२४ सप्टेंबर २०१४, सकाळचे सात वाजून तीस-एकतीस मिनिटे! सर्व वाहिन्यांवर एकाच विषयावर चर्चा सुरू झाली, ती म्हणजे ‘मॉम’(मार्स ऑरबिटर मिशन) किंवा आपले मंगळयान यशस्वी होणार की नाही?
..यानाचा वेग कमी होण्यासाठी मोटर यशस्वीपणे सुरू झाल्यानंतर थोडय़ाच वेळात ते मंगळ ग्रहाच्या पलीकडे (पृथ्वीच्या दृष्टीने) गेले. त्याचा संपर्क तुटला. आता त्याचा हा ग्रहणकाळ संपल्यानंतरच काय झाले ते कळणार होते. त्यादरम्यान यानाची गती कमी होऊन ते योग्य दिशेने मार्गक्रमण करत आहे की नाही? त्याची अँटेना पुन्हा पृथ्वीच्या दिशेने झाली की नाही? मंगळाच्या कक्षेत हे यान स्थापिले गेले की नाही? या उत्कंठा वाढविणाऱ्या प्रश्नांने भारतीय शास्त्रज्ञ चिंताग्रस्त झाले होते. ‘इस्रो’च्या इस्ट्रॅक सेंटरमध्ये प्रत्येक जण आपआपल्या ‘स्क्रीन’वर डोळे लावून बसले होते. त्यांच्या सोबतीनेच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उत्कंठावर्धक अवस्थेत बसलेले. याच दरम्यान आठ वाजून एक-दोन मिनिटांनी यानाकडून पहिला सिग्नल आला आणि सर्वाना कळाले, की यान अपेक्षित कक्षेत मार्गक्रमण करीत आहे. टाळय़ांचा कडकडाट झाला. साऱ्यांनीच एकमेकांचे अभिनंदन केले. ‘इस्रो’चे अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन यांच्यावर तर अभिनंदनाचा वर्षांव झाला. यामध्ये खुद्द पंतप्रधानांचीही शाबासकी होती. पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत यशस्वीपणे यान पाठविणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला होता. गेले अनेक दिवस भारतीयांच्या मनात ही ‘मंगळ मोहीम’ रूं जी घालत होती. त्याचे हे यशस्वी पाऊल आज अंतराळ विश्वात एक नवा अध्याय रचून गेले. अगदी शास्त्रज्ञांपासून ते सामान्यांपर्यंत साऱ्यांचे लक्ष या मंगळ ग्रहाकडे वळले.
– अनुज जगताप, (शास्त्रज्ञ, इस्त्रो.)

अवकाशातील मंगळागौर 

Bank Holiday in May 2024 in Marath
१ मे शिवाय कोणत्या दिवशी बँकेचं काम होणार नाही? अक्षय्य तृतीयेला बँक बंद असणार का? पाहा सुट्ट्यांची यादी
Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
Rahu Shukra Yuti in meen rashi
विपरीत राजयोगामुळे दहा दिवसांमध्ये ‘या’ तीन राशींचे बदलणार नशीब , मिळणार गडगंज पैसा

‘क्युरियॉसिटी’कडून ‘मंगळयाना’चे स्वागत..
भारताचे मंगळयान मंगळ ग्रहाच्या कक्षेत येताच यानाला ‘सुखद धक्का’ बसला. मंगळयानाआधीच मंगळावर पाठविण्यात आलेल्या नासाच्या ‘क्युरियॉसिटी रोव्हर’तर्फे मंगळयानाचे स्वागत करण्यात आले. ‘नमस्ते, मार्स ऑर्बिटर, भारताच्या पहिल्या आंतरग्रह मोहिमेतील यशाबद्दल अभिनंदन,’ अशी मैत्रीपूर्ण ट्विप्पणी अमेरिकी अंतराळ संस्थेच्या – ‘नासा’च्या क्युरियॉसिटी रोव्हरच्या वतीने करण्यात आली. या ट्विप्पणीस भारताच्या मंगळयानाने ‘तू कसा आहेस? संपर्कात राहूया, मी जवळच आहे,’ असे उत्तर दिले.’
मंगळ ग्रहाविषयी..
*मंगळ हा सूर्यमालेतला चौथा ग्रह आहे.
*मंगळाचा व्यास हा पृथ्वीच्या व्यासाच्या निम्मा आहे.
*मंगळाचा दिवस हा २४ तास ३९ मिनिटांचा असतो, तर मंगळाचे वर्ष ६८७ पृथ्वी-दिवसांचे असते. मंगळाचा अक्ष हा पृथ्वीप्रमाणेच एका दिशेला २५ अंश कललेला आहे.
*मंगळावर ऋतू (उन्हाळा आणि हिवाळा) आहेत. मंगळ हा पृष्ठभागावर जमीन असलेला सूर्यमालेतील शेवटचा ग्रह आहे. त्या पलिकडील ग्रह म्हणजे गुरू, शनी, युरेनस वगैरे ग्रहांचा पृष्ठभाग हा वायुस्थितीत आहे.
*मंगळावरील तापमान हे ध्रुवीय प्रदेशात उणे १४५ अंश, तर विषुवृत्तीय प्रदेशात ३५ अंश सेल्सियस इतके आहे.
*या सर्व साधम्र्यामुळे मंगळ ग्रहाबद्दलची उत्सुकता सर्व पृथ्वीवासीयांना फार पूर्वीपासून आहे. मंगळावर वातावरण आहे की नाही? मंगळावर पाणी आहे का? किंवा कधीकाळी होते का? मंगळावर जीवसृष्टी होती का? अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा ध्यास गेली कित्येक दशके अनेक देशांनी घेतला आहे. यात अर्थातच रशिया, अमेरिका, युरोपीय संघ हे देश आघाडीवर होते.
काय आहे मोहीम?
*मंगळावर पोहोचण्यासाठी मुख्य अडथळा होता तो लागणाऱ्या इंधनाचा. पृथ्वी, सूर्य आणि मंगळ हे अंतराळात विशिष्ट स्थितीत आले असता सर्वात कमी इंधनाद्वारे यान पृथ्वीवरून मंगळावर जाऊ शकते. अशी परिस्थिती दर २६ महिन्यांनी येते. नोव्हेंबर २०१३ ला अशी परिस्थिती होती. त्याचाच फायदा घेण्याचे भारताने उड्डाण करण्याचे ठरवले.


* यानाच्या उड्डाणातला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे त्याचे वजन. या वजनाचे मुख्यत: तीन घटक असतात. यानाचे वजन, त्यातील उपकरणांचे वजन आणि यानाला लागणाऱ्या इंधनाचे वजन. यात सर्वात जास्त वजन हे इंधनाचे असते. म्हणून कमीत कमी इंधनात उड्डाण करण्याकडे शास्त्रज्ञांचे प्रयत्न असतात.
* अत्यंत कमी वेळात म्हणजे १६ ते १८ महिन्यात मंगळयानाचे काम ‘इस्रो’च्या शेकडो शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांनी अथकपणे प्रयत्न करून पार पाडले.
* मंगळयान मोहीम यशस्वी करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. आत्तापर्यंत फक्त अमेरिका (नासा), रशिया आणि युरोपीय संघ याच देशांनी मंगळाकडे यशस्वीपणे यान पाठवले आहे.
* मंगळा मोहिमांत आत्तापर्यंतच्या ५१ प्रयत्नांत फक्त २१ मोहिमा यशस्वी झाल्या आहेत. त्यातल्या बहुतेक फक्त मंगळाच्या जवळ जाणे एवढय़ापुरत्याच मर्यादित होत्या.
* या मोहिमेचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे यासाठी आलेला खर्च. जगातील सर्वात कमी खर्चाच्या या मोहिमेसाठी फक्त ४५० कोटी रुपये एवढा खर्च आला.
मंगळस्वारीची गाथा
५ नोव्हेंबर २०१३ श्रीहरीकोटा येथील ‘सतीश धवन स्पेस सेंटर’मधून मंगळयानाचे ‘पीएसएलव्हीसी २५’ या रॉकेटद्वारे अवकाशात उड्डाण झाले. सुमारे वीस मिनिटांत पाच टप्प्यांत हे यान पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकर कक्षेत फिरू लागले. सुरूवातीस २३५५० किलोमीटर असलेली कक्षा यानावर असलेल्या ‘रॉकेटस’च्या साहाय्याने पूर्वनियोजित सहा प्रयत्नांद्वारे सुमारे १ लाख ९३ हजार किलोमीटपर्यंत वाढवण्यात आली.
१ डिसेंबर २०१३ रोजी हे यान पृथ्वीची कक्षा सोडून ‘हेलिओसेंटरिक’ म्हणजे सूर्यमालेतील ग्रह जसे सूर्याभोवती फिरतात तशा प्रकारच्या कक्षेत सोडण्यात आले. या कक्षेतून मंगळयान मंगळ ग्रहाच्या दिशेने प्रवास करू लागले.
डिसेंबर २०१३ ते सप्टेंबर २०१४ सुमारे १० महिन्यात या यानाने जवळजवळ ६५ कोटी किलोमीटर एवढे अंतर कापले.
२२ सप्टेंबर २०१४ रोजी मंगळयानाने मंगळाच्या ‘स्फिअर ऑफ इन्फ्ल्युअन्स’ म्हणजे गुरुत्वाकर्षण कक्षेत प्रवेश केला. त्यावेळी ३०० दिवस निद्रावस्थेत असलेली ‘लिक्विड अ‍ॅपोजी मोटर’ ४ सेकंदांसाठी प्रज्वलित केली गेली. ही मोटर यशस्वीपणे सुरू झाल्याने मंगळयानाची मंगळग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे स्थिरावण्याची शक्यता वाढली
२४ सप्टेंबर २०१४
सकाळी ४.१५ : मंगळयानाचा मिडीयम गेन एन्टेना कार्यान्वित
सकाळी ६.५६ : मंगळयानाच्या रोटेशनला सुरुवात
सकाळी ७.१२ : यानाचे एक्लिप्स सुरू करण्यात आले
सकाळी ७.१७ : लिक्विड अ‍ॅपॉजी मोटर इंजीन प्रज्वलित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात
सकाळी ७.२९ : इंजीन प्रज्वलित केल्यानंतर यानाचा सिग्नल दिसेनासा झाला
सकाळी ७.३० : लिक्विड अ‍ॅपॉजी मोटोर इंजीन प्रज्वलित करण्यात यश
सकाळी ७.३७ : यानाचे एक्लिप्स बंद करण्यात आले.
सकाळी ७.४१ : मंगळयानाची प्रज्वलन प्रक्रिया पूर्ण
सकाळी ७.४२ : मंगळयानाच्या रिव्हर्स रोटेशनला सुरुवात
सकाळी ७.४५ : मंगळयानाचा सिग्नल पुन्हा मिळण्यास सुरुवात
सकाळी ७.५२ : यानाचा मंगळाच्या कक्षेत प्रवेश
मंगळयान मोहिमेतील यशाचे मानकरी
के. राधाकृष्णन
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे( इस्रो) प्रमुख असलेले राधाकृष्णन हे यावर्षांच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. मंगळयानाचे यश ही त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च कामगिरी आहे यात शंकाच नाही. स्वदेशी बनावटीच्या भूस्थिर उपग्रह प्रक्षेपकाची यशस्वी चाचणीही त्यांच्याच काळात झाली. त्यांना कथकली नृत्याची आवड आहे.
व्ही. कोटेश्वर राव
इस्रोचे वैज्ञानिक सचिव असलेले कोटेश्वर राव हे लॅबोरेटरी फॉर इलेक्ट्रो ऑप्टिक सिस्टीम्सचे माजी संचालक व अ‍ॅस्ट्रोसॅट उपग्रह मोहिमेचे प्रकल्प संचालक होते. मंगळ मोहिमेत पाठवण्यात आलेल्या प्रणालींचे विविध भाग बनवण्यात त्यांची मोठी भूमिका आहे.

एस. अरूणन
हे मंगळ मोहिमेचे प्रकल्प संचालक आहेत, एखाद्या मोहिमेचे प्रकल्प संचालक म्हणून काम करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे. बारा महिन्यात मार्स ऑर्बटिर यान तयार करण्याची करामत त्यांनी करून दाखवली आहे.

एम. अण्णादुराई
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या २००८ मधील चांद्रयान-१ मोहिमेचे ते प्रकल्प संचालक होते. चांद्रयान २ मोहिमेचे प्रकल्प संचालकपदही त्यांच्याकडे आहे. मंगळयान मोहिमेवर र्सवकष लक्ष ठेवण्याचे काम त्यांनी केले. सध्या ते दूरसंवेदन उपग्रह व छोटे उपग्रह कार्यक्रमाचे प्रकल्प संचालक आहेत.
मीनल संपत
मंगळ मोहिमेत अगदी मोजक्याच महिला वैज्ञानिकांनी काम केले आहे, त्यातील प्रमुख वैज्ञानिक असलेल्या मीनल संपत यांनी मंगळयानाच्या मोहिमेत दोन वष्रे काम केले. त्या रोज अठरा तास काम करीत होत्या. कालमर्यादा पाळणे हे आवश्यक असते याची चांगली समज असल्याने आपण नेटाने या मोहिमेसाठी काम केले असे त्या सांगतात. सिस्टीम इंजिनीयर म्हणून त्यांनी मोठी भूमिका पार पाडली आहे. लहानपणी आपण एका यानाचे उड्डाण टीव्हीवर पाहिले होते व तेव्हा आपणही अशा ठिकाणी काम करावे अशी इच्छा होती व आज आपण इस्रोत काम करीत आहोत, असे त्यांनी सांगितले. इस्रोच्या मंगळ मोहिमेत ५०० वैज्ञानिक आहेत. मंगळयानावर जी उपकरणे आहेत त्यातील तीन तयार करण्याच्या पथकात संपत यांनी काम केले. उड्डाणाच्या आधीच्या काळात आपण शनिवार, रविवार या सुट्टयांनाही काम करीत होतो. इस्रोत काम करताना कधीही आपण स्त्री आहोत म्हणून वेगळी वागणूक कुणी दिली नाही, तेथे समानता बघायला मिळाली, आपण स्त्री आहोत हे मी तेथे काम करताना विसरून गेले. मंगळ मोहिमेत केवळ दहा महिला वैज्ञानिक होत्या, हे चित्र बदलले पाहिजे. महिलांना हे आपण करू शकतो असा आत्मविश्वास वाटला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हे काम करताना त्यांना कौटुंबिक आयुष्य बाजूला ठेवावे लागले. मुलगा आजारी असला तरी त्याच्यासाठी काही करता येत नसे, पण कुटुंबाने दिलेली साथही मोलाची होती. त्यांच्या मते स्वप्ने पाहता येतात व ती खरीही होतात. आपण आपले जीवन घडवू शकतो असा त्यांचा महिलांना संदेश आहे.स्टार सेन्सर्सचे गमक
चांद्रयानाच्या यशानंतर भारतीय अंतराळ संस्थेने (इस्रो) मंगळ मोहीम जाहीर केली. या वेळेस केवळ मंगळाचा वैज्ञानिक अभ्यास करणे एवढाच एकमेव उद्देश समोर नव्हता. तर एखादे यान परग्रहावर पोहोचविण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान विकसित करण्याचे आव्हान या मोहिमेत वैज्ञानिकांनी स्वीकारले होते. यात सर्वात पहिली अडचण होती, ती म्हणजे नेव्हिगेशनची, कारण आपण चंद्राच्या पलीकडे कधीच कोणतेही अवकाशयान पाठविले नव्हते. यामुळे मंगळयानासाठी पृथ्वीवरून संदेश पाठविणारी आणि पृथ्वीवर येणारा संदेश ग्रहण करणारी या दोन्ही यंत्रणा सक्षम करणे गरजेचे होते. यातही मोठी अडचण होती ती म्हणजे पृथ्वी आणि मंगळ यातील अंतराची. हे अंतर खूप जास्त असल्यामुळे आपल्याला मंगळयानातील संगणक हा इतका सक्षम करण्याची गरज होती, की वेळप्रसंगी ते यान स्वत: छोटेछोटे निर्णय घेऊ शकेल. यामुळे मंगळयानात आपल्याला स्टार सेन्सर लावण्याची गरज होती. पृथ्वीवर आपण मार्ग शोधण्यासाठी ज्याप्रमाणे जीपीएसचा वापर करतो तसाच अंतराळात मार्ग शोधण्यासाठी ताऱ्यांची मदत घ्यावी लागते. हे सेन्सर संगणकात अपलोड केलेल्या मार्गिका तक्त्यावरील ताऱ्यांचे फोटो घेतात आणि ते संगणकाला पाठवतात. यातून यान आपला मार्ग ठरवीत पुढे जाते. यानंतरची एक समस्या होती ती म्हणजे अंतराळात वातावरण खूप थंड असते. अशा वातावरणात इलेक्ट्रॉनिक सर्किट्सना काम करण्यात कोणत्या अडचणी येऊ शकतात हे तपासण्यासाठी प्रत्येक उपकरणाची हुबेहूब प्रतिकृती बनवली जाते. यानामध्ये उपकरणांसाठी योग्य ती जागा मोकळी सोडली जाते. आपल्या यानाची आणखी एक खासियत होती, ती म्हणजे हे यान कमीत कमी इंधनामध्ये प्रवास करणारे होते. इंधनाचा वापर कमी व्हावा यासाठी सूर्याच्या गुरूत्वाकर्षणाचा वापर करण्यात आला.
या मोहिमेतून काय मिळणार
या मोहिमेतून आपल्याला अनेक फायदे होणार आहेत. यात भारतही अशा प्रकारची मोहीम यशस्वी करू शकतो हे जगाला दाखवून दिले. याचबरोबर कमी खर्चात चांगली मोहीम कशी यशस्वी होऊ शकते याचा दाखलाही या मोहिमेतून मिळाला आहे, कारण ही मोहीम अमेरिकेतील मोहिमांच्या तुलनेत पाचपट कमी खर्चात आखून यशस्वी करण्यात आली आहे. याचाच अर्थ असा होतो की, आपण व्यावसायिक पातळीवर खूप चोख आहोत. इस्रो वर्षांला जेवढी व्यावसायिक उड्डाणे घेते त्यातून इस्रोच्या अर्थसंकल्पापेक्षा जास्त नफा होतो. यातूनच इस्रो ही एक आर्थिकदृष्टय़ा सक्षम संस्था म्हणून उभी राहिली आहे. या यानाच्या जडणघडणीत विकसित करण्यात आलेले विविध प्रकारचे तंत्रज्ञान हे भविष्यात सामान्यांपर्यंत पोहोचून ते उपयुक्त ठरू शकणार आहेत. या मोहिमेच्या यशामुळे इस्रोला भावी प्रकल्पांसाठी मोठे प्रोत्साहन मिळाले असून आता इस्रो चंद्रावर रोव्हर उतरवू शकेल किंवा अंतराळात मानवी मोहीमही यशस्वी करू शकेल.
– डॉ. अनिकेत सुळे
(लेखक होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात खगोलशास्त्राचे प्राध्यापक आहेत.)
इस्रोच्या मंगळयान मोहिमेचे यश ही ऐतिहासिक कामगिरी असून देशाला या वैज्ञानिकांचा अभिमान वाटतो, त्या सर्वाचे आपण अभिनंदन करतो.
– राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
भारतासाठी हा स्मरणीय दिवस आहे. सर्व देशवासीयांबरोबर आपण या वैज्ञानिकांच्या कामगिरीला सलाम करतो. आपले वैज्ञानिक यशाची अशीच शिखरे पादाक्रांत करीत राहतील व देशासाठी कौतुकास्पद कामगिरी करतील अशी आशा आहे.
– उपराष्ट्रपती हमीद अन्सारी
इस्रोच्या वैज्ञानिकांची कामगिरी पुढील पिढय़ांना प्रेरणा देणारी आहे. मंगळयानामुळे भारताने स्पृहणीय कामगिरी केली आहे. स्वातंत्र्यानंतर सुरू झालेल्या प्रवासातील हा महत्त्वाचा टप्पा आहे. धैर्य, एखाद्या गोष्टीची आवड अन ध्यास, कल्पकता यामुळे राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील वैज्ञानिकांनी ही मोहीम यशस्वी केली.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी</strong>
मावेन टीमकडून इस्रोचे व मार्स ऑरबिटर यानाचे स्वागत.
– नासा

सोशल मीडियावरही ‘मंगळ’मय गाथा
भारताची मंगळमोहीम यशस्वी झाली आणि जगभरातून भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) वर शुभेच्छांचा वर्षांव झाला. अनेकांनी हा आपल्यासाठी आणि देशासाठी कसा अभिमानाचा क्षण आहे हे आपल्या फेसबुक, ट्विटरवरून शेअर केलेच पण व्हॉट्स अ‍ॅपवर वुई रिच ऑन मार्स, टुडे इज मंगळवार असे स्टेटस अपडेटही केलेले पहावयास मिळाले. बुधवारी पहाटेपासूनच सोशल मिडिया हॅंडलवर  #Mangalyaan, #ISRO, #MarsMission हे हॅश टॅग ट्रेंड करत होते. साधारण आठ वाजता मंगळयानाने यशस्वीरित्या मंगळाच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर लागलीच #IndiaonMars #JaiHind, #ProudIndian हे हॅशटॅगही  ट्रेंड करू लागले. याचबरोबर व्हॉट्सअ‍ॅपवरही मंगळयानासंदर्भातील जोक्स फिरू लागले.
पीएसएलव्ही
मंगळयान ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक म्हणजे पीएसएलव्ही सी २५ या प्रक्षेपकाच्या मदतीने सोडण्यात आले. पीएसएलव्ही प्रक्षेपकानेच चांद्रयान प्रक्षेपणात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. इस्रोचा तो भरवशाचा उपग्रह प्रक्षेपक मानला जातो. त्याच्या मदतीने मार्स ऑर्बिटर सॅटेलाईट म्हणजे मंगळयान पृथ्वीच्या बाहेर नेऊन सोडण्यात आले. हा एकूण चार टप्प्यांचा अग्निबाण असतो. त्याची उंची ४४.४ मीटर असून ३२० टन वस्तुमान वाहून नेण्याची त्याची क्षमता असते, त्यात घन व द्रव इंधने वापरलेली असतात. इंधनाच्या ज्वलनाने अग्निबाणावर खालच्या बाजूने जोर निर्माण होऊन तो पुढे जातो.
क्रायोजेनिक इंजिन
क्रायोजेनिक इंजिन हे भूस्थिर उपग्रह प्रक्षेपकात वापरले जाते. भारताला १९९१ मध्ये अमेरिकेच्या सांगण्यानुसार रशियाने क्रायोजेनिक इंजिने देण्याचे नाकारले तेव्हा भारताने दहा-पंधरा वर्षांत ती विकसित केली. अग्निबाणात क्रायोजेनिक इंजिन वापरल्याने तो जास्त वजन वाहून नेऊ शकतो. त्यात द्रव हायड्रोजन व द्रव ऑक्सिजन ही इंधने असतात, ही इंधने उणे १८३ (ऑक्सिजन) व उणे २५३ (हायड्रोजन) तापमानाला असतात. त्यामुळे अग्निबाणाला ७३.५ किलोन्यूटन इतका जोर मिळतो.
यानाला संदेश कसे पोहोचतात..
इस्रोने ब्यालूलू येथे एक मोठा रेडिओ लहरी अँटेना सुरू केलेला आहे तसेच बंगळुरू येथे टेलिमेट्री केंद्र आहे. टेलिमेट्री केंद्रात इलेक्ट्रॉनिक भाषेत तयार केलेला संदेश नंतर ब्यालूलू केंद्राकडे जातो व तेथून तो रेडिओ लहरींच्या मार्फत यानाकडे जातो.  यानाकडून येणारे संदेशही रेडिओलहरींच्या माध्यमातून सरमिसळ होऊन येत असतात. त्यामुळे इतक्या लांब अंतरावर असलेल्या यानावरील अँटेना या लहरी ग्रहण करून पृथ्वीवरून पाठवलेले संदेश संग्रहित करून त्यानुसार काम करते. मंगळयान हे सकाळी ११ ते रात्री अकरा भारतातून अँटेनाला दिसते. इतर वेळी ते गोल्डस्टोन, कॅनबेरा, माद्रिद येथील केंद्रावरील रेडिओ अँटेनांना दिसत असते.
संकलन : नीरज पंडित, राजेंद्र येवलेकर