ganesh visheshचिंतामणराव पटवर्धनांनी कृष्णा नदीकाठी १८१४ मध्ये गणेश मंदिराची उभारणी सुरू केली. ती पुढे तीस वर्षे सुरू होती, असे सांगितले जाते. मुख्य मंदिर काळ्या पाषाणातील असून पेशवेकालीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून याकडे पाहिले जाते.

कृष्णातीरावरील गणेश मंदिर तब्बल दोन शतके सांगलीकरांच्या सुख-दु:खाचा साक्षीदार बनून राहिले आहे. या संस्थानकालीन मंदिराचे सौंदर्य लुभावणारे आहे. दगडी स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून अभ्यासकांना आकर्षति करणारे हे मंदिर वैशिष्टय़पूर्ण रचनेमुळे ख्यातकीर्त झाले नसते तर नवलच.

bhau rangari ganpati temple fire marathi news
भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळील जुन्या लाकडी वाड्याला आग
How Did Get Name Tulsibaug To Pune Famous Market
Pune : पुण्यातील प्रसिद्ध बाजारपेठेला ‘तुळशीबाग’ हे नाव कसे पडले? जाणून घ्या, या नावामागचा इतिहास
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन

मिरज संस्थानचे अधिपती सरदार गंगाधरराव पटवर्धन आणि सांगलीचे पहिले अधिपती चिंतामणराव पटवर्धन यांच्यात १७९९ मध्ये सरंजामाच्या वाटणीवरून विवाद निर्माण होऊन वाटणी झाली. चिंतामणराव पटवर्धन यांनी मिरजेच्या किल्ल्यातून बाहेर पडून सांगलीला आपल्या संस्थानाची राजधानी बनविली. त्यांनी सांगलीला गणेशदुर्ग या भुईकोटाची उभारणी केली.

चिंतामणराव पटवर्धनांची गणेशावर नितांत श्रद्धा होती. यामुळे त्यांनी कृष्णा नदीच्या काठाला १८१४ मध्ये गणेश मंदिराची उभारणी सुरू केली. प्रवेशद्वाराला लाल दगड वापरला तर मुख्य गाभारा आणि पंचायतनच्या मंदिरासाठी काळा घडीव दगड वापरला. या मंदिराच्या उभारणीस तब्बल ३० वर्षांचा कालावधी लागल्याचे समजते. शेकडो मजूर रात्रंदिवस या मंदिराच्या उभारणीच्या कामासाठी कष्ट करीत होते. वेगळ्या धाटणीच्या या मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर १८४५ मध्ये चत्र शुद्ध दशमीला या मंदिराचा अर्चा विधी झाला.

मंदिरातील पंचायतनच्या पाच मूर्ती भिमण्णा आणि मुकुंदा पाथरवट या स्थानिक कारागिरांकडून बनवून घेण्यात आल्या. यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १८४७ मध्ये मंदिराच्या शिखराचे काम पूर्ण करण्यात आले. १८४७ मधील मार्गशीर्ष महिन्यात मंदिराचा कलशारोहण समारंभ मोठय़ा थाटामाटात साजरा करण्यात आला.

गणपती पंचायतनच्या नमित्तिक खर्चासाठी संस्थानाच्या विविध गावांतील जमिनी इनाम दिल्या होत्या. गणेश मंदिराच्या आसपासचा परिसर यामुळे गेल्या १५० वर्षांपासून विकास पावत गेला. याच गणेशाच्या नावाने सांगलीची बाजारपेठ वसली. १९५२ मध्ये या गणेश मंदिरासमोर लाल रंगातील दगडाची कमान उभारण्यात आली. दुसऱ्या चिंतामणरावांच्या काळात या मंदिराची उर्वरित कामे पूर्ण करण्यात आली.

मुख्य मंदिर काळ्या पाषाणातील असून पेशवेकालीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून याकडे पाहिले जाते. मंदिरात संगमरवरातील रिद्धी-सिद्धीसह असलेल्या गणेशाची मूर्ती सुबक आहे. मुख्य मंदिराभोवती चिंतामणेश्वर हे महादेवाचे, चिंतामणेश्वरी हे देवीचे, सूर्यनारायण आणि लक्ष्मीनारायण अशी चार मंदिरे आहेत. या चार व एक मुख्य मंदिर असे गणपती पंचायतन म्हणून ओळखले जाते.

दरवर्षी भाद्रपद महिन्यात पाच दिवस गणेशोत्सव येथे साजरा केला जातो. या काळात कीर्तन, प्रवचन, लळित असे कार्यक्रम संस्थानकाळात आयोजित करण्यात येत होते. याशिवाय नामांकित हरदास, गवई अणि नृत्यांगनांचे कार्यक्रमही आयोजित करण्यात येत होते.

अलीकडच्या काळात विजयसिंह पटवर्धन यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून कायापालट केला आहे. मंदिराचे सुशोभीकरण करण्यात आले असले तरी मंदिराची मूळची सजावट कायम ठेवण्यात आली आहे. गणेशोत्सवालाही शाही रुपडे देण्यात आले आहे. उत्सवासाठी शाही परिवार अगत्याने उपस्थित असतो. अगदी चित्रपट तारका भाग्यश्री पटवर्धनही या उत्सवाला आवर्जून हजेरी लावून गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होते.

गणेशदुर्गातील दरबार हॉलमध्येही गणेशाची स्थापना करण्यात येते. ही प्रथा गेल्या २०० वर्षांपासून जपण्यात आली असून हा उत्सव पाहण्यासाठी आसपासच्या गावांसह लांबून लोक येतात.

गणेश मंदिराची उभारणी केल्यानंतर चिंतामणरावांनी भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून उत्सव सुरू केला. या उत्सवासाठी लाकूड, भुसा आणि कागदाचा लगदा वापरून गणेशमूर्ती तयार करण्यात येते. याला अलीकडील काळात चोर गणपती असे म्हटले जात असले तरी तसा ऐतिहासिक कागदपत्रांत संदर्भ सापडत नाही.

मंदिरातील गणेश उत्सवाची सांगता पंचमीला होते, मात्र राजवाडय़ातील दरबार हॉलमधील गणेश विसर्जन भाद्रपद अष्टमीला होते. या विसर्जन मिरवणुकीत अग्रभागी बबलू हत्ती असायचा. आजही त्याच दिमाखात मिरवणूक निघत असली तरी बबलूशिवाय असते. या मिरवणुकीवर गणेशभक्तांकडून पेढय़ांची उधळण होत असते.

तासगावचा गणेश

प्रा. पांडुरंग तपासे

सातमजली गोपुरांचे आणि २३१ वर्षांची रथयात्रेची परंपरा लाभलेले तासगाव येथील गणेश मंदिर चांगलेच प्रसिद्ध आहे. मराठय़ांचे सरसेनापती म्हणून पेशवाई काळात दक्षिण मुलुखगिरीत टिपू सुलतान, हैदर खान यांच्याशी लढाई गाजविणाऱ्या परशुरामभाऊंनी या मंदिराची पायाभरणी केली, तर त्यांचे पुत्र अप्पा पटवर्धन यांनी कलशारोहण केले.

मराठय़ांच्या स्वराज्यविस्तारात पेशवाईच्या कालखंडात ज्या ज्या सरदारांनी मर्दुमकी गाजविली अशांना दक्षिण भारतातील संस्थाने देण्यात आली. यामध्ये प्रमुख होते ते हरभटबाबा पटवर्धन. पटवर्धन घराण्यातील परशुरामभाऊ पटवर्धन यांना तासगावचा सुभा मिळाला. मूळ पुरुष असलेल्या हरभटबाबांची गणेशभक्ती परंपरागत आली असल्याने परशुरामभाऊ पटवर्धनांनी तासगावमध्ये गणेश मंदिराची उभारणी केली.

tasgoan-ganpatiतासगावचे गणेश मंदिर हे दाक्षिणात्य स्थापत्य कलेचा वारसा म्हणूनच ओळखले जाते. पश्चिम महाराष्ट्रात कुठेही आढळणार नाही असे गोपूर हे तासगावच्या गणेश मंदिराचे महत्त्वाचे वैशिष्टय़. त्याचबरोबर उजव्या सोंडेची गणेशमूर्ती हेदेखील अनोखपण म्हणावे लागले. तासगावच्या गणेशोत्सवातील रथयात्रेला २५० वर्षांची परंपरा लाभली आहे.

पटवर्धन घराण्यातील मूळ पुरुष असलेले हरभटबाबा हे कडवे गणेशभक्त. त्यांचे मूळ गाव कोकणातील गणपतीपुळ्याजवळील कोथवडे. हरभटबाबांनी दुर्वारस प्राशन करून गणेशपूजा केली असल्याचे सांगण्यात येते. परशुराम हे हरभटबाबांचे नातू. पेशवाईमध्ये अनेक लढायांमध्ये मर्दुमकी गाजवलेले. मराठय़ांच्या मुलुखगिरीत दक्षिणेत वावरत असताना तेथील मंदिराची स्थापत्यकला त्यांना आवडली आणि त्यांनी आपल्या संस्थानामध्ये तासगावला गोपुराचे गणेश मंदिर उभारले.

तासगावचे गणेश मंदिर तीन टप्प्यांत पाहण्यास मिळते. सातमजली ९६ फूट उंचीचे गोपूर, भव्य सभामंडप आणि गाभारा. मुख्य मंदिर ९.४४ ७ ८.८३ मीटर आकाराचे मुख्य मंदिर तर सभामंडप १३.७ ७ १०.३६ मीटर आकाराचा आहे. मंदिरात प्रवेश करीत असताना लागणारे गोपूर सातमजली असून यासाठी कर्नाटकातील गदगहून आणलेल्या दगडांचा वापर करण्यात आला. कर्नाटकातील वडार समाजातील कारागिरांकडून या मंदिराची उभारणी करण्यात आली. मंदिराच्या बांधकामाला तब्बल २० वष्रे लागली. १७७९ मध्ये सुरू झालेले मंदिरउभारणीचे काम १७९९ मध्ये परशुराम यांचे पुत्र अप्पाजी पटवर्धन यांनी पूर्ण केले.

या मंदिरात उजव्या सोंडेची गणेशमूर्ती आहे. गणेशोत्सवात भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशाचे आगमन झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे दीड दिवसात या गणेशाची मिरवणूक काढण्यात येते. १७८५ मध्ये पहिल्यांदा रथयात्रा सुरू करण्यात आली. यासाठी पाच मजली खास रथ तयार करण्यात आला असून प्रारंभी हा रथ लोखंडाचा करण्यात आला होता. मात्र दुसऱ्या वर्षांपासून सागवानी लाकडाचा रथ तयार करण्यात आला.

कापूर ओढय़ाकाठी सातशे मीटर अंतरावर असलेल्या काíतकस्वामींना भेटण्यास गणेश रथातून जातो. ३० फूट लांब आणि पाचमजली रथ गणेशभक्त दोरखंडाच्या साहाय्याने ओढत नेतात. या वेळी रथातून गणेशभक्तांवर फुले, गुलाल, पेढे यांची बरसात करण्यात येते. तसेच दर संकष्टीला सायंकाळी पाच वाजता गणेशाची पालखी पश्चिमेस असलेल्या काशी विश्वेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात येते.

response.lokprabha@expressindia.com