अंध, अपंग, मनोरुग्ण, मतिमंद व निराधार अवस्थेत जीवन जगणाऱ्या वंचितांना आधार देण्याचे काम नागपूरची श्रीकृष्ण शांतिनिकेतन संस्था करत आहे. प्रज्ञा राऊत व त्यांचे पती प्रमोद या दोघांनी ही संस्था स्थापन केली आहे. आजवर शंभरपेक्षा जास्त वंचितांचा सांभाळ करणाऱ्या व सध्या २२ जणांना आपल्या कुटुंबात सामावून घेणाऱ्या श्रीकृष्ण शांतिनिकेतनच्या कर्त्यांधर्त्यां प्रज्ञा राऊत आहेत. त्यांच्या घरी तुकडोजी महाराज यायचे. त्यांचे पती प्रमोद यांच्या घरीसुद्धा तुकडोजी महाराज यायचे. यातूनच त्यांच्यावर नकळतपणे वंचितांच्या सेवेचे संस्कार झाले आणि या संस्कारांतूनच श्रीकृष्ण शांतिनिकेतन अस्तित्वात आले. विदर्भात सेवेचा वारसा रुजवला गाडगेबाबा व तुकडोजी महाराजांनी. त्याला पुढे नेण्यात हातभार लावला आमटे व बंग कुटुंबांनी. आता सेवा क्षेत्रातली तिसरी पिढी विदर्भात उदयाला येत आहे. त्यात अनेक नावे आहेत, पण फारशा प्रसिद्धीच्या मागे न लागता अंध, अपंग, मनोरुग्ण, मतिमंद व निराधार अवस्थेत जीवन जगणाऱ्या वंचितांना आधार देण्याचे काम करणाऱ्या श्रीकृष्ण शांतिनिकेतनच्या प्रज्ञा राऊत यांचा आजवरचा प्रवास विलक्षण व एका मध्यमवर्गीय महिलेच्या सेवाभावी वृत्तीची कहाणी सांगणारा आहे. निराधारांना मायेचा आधार.. आजवर शंभरपेक्षा जास्त वंचितांचा सांभाळ करणाऱ्या व सध्या २२ जणांना आपल्या कुटुंबात सामावून घेणाऱ्या प्रज्ञा राऊत मूळच्या अमरावतीच्या. त्यांच्या घरी तुकडोजी महाराज यायचे. हाच त्यांच्या सेवाकार्याचा वारसा म्हणावा लागेल. केवळ बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या प्रज्ञाचे लग्न शासकीय चित्रकला महाविद्यालयात अधीक्षक असलेल्या प्रमोदशी झाले तेव्हा आपल्या आयुष्यात वेगळे काही घडेल हे त्यांच्या गावीही नव्हते. मूळचे वर्धा जिल्ह्य़ातील आर्वीचे असलेल्या प्रमोदच्या घरीसुद्धा तुकडोजी महाराज यायचे. यामुळे या दोघांमध्ये वंचितांची सेवा कशी करता येईल, अशा चर्चा चालायच्या. मुंबईत असताना प्रज्ञाने मदर तेरेसांच्या संस्थेचे काम बघितले, मग एकदा हे दोघे कोलकात्याला जाऊन त्यांना भेटून आले. यामुळे प्रभावित झालेल्या प्रज्ञाने मग वंचितांची सेवा करायचीच, असा निर्णय घेतला. या दोघांनी औरंगाबादेत श्रीकृष्ण शांतिनिकेतन ही संस्था स्थापन केली. याच शहरातील रीना पेंडके ही मनोरुग्ण महिला प्रज्ञाची पहिली मैत्रीण झाली. आई कर्करोगाने आजारी, विवाहित रीना प्रसूतीदरम्यान वेडी झाली. भावाने जबाबदारी झटकलेली. प्रज्ञाला हे कळताच रीनाला त्यांनी घरी आणले. येथून मग या दोघांची पालक आणि समाजाने जबाबदारी नाकारलेल्या निराधारांना पालकत्व देण्याची सेवा सुरू झाली. रीनापाठोपाठ नागपूरजवळच्या कामठीची आशा आली. तिचीही कथा रीनासारखीच, मग याच शहरातील एका श्रीमंत कुटुंबाने मतिमंद आहे म्हणून बाहेर हाकलून दिलेला रवी आला आणि हळूहळू प्रज्ञाच्या सेवेचे वर्तुळ वाढत गेले. याच दरम्यान प्रमोद राऊतांची बदली नागपुरात झाली. येथील बेलतरोडी भागात राऊतांचा भूखंड होता, पण घर बांधण्याची त्यांची ऐपत नव्हती. आता जमा केलेला हा गोतावळा, बरोबर पोटची मुलगी अनुश्री या सर्वाना घेऊन राहायचे कुठे, हा प्रश्नच होता. या शहरात येताच राऊतांनी एक घर भाडय़ाने घेतले. सामान हलवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मतिमंद, मनोरुग्णांचा आरडाओरडा ऐकून घरमालकाने घर रिकामे करण्याचे फर्मान सोडले. प्रज्ञाने धावपळ करून नवे घर शोधले. नव्या मालकाला परिस्थितीची कल्पना दिली. त्यांनी फक्त काही दिवस राहू देईन, या अटीवर होकार दिला. मालकीचा भूखंड आहे पण घर बांधायला पैसे नाहीत, भाडय़ाने कुणी घर देत नाही, अशा स्थितीत प्रज्ञा व प्रमोदने बेलतरोडीला अक्षरश: एक झोपडी उभारली व त्यात आपला सेवेचा संसार हलवला. त्या वेळी हा भाग विकसित व्हायचा होता, तरीही आता येथून कुणी हाकलणार नाही या आशेवर प्रज्ञाने एका झोपडीत राहणे पसंत केले. ही सेवा करतानाच प्रज्ञा व प्रमोदने मदतीसाठी कधीही कुणाकडे स्वत:हून हात पसरायचा नाही असा निर्धार केलेला. त्यामुळे एकाच्या पगारात जमलेल्या साऱ्या गोतावळ्याचे भागवावे लागायचे. बरीच ओढाताण व्हायची. कधी कधी स्वत:ला उपाशी ठेवून जमवलेल्या वंचितांना खाऊ-पिऊ घालण्याची पाळी यायची. हा सारा प्रवास प्रज्ञाने अगदी न थकता पूर्ण केला. स्वत:हून कुणी मदत दिली तर नाकारायची नाही व शासनाचे अनुदान कधीच घ्यायचे नाही, असाही निर्धार प्रज्ञाने केलेला. प्रारंभी तिचे काम नागपुरात कुणाला ठाऊकच नव्हते. त्यामुळे मदत मिळायची नाही. मग हळूहळू ओळखी झाल्या व मदत सुरू झाली, तीही प्रामुख्याने वस्तू स्वरूपात. याच ओळखींमुळे प्रज्ञाकडे वंचितांचा ओघ पण वाढू लागला. निराधारांचा सांभाळ करणे तुलनेने सोपे आहे पण मतिमंद व मनोरुग्णांना सांभाळणे कठीण. गेल्या अकरा वर्षांपासून प्रज्ञा, तिची मुलगी व पती हे काम अव्याहतपणे करीत आहेत. या वंचितांना त्यांचे पालक केवळ आणून सोडतात, नंतर ढुंकूनही पाहत नाहीत. या संदर्भात प्रज्ञाला आलेले अनुभव आपल्या समाजव्यवस्थेचे अतिशय कुरूपता दाखवणारे आहेत. ‘पाच श्रीमंत बहिणींचा एक मतिमंद भाऊ माझ्याकडे आहे. या बहिणी केवळ उपचार म्हणून त्याला भेटायला येतात. हा भाऊ खूप त्रासदायक आहे, म्हणून तुमच्याकडे ठेवला असे मानभावीपणे सांगतात. आर्थिक मदतसुद्धा करीत नाहीत व निघून जातात’ असे सांगताना प्रज्ञाचा स्वर लगेच हळवा होतो. हाच त्रासदायक भाऊ आता आमच्या संस्थेतला सर्वात आज्ञाधारक सदस्य आहे. तो रोज सर्वाचे कपडे धुतो, तेच त्याच्या आवडीचे काम झाले आहे, असे सांगताना प्रज्ञाचा स्वर पुन्हा अभिमानाने भरून येतो. मतिमंद १८ वर्षांचा होईपर्यंत त्याची जबाबदारी सरकार घेते. नंतर मात्र त्याला सांभाळण्यासाठी मदत करीत नाही. राज्यात मतिमंदांच्या अनेक शाळा आहेत. या मतिमंदांना काम करता यावे यासाठी शासकीय अनुदानावर आधारित कार्यशाळा आहेत. मात्र हे संस्थाचालक सर्वात कमी बुद्धय़ांक असलेली मतिमंद मुले सरळ आमच्याकडे आणून सोडतात. संस्थाचालकांची ही लबाडी लक्षात येते, पण आम्ही तक्रार करण्याच्या भानगडीत पडत नाही. शेवटी अशा मुलांना सांभाळणारा कुणी तरी हवाच ना, हा प्रज्ञाचा सवाल अंतर्मुख करून जातो. प्रज्ञाकडे अशी खूप मुले आली. काही वेळा तर संस्थाचालक मतिमंद मुलांची प्रकृती खराब झाली की त्यांना आमच्याकडे आणून सोडतात. मग त्या मुलांच्या उपचाराचेही आम्हाला बघावे लागते, असा अनुभव प्रज्ञा सांगते. मतिमंदांपेक्षा मनोरुग्णांना सांभाळणे आणखी कठीण आहे. मुळात अनेक कुटुंबांत अशी मुले असतात. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी शासकीय तसेच खासगी मनोरुग्णालये आहेत. अनेकदा पालक उपचारासाठी या रुग्णालयात जातात. तिथे दाखल करण्याची प्रक्रिया थोडी जटिल आहे. न्यायालयाचा आदेश घ्यावा लागतो. मनोरुग्णालयात उपचार झाल्यानंतर रुग्णांना ९० दिवसांचा पॅरोल मिळतो. या काळात त्याची वर्तणूक कशी आहे हे बघितले जाते व नंतर त्याला पुन्हा दाखल करण्याबाबत निर्णय होतो. अनेक पालक या जटिल प्रक्रियेला कंटाळतात. ९० दिवसांचा पॅरोल पूर्ण व्हायच्या आधीच मुलांना आमच्याकडे आणून सोडून देतात. ममता नावाची अत्यंत गंभीर अवस्थेतील मनोरुग्ण महिला पालकांनी संस्थेत आणून सोडली. ती मेल्यावरच आम्हाला कळवा, असे सांगून पालक निघून गेले. चार वर्षांपूर्वीची ही घटना आहे. ममताला आम्ही उपचार करून पूर्णपणे बरे केले. ती बरी झाली हे पालकांना कळवण्याचे धैर्य मात्र झाले नाही, असे प्रज्ञा सांगते. गेल्या अकरा वर्षांत प्रज्ञाच्या गाठीशी या वंचितांच्या पालकांचे अनेक वाईट अनुभव गोळा झाले आहेत. मात्र ते उगाळत बसण्यापेक्षा या सर्वाची चांगली सेवा कशी करता येईल हाच सकारात्मक दृष्टिकोन प्रज्ञाने आजवर बाळगला आहे. या संस्थेकडे मुलांना सोपवून निर्धास्त झालेले पालक नंतर फिरकत नाहीत. अनेकदा मतिमंद व मनोरुग्ण आजारी पडतात. तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते. अशा वेळी मग बरीच धावपळ होते. किमान रुग्णालयात बसायला तरी या, अशी विनंती करूनसुद्धा पालक येत नाहीत. मग मी माझी मुलगी व पती आळीपाळीने सेवा करीत असतो. उपचार करूनही मृत्यूला जवळ केलेल्या वंचितांचे अंत्यसंस्कारसुद्धा प्रज्ञालाच करावे लागले आहेत. गेल्या ११ वर्षांत दहा मृत्यू बघितले. अशा वेळी मनाची अवस्था, संस्थेतले वातावरण अतिशय वेदनादायी होऊन जाते असे प्रज्ञा सांगते. या वंचितांनी गोंधळ करू नये, भटकू नये म्हणून प्रज्ञाने त्यांची आवड लक्षात घेऊन त्यांना कामे दिली आहेत. कुणाला देवाचे नामस्मरण आवडते तर कुणाला भजन, त्यात ही मुले रममाण होताना बघून मन भरून येते. असे प्रज्ञा सांगते. संस्थेपर्यंत कसे जाल? एसटी किंवा रेल्वेने नागपूर येथे यावे. नागपुरातील मानेवाडा चौकातून बेलतरोडी अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आहे. श्रीकृष्ण शांतिनिकेतन, नागपूर अनेक सेवाभावी लोक, संघटना मदत करतात, पण त्यापैकी बहुतेक मदत वस्तुरूपात असते. आता थोडे कर्ज काढून बांधकाम करायचे प्रज्ञाने ठरवले आहे. संस्थेत कितीही वंचित मुले, महिला, पुरुष दाखल झाले तरी त्यांचा सांभाळ करण्याची प्रज्ञाची तयारी आहे. मात्र त्यांच्या पालकांनी थोडी तरी मानवता दाखवावी व आपल्या या सेवाकार्यात थोडा वाटा उचलावा, असे प्रज्ञाला वाटते. आर्वीला संस्था उभारण्याचा मानस बेलतरोडीला आता दाट वस्ती झाली आहे. येथील अनेक जण या सेवेवर आक्षेप घ्यायला लागले आहेत. म्हणून आता प्रज्ञा व तिच्या पतीने वर्धा जिल्ह्य़ातील आर्वीला संस्था हलवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तिथे राऊतांच्या वाटय़ाला वडिलोपार्जित शेतीतील चार एकरांचा तुकडा मिळाला. त्यावर संस्थेची इमारत उभारण्याचा प्रज्ञाचा मानस आहे. मतिमंद, अपंग व्यक्तींना सांभाळणे कठीणच आहे. त्यातही तिशी उलटून गेलेल्यांना सांभाळणे म्हणजे दिव्यच. मात्र कमी वयात प्रज्ञाने तिच्या पतीच्या सहकार्याने हे दिव्य पार केले आहे. इतक्या कमी वयात सेवेचा हा वसा स्वीकारून तो जोपासण्याच्या प्रज्ञाच्या कार्याला सलामच ठोकायला हवा. - गिरीश गांधी, विश्वस्त , वनराई धनादेश या नावाने काढावेत श्रीरामकृष्णहरी सेवाभावी प्रतिष्ठान (Shriramkrishnahari Sewabhavi Pratishthan) (कलम ८०जी नुसार देणग्या करसवलतीस पात्र आहेत) संस्थांकडे धनादेश नोव्हेंबर महिन्यात सुपूर्द केले जातील. धनादेश येथे पाठवा.. एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील. मुंबई कार्यालय लोकसत्ता, संपादकीय विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई - ४०००२१, (०२२-६७४४०५३६) महापे कार्यालय संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई - ४००७१० (०२२-२७६३९९००) ठाणे कार्यालय संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे. (०२२-२५३९९६०७) पुणे कार्यालय संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे - ४११००४. ०२०-६७२४१००० नाशिक कार्यालय संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक - ४२२००१. (०२५३-२३१०४४४) नागपूर कार्यालय संपादकीय विभाग, प्लॉट नं. १९, ग्रेट नागरोड, उंटखाना, नागपूर - ४४०००९, (०७१२ - २७०६९२३) औरंगाबाद कार्यालय संपादकीय विभाग, १०३, गोमटेश मार्केट, औषधी भवनजवळ, नवा गुलमंडी रस्ता, औरंगाबाद. (०२४०-२३४८३०३) नगर कार्यालय संपादकीय विभाग, १६६, अंबर प्लाझा, पहिला मजला, स्टेशन रोड, अहमदनगर. (०२४१-२४५१५४४/२४५१९०७) दिल्ली कार्यालय संपादकीय विभाग, एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१ / बी, सेक्टर- १० नोएडा (गौतम बुद्ध नगर, उत्तर प्रदेश) - २०१३०१ (०१२०- ६६५१५००)