डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भीमराव होते आणि त्यामुळे त्यांनी अथक परिश्रमाने निर्माण केलेल्या पोलादी शक्तीला भीमशक्ती संबोधण्याचा प्रघात होता. महाडच्या पाणी प्रशासनाच्या प्रसंगानंतर आंबेडकरी शक्तीला भीमशक्ती म्हटले जाऊ लागले, परंतु हा शब्द प्रामुख्याने प्रचारात आला तो १९५७ च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर. १९५७ च्या निवडणुकीचे वारे वाहू लागले तेव्हा भारतीय काँग्रेस पक्षाच्या विरोधात एक प्रबळ पक्षनिर्मितीची अपेक्षा प्रबोधनकार ठाकरे यांनी बाबासाहेबांकडे केली होती. बाबासाहेबांनी प्रबोधनकारांना सांगितले होते की, ‘तुम्ही आपापले राजकीय पक्ष खुंटीला टांगून ठेवलेत तर माझा ‘शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशन’ हा पक्ष तुमच्या मागे जिब्राल्टरसारखा उभा राहील.’
१. सर्वानी आपापले पक्ष विसरून संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन केली. १९५६ साली बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले, परंतु त्यांच्या इच्छेनुसार शेकाप हा पक्ष समितीचा घटक पक्ष झाला. या काळात भीमशक्ती एवढी प्रबळ ठरली की संयुक्त महाराष्ट्र समितीचा ती कणा बनली. १९५७ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष काठावरचे बहुमत घेऊन सत्ताधारी पक्ष झाला असला तरी त्यानंतर घेण्यात आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समिती अनेक शहरांत सत्ताधारी झाली. अगदी महानगरीय (मेट्रोपोलिटन) बृहन्मुंबई राज्यातसुद्धा या काळात प्रभावी असलेल्या आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’मध्ये ठळक बातमी येत होती ती भीमशक्ती- शिवशक्तीच्या प्रभावाची. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शवत राजवटीला डोळ्यासमोर ठेवून या शक्तीला शिवशक्ती असे संबोधले जाऊ लागले. १९५८ नंतर भीमशक्ती कमकुवत झाल्यानंतर या शब्दाचा पुनरुच्चार केला तो १९७८ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. १९८५ साली शिवसेनेने मुंबई-ठाण्याबाहेर मुसंडी मारली. तेव्हा खेडय़ापाडय़ांत जागृत असलेला भीमसैनिक अनुभवला. १९७२ साली निर्माण झालेल्या दलित पँथरची शक्ती शिवसेना आणि काँग्रेस यांना टकरा मारीत होती. ठाकरे यांनी या शक्तीला आव्हान देण्यासाठी बौद्धांना आव्हान दिले तर बौद्धेतर दलितांना जवळ केले. त्यांना सत्ता दिली. नामांतराच्या काळात ठाकरे यांनी आंबेडकरद्वेष जोपासला. बौद्ध समाज हा आपला मतदार नाही हे ओळखल्यामुळे भीमशक्ती त्यांच्यापासून दुरावली होती.

२. हा दुरावा नष्ट करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ११ फेब्रुवारी २००३ रोजी मुंबई विद्यापीठात शिवशक्ती- भीमशक्ती यांचा मिलाप करण्याची घोषणा केली. १९५७ आणि २००३ यामध्ये महदंतर होते. १९५७ साली जेव्हा निवडणुकीला सामोरे गेले तेव्हा तत्कालीन शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशन हा पक्ष एकसंध होता. त्या पक्षाची एकसंधता आणि संयुक्त महाराष्ट्र समितीच्या इतर घटक पक्षांची शक्ती यामुळे शेकापचे नऊ खासदार निवडून आले. १७ आमदार निवडून आले. या निवडून आलेल्या आमदारांच्या बळावर दातांच्या कण्या न करता बॅ. खोब्रागडे यांना राज्यसभेवर नियुक्त करण्यात आले होते. भीमशक्तीची ही पोचपावती होती. १९७८ नंतर नवस्थापित रिपब्लिकन पक्ष गटबाजीमुळं पंगू ठरला. ही निष्प्रभता एवढी पराकोटीची झाली की या पक्षाच्या कोणत्याही गटाला दोन टक्के मते मिळेनाशी झाली. ही निष्प्रभता सर्वच राजकीय पक्षांत परावर्तित झाली. त्यामुळे एक-दीड टक्के मतांसाठी निवडणूक युत्या झाल्या. १९ जून १९६६ या दिवशी स्थापन झालेली शिवसेना राजकारणाच्या गजकरणाला शरण गेली. २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण करणाऱ्या शिवसेनेने कूस बदलली आणि टक्केवारीची अदलाबदल केली. बदलत्या राजकारणासाठी भाजपच्या हिंदुत्वाचे निशाण शिवसेनेने आपल्या हाती घेतले. शिवसेना सुरुवातीला प्रखर हिंदुत्ववादी नव्हती. परंतु भाजपमुळे ‘गर्व से कहे हम हिंदु हैं’ हा नारा स्वीकारला. भाजपचे ईप्सित कार्य सेनेने स्वीकारल्यामुळे शहरातला उच्चवर्णीय भाजप ग्रामीण भागात पाय रोवू शकला.
३. याच दरम्यान भारतीय राजकारणात आमूलाग्र बदल होऊ लागला. विश्वनाथ प्रतापसिंह यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत मंडल आयोगाची अंमलबजावणी सुरू केली. ५२ टक्के लोकसंख्या असलेल्या इतर मागासवर्गीयांना त्यामुळे राजकीय भान आले. आपण बहुसंख्याक असूनही अल्पसंख्याक आपल्यावर राज्य करतात, सत्ता आणि संपत्तीपासून दूर ठेवतात हे शल्य या इतर मागासवर्गीयांना अस्वस्थ करीत होते. मंडल आयोगाची अंमलबजावणी म्हणजे तत्कालीन राजकारणावर उगारलेली वज्रमूठ होती. शिवसेनेसह अनेक राजकीय पक्षांना खिळखिळी करणारी राजनीती होती. छगन भुजबळांसारखे नेते स्वत:ला ओबीसींचे नेते समजू लागले होते. खरे तर मंडल आयोगामुळे राजकारणाच्या माध्यमाने सामाजिक परिवर्तनाची नांदी सुरू झाली. या बाबतीत बोलके  उदाहरण म्हणजे नामांतराच्या वेळी ओबीसी प्रवर्गातील लोक हातातल्या दगडांचा आंबेडकरानुयायांच्या घरावर वर्षांव करीत होते, तेच हात आता जयभीम म्हणण्यासाठी जोडले जाऊ लागले. सर्वच राजकीय पक्षांची अशी केविलवाणी स्थिती झाल्यावर दलितांची काही मते आपल्याला मिळावीत असे प्रयत्न झाले. प्रकाश आंबेडकर यांच्या भारतीय रिपब्लिकन पक्षाकडे स्पृहणीय मते होती. गवई, आठवले, कवाडे, कांबळे वगैरे गटांकडे एक टक्कासुद्धा मतदान नव्हते. जे मिळेल ते आपले या न्यायाने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मतांचा जोगवा मागितला. या पक्षनेतृत्वाने तो दिला अन् त्याचा पुरेपूर फायदा उठविला.
४. असाच फायदा उठविण्यासाठी ११ फेब्रुवारी २०१३ रोजी शिवसेनेने आठवले यांच्यापुढे शिवशक्ती-भीमशक्तीचा पर्याय ठेवला. १९६० पर्यंत आंबेडकरी अनुयायी काँग्रेसकडे जाणे अशक्यप्राय होते. तसेच शिवसेनेकडेसुद्धा जाणे अशक्यप्राय होते. शिवसेनेचा नामांतराला विरोध, मंडल आयोगाला विरोध, आरक्षणाला विरोध आणि हिंदुत्वाचा जागर यामुळे आंबेडकरी समाज शिवसेनेचा विरोधक होता. या संदर्भात रिपब्लिकन पक्षाचे सर्वच नेते शिवसेना-भाजप यांच्या विरोधात होते. आठवले जेव्हा दोन्ही काँग्रेसची तळी उचलून धरीत होते तेव्हा जातीयवादी सेवा भाजपपेक्षा काँग्रेस चांगली असे सांगून आंबेडकरी जनतेला फसवीत होते. २००३ साली असे काय घडले की त्यामुळे सेना त्यांना पुरोगामी वाटू लागली? ते लोकांना फसवीत होते, लोकही फसत होते आणि तरीही शिवशक्ती- भीमशक्तीच्या सभा पार पडत होत्या. यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आठवलेंच्या गटाला स्वत:च्या निवडणूक चिन्हावर एकही जागा जिंकता येत नाही वा ज्या पक्षाला एकही मतदारसंघ नाही, त्या पक्षाला वा गटाला भीमशक्ती समजणे हीच मुळी उद्धव ठाकरे यांची चूक होती. ठाकरे यांना त्यांची चूक लवकरच लक्षात आली आणि म्हणून शिवशक्ती (शिवसेना)ने आठवले यांना राज्यसभेचा दरवाजाही बंद केला. आठवले त्यानंतर आमच्यामुळेच सेना-भाजप सत्तेवर आली असा दावा करून आम्हाला सन्मानाची वागवणूक द्या अशी विनंती करीत असले तरी सेना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात ‘काणतेही खाते द्या’ असे म्हणत असले तरी मोदी त्यांना ते देत नाहीत. कारण सेनेची व तुमची युती होती, त्यांनी लाथाडले तरी आम्ही राज्यसभा दिली हेच पुरेसे आहे असे बिंबविले जात आहे. देवेंद्र फडणवीस तर त्यांना खिजगणतीतही घेत नाहीत. आठवले यांच्या सहकाऱ्यांना सत्तापदे दिली नाहीत तरी ते काहीच करू शकत नाहीत. काण त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांचे दोर कापले आहेत. आता भिक्षेकरीच्या पेहेरावात बसण्याशिवाय आठवले यांना पर्याय नाही.

BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
Prakash Ambedkar Vijay Wadettiwar
“आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट, त्यामुळे तुम्ही वंचितच्या…”, प्रकाश आंबेडकरांचा विजय वडेट्टीवारांना इशारा
prakash ambedkar
“चळवळीला लाचार करून…”, प्रकाश आंबेडकरांचा मविआला टोला; म्हणाले, “माझ्या आजोबांनी…”
Hindu Code Bill and Dr Babasaheb Ambedkar Marathi News
Hindu Code Bill: बाबासाहेबांचा राजीनामा; पंडित जवाहरलाल यांची भूमिका नक्की काय घडले होते?

५. आठवले यांना काय मिळाले वा काय मिळत नाही यापेक्षा ते आंबेडकरी समाजाचा अवमान करीत आहेत. याचेच दु:ख जाणकारांमध्ये आहे. खरेतर शिवसेना-रिपब्लिकन ही विळ्या-भोपळ्याची मोट, या दोन्ही पक्षांत कोणतेही वैचारिक साम्य नाही आणि तरीही ओअ‍ॅसिसचे दर्शन झाल्याचे आठवले सांगत असले तरी ते एक मृगजळ आहे. या मृगजळामागे किती काळ धावायचे याचा विचार आठवले यांच्या सहकाऱ्यांनी करावा अन्यथा रिपाइं म्हणजे स्वाभिमानशून्यता हे समीकरण अस्तित्वात येईल आणि त्यामुळे बाबासाहेबांचीच बदनामी होईल. खरे तर भाजपने शिवशक्ती व भीमशक्ती यांचे पंख छाटले आहेत. ही पंखविहीनता सेनेला आपल्या अर्धशतकीय वाटचालीत कळावी आणि आठवले म्हणजे भीमशक्ती नव्हे हे जाणिले तरी पुरेसे आहे.
davipawar@gmail.com