‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँक’ यांनी आयोजित केलेल्या ‘बदलता महाराष्ट्र‘ या उपक्रमाचे पाचवे पर्व १५ व १६ सप्टेंबर रोजी पुण्यात पार पडले. विषय होता : ‘सामाजिक चळवळींचा बदलता चेहरा’. राज्याच्या समाजजीवनातील मातब्बर अभ्यासक, कार्यकर्ते यांनी या परिषदेत धर्म, श्रद्धा, जात, सुधारणेच्या चळवळी आणि आजचे सामाजिक वास्तव अशा विविध मुद्दय़ांचा वेध घेतला, विचारमंथन केले. हे प्रश्न तसे वादाचे; पण त्या वादांमधून तत्त्वबोधच व्हावा याच भावनेने ही वादसभा पार पडली. अनेक व्यासंगी, ज्येष्ठ आणि तरुण मंडळींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या ठोस आणि विधायक चर्चेचा हा सारांश..
धर्मसुधारणा आणि आजची आव्हाने
सर्वच धर्मामधील सुधारणावाद्यांनी एकत्र येणे गरजेचे
बहुतेक धर्माची निर्मिती आणि त्यांची तत्त्वे, नियम, आचारविचार तयार होऊन शेकडो वर्षे उलटली आहेत. मधल्या काळात या साऱ्यांमध्ये अनिष्ट रूढींचाही शिरकाव झाल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. चिरंतन सत्य सोडून आचरण तत्त्वे महत्त्वाची ठरू लागल्याने हा गोंधळ वाढीस लागला. याला मुस्लिमांचे कुराणही अपवाद नाही. यातूनच धर्मगुरूंचे महत्त्व वाढले. ही मंडळी सांगतील तोच धर्म अशी समाजाची धारणा झाली. मग अशा वेळी नकळतपणे धर्मातील या उलेमा, महंत, योगी, मिशनरी वा धर्मगुरूंकडूनच दहशतवाद सुरू झाला. त्यांना विरोध करणाऱ्यांना मारून टाकण्यापर्यंत मजल गेली. धर्मसुधारणेच्या चळवळीपुढे अशा धर्मगुरूंचेच मोठे आव्हान आहे.
गेल्या काही वर्षांत जागतिकीकरणामुळे निर्माण झालेला साम्राज्यवाद आणि धर्माध हिंसक शक्ती ही आणखी दोन महत्त्वाची आव्हाने या धर्मसुधारणेच्या कार्यापुढे उभी ठाकली आहेत. मुस्लीम जगात तर ही गोष्ट खूप प्रामुख्याने दिसत आहे. अमेरिकेने सौदी अरेबियासारख्या देशांना हाताशी धरून सुन्नी मुसलमानांचे अतिरेक्यांमध्ये रूपांतर केले आहे. यामुळे आज अनेक मुस्लीम देशांत शिया-सुन्नी दंगे सुरू झाले आहेत. यामागे वरकरणी धार्मिकतेचा रंग दिसत असला तरी त्यामागे खरे तर आर्थिक हितसंबंध दडलेले आहेत. हे असे अराजक निर्माण करायचे आणि त्यातून साम्राज्यवाद पोसायचा हेच अमेरिकेचे अनेक ठिकाणी धोरण आहे. हिंदू धर्म हा सहिष्णुतावादी, सर्वसमावेशक, अहिंसक म्हणून आजवर ओळखला जात होता; पण गेल्या काही वर्षांमध्ये या धर्मातही उजव्या धर्माध शक्तीचा शिरकाव झाला आहे. या एकूणच बदललेल्या सामाजिक-आर्थिक स्थितीमध्ये धर्मसुधारणेची चळवळ पुढे चालू ठेवणे खूप अवघड झाले आहे.
कालपरत्वे प्रत्येक धर्मात बदल आवश्यक असतात. साचलेपणा, कालबाह्य़ गोष्टी दूर करणे आवश्यक असते. यालाच ‘धर्मसुधारणा’ असे आपण म्हणतो. या धर्मसुधारणा अनेक शतकांपासून सुरू आहेत. या सुधारणा करताना सध्याच्या सामाजिक, आर्थिक आणि मुख्य म्हणजे राजकीय स्थितीचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. या साऱ्यांचा अभ्यास करत आणि एकेका मुद्दय़ावर स्वतंत्र लढा देण्यापेक्षा एकत्र येत मार्ग शोधले पाहिजेत.
आपल्याकडील समाजकारण, अर्थकारण आणि मुख्य म्हणजे राजकारणाचा धर्म स्थायिभाव बनला आहे. यामुळे तो समाजातून दूर करणे शक्य नाही; पण परिवर्तन शक्य आहे. यासाठीच सर्व सुधारणावाद्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. या वेळी धर्माच्या जमेच्या बाजू लक्षात घ्याव्यात, त्यातली सामाजिक ताकद लक्षात घ्यावी, मानवतावादी रूप ध्यानात घ्यावे आणि या साऱ्यांचा उपयोग करत सुधारणेचा मार्ग धरावा. असे केल्यास हाच धर्म समाजाला बांधून ठेवणारा- प्रगतीकडे घेऊन जाणारा घटक ठरेल.
प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, ज्येष्ठ विचारवंत  

सामाजिक हितासाठी धर्म व राजकारण वेगळे हवे
धर्म व जात हे इच्छेने मिळत नसतात, त्यामुळे त्यास फार चिकटून राहणे चुकीचे आहे. जाती-धर्मातून बाहेर आल्याशिवाय सर्व धर्माकडे समानतेने पाहण्याची दृष्टी मिळू शकत नाही तसेच इतरांच्या चांगल्या गोष्टी आपल्याला दिसतही नाहीत. धर्माची व्याख्या काय? तर माणसाला माणसाशी जोडण्यासाठी जे सांगितले जाते, त्याला धर्म म्हटले जाते. त्याचप्रमाणे, माणसाला माणसापासून तोडण्यासाठी जे सांगितले जाते, तो अधर्म मानला जातो. वर्षांनुवर्षे धर्म बाह्य़ गोष्टींना चिकटून राहिला आहे. आपण देव नाकारत नाही, मात्र त्याची कल्पना करणे नाकारतो. आपल्याला मानवी नियोजनामध्ये देवाला घ्यावेसे वाटत नाही, असे म्हटले तर गैर काय आहे.
धर्मामध्ये नैतिकता असते. समाज टिकण्यासाठी जे जे आवश्यक आहे, ते म्हणजे नैतिकता. हे सर्व करण्याकरिता देवाला अथवा धर्माला मध्यस्थ करण्याची काय गरज आहे? माणसाने खोटे बोलू नये किंवा चोरी करू नये, हे देवाने सांगितले आहे, असे म्हणण्याची काय गरज आहे. नैतिकतेसाठी धर्माचा आधार असतो, मात्र अनैतिक कृत्ये करण्यासाठीदेखील धर्माचा आधार घेतला जातो आणि धर्माचा आधार न घेताही माणसे नैतिक असू शकतात. हिंदूू धर्मामध्ये सहिष्णुता, दया, क्षमा, शांती आहे आणि केवळ अतिरेकी निर्माण करण्यासाठी इस्लाम तयार झाला, अशा प्रकारे आपण एकमेकांशी बोलतो. हे फार घातक आहे. सामाजिक हितासाठी धर्म व राजकारण वेगळे झाले पाहिजे. इतर देशांत धर्म व राजकारण वेगळे करण्याचे कारण नसते, कारण बहुतांश जनता एकधर्मीय असते. भारतातील राजकारण धर्मातीत असेच राहिले पाहिजे. कोणत्याही एका धर्माच्या हातात गेले तर भारताचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही.
डॉ. कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत

धर्मग्रंथांचा नव्याने अर्थ लावणे आवश्यक
मानवी जाणिवा, संवेदना आणि ज्ञान सतत बदलत, विकसित आणि विस्तारित असते. याचा परिणाम भोवतीच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जीवनावरही होतो तसाच तो धर्मावरही होतो. यामुळे अनेकदा श्रद्धा, मूल्ये, आचार आणि कार्यपद्धती बदलतात. या साऱ्यांमुळेच कुठल्याही धर्मात सुधारणा या वेळोवेळी कराव्याच लागतात. हे बदल न करणाऱ्या धर्माकडे मग लोक पाठ फिरवतात.
धर्माने नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. यासाठी त्या धर्माला विवेक आणि वैज्ञानिक दृष्टी असली पाहिजे. या दोन गोष्टी नसतील तिथे अंधश्रद्धा तयार होण्याचा धोका असतो. हा दृष्टिकोन ठेवल्यामुळे आम्ही आमच्या धर्मातील अनेक कालबाह्य़ रूढी रद्द केल्या. लॅटिन भाषेऐवजी लोकभाषेचा वापर, धर्मगुरू नसलेल्यांनाही बायबल वाचनास परवानगी, चर्चच्या कारभारात धर्मगुरूंबरोबर धर्मातील अन्य लोकांचा प्रवेश असे अनेक बदल हे या धर्मसुधारणा प्रक्रियेचेच भाग होते. अनेकदा धर्माच्या बाबतीत श्रद्धा म्हणून असणारी एखादी गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर चुकीची ठरली तर तिचा त्याग करता आला पाहिजे. धर्माचे क्षेत्र हे केवळ अध्यात्म आणि नीतीपुरते असावे. जगात आता बहुधार्मिक आणि बहुसंस्कृतीची परंपरा रुजली असल्याने कुठेही अशी एकाच धर्माची राजसत्ता असणे हे त्या राष्ट्रासाठी धोक्याचे ठरू शकते. धर्मग्रंथ मानण्यात काही गैर नाही; पण ज्यांनी हे ग्रंथ लिहिले त्यांच्या जाणिवा व ज्ञान यांनाच मुळात काळाच्या मर्यादा होत्या. यामुळे या धर्मग्रंथांनाही मर्यादा असल्याचे लक्षात ठेवावे. यामुळेच धर्मग्रंथांचा नव्याने अर्थ लावणे, त्यांचा वर्तमानाशी जोडून अन्वयार्थ लावणे आवश्यक आहे.
बिशप थॉमस डाबरे, धर्मगुरू, संत साहित्याचे अभ्यासक
जातिअंताचा मार्ग कोणता?
जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठीचे तत्त्वज्ञान निर्माण करावे लागेल
जाती व्यवस्था हा आपल्या समाजातला महत्त्वाचा प्रश्न आहे. तो टाळून सुटणार नाही. मुळात माणूस शेतीप्रधान व्यवस्थेत स्थिरावयाला लागला तशी जित-जेते संबंधातून जात निर्माण झाली. कोणतीही रचना टिकवण्याचे समर्थन केल्याशिवाय, त्यासाठीचे तसे तत्त्वज्ञान निर्माण केल्याशिवाय ती गोष्ट टिकवता येत नाही. जाती व्यवस्था निर्माण करण्यासाठी तसे तत्त्वज्ञान निर्माण केले गेले. जात देवाने निर्माण केली आहे, अमक्या जातीत जन्म म्हणजे गेल्या जन्मीचे भोग, आपल्या जातीचे पालन हा धर्म, असे तत्त्वज्ञान लोकांच्या मनावर बिंबवले गेले. तसेच आता जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठीचे तत्त्वज्ञान निर्माण करावे लागेल. ज्यांना बदल घडवायचा असतो, त्यांना तत्त्वज्ञानाची गरज असते. त्यामुळे जात नष्ट करण्याचे तत्त्वज्ञान हे जाणीवपूर्वक निर्माण करावे लागेल. काही लोक असे म्हणतात की, जाती कधीच नष्ट होणार नाहीत. जे गौतम बुद्धापासून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या भल्याभल्यांना जमले नाही, ते आता काय जमणार आहेत.. त्यातूनच ‘जात नाही ती जात’, अशा म्हणीही निर्माण केल्या गेल्या आहेत; पण एके काळी ज्ञानबंदी होती, स्पर्शबंदी होती, रोटीबंदी होती. या बंदी आज उरलेल्या नाहीत. बेटीबंदीही हळूहळू कमी होते आहे. हे बदल झालेले आपण पाहतो आहोत. जातींची दाहकता कमी झाली आहे. त्यामुळे प्रयत्न केला तर हळूहळू परिस्थिती नक्कीच बदलेल; पण म्हणून आपण शांत बसून चालणार नाही. एखादी गोष्ट अन्यायकारक आहे हे आपल्या लक्षात आले तरी आपल्याला नुसता राग येऊन चालत नाही, तर त्या रागाला तर्कशुद्ध विचारांची जोड द्यावी लागते, कारण हितसंबंधांचा मुकाबला संघर्षांनेच करावा लागतो. संघर्ष न करता जाती व्यवस्था नष्ट होईल असे कुणाला वाटत असेल, तर ते चुकीचे आहे. जातिअंतासाठी संघर्षांला पर्याय नाही.
कॉम्रेड गोविंद पानसरे,  ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते

जन्मामुळे मिळालेले अधिकार उच्च जातींनी नाकारावेत
जातिअंत यापेक्षा जाती निर्मूलन हा शब्दप्रयोग अधिक समर्पक वाटतो. जाती निर्मूलनाच्या विषयावर चर्चा खूप होतात, मात्र हा विषय कृतीच्या पातळीपर्यंत आल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत. भारतातीत जाती व्यवस्थेत बदल होतात; पण ती मुळापासून बदलत नाही किंवा नष्ट होत नाही. त्याचे कारण वर्षांनुवर्षे आणि पिढय़ान्पिढय़ा जाती व्यवस्थेतील बारकावे, पद्धती, कारणे, परिणाम यांबाबत असलेली सामूहिक निद्रावस्था (कलेक्टिव्ह अनकॉन्शस). आपल्याकडील बहुतेक सर्व सामाजिक, आर्थिक समस्यांचे कारण हे जाती व्यवस्था आहे आणि त्याच वेळी या समस्या हा जाती व्यवस्थेचाच परिणाम आहेत. कारण नष्ट करण्यासाठी उपाय केला, की त्याचा परिणाम हा नव्या समस्येचे कारण ठरतो. या कारण-परिणाम-कारण साखळीचा मुळातून आणि सर्वागाने विचार व्हायला हवा. जाती व्यवस्थेतून उद्भवणाऱ्या समस्यांवर ठोस उत्तरे मिळाली आहेत, असे ठामपणे सांगता येणार नाही. भारतातील जातींना वर्ग मानल्यामुळे या व्यवस्थेत आणखी गोंधळ निर्माण झाला आहे.
जाती व्यवस्थेचे निर्मूलन करायचे असेल, तर ते त्रयस्थपणे करता येणार नाही. ते समाजाच्या पुढाकारातूनच व्हावे लागेल. याचे चांगले उदाहरण जपानमधील सामुराई जातीने दाखवून दिले आहे. सामुराईंनी उच्च जातीत जन्म झाल्यामुळे मिळालेले हक्क नाकारले. त्याप्रमाणे आपल्याकडेही जाती व्यवस्थेचे निर्मूलन करण्यासाठी उच्च जातींनी जन्मामुळे मिळालेले अधिकार नाकारावेत आणि जात सोडून द्यावी. ज्यांनी ही व्यवस्था निर्माण केली, त्यांनीच त्याचा अंत करावा, मात्र जात ही मिरवण्याची गोष्ट झाल्यामुळे आणि लोकशाहीत जात हे राजकीय सत्ता मिळवण्याचे, अधिकारशाही टिकवण्यासाठीचे भांडवल झाले आहे. हेच जाती निर्मूलनापुढील मोठे आव्हान आहे.
प्रा. गौतमीपुत्र कांबळे, ‘सेक्युलर मुव्हमेंट’चे अध्यक्ष

जाती निर्मूलन हे सहकार्यानेच होऊ शकते
संपूर्ण सामाजिक परिवर्तन झाल्याशिवाय जातिअंत होणे शक्य नाही. त्याच वेळी परिवर्तन हे सहज होत नाही, हे लक्षात घ्यायला हवे. परिवर्तन ही दीर्घकालीन आणि सतत चालणारी प्रक्रिया आहे. सर्व समाजाच्या एकत्रित प्रयत्नांतूनच ते शक्य आहे. पूर्वी जाती व्यवस्था नव्हती, तर वर्ण व्यवस्था होती. ती व्यवस्था कामांनुसार होती, त्यामुळे ती लवचीक होती. त्या वेळी श्रमांचे विभाजन केले होते, श्रमिकांचे नाही. आता श्रमिकांचे विभाजन झाल्यामुळे समस्या उद्भवल्या आहेत. कालांतराने या व्यवस्थेतील लवचीकता संपुष्टात आली. जात ही जन्माने तयार झाली. तिची अभेद्य व्यवस्था निर्माण होत गेली.
आता जाती व्यवस्था ही मतांच्या राजकारणासाठी जोडली गेली आहे. जोपर्यंत एकगठ्ठा मते मिळवण्यासाठी जाती व्यवस्था टिकवण्याची कल्पना नाहीशी होत नाही, तोपर्यंत जाती निर्मूलन होणार नाही. आपल्या शासकीय व्यवस्थेनेही जातींच्या गाठी अधिक घट्ट करत नेल्या. जाती निर्मूलन हा मानसिकतेचाही भाग आहे,  ती बदलण्यासाठी आवश्यक असे वातावरण तयार झाले पाहिजे, मात्र आपल्याकडे ते दिसत नाही. आरक्षण हे त्याचे उदाहरण आहे. आरक्षण जातीच्या आधारावर नव्हे, तर आर्थिक मुद्दय़ांवर हवे. जाती निर्मूलनाचा संस्कार हा लहानपणापासून मुलांवर करायला हवा आणि त्या अनुषंगाने शिक्षण व्यवस्था बदलायला हवी. वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणेही जाती निर्मूलनासाठी आवश्यक आहे.
प्रा. शं. ना. नवलगुंदकर, ज्येष्ठ विचारवंत
श्रद्धा आणि अंधश्रद्धा
नवसाला पावायला देव का भ्रष्ट अधिकारी आहे?
एकाची अंधश्रद्धा ही दुसऱ्याची जीवनमरणाची धर्मश्रद्धा असू शकते. भूत, भानामती, भगत, ज्योतिषी, अघोरी प्रथा वगैरे ज्या अनेक अंधश्रद्धांच्या विरोधात अंनिस  समाजसुधारणेचे मोठे प्रशंसनीय कार्य करीत आहे, त्या सगळ्या ‘अंधश्रद्धा’ आणि इतर म्हणजे देवधर्मविषयक श्रद्धा त्या ‘श्रद्धा’ असे आपण तात्पुरते म्हणू या.
अंनिस देवधर्मविषयक श्रद्धांबाबत थोडी तटस्थ, थोडी मवाळ भूमिका घेतात; पण मी देवधर्मविषयक श्रद्धांचीसुद्धा चिकित्सा करतो. एखाद्या प्रसिद्ध, जागृत, मोठय़ा देवस्थानातला देव, त्याची आपण मनोभावे प्रार्थना केली, तर आपल्या नवसाला, पूजाप्रार्थनेला पावतो व आपल्याला प्रार्थनेचे काही फळे देतो; पण आपल्या नवसाची किंवा देणगीची लाच स्वीकारून आपल्याला त्याचे काही फळ द्यायला देव काय भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यासारखा आहे का?
भक्तांच्या बिकट प्रसंगी देव त्याच्या हाकेला धावून येतो. सबंध विश्वाचा जर कुणी एक ईश्वर असेल आणि त्याचे अनेक भक्त त्याची कितीही भक्ती करीत बसले तरी लाखो भक्तांच्या लाखो हाका ऐकून तिथे-तिथे जाऊन त्यांना मदत करणे हे त्या ईश्वराच्या कार्यक्रमात असू शकेल का? तो काय भक्तांचा नोकर किंवा अंगरक्षक आहे का? एवढय़ा प्रचंड विश्वाचे, अब्जोअब्ज सूर्याचे व्यवस्थापन करण्यात तो गुंतलेला असताना, क्षुद्र पृथ्वीनामक एका ग्रहावर क्षुद्र सजीव माणूस जातीमध्ये न्यायस्थापनेचे उपद्व्याप तो कशाला करील?
खरेच का पूजाअर्चा केल्या म्हणून स्पर्धेत किंवा मारामारीत किंवा युद्धात राष्ट्राला यश मिळेल? आपली स्तुती, पूजा-प्रार्थना करणाऱ्याचा ‘पक्षपाती’ व्हायला ईश्वर काय कुणी माणूस आहे का? खरंच का सत्यनारायणाच्या कथेत सांगितल्याप्रमाणे कलावतीने प्रसाद भक्षण केल्यामुळे आधी बुडालेली साधुवाण्याची बोट पूर्वी होती तशी परत वर येईल? असल्या थापांवर आपण विश्वास आणि श्रद्धा ठेवू तरी कशी शकतो? परंतु देवधर्मविषयक अशा अनेक श्रद्धा आपण मनात बाळगतो, त्यांच्यावर विश्वास ठेवतो. पुण्यप्राप्तीसाठी, पापक्षालनासाठी किंवा मानसिक आधारासाठी किंवा पाण्यात राहून माशाशी वैर नको म्हणून. उगाच कशाला आपल्या आजूबाजूच्या समाजाला दुखवा? आणि आपल्या अशा श्रद्धांना आधार काय? तर ग्रंथप्रामाण्य, शब्दप्रामाण्य आणि चिकित्सेला नकार देतो.
शरद बेडेकर, ज्येष्ठ विचारवंत

श्रद्धेला अंध कसे म्हणता येईल?
श्रद्धा ही कधीच अंध नसते. ती डोळसच असते. ती एक भावना आहे. तिला अंध कसे म्हणता येईल? श्रद्धा जर अंध असेल, तर सर्वच भावना अंध नाहीत का? विज्ञानातही श्रद्धा ठेवावीच लागते. आध्यात्मिक साधनेत प्रत्येकाला येणारे अनुभव हे वेगवेगळे आणि व्यक्तीपुरतेच सीमित असतात. त्यामुळे परमेश्वरी तत्त्व जरी एक असले, तरी त्याचा साक्षात्कार निरनिराळ्या स्वरूपांत होतो. हे अनुभव एकसारखे नसतात; म्हणून ते सर्व खोटे आहेत, ते काही शास्त्र नाही, असे म्हणणे अनुचित आहे. विजेमुळे प्रकाश मिळतो, यंत्र चालवले जाते, उष्णता निर्माण केली जाते आणि त्याच्या उलट शीतकपाटामध्ये थंडपणा येतो. वीज डोळ्यांना दिसत नाही आणि तिच्या आविष्काराचे स्वरूप वेगवेगळे असते, म्हणून ती खोटी आहे, असे म्हणतो का?     प्रत्येक गोष्ट भौतिक प्रयोगशाळेत पडताळून पाहणे अयोग्य ठरते. कुत्रा वासावरून माणूस ओळखतो, वस्तू ओळखतो. नसíगक आपत्ती येणार, हे प्राण्यांना आधी कळून ते कान टवकारतात, हे परीक्षानळीत कसे सिद्ध करणार?
अभय वर्तक , सनातन संस्थेचे माजी प्रवक्ते

अंधश्रद्धाच नव्हे, तर श्रद्धासुद्धा तपासायला हव्यात
श्रद्धा तपासण्याचा वारसा आपण नाकारतो व त्यातून अडचण निर्माण होते. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करून श्रद्धाही तपासल्या पाहिजेत. श्रद्धेची तपासणी केली की मूल्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्हे निर्माण केली जातात. आपण विज्ञानाची केवळ सृष्टी घेतली, दृष्टी घेतली नाही. तपासणे, चिकित्सा करणे, हे आपण विसरतो. त्यातून श्रद्धा व अंधश्रद्धेबाबत गफलत होते. चिकित्सा म्हणजे धर्माला विरोध हा बागुलबुवा हितसंबंधातूनच निर्माण केला जातो. चिकित्सा म्हणजे धर्माला विरोध न समजता ती आधुनिक जगण्याची गरज आहे, असे मानले पाहिजे. जीवनाची गतिमानता वाढत असताना काही श्रद्धा जात असतात. देवीचा कोप म्हणून देवीचा विकार होतो, ही बाब आता गळून पडली आहे. विज्ञानाच्या संशोधनातूनच हे शक्य झाले. कोणत्याही ग्रंथप्रामाण्याची चिकित्सा केली नाही, तर पुढे जाता येत नाही. धर्मश्रद्धेतून बाईला कमी लेखले जाते. त्याबद्दल चिकित्सा केलेली चालत नाही. इतर बाबतीत आपल्याला हायब्रीड चालते, पण जाती एकत्र होणे चालत नाही, कारण त्यात धर्मश्रद्धा आहे. जगण्याच्या ताणतणावामुळे अगतिकता येते व त्या वेळी माणसाकडे वैज्ञानिक दृष्टी नसेल, तर तो अंधश्रद्धांकडे वळतो. त्यामुळे केवळ कठोर मूल्यमापन व चिकित्साच नव्हे, तर माणसांच्या गरजांची परिपूर्तीही व्हायला हवी. त्यातून अंधश्रद्धा निर्मूलन होऊ शकेल. आजच्या शिक्षण व्यवस्थेत प्रश्न विचारणे, तपासणे आदी आशय हरवला आहे. त्यामुळे प्रश्न विचारण्यास लावून श्रद्धा तपासून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
अविनाश पाटील, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष

*संकलन : अभिजित घोरपडे, अभिजित बेल्हेकर, वैशाली चिटणीस, विनायक करमरकर, पावलस मुगुटमल, बाळासाहेब जवळकर, श्रीराम ओक, विद्याधर कुलकर्णी, श्रीकृष्ण कोल्हे,
रसिका मुळय़े, संपदा सोवनी.  
*छायाचित्र : पवन खेंगरे, राजेश स्टीफन  *
*या कार्यक्रमाची ध्वनिचित्रफीत पाहण्यासाठी  http://www.youtube.com/LoksattaLive येथे भेट द्या.