दयानंद लिपारे बदलत्या काळात केवळ साचेबंद पद्धतीने शेती करून भागणार नाही. तर ती करताना बाजारपेठेचा, समाजाच्या जीवन-आहारशैलीचादेखील अंदाज घेणे आवश्यक आहे. पिकाचे उत्पादन आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार करत कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील सुदर्शन महादेव जाधव यांनी अशीच ‘गॅलन’वांग्याची शेती फुलवली आहे. भाजीच्या बरोबरीने भरीत करण्यासाठी वांग्याचा स्वयंपाकात नेहमी वापर केला जातो. हातकणंगले तालुक्यातील सुदर्शन महादेव जाधव (पट्टणकोडोली) हे गेली बारा वर्ष शेती करत आहेत. त्यांनी ‘गॅलन’ हे खास भरीतासाठी वापरले जाणारे वांग्याच्या जातीचे पीक घेण्यावर विशेष लक्ष पुरवले आहे. संतुलित आहार बनवण्यासाठी वांग्यातील पोषक घटकांचे मिश्रण आवश्यक ठरते. महानगरासह गोव्यात या वांग्यांना चांगले मोल मोजून विकत घेणारा ग्राहक मोठा आहे. आहारात वांग्याचा वापर नेहमीच केला जातो. खाद्यपदार्थ म्हणून वापरली जातात. मुळातील दक्षिण आशियात उगम पावलेल्या या वनस्पतीची लागवड आता उष्णकटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधातील अन्य भूप्रदेशांमध्येही केली जाते. मोठय़ा आकारमानाच्या काळय़ा वांग्यांचे भरीत करतात. त्यासाठी गॅलन जातीचे वांगे अधिक प्रमाणात वापरले जाते. ही वांगी घालून वांगीभात होतो. वाळवलेल्या वांग्याचे लोणचे केले जाते. वांग्याची आधी रोपे तयार करून नंतर ती पुनर्लागवड पद्धतीने पेरली जातात. निचरा होणाऱ्या जमिनीत यांची लागवड केली जाते. वांगे, टोमॅटो आणि मिरची या तिन्हीचे जनुकीय गुणधर्म सारखे असतात. ही पिके एकाच वाफ्यात घेतली जात नाहीत. सूत्रकृमींचा प्रादुर्भाव होत असल्याने ते टाळले जाते. वांग्याच्या रोपावर तुडतुडय़ांचा प्रादुर्भाव होतो. ते पिकावरील रस शोषून घेतात. पीक पिवळे पडते, वांग्यांची वाढ होत नाही. अशावेळी फवारणी केली जाते. थोडेसे वांगीपुराण वांग्यामध्ये पोषण मूल्य चांगले असल्याचे सांगितले जाते. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी वांगी प्रभावी आहेत. १०० ग्रॅम वांग्यात असलेल्या पोषक तत्त्वांचा तपशील देताना त्यामध्ये काबरेहायड्रेट ४ टक्के, प्रोटिन १.४ टक्के, फॅट ०.३ टक्के, फायबर ९ टक्के असते. याशिवाय २० टक्के विविध प्रकारची जीवनसत्त्वे आणि २६ टक्के लोह, कॅल्शियम इतर घटक असतात. भरताचे वांगे हे आकाराने मोठे असते. काही जण भरताची उभट आकाराची वांगी निवडतात. उत्तम चव येण्यासाठी कमी बिया असलेली वांगी निवडली जातात. भरीत करण्यासाठी वांगी भाजून घेतली जातात. चुलीवर भरलेले वांगे चविष्ट लागते. अलीकडे काळ बदलला असल्याने घरातून चूल गायब झाली आहे. त्यामुळे गॅस किंवा ओव्हनवर ती भाजावी लागतात. भरीताचे विविध प्रकार असतात. वांग्याचे कांदा घालून केलेले भरीत, बिन कांद्याचे भरीत, कच्च्या तेलाचे भरीत, वांग्याचे चिंच-गुळाचे भरीत आदींचा त्यामध्ये समावेश आहे. गोवा,कोकणामध्ये माशांसमवेत गॅलन जातीही वांगी मोठया प्रमाणात वापरली जातात. ही बाजारपेठ लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील सुदर्शन जाधव यांनी एक एकर शेतीमध्ये केवळ गॅलन जातीच्या वांग्याचे उत्पादन काढण्यास सुरुवात केली आहे. तसे पाहिले तर कोल्हापूर जिल्हा हा उसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कमी कष्टात जास्त उत्पन्न, हमखास उत्पन्न देणारी शेती म्हणून उसाकडे पाहिले जाते. त्याला फाटा देऊन जाधव कुटुंबीयांनी गेल्या बारा वर्षांपासून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फळभाज्या शेतीकडे लक्ष पुरवले आहे. सुदर्शन जाधव हे २०११ पासून शेती व्यवसाय करतात. कला शाखेचे पदवीधर असलेल्या जाधव यांना नोकरीच्या चांगल्या संधी आल्या असताना त्या डावलल्या. वडील आणि काकांनी सुरू ठेवलेल्या पारंपरिक शेतीला त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे वळण दिले. जाधव यांच्याकडे ७ एकर बागायत जमीन तर २ एकर जिराईत अशी ९ एकर जमीन आहे. यापूर्वी त्यांचे कुटुंबीय भुईमूग,सोयाबीन अशा पिकांचे उत्पादन घेत असत. १२ वर्षांपूर्वी सुदर्शन जाधव यांनी शेतीच्या आधुनिक तंत्राचा अभ्यास करून बागायत शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाच्या पाठीमागे कुटुंबीय ठामपणे उभे राहिले. प्रयोगशील शेती सात एकर पैकी दोन एकर शेतीमध्ये फळभाज्यांचे उत्पादन घेतले जाते. त्यासाठी शेतामध्ये विहीर बांधण्यात आली. सुरुवात कमी क्षेत्रांमध्ये फळभाज्या, पालेभाजी उत्पादन घेऊन केली. आता हे क्षेत्र वाढत चालले आहे. दोडका, कारले या भाजीपाल्यांची मागणी लक्षात घेऊन त्याकडे सुरुवातीला लक्ष पुरवले. विहिरीचे पाणी पिकांना दिले जात असल्याने शेतामध्ये मिल्चग तंत्रज्ञानाचा वापर करीत ठिबक सिंचन सुरू केले आहे. मिल्चग करताना वापरण्यात येणारी मशीन जाधव यांनी स्वत:च तयार केली आहे. पिकांसाठी लागणारे खत पाण्याद्वारे देण्यात येते. यामुळे खत, पाण्यात बचत होऊन उत्पन्नाची वाढ होते गेली. शेतीमध्ये अशी प्रयोगशीलता जोपासली जाते. लाभदायक अर्थकारण सुदर्शन जाधव यांनी एक एकर शेतीमध्ये केवळ गॅलन जातीच्या वांगीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. क्षेत्र कमी आणि उत्पन्न अधिक असे सूत्र या पिकातून त्यांना गवसले. गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी हे पीक घेण्यास सुरुवात केली आहे. वांग्याची लागवड केल्यापासून ७० व्या दिवसापासून उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. पुढील तीन ते चार महिने सुमारे ४० टन गॅलन वांग्याचे उत्पादन घेतले जाते. बाजारात सरासरी २५ रुपये किलो असा या गॅलन वांग्याला दर मिळतो. मुंबई, पुणे, गोवा, बेळगाव या बाजारामध्ये ती पाठवली जातात. गॅलन वांगी हे भरतासाठी तर गोव्यात माशाबरोबर खाण्यासाठी वापरले जाते. इतके सारे कष्ट घेतले जात असल्याने एकरी ८ लाखाचे उत्पन्न गॅलन वांग्यामुळे मिळते असे जाधव कुटुंबीय सांगतात. मशागतीचा २ लाख रुपये खर्च वजा केला तर ६ लाख रुपयांचा नफा त्यांना वर्षांखेरीस मिळतो. सोबत चार एकर मध्ये ते उसाचे पीक घेतात. सरासरी ४० ते ५० टन उसाचे उत्पन्न निघते. वर्षांअखेरीस १० ते १२ लाखाचे उत्पन्न शेतीमधून मिळते. पारंपरिक शेतीला बगल देऊन कमी जागेत नवतंत्रज्ञानाचा वापर करून नफा मिळवणे कसे शक्य आहे हे जाधव कुटुंबीयाने कृतीने सिद्ध करून दाखवले आहे.