उत्स विशेष शमिका वृषाली - response.lokprabha@expressindia.com श्रावण महिन्यात अनेक सण साजरे होतात, व्रतवैकल्ये केली जातात. रिमझिम पावसाच्या धुंद मनमोहक वातावरणात आध्यात्मिक व धार्मिक परंपरांचा वारसा जोपासायचे काम श्रावण महिना करतो. श्रावणात येणाऱ्या अनेक सणांपकी सर्वाचा लाडका सण म्हणजे गोकुळाष्टमी, कृष्णजन्माचा दिवस. श्रावण महिन्याच्या वद्य अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला. कंसाच्या कडेकोट बंदिवासात देवकीने आपल्या आठव्या पुत्राला जन्म दिला. विष्णूच्या या आठव्या अवताराचे या दिवशी पृथ्वीवर दुर्जनांच्या नाशासाठी झालेले हे आगमन, म्हणून हा दिवस मोठय़ा भक्तिभावाने व जल्लोषात साजरा केला जातो. कृष्ण हा ईश्वर, ज्येष्ठ राजनीतिज्ञ, गोपिकांचा सखा अशा अनेक स्वरूपांत प्रसिद्ध आहे. या कृष्णाच्या प्रेमात न पडणारे विरळच आहेत. जगाच्या पाठीवर सर्वत्र कृष्णभक्त सापडतातच. याचे प्राचीन उत्तम उदाहरण म्हणजे हेलिडोटोरस. हेलिडोटोरस हा इंडो ग्रीक राजाचा राजदूत भागभद्र या शुंग राजाच्या दरबारात कार्यरत होता. विदिशा येथील इसवी सनपूर्व पहिल्या शतकातील स्तंभ शिलालेखात ग्रीक राजदूत हेलिडोटोरस हा स्वत:ला ‘भागवत’ म्हणवून घेतो. यावरूनच कृष्णभक्तीची परंपरा ही किती जुनी असावी हे लक्षात येते. ग्रीकही कृष्णाच्या प्रेमातून अलिप्त राहू शकले नाहीत. गोकुळाष्टमी या सणाच्या निमित्ताने आपण याच कृष्णतत्त्वाची उपासना करतो. म्हणूनच या सणाचे निमित्त साधून याच कृष्णाशी निगडित असणाऱ्या एका ऐतिहासिक पलूचा आढावा घेणार आहोत. ब्रिटिश आमदानीत अभ्यासकांनी रामायण व महाभारत तसेच इतर पौराणिक साहित्य या भाकडकथा आहेत म्हणून घोषित केल्या, ते साहजिकच होते. तत्कालीन विदेशी अभ्यासकांनी त्यांच्या संस्कृतीतील समाजरचनेनुसार किंवा त्यांच्या प्रादेशिक ऐतिहासिक मापदंडानुसार भारतीय इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला. ज्या देशावर नेहमी परकीयांनी राज्ये केली, नेहमी परकीय आक्रमणे होत राहिली त्या भूमीत रामायण, महाभारत या केवळ कथाच असू शकतात असे प्रतिपादले जाऊ लागले, त्यामागची सत्यता पडताळून पाहण्यात आली नाही. यामधूनच मग आर्य भारताबाहेरून आले (आर्यन थिअरी) यासारखी गृहितके मांडली गेली त्यातून अनेक यक्षप्रश्न निर्माण झाले. भारताचा इतिहास हा अॅलेक्झांडरपासून सुरू होतो असे मानले जाऊ लागले, परंतु या पार्श्वभूमीवर एक आश्चर्याची घटना घडली, ही घटना जगाचा इतिहास बदलणारी ठरली. असंस्कृत भारतीय इतिहासाला ‘सुसंस्कृत’ बनवणारी हडप्पा संस्कृती जगासमोर आली. जगात चार प्राचीन मानल्या जाणाऱ्या संस्कृतींत ही हडप्पा संस्कृती गणली जाऊ लागली. या संस्कृतीची अनेक स्थळे उघडकीस आली; यामध्येच गेल्या काही दशकांत एक महत्त्वपूर्ण स्थळ आपला संबंध या संस्कृतीशी दर्शवत होते; हे म्हणजे द्वारका. द्वारकेचा कृष्णाशी असलेला संबंध आणि त्याच वेळी हडप्पा संस्कृतीशी असलेला संबंध हा भारतीय पौराणिक संस्कृती व भारतीय इतिहास या दोन्ही गोष्टींना आत्मचिंतन करायला लावणारा होता. आज आपण श्रीकृष्णाच्या ज्या शहराला द्वारका म्हणून ओळखतो, त्या शहराचे जुने नाव द्वारिका. भारतीयांच्या जीवनात द्वारकेचे वेगळेच महत्त्व आहे. आपल्या संस्कारातून, मनातून कृष्ण जसा आपण वेगळा काढू शकत नाही तसेच द्वारकेचे अस्तित्व भारतीयांच्या संस्कारातून पर्यायाने इतिहासातून वगळता येत नाही. पौराणिक कथा म्हटल्या, कीत्यात तथ्य किती, हा प्रश्न नेहमीच उभा राहतो आणि भारतात तर हा प्रश्नच जटिल केला गेला आहे. एक तर या कथा भाकड ठरविल्या जातात किंवा त्यांचे सादरीकरण अद्भुत दैवीकरणाच्या आच्छादनात केले जाते. त्यामुळे या कथांच्या गíभताकडे साहजिकच दुर्लक्ष होते. ऐतिहासिक तथ्य हाताळत असताना कुठल्याही पुराव्याला कमी लेखून चालत नसते; म्हणूनच साहित्यिक पुरावा हादेखील इतिहासात तितकाच महत्त्वपूर्ण असतो. एखादे साहित्य मग ते धार्मिक असो किंवा अधार्मिक, ते तत्कालीन समाजाचे प्रतिनिधित्व करत असते. त्यातील अद्भुततेचा किंवा लालित्याचा भाग वगळून त्याकडे डोळसपणे पाहणे गरजेचे असते. तसेच महाभारत- द्वारका यांच्या संदर्भात झालेले आढळते. भारतीय धार्मिक संकल्पनेत महाभारत, कृष्ण, द्वारका यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पौराणिक साहित्यातून श्रीकृष्णाने वसवलेल्या द्वारकेविषयी भरभरून लिहिलेले आहे. आता ही द्वारका अस्तित्वात होती का, असा प्रश्न निर्माण होतो? गेल्या पन्नास वर्षांत झालेल्या पुरातत्त्वीय संशोधनातून द्वारकेचे अस्तित्व सिद्ध झालेले आहे; परंतु याबरोबरच अनेक नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. १. द्वारका आहे किंवा होती तर मग श्रीकृष्ण सत्य समजावा की मिथ्या? २. महाभारत इतिहास मानावा की एक भाकडकथा? ३. आतापर्यंत पाश्चिमात्य मापदंडानुसार भारताचा इतिहास जसा मांडला गेला आहे, तो तसाच आहे का? या प्रश्नांवरूनच लक्षात येते की, हे प्रश्न केवळ इतिहासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे नाहीत तर, भारतीय समाज, संस्कृती, धर्म, राजकारण या सर्व बाबतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. म्हणूनच द्वारकेच्या संशोधनावर संपूर्ण जगाचे लक्ष केंद्रित झालेले आहे. पौराणिक पार्श्वभूमी द्वारका हे भारताच्या गुजरात राज्यातील प्राचीन शहर असून पश्चिम किनारपट्टीवर पाण्याने वेढलेल्या ओखामंडल या भागात गोमती नदीच्या उजव्या किनाऱ्यावर वसलेले आहे. द्वारका हे िहदू तीर्थक्षेत्रातील बद्रीनाथ, पुरी, रामेश्वर, द्वारका या चार धामांतील एक, तर मथुरा, अयोध्या, काशी, कांचीपुरम, उज्जैन, पुरी, द्वारका या सप्तपुरीतील एक महत्त्वपूर्ण स्थळ मानले जाते. सध्या अस्तित्वात असलेल्या द्वारकेची दोन रूपे आहेत एक गोमती द्वारका तर दुसरे बेट द्वारका. गोमती द्वारका ही धाम आहे, तर बेट द्वारका ही पुरी आहे. बेट द्वारका ही गोमती द्वारकेपासून २५ किलोमीटर अंतरावर असून बेट द्वारकेला जाण्यासाठी नावेने समुद्र ओलांडावा लागतो. खरं तर हा समुद्र नसून कच्छची खाडी आहे. द्वारकेत श्रीकृष्णाचं मंदिर हे गोमती नदीच्या काठी आहे. ती नदी सागरात एकरूप होण्यासाठी तिथे येते. १७० फूट उंचीचे असे हे मंदिर असून त्याचे शिखर पाच मजली आहे. त्या मंदिराचा सभा मंडप साठ खांबांवर उभा असून गर्भगृहात श्रीकृष्णाची चतुर्भुज अशी चार फुटांची मूर्ती आहे. श्रीकृष्णाच्या अष्टनायिकांची स्थापना जवळच्याच एका वाडय़ात केलेली आहे. द्वारिका हा मूळ संस्कृत शब्द असून याचा अर्थ अनेक द्वार असलेलं नगर असा होतो. महाभारतात या स्थळाचा उल्लेख कुशस्थली असा करण्यात आलेला आहे. हे नगर भगवान श्रीकृष्णांनी वसवलेलं असून कालांतरांने सिंधु सागरात विलीन झाले अशी आख्यायिका आहे. असे असले तरी महाभारतातील व इतर पौराणिक साहित्यानुसार द्वारका ही कृष्णाने वसविण्यापूर्वी कुशस्थली या नावाने अस्तित्वात होती. देवी भागवत व श्रीमद भागवतानुसार जुनी द्वारका म्हणजेच कुशस्थली हे शहर ‘शर्यत’ राजवंशाचा राजा रेवत याने उभारलेले होते. राजा रेवत हा आनर्ताचा मुलगा असून वैवस्वत मनू याचा नातू होता. तर बलरामाची पत्नी रेवती ही रेवत राजाची कन्या होती. वायू-पुराणानुसार यादवांपूर्वी हे स्थळ आनर्ताच्या राजधानीचे ठिकाण होते. या राजवंशातील ककुद्मी या राजाच्या कारकीर्दीत पुण्यजन नावाच्या राक्षसाने हा प्रदेश बळकावला व कालांतराने जुनी द्वारका पाण्याखाली गेली. या घटनेनंतर बऱ्याच काळाने श्रीकृष्णाने द्वारका या नावाने येथे नवीन शहर वसवले. महाभारतातील आख्यायिकेप्रमाणे जरासंधाने कालयवनाच्या मदतीने मथुरेवर सतरा वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला. अठराव्या वेळी जरासंध व कालयवनाने मथुरेवर आक्रमण केल्यामुळे श्रीकृष्ण व बलरामाने यादवांसह राजस्थानमाग्रे रैवतक पर्वताचा पायथा गाठला आणि तिथे सागरतीरावर त्याने नवी द्वारकानगरी उभारली, म्हणूनच श्रीकृष्ण रणछोडदास या नावाने प्रसिद्ध झाला. श्रीकृष्णाने नव्या नगरीसाठी भगवान विश्वकर्मा यांचे आवाहन केले. विश्वकर्मा प्रगट झाल्यावर त्यांनी श्रीकृष्णाच्या विनंतीवरून समुद्रावर तरंगत्या अशा अद्भुत द्वारकेची निर्मिती केली. ही द्वारका म्हणजे सोन्याची नौकाच होती. द्वारकेचे प्रवेशद्वार अद्भुत होते. जरासंधासारखे शत्रू द्वारकेत सहजासहजी प्रवेश करू शकणार नाहीत अशी या द्वारकेच्या प्रवेशद्वाराची रचना होती, असे वर्णन पुराणात सापडते. परंतु दुर्दैवाने त्या शहराचा अंतही पाण्यात विलीन होऊनच झाला. श्रीकृष्णाच्या देहत्यागानंतर द्वारकेला सागराने गिळून टाकले, प्राचीन द्वारका ही बेटावर वसलेली होती व बंदर स्थान होती. बंदर अर्थव्यवस्थेमुळे आíथकदृष्टय़ा पुढारलेले शहर म्हणून ख्याती होती. गांधारीच्या शापामुळे यादवांच्या कुलनाशाबरोबरच द्वारकेचा नाश झाला, यादवांनी आपसात लढून आपला कुलनाश करून घेतल्यानंतर द्वारकेला समुद्राने आपल्या अंतरात सामावून घेतले अशी आख्यायिका आहे. ती द्वारका समुद्रात बुडाल्यावर कृष्णाच्या नातवाने वज्रनाथने ती पुन्हा उभारली. परंतु कालांतराने तिचा अंतही तसाच झाला. सध्या द्वारका व बेट द्वारका ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी पुराणकाळातील द्वारका होती का? यावरून अभ्यासकांमध्ये बरीच मतमतांतरे आहेत. ‘पेरीप्लस ऑफ एरिथ्रीअन सी’ या ग्रीक-रोमन ग्रंथात द्वारिकेला ‘बराका’ असे म्हटले गेले आहे, असा काही अभ्यासकांचा अंदाज आहे, तर टॉलेमी म्हणतो की, बराका हे एक द्वीप असून चारी बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे. महाभारतकालीन द्वारका नेमकी कुठे स्थित आहे, यावर पुष्कळ मतभेद आहेत. पहिला लेखी पुरावा आपल्याला पालीटाना येथील ताम्रपटामध्ये सापडतो. या ताम्रपटाचा कालावधी इ.स. सहाव्या शतकात जातो. भारतीय पुरातत्त्वाचे जनक डॉ. हसमुखलाल सांकालिया यांच्या मते सध्याची द्वारका हीच महाभारतकालीन द्वारावती आहे. पौराणिक साहित्यात दोन द्वारकांचा उल्लेख प्रकर्षांने येतो, एक म्हणजे रेवत राजाची द्वारका व दुसरा उल्लेख म्हणजे श्रीकृष्णाची द्वारका. महाभारतातील सभापर्व व आदिपर्वानुसार तसेच विष्णू व वायू पुराणात उल्लेखलेली द्वारका ही गुजरातमधील रैवत पर्वताच्या परिसरातील आहे, तर महाभारतातील मौसल पर्व हरिवंश, भागवत पुराणानुसार द्वारका ही समुद्रकिनारी वसलेली आहे. हरिवंशाच्या विष्णुपर्वात द्वारकेचा उल्लेख वारीदुर्ग म्हणजेच जलदुर्ग म्हणून केलेला आहे. हा दुर्ग चहूबाजूंनी पाण्याने वेढलेला आहे असे वर्णन केलेले आहे. पुरातत्वज्ज्ञ डॉ. सांकलिया यांच्या मतानुसार या दोन्ही द्वारका वेगवेगळ्या काळांतील असून आदी पर्व, सभा पर्व, विष्णू पुराण व वायू पुराण यात नमूद केलेली द्वारका ही इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकातील आहे, तर मौसल पर्वातील द्वारका ही त्यानंतरच्या कालखंडातील आहे. बौद्ध साहित्यातही आपल्याला द्वारकेचा उल्लेख सापडतो. घट जातकात इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकातील द्वारकेचा उल्लेख केलेला आहे. या उल्लेखानुसार द्वारकेच्या एका बाजूस समुद्र, तर दुसऱ्या बाजूस डोंगर आहे. काही तज्ज्ञांच्या मतानुसार ज्या वेळेस यादव मथुरेहून द्वारकेस स्थलांतरित झाले त्या वेळेस त्यांनी एक द्वारका वसवलेली नसून तब्बल पाच द्वारका वसवल्या असाव्यात. केवळ साहित्यातच नव्हे तर गुजरातमध्ये अनेक लोककथांमध्ये वेगवेगळ्या स्थळांचा द्वारका म्हणून उल्लेख केला जातो. त्यात मूळ द्वारका, सध्याची द्वारका, माधवपूर, जुनागढ, पोरबंदर व मियानी किनाऱ्यामधील काही स्थळांचा समावेश होतो. प्रसिद्ध पुरातत्त्वज्ज्ञ डॉ. एस. आर. राव यांनी कुशस्थली हीच द्वारका आहे असा निष्कर्ष मांडला. त्यांच्या मतानुसार गोमती द्वारका व बेट द्वारका याच प्राचीन द्वारका आहेत; परंतु पुरातत्वज्ज्ञ डॉ. अलोक त्रिपाठी यांनी त्यांच्या मताचे खंडन करत, गुजरातमधील माधवपूर, जुनागढ, पोरबंदर व मियानी किनाऱ्यामधील काही स्थळे यांचा संबंध प्राचीन द्वारकेशी असावा, असे मत मांडले. त्रिपाठींनी जुनागढ हे स्थळ प्राचीन द्वारका असावे, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न त्यांच्या संशोधनात केला आहे. यासाठी त्यांनी सॅटेलाइट रिमोट सेिन्सग फोटोग्राफीद्वारे घेतलेल्या चित्रणाचा वापर केला. या छायाचित्रात त्यांना जुनागढ परिसरात आटलेल्या नदीचे पुरावे सापडले. त्या आधारे त्यांनी प्राचीन काळात जुनागढ येथे पूर्वी पाण्याचा स्रोत होता व तो कालांतराने आटला, अशी मांडणी त्यांच्या संशोधनात केली. प्राचीन साहित्यात पाण्याच्या स्रोतास सागर असे म्हणत, त्याचा आधारही त्यांनी घेतला. तसेच येथे डोंगररांग असून पुराणात द्वारकेचे वर्णन केल्याप्रमाणे सागर व पर्वत असे दोन्हीही येथे आहेत. म्हणूनच त्रिपाठी यांनी जुनागढला प्राचीन द्वारकेचा दर्जा दिला. याशिवाय सम्राट अशोक व शक राजा रुद्रदामन पहिला यांचे शिलालेखही जुनागढला सापडले आहेत, हे विशेष. पुरातत्त्वीय पुरावे सर्वात आधी १९६३ मध्ये गुजरात पुरातत्त्व विभागाने व पुण्याच्या डेक्कन अभिमत महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने डॉ. सांकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली द्वारकेच्या द्वारकाधीश मंदिराच्या बाजूलाच उत्खनन करण्यात आले. या उत्खननातून इसवी सन पूर्व कालखंडात तिथे वस्ती होती याचे पुरावे सापडले. या संशोधनातून द्वारका दोनदा बुडाली असाही निष्कर्ष निघाला. या पुरातत्त्वीय उत्खननात पाच वेगवेगळ्या कालखंडाचे थर अभ्यासकांनी उघडकीस आणले. या थरांतून रेड पॉलिश वेअर, मातीचे चेंडू, रोमन अॅम्फोरा, शंखांपासून तयार केलेल्या बांगडय़ा, मंदिराचे भग्न अवशेष, मध्ययुगीन कालखंडातील गुजरातच्या सुलतानाची नाणी, मध्ययुगीन काचेच्या बांगडय़ा, मध्ययुगीन चमकदार मृदभांडी असे काही महत्त्वपूर्ण अवशेष मिळाले. तर डेक्कन महाविद्यालयानंतर डॉ. एस. आर. राव आणि भारतीय पुरातत्त्व खात्याने १९७९-८० च्या काळात या भागात पुन्हा पुरातत्त्वीय उत्खनन केले. या उत्खननातून आठ कालखंडांचे थर उघडकीस आले. या शिवाय या भूभागावर इसवी सन पूर्व १५०० या कालखंडात एक प्रगत हडप्पाकालीन संस्कृती नांदत होती आणि ती समुद्रामुळे नष्ट झाली असा निष्कर्ष अभ्यासा अंती मांडण्यात आला. द्वारका हे भारतातील पहिले सागरी पुरातत्त्वीय स्थळ असून समुद्राच्या तळाशी झालेले उत्खनन आणि सर्वेक्षण गोव्याच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशियनोग्राफीच्या मार्फत करण्यात आले. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशियनोग्राफीच्या मदतीने १९८२-८३ साली बेट द्वारकेला सर्वात प्रथम ऑन शोअर म्हणजे किनाऱ्यावर आणि ऑफ शोअर म्हणजे थेट समुद्रात पाण्याखाली असे सर्वेक्षण सुरू झाले. १९८२ पासून सुरू झालेले हे सर्वेक्षण टप्प्याटप्प्याने २००१ पर्यंत चालले. किनाऱ्यालगत आणि समुद्राअंतर्गत चाललेल्या या सर्वेक्षणात अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी उघडकीस आल्या. २००५ आणि २००७ मध्ये भारतीय नौदल व भारतीय पुरातत्त्व खात्याने एकत्रितपणे सर्वेक्षण केले. १९९७ आणि २००१ या कालावधीत समुद्री उत्खननात बरेच महत्त्वाचे पुरावे आढळले. त्यासाठी अभ्यासकांनी द्वारकेच्या किनाऱ्यापासून इंटर-टाईडल झोन ते २५ किमी खोल पाण्यात गवेषण केले. या संशोधनात एक चौरस किमी एवढा समुद्री सपाटीचा भाग अभ्यासण्यात आला. हा परिसर दोन भागात विभागलेला होता. पहिल्या भागात म्हणजेच लोकेशन-ए मध्ये स्थापत्य अवशेष आढळून आले. या स्थापत्य अवशेषात बरेच अर्धवर्तुळाकार खडक सापडले. त्यांचा आकार ९० अंश म्हणजेच इंग्रजी ‘छ’ आकाराचा आहे. या स्थापत्य रचना ६०-८० सेमी. एवढय़ा उंचीच्या असून, याचबरोबर काही आयताकृती दगडी ठोकळेसुद्धा सापडले. वेगवेगळ्या प्रकाराचे जहाजांचे दगडी नांगरसुद्धा या उत्खननात सापडले, त्यावरून असे सिद्ध होते कीद्वारका ही कधी काळी महत्त्वाचे बंदर असण्याची शक्यता आहे. तसेच या शिवाय बेट द्वारका इसवी सन पूर्व १५०० मध्ये मुख्य भूमीला जोडलेली होती हेही या अभ्यासात सिद्ध झाले. एकूणच संपूर्ण सर्वेक्षणात दगडी वास्तूंचे अवशेष, उत्तर हडप्पाकालीन मृद भांडय़ांचे अवशेष, पाटे, भग्न विष्णू मूर्ती, मंदिराचे अवशेष, किल्ल्याच्या िभतींचे अवशेष, नांगर, पितळेच्या वस्तू, लोखंडाच्या गंजलेल्या वस्तूंचे भाग, जीर्ण लाकडी वस्तूंचे भाग, मणी, कुशाण कालीन नाणी असे अनेक पुरावे हाती लागले. थोडक्यात डॉ. एस. आर. राव यांच्याच शब्दात सांगावयाचे झाले तर द्वारका हे भारतीय इतिहासातील पहिले सागरी बंदर हडप्पा संस्कृतीबरोबरच भारतातील नागरीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याचेही प्रतिनिधित्व करते. हा दुसरा टप्पा इसवीसनपूर्व सहाव्या शतकातील आहे. श्रीमद्भागवतामध्ये द्वारकेचे वर्णन करताना नारदमुनी म्हणतात, ‘हे शहर उद्यान, पक्षी, पाखरं यांनी समृद्ध असून, इकडची जल-तलाव विविध पुष्पानी बहरलेली होती. त्यात इंदिवरा, अंभोजा, कहलारा, कुमुद, उत्पला कमळ आणि हंसाचे मधुर स्वर तरंगत असत. सोन्या-चांदी-पाचूनी बांधलेले नऊ लक्ष राजमहाल, या महालांमध्ये सोन्या- माणकांनी सजवलेल्या वस्तूंची आरास होती. शहर-रचना अप्रतिम स्थापत्यकलेचा नमुना होती. रस्ते, बाजारहाट, अनेक सभागृहे आणि देवतांची देवालये शहराची शोभा वाढवत असत. मार्ग, राजमार्ग, वस्तील मार्ग, या सर्वावर उष्णता कमी करण्यासाठी पाणी िशपडले जात असे. भगवान विश्वकर्मानी आपली विशेष कला भगवान श्रीकृष्णासाठी या नगर रचनेतून दाखवली. विश्वकमार्ंनी १६ सहस्र महाल उभारले. या सर्व महालात श्रीकृष्णांच्या १६ सहस्र राण्या राहत होत्या. या शहराला महाभारतात द्वारावती म्हणून ओळख होती. हे वर्णन जरी लालित्यपूर्ण असले तरी सापडलेल्या पुराव्यांवरून श्रीमद् भागवतामध्ये द्वारकेची वर्णन केलेली नगररचना अगदीच नाकारता येत नाही, असे संशोधकांना पुराव्यांवरून लक्षात आले. द्वारकेचा शेवट द्वारका हे भारतीय इतिहासाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण स्थळ आहे. द्वारकेचे धार्मिक महत्त्व हे तिच्या ऐतिहासिक पाश्र्वभूमीपेक्षा नेहमीच वरचढ ठरते. हे धार्मिक महत्त्व केवळ अस्तिकांसाठी नाही तर नास्तिकांसाठीही तेवढेच महत्त्वाचे असते. आस्तिक आपल्या श्रद्धेच्या चष्म्यातून द्वारकेकडे पाहतात तर नास्तिक अस्तिकांना विरोध करण्याच्या भूमिकेतून द्वारकेकडे पाहतात. या वादाच्या द्वंद्वाचे चटके भारतीय इतिहासाला उजाळा देणाऱ्या स्थळाला सोसावे लागतात. मग घडते ते राजकारण, म्हणूनच सगळ्या प्रकारचे पडदे, चष्मे डोळ्यांवरून बाजूला सारून एक ऐतिहासिक स्थळ म्हणून द्वारकेकडे पाहिल्यास आपल्यालाच पूर्वजांच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा समजण्यास मदत होईल. द्वारकेच्या संशोधनात बेट द्वारका हे तत्कालीन प्रसिद्ध बंदर आहे हे सिद्ध झाले आहे. तरीही उपलब्ध पुराव्यांवरून द्वारकेच्या काळासंबंधी अनेक वाद आहेत. नवीन संशोधनात जहाजांचे नांगर मोठय़ा प्रमाणात सापडले, या नांगरावरून ते कुठल्या भागातील असावेत, कुठल्या प्रकारच्या नौकांसाठी वापरले जात असावेत, असे अनेक अंदाज बांधता येतात. त्याचबरोबर अभ्यासकांनी द्वारकेच्या आजूबाजूच्या परिसरातही सर्वेक्षण आणि उत्खनन केले, या सर्वेक्षणात त्यांना गुजराती लिपी असलेला एक दगडी ठोकळा मिळाला. या दगडी ठोकळ्याची धाटणी, जहाजांच्या नागरांप्रमाणे असल्याने अभ्यासकांनी गुजराती लिपीच्या आधारे या नांगराचा काळ मध्ययुगीन असून अशा प्रकारचे नांगर इंडो-अरब व्यापाराचे निदर्शक होते, असा निष्कर्ष मांडला. वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून पाण्यात बुडालेल्या द्वारकेच्या अवशेषांना जगासमोर आणण्यात आले आहे, असे असले तरी या पुराव्यांची कालनिश्चितीही तशीच वैज्ञानिक पद्धतीने होण्याची गरज आहे. जहाजांच्या नांगरांचा काळ हा गृहीतकांऐवजी रेडिओमेट्रिक डेटिंगसारख्या वैज्ञानिक पद्धतीने शोधला असता तर सत्याकडे अधिक अचूक वाटचाल करता आली असती. नांगर मध्ययुगीन तर पूर्वीच्या उत्खननात मिळालेली मृदभांडी हडप्पाकालीन असल्याने अनेकविध कालखंडांमध्ये हा भूभाग वापरात होता, हेच लक्षात येते. ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात नेहमीच लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे ते स्थळ केवळ एकाच काळाचे निदर्शक असू शकत नाही. कालपरत्वे एक संस्कृती वसते, फुलते व कालांतराने नष्ट होते व त्याच ठिकाणी नव्याने दुसरी संस्कृती रुजू होते. असे असले तरी द्वारकेला सापडलेल्या पुराव्यांवरून हे मात्र नक्की सिद्ध होते की, द्वारका हे नागरीकरणाच्या पहिल्या टप्प्यापासून सुरक्षित कार्यरत बंदर होते व इंडो-अरब व्यापाराच्या काळात ते प्रगतीच्या सर्वोच्च िबदूवर होते. म्हणूनच द्वाराकेच्या संदर्भात अजून सखोल व शास्त्रीय संशोधनाची गरज आहे.