महाराष्ट्रामध्ये १८ एप्रिलपासून शासनाने प्लास्टिकबंदी लागू केली. प्लास्टिकबंदी म्हणजे उपायापेक्षा भयंकर इलाज झाला आहे. खरेच प्लास्टिकबंदीमुळे पर्यावरणाची हानी होणे थांबणार आहे का, हा अनुत्तरित प्रश्न आहे. ही बंदी लागू करण्यापूर्वी शासनाने त्यावर प्रथम कृती आराखडा करून शास्त्रोक्त पद्धतीने त्याचे चक्रीकरण (रिसायकलिंग) कसे करणार, याबाबत उपाययोजना करणे आवश्यक होते. मात्र शासनाने सर्व तसे केल्याचे वरकरणी दिसत नाही. त्यामुळे प्लास्टिकबंदीचा जास्त फटका उद्योजक, त्यामध्ये काम करणारे कामगार तसेच सामान्य नागरिक यांना जास्त बसणार आहे.

खरे तर प्लास्टिक हे अत्यंत सुरेख, स्वस्त व अनेकोपयोगी उत्पादन आहे. सध्या तरी याला कुठलाही पर्याय उपलब्ध नाही. फक्त लोकांमध्ये प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत प्रबोधन व जागृती करून त्याचे वर्गीकरण, तो जमा करणे, चक्रीकरण याची जर व्यवस्थित माहिती देऊन त्यांच्या सवयीमध्ये थोडासा बदल करण्यास प्रवृत्त केले तर प्लास्टिकबंदीची पण गरज नाही.

उद्योजकांनीही काही उत्पादनांवर स्वत:हून र्निबध घालणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अशी उत्पादने करणाऱ्या उद्योजकांच्या संघटनेने  अशी चुकीची उत्पादने करणाऱ्या सदस्याला काढून टाकणे, अशा लोकांची माहिती समजल्यास सरकारला कळवणे, अशी उत्पादने विकणाऱ्या दुकानदारांवर लक्ष ठेवणे, नागरिकांचाही गट तयार करणे, त्यांना अशी उत्पादने विकत घेण्यापासून प्रवृत्त करणे अशा उपाययोजना करता येऊ  शकतात.    लोकांची मानसिकता बदलणे, त्यांना प्लास्टिकमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून देणे, प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण, त्याचे मानवजातीवर, प्राणी, पक्षी यांच्यावर होणारे गंभीर व भयावह परिणाम सांगणे अत्यंत आवश्यक आहे. हे समजल्यावर त्यांच्या प्रवृत्तीमध्ये नक्कीच बदल होईल. मुंबईमध्ये आलेला पूर त्याचे उदाहरण आहे. कॅरीबॅग ड्रेनेजमध्ये अडकल्यामुळे झालेली मनुष्यहानी व वित्तहानी सर्वश्रुत आहे. अनेक प्राणी प्लास्टिक खाल्ल्याने मरतात याची माहिती देणे, पिण्याच्या पाण्यामध्ये सापडत असलेले प्लास्टिकचे अंश, त्याचे मानवी शरीरावर होणारे परिणाम, नद्या, समुद्र यांतील जलचरांवर होणारे परिणाम हे सारे लोकांसमोर सारखे आणल्यास जनता नक्की जागरूक होते व ते प्लास्टिक नीट वर्गीकरण करून देतात असा अनुभव आहे.

आमची केशव सीता मेमोरियल फाऊंडेशन ट्रस्ट ही संस्था गेली साडेतीन वर्षे पुण्यामध्ये घरोघरी जाऊन प्लास्टिक कचरा गोळा करते. फक्त २ टेम्पो, २ ड्रायव्हर, २ मदतनीस व २ जण ऑफिसमध्ये, २ संचालक एवढय़ा लोकांच्या बळावर महिन्याला अंदाजे १५ टन प्लास्टिक गोळा करते. ते प्लास्टिक आम्ही रिसायकल करतो. काही प्लास्टिकचे आमच्या कंपनीमध्ये इंधन बनवतो. मागील वर्षी पुणे महानगरपालिकेला आम्ही जवळजवळ १० टन प्लास्टिक प्रायोगिक तत्त्वावर रस्ते करण्यासाठी दिले होते. त्याचे चांगले परिणाम आलेले आहेत. काही कंपन्यांनीही त्यांच्या रस्त्यामध्ये वापर करण्यासाठी आमच्याकडून प्लास्टिक नेले आहे. आम्हीही प्लास्टिक कचऱ्यापासून वेगवेगळी उत्पादने तयार करत आहोत.

आमच्याकडे मुंबई, ठाणे, डोंबिवली येथून अंदाजे ३-४ टन प्लास्टिक दरमहिना येते. विशाखापट्टणम, जम्मू-काश्मीर, दिल्ली, कोइम्बतूर, बंगळूरु येथूनही प्लास्टिक येते. महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत किंवा सर्व सरकारी आस्थापना यांनी प्लास्टिकचे चक्रीकरणकरण्याबाबतचे धोरण व उपाययोजना निश्चित करणे अत्यंत जरुरीचे आहे. यातून अतिशय उत्तम आर्थिक उत्पन्न मिळू शकते. फक्त शासनाची व प्रशासनाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे.

शासकीय स्तरावर तातडीने एक समिती नेमून उपाययोजनांचा अभ्यास करून या गोष्टी अमलात आणता येतील. वरील सर्व बाबींचा विचार करून जर प्लास्टिकबंदीची अधिक चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करावयाची असेल तर प्लास्टिकचे व्यवस्थापन, कलेक्शन अ‍ॅट सोर्स, वर्गीकरण, चक्रीकरण या सर्व प्रक्रिया सहजतेने करता येतील. यामध्ये कोणीही भरडले जाणार नाहीत व नागरिकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळेल.

  • काही प्लास्टिकच्या वर्गीकरणानुसार प्रक्रिया करून उपाययोजना केल्यास निश्चितच फायदा होऊ शकतो
  • लोकांमध्ये जनजागृती करणे व प्लास्टिक कचरा वेगळा करण्यास सांगणे.
  • घरोघरी जाऊन वेगळे केलेले प्लास्टिक गोळा करणे.
  • प्लास्टिक कलेक्शन सेंटर प्रत्येक भागात उभी करणे.
  • प्लास्टिक कचऱ्याचे वर्गीकरण करणे.
  • वर्गीकरण केलेले प्लास्टिक वेगवेगळ्या प्रक्रिया करण्यासाठी पाठवणे.
  • प्लास्टिक वर्गीकरण करणे व त्यापासून इंधननिर्मिती करणे. याचा उपयोग कंपन्यांना इंधन, जनरेटर, इन्सिनरेटर, बर्नर, बॉयलर, शेतीसाठी लागणारे पंप यामध्ये करता येतो.
  • प्लास्टिकपासून ग्रॅनुअल तयार करणे. त्यापासून कचऱ्याच्या बादल्या, बाके, रोड डिव्हायडर, पेव्हर ब्लॉक्स अशा वस्तू बनवून वापरता येतात.
  • अनेक वस्तू प्लास्टिकचे चक्रीकरण करून तयार करणे शक्य आहे. ताडपत्र्या, शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचनाचे पाइप, प्लास्टिक पाइप व फिटिंग आदी.
  • कॅरीबॅग, पातळ पिशव्यांचे प्लास्टिक ग्रॅनुअल रस्ते तयार करताना खडी व डांबर यांच्यामध्ये मिश्रण करून वापरले तर रस्त्यांचे आयुष्य २-३ वर्षांनी वाढते. तसेच प्रति कि.मी. ३०,००० ते ३५,००० रुपयांची बचत होते. खड्डे कमी पडतात.
  • पेट बॉटलपासून धागा बनवता येतो. सध्या बरेच खेळाडू वापरत असलेले ड्राय फिट कापडाचे कपडे, फर्निशिंग कपडे, उशा अशा अनेक प्रकारांमध्ये वापरता येतात.
  • सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यामध्ये पेटपासून केलेले प्लास्टिकचे धागे किंवा नेट वापरल्यास रस्त्यांना तडे जात नाहीत. त्यांचे आयुष्य वाढते.
  • प्लास्टिक रिसायकल उद्योगामुळे लोकांना उद्योग आणि नोकरी मिळू शकते. अंदाजे १ टन प्लास्टिकवर प्रक्रिया करण्यासाठी १२-१३ लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. पूर्ण महाराष्ट्राचा विचार केल्यास रोज अंदाजे २००० टन प्लास्टिकवर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू केल्यास अंदाजे २५ ते ३० हजार लोकांना रोजगार उपलब्ध होऊ  शकेल.
  • रोज अंदाजे २ कोटी रुपयांचा महसूल सरकारच्या तिजोरीत जमा होऊ शकेल.
  • सरकारने प्लास्टिक रिसायकलिंग करण्यासाठी प्रत्येक महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, एमआयडीसी यांच्याबरोबर करार करून कंपनी स्थापन करता येऊ शकेल.

काही मूलभूत प्रश्न

  • प्लास्टिकबंदीमुळे जे उद्योग बंद पडतील त्यामध्ये काम करणाऱ्या कामगारवर्गाचे कसे पुनर्वसन करणार?
  • किती मायक्रॉन जाडीच्या प्लास्टिक पिशव्या चांगल्या किंवा वाईट याचे शास्त्रीय विवेचन कसे करणार?
  • पेट बॉटलमधील मिळणारे मिनरल वॉटर चांगले का वाईट? याचा परिणाम करणारा अभ्यास प्रकाशित झाला का?
  • अनेक खाद्यपदार्थ जसे पापड, लोणची, पोळ्या, भाजी, कडधान्ये, धान्ये, मसाले, नूडल्स, पास्ता, श्रीखंड, चक्का, बर्फी, गुलाबजाम, सुकामेवा, कोरडे पदार्थ यांचे पॅकिंग कसे करणार?
  • कपडे, चादरी, क्रॉकरी, भांडी, भेटवस्तू व इतर अनेक वस्तू कुठल्या वेष्टनात बांधणार?
  • औषधे, गोळ्या कुठल्या वेष्टनात येणार? अनेक पातळ औषधे प्लास्टिक बाटल्यांमध्ये पॅक केली जातात. होमिओपॅथी औषधेसुद्धा प्लास्टिक बाटल्यांमध्ये पॅक केली जातात. ती आता कुठल्या प्रकारे मिळणार?
  • दैनंदिन जीवनोपयोगी वस्तू प्लास्टिकशिवाय कुठल्या वेष्टनात येणार?
  • कागदी पिशव्या वापरणे खूप सयुक्तिक नाही. त्याने उलट निसर्गाची हानी होते. ए-४ आकाराचे ४४० पेपर तयार करण्यासाठी एक झाड तोडावे लागते.
  • वृत्तपत्र कागद खाण्याच्या पदार्थासाठी वापरल्यास छपाईच्या शाईमध्ये शिसे असते. ते विषारी व आरोग्यासाठी फार धोकादायक आहे. त्याने कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात.
  • काचेच्या बाटल्या रिसायकल करण्यास बंदी आहे. त्या बाटल्या कुठे जातात? अनेक ठिकाणी काचेच्या बाटल्या समुद्रात टाकल्या जातात. त्यामुळे पर्यावरणाची हानी होते.
  • शेतकरी मातीमधील पाण्याचा ओलावा जाऊ नये म्हणून प्लास्टिक कागद वापरतात. ते आता काय करणार?
  • बी-बियाणे प्लास्टिक पॅकमध्ये येतात. त्याबाबत दुसरा पर्याय कोणता?
  • अनेक इलेक्ट्रॉनिक उत्पादने प्लास्टिकमध्ये पॅक होतात. ते आवश्यक आहे. काही शास्त्रीय कारणे आहेत, त्याला पर्याय काय?
  • मेडिकल उद्योगामध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला पर्याय काय?
  • खाद्यपदार्थासाठी शेल्फ लाइफ केवळ प्लास्टिक पिशव्यांमध्ये पॅक केल्यामुळे वाढते. त्याला सद्य:स्थितीत पर्याय उपलब्ध नाही.
  • सरकारने कलेक्शनसाठी पैसे जाहीर केले आहेत, पण व्यापारी जमा केलेले प्लास्टिक कोणाकडे देणार व त्याची सिस्टीम काय असणार?

 

– शिरीष फडतरे

shirish2364@gmail.com