे स्वातंत्र्या आपण शेकडो वर्षांच्या बलिदानानंतर, रक्त वाहवून, घाम गाळून, अश्रू वाहवून मिळवले आहे, ते स्वातंत्र्य आम्हाला अमर बनवायचे आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Memorable speeches of former prime minister atal bihari vajpayee in pune
First published on: 17-08-2018 at 03:58 IST