हर्षल प्रधान

शीर्षस्थ नेतृत्व बदलू लागल्यावर भारतीय जनता पक्षाच्या हिंदूत्वाच्या व्याख्येत कमालीचा बदल झालेला आहे. जनसामान्यांचा पक्ष अशी ख्याती असलेल्या भाजपच्या लेखी हिंदूत्व हे केवळ आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांच्यापुरते मर्यादित झाले आहे. याउलट शिवसेनेचे हिंदूत्व हे सर्वसमावेशक रुजलेले आहे. म्हणूनच आमदारांनी बंडखोरी करूनही सामान्य जनता ही शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. त्या हिंदूत्वात दहशत, गद्दारी यांचा लवलेशही नाही. भाजप आणि शिवसेनेच्या हिंदूत्वाची खरे तर तुलना होऊ शकणार नाही. कारण शिवसेना हिंदूत्वनिष्ठ आहे. मात्र भाजपच्या हिंदूत्वात पदोपदी वाद दिसून आले आहेत. अथवा राजकीय स्वार्थासाठी भाजपने ते हेतूपूर्वक निर्माण केले आहेत. शिवसेनेने सर्वसमावेशक असे हिंदूत्व जोपासले असताना दुसरीकडे भाजपने राजकीय हिंदूत्व रसातळाला नेण्याचे पाप केलेले आहे. नुकताच आखाती देशांनी भाजप प्रवक्त्यांच्या विधानावर रोष प्रकट करून त्याची प्रचीती दिली आहे. महाशक्तीच्या नावाखाली हिंदूत्वाचा जो अपमान भाजपने केला आहे त्याने जगात भारताची बदनामी झाली आहे. भाजपच्या हिंदूत्वाचे वर्तुळ हे सत्तेपुरते मर्यादित आहे. तर शिवसेनेचे हिंदूत्व हे सामान्य माणसाच्या हितासाठी झटणारे, राष्ट्रीय हिताचे आहे, हे अनेकदा स्पष्ट झाले आहे.

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
Semiconductor project
सेमीकंडक्टर चिपच्या १.२६ लाख कोटींच्या ३ प्रकल्पांना मोदी सरकारची मंजुरी; ३ पैकी २ प्रकल्प गुजरातमध्ये
maharashtra budget analysis maharashtra deficit budget from last 15 years
गेल्या १५ वर्षांत तुटीच्या अर्थसंकल्पाकडे कल
good touch bad touch
मुलेही ‘गुडटच-बॅडटच’चे शिकार! सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख म्हणतात, घराचा वंश पुढे चालवू शकत नसल्याने…

गेली अडीच वर्षे किमान समान कार्यक्रमावर आधारलेले महाविकास आघाडी सरकार कार्यरत होते. या पद्धतीने भाजपनेही यापूर्वी अनेक राजकीय पक्षांसोबत सरकारे स्थापली आहेत. अगदी वंदे मातरम म्हणायला नकार देणाऱ्या मुफ्ती मोहम्मद सईद, भाजपचा द्वेष करणाऱ्या मायावती, भारत संघमुक्त करण्याची घोषणा देणारे नितीश कुमार अशी किती तरी उदाहरणे देता येतील. याउलट शिवसेनेचे आहे. अगदी बाळासाहेबांपासून ते उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत शिवसेनेने भाजपला नेहमी सन्मान दिला, तळहाताच्या फोडासारखे जपले आणि महाराष्ट्रात वाढवलेदेखील असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. अटलजी, अडवाणींपासून प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे ते अगदी नितीन गडकरींपर्यंत भाजपच्या पूर्वीच्या सगळय़ा नेत्यांनी बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्याशी जिव्हाळय़ाचे संबंध जोपासले ते त्यामुळेच. मात्र भाजपच्या नवनियुक्त शीर्षस्थ नेत्यांनी शिवसेनेला दिलेला मुख्यमंत्री पदाचा शब्द फिरवल्याने महाराष्ट्रात एक अपरिहार्य राजकीय उलथापालथ झाली आणि अचानक भाजपकडून शिवसेनेच्या हिंदूत्वावर संभ्रम आणि शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या. २०१४ साली मोदींना पंतप्रधान झाल्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती का तोडली गेली याचे उत्तर देण्यासाठी भाजपकडे आजही तोंड नाही. जवळजवळ तीन दशके चांगल्या-वाईट काळात सदैव पाठिंबा देणारी शिवसेना स्वत:चे भविष्य उज्ज्वल दिसायला लागल्यावर भाजपला नकोशी झाली, हा इतिहास भाजपला बदलता येणार नाही. तत्कालीन दिग्गज भाजप नेत्यांसमवेत शिवसेना आणि मातोश्रीने कौटुंबिक संबंध जोपासले. भाजपत आलेल्या नवीन नेतृत्वाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षांना २०१४ नंतर शिवसेना अचानक परकी वाटू लागली. शिवसेनेची गरज केवळ सत्तेपुरती मर्यादित करण्याचा भाजपकडून प्रयत्न झाला. शिवसेनेच्या नेतृत्वातले महाविकास आघाडी सरकार उलथवून लावण्याचे षडय़ंत्र भाजपच्या याच शीर्षस्थ नेतृत्वाने केले, हे लपून राहिलेले नाही.

रत्नागिरीत राष्ट्रवादी काँग्रेसची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी निवडणूक आघाडी

हजारो कोटी रुपयांचा अपव्यय, ४० आमदारांच्या सुरत, गुवाहटी, गोवा प्रवासासाठी चार्टर्ड विमाने, त्यांना पंचतारांकित सुविधा या सगळय़ाचा वापर शिवसेनेच्या नेतृत्वातले हिंदूत्वनिष्ठ सरकार उलथवून लावण्यासाठी केला गेला. त्यामुळे हे सगळे षडय़ंत्र हे हिंदूत्वासाठी नसून केवळ राज्याच्या सत्तेचे नियंत्रण स्वत:च्या हातात ठेवण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने केले हे स्पष्टच आहे. याला हिंदूत्वासाठीचा उद्रेक वगैरेची उपमा देऊन भाजप समर्थकांनी मूर्खाच्या नंदनवनात वावरू नये. हिंदूत्वात त्यागाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या भाजपत त्यागाचा लवलेशही दिसून येत नाही. कटकारस्थाने करून येनकेनप्रकारेण सत्ता मिळवणे या एकमेव उद्देशाने भाजपची वाटचाल सुरू आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई कसेही आणि काहीही करून, कुठल्याही थराला जाऊन ताब्यात घेणे हा या षडय़ंत्राचा भाग. हिंदूत्वाच्या नावाखाली धनाढय़, भांडवलदारांच्या घशात प्रगत मुंबई आणि महाराष्ट्र घालणे हा एकमेव उद्देश यामागे आहे. हिंदूत्वाच्या नावाने भांडवलदारांच्या अपेक्षा पूर्ण करून स्वत:चे आर्थिक हित साध्य करणे हा एकमेव हेतू यामागे आहे. एक प्रकारे केवळ राजकीय आणि आर्थिक आप्तस्वकीयांच्या उत्कर्षांसाठी केंद्रीय भाजपचा डोळा मुंबई- महाराष्ट्रावर आहे.

सुसंस्कृत, शालीन उद्धव ठाकरेंनी हिंदूत्वाच्या त्यागाची परंपरा कायम ठेवली. राज्याचे प्रमुख म्हणून इतक्या मोठय़ा पदाचा सहजतेने त्याग करताना उद्धव ठाकरेंचा त्याग हा भाजपच्या सत्तेच्या लालसेचा खरा चेहरा उघडा करून गेला. मुख्यमंत्री पद स्वीकारून अडीच वर्षांनी त्याचा सहज त्याग करताना उद्धव ठाकरे अधिक मोठे भासत होते. देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री अशी गणना होऊनही त्याचा कोणताही अहंभाव उद्धव ठाकरे यांच्या वागण्या- बोलण्यात कधीच जाणवला नाही. मुख्यमंत्री पदाचा मोह त्यांना कधी शिवला नाही. उलट ‘मला मुख्यमंत्री असल्यासारखे वाटतही नाही’ असेच ते सांगत आले. दुसरीकडे ‘मी पुन्हा येईन’ म्हणणारे देवेंद्र ‘आपल्याला आजही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते’ असे म्हटल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे भाजपने मोहाची परंपरा कायम ठेवली तर उद्धव ठाकरेंनी त्यागाची ठाकरे कुटुंबाची परंपरा जपली हा भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या वर्तणुकीतील मोठा फरक आहे. वर्षां ते मातोश्री उद्धव ठाकरेंचे साश्रुनयनांनी झालेले स्वागत हे नव्या मुख्यमंत्र्यांच्या छोटेखानी शपथविधीपेक्षा अधिक दिमाखदार आणि तेजस्वी ठरले. अडीच वर्षांत नैसर्गिक तसेच भाजपने उभ्या केलेल्या अनैसर्गिक आपत्तींना सामोरे जात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी केलेले कार्य महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल. शेतकरी कर्जमुक्ती, करोनाकाळातील सेवाभाव, पर्यावरण क्षेत्रातील  अनेक निर्णय, पुरातन मंदिरांचे संवर्धन इत्यादी अनेक निर्णय आणि जाता जाता संभाजीनगर, धाराशिव, दि.बा. पाटील ही नामांतरे उद्धव ठाकरेंच्या कार्यप्रणालीवर हिंदूत्वाचे शिक्कामोर्तब करणारी ठरली.

साताऱ्यात शिवसेनेपुढे अस्तित्वाची लढाई

लोकशाहीत डोकी मोजण्याची परंपरा भाजपने कायम ठेवली. अनपेक्षितपणे मुख्यमंत्री झालो आणि अनपेक्षितपणे पद त्यागतो आहे हे उद्धव ठाकरेंचे विधान सामान्यांच्या काळजाचा ठाव घेणारे होते. त्यातून केवळ आणि केवळ उद्धव ठाकरेंच्या मनातील स्वच्छ, निरागस आणि सुसंस्कृतपणाचे दर्शन अवघ्या देशाला घडले. मुख्यमंत्री पदावर असूनही नगरविकास मंत्रालयाचा कारभार आपल्या सहकाऱ्यास म्हणजेच एकनाथ शिंदेंना देण्याचे मोठे मन उद्धव ठाकरेंनी दाखवले. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केंद्रीय नेतृत्वाने दिलेली वागणूक भाजपला अधिकच निराशेच्या गर्तेत घालणारी ठरली. विविध विषयांचा व्यासंग असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना जे मुळात संविधानातच अस्तित्वात नाही असे दुय्यम दर्जाचे उपपद देऊन भाजपने स्वत:च्याच निष्ठावंताचे खच्चीकरण कसे करायचे त्याचे जिवंत उदाहरण महाराष्ट्राच्या इतिहासात नोंदवले. राज्य भाजपात अगोदरच बाहेरून आलेल्या उपऱ्यांकडून निष्ठावंतांची उपेक्षा सुरू असताना फडणवीसांचे मूल्य दाखवण्याची संधी घेण्यात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने कुठलीही कसर ठेवली नाही.

बंडखोरांच्या बाबतीत बोलायचे तर राजकारणात अनैसर्गिक आणि अनैतिक राजकीय संबंधांतूनच बंडखोरांचे पाळणे हलल्याचा आजवरचा इतिहास आहे. राजकारणात स्वत:ला अनाथ असल्याचे रडगाणे गाऊन झाल्यावर बंडखोरांचे राजकीय पालक ठरावीक वळणावर अचानक प्रकट होऊन पालकत्व  स्वीकारत आले आहेत. त्यातून राजकीय पालकांचा नफा-तोटा पूर्ण झाल्यावर बंडखोर खऱ्या अर्थाने अनाथ झाल्याचीच उदाहरणे आहेत. कालांतराने या अनाथांना आपल्या राजकीय सोयीसाठी कुणी तरी दत्तक घेऊन तुटपुंजे पुनर्वसन करून राजकीय स्वार्थ साधतो. त्यातील काहींचा राजकीय मालमत्ता म्हणून दुरुपयोग केला जातो तर बहुतांशी बंडखोरांना दायित्व म्हणून अडगळीत टाकले जाते. तात्कालिक राजकीय स्वार्थासाठी असे राजकारण अनेकदा देशभरात झाले आहे. अमर्याद राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी आपले कुटुंब सोडून भलत्याचीच साथ धरणारे सर्वच जण नंतर बळी ठरले आहेत. यातील बहुतांशी बंडखोर आज विस्मृतीत गेले आहेत. जे राजकीय क्षेत्रात आहेत ते पदरी पडेल ते पवित्र समजून मर्यादित आयुष्य जगताहेत.

अनैसर्गिक राजकीय पालकांच्या छत्रछायेत गेल्यावर या बंडखोरांचा आपल्या नैसर्गिक पालकांच्या आठवणीने ‘दाटून कंठ येतो’ याची भविष्यात प्रचीती येईलच. आमदारावर हिंदूत्व ठरत नाहीत, तर हिंदूत्वावर आमदार ठरतो हे शिवसेनेचे हिंदूत्व आहे. सत्तांतराच्या प्रयोगाने एक बाब निश्चित समोर आली. मुख्यमंत्री पदाचा त्याग करणाऱ्या उद्धव ठाकरेंचे मोठेपण अधिक मोठे झाले. मुख्यमंत्री पद गेले नाही तर त्यागले आहे, त्यामुळे ते गेल्याच्या यातना नाहीतच!

तसेही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेने दोन पावले पुढेच टाकली आहेत. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांतील अनुक्रमे ६३ आणि ५६ आमदार हे केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे निवडून आले.  तसेच गेल्या पाच वेळा शिवसेनेने मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली या महानगरपालिका उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली निवडून आणल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या सर्व निवडणुका उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेला उत्तरोत्तर अधिक उंची गाठून देतील यात कोणतीही शंका नाही.

लेखक शिवसेना जनसंपर्क प्रमुख आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत.