निरेन आपटे – response.lokprabha@expressindia.com
एकेकाळच्या समाजरचनेत वेगवेगळ्या कामांसाठी गाव बारा बलुतेदारांवर अवलंबून असायचं. आता तसं गाव राहिलं नाही आणि तसे बलुतेदारही उरले नाही. पण आपण ज्यांच्यावर अवलंबून असतो असे नवे बलुतेदार मात्र आहेत.

आत्मविश्वास वाढवण्यासाठी अनेक वक्ते, संन्यासी किंवा पंडित ‘स्वयंपूर्ण’ व्हा असं कितीही सांगत असले तरीही माणूस स्वत:पेक्षा दुसऱ्यावर अवलंबून राहूनच जगू शकतो. दुसऱ्यावर अवलंबून राहिल्याशिवाय त्याला स्वयंपूर्ण होताच येत नाही. आधी माणसाला वैयक्तिक जीवनात स्वयंपूर्ण होण्याचा संदेश देण्यात आला, मग गावे स्वयंपूर्ण करून पाहिली. पाठोपाठ शहरेही स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न झाला. पण तरीही दुसऱ्यावर अवलंबून राहिल्याशिवाय जगता येत नाही हेच वास्तव हाती उरलं. भारताचा प्राचीन इतिहासही त्याची साक्ष देतो. पूर्वी गावागावांत बलुतेदार असत. एकमेकांच्या गरजा पूर्ण करून ते जगत असत. आता काळ ‘फोर जी’चा आला तरीही बलुतेदारी संपलेली नाही. फक्त काळाच्या ओघात त्यांचं स्वरूप बदललं. आजही बलुतेदार अस्तित्वात असून आपल्याला त्यांच्याशिवाय आपलं जीवन जगता येत नाही.

Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
live in relationship old age marathi article
समुपदेशन : वृद्धत्वात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ?
Kitchen jugad video wash clothes with green chilli apply on cloth
Kitchen Jugaad Video: साबणाऐवजी हिरव्या मिरचीने धुवा कपडे; विचित्र उपायाचा चमत्कारिक परिणाम
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…

आधुनिक काळातील पहिला अत्यावश्यक बलुतेदार आहे मोबाइलवाला! मोबाइलचा वापर यत्र-तत्र-सर्वत्र झाला आहे. उद्या बोहल्यावर चढलेल्या वधू-वरासकट भटजींच्या हाती मोबाइल दिसला तर नवल वाटायला नको. किंवा आग लागलेल्या इमारतीत अग्निशामक दलाचा जवान एखाद्या स्त्रीला बाहेर काढतोय आणि ती मोबाइलवर ‘माझ्या नवऱ्याची बायको’ पाहत बाहेर आली आहे असं दृश्य दिसल्यास नवल वाटायला नको. माणूस शेजारी बसलेल्या माणसाला एकवेळ विचारणार नाही, पण मोबाइलवर ऑनलाइन आलेल्याला विचारल्याशिवाय राहणार नाही. मोबाइलचा इतका वापर असल्यामुळे मोबाइलवाला हा आधुनिक बलुतेदार जीवनात हवाच. एकतर हल्लीच्या युगात फक्त मोबाइल असणे पुरेसे नसते. तो मोबाइल सतत अपडेट झाल्याशिवाय तुम्ही आधुनिक होत नाही. अपडेट होण्यासाठी प्रसंगी मोबाइल बदलावा लागतो. अशा वेळी मोबाइल दुकानदार कामाला येतो. हातभर मोबाइलमध्ये तो काय करामती करून दाखवत नाही? मराठी कीपॅड लागत नाही म्हणून तुम्ही त्याच्याकडे जाता आणि तो क्षणभरात काहीतरी किमया करून मराठी कीपॅड लावतो. त्या आनंदात तुम्ही घरी येता आणि घरी आल्यावर मराठी कीपॅड दिसेनासे होते. पुन्हा त्याच्या दुकानात जावे लागते. त्याचा हात लागला की मोबाइल पाहिजे तसा सुरू होतो! या मोबाइलवाल्याला बहुधा देवाने वरदान दिलेलं असतं. मोबाइल सतत अपडेट होत असतात, पण या पठ्ठय़ाला लगेच सगळं समजतं. नारळ विकणारे नारळ नासका निघाला तर त्याची जबाबदारी घेत नाही. मोबाइलवालाही वॉरंटी, गॅरंटी असे बरेच शब्दप्रयोग करून मोबाइल देतो, पण खराब निघाला की त्याची जबाबदारी नसते. मग तुम्ही मोबाइलच्या कंपनीकडे फेऱ्या मारायच्या. मोबाइल विकणारा कंबरेला लावायचे पट्टेही का विकतो हा प्रश्न डेंटिस्ट गळ्यात टेथेस्कोप का घालतो तसा न सुटणारा आहे.

ज्याची आपल्याला केव्हाही गरज लागू शकते असा एक बलुतेदार म्हणजे प्लंबर. प्लंबरला प्लंबर असं म्हणत नाहीत तर माणूस असं म्हणतात. हा माणूस हार्डवेअरच्या दुकानाच्या बाजूला शांतपणे पान खात उभा असतो. गिऱ्हाईक आलं म्हणून त्याच्या चेहऱ्यावर कधीही आनंद दिसत नाही. येतो थोडय़ा वेळात असं सांगून तो कधीच सांगितलेल्या वेळेवर येत नाही. तो डोक्यावर टोपी का घालतो हा एक मोठा प्रश्न आहे. वरून गळणारं पाणी डोक्यात पडू नये म्हणून तो काळजी घेत असावा असे वाटत नाही. कारण आपण पाणी गळतं म्हणून या माणसाला बोलावलं की गळणारं पाणी थांबतं. तो नळाची तोटी फक्त फिरवतो आणि गळका नळ आपलं गळके तोंड बंद करतो. समुद्राला मागे जा असं सांगण्याची हिम्मत जशी ऋषीमुनींमध्ये असते तशी हिम्मत याच्यात असते. गळणारे नळ यांच्यासमोर माना टाकतात.

हा माणूस येतो तेव्हा ‘टाकी बंद करा’ असा आदेश आपल्याला सोडतो. नेमका त्याचवेळी गच्चीच्या टाकीची चावी असलेला इमारतीतला इसम बाहेर गेलेला असतो. टाकी बंद करता येत नाही. त्यामुळे हा माणूस जोरात येणारं पाणी अंगावर घेऊन नळ दुरुस्त करतो. बऱ्याच वेळा मला संशय येतो की, अशी माणसं कोकणातून शिकून येत असावीत. कारण कोकणातला माणूस पाण्याला कधीही घाबरत नाही.

पूर्वी जे बलुतेदार होते त्यात प्लंबर नव्हता. कारण तेव्हा नळ माहीत होता फक्त दमयंतीला! बाकीचे पाणवठे, विहीर किंवा तळ्यावरून पाणी भरत होते. नळाचा शोध लागला आणि हां हां म्हणता प्लिम्बगचं विश्व उभं राहील. माणूस पाणवठे, नदी सोडून दूर राहू लागला. तोटीतून घरात पाणी आलं आणि वेळीअवेळी तोटी गळू लागली, बंद पडू लागली. आणि प्लंबरही निर्माण झाले. आधुनिक युगात एक बलुतेदार तयार झाला. हा नळवाला तसा दुर्लक्षित. पण एकदा का नळाचं काही बिनसलं की हा अतिआवश्यक बनतो. दमयंती जशी नलाची वाट पाहत होती तशी या नळवाल्याची वाट पाहावी लागते.

एक जुना बलुतेदार अजूनही टिकून आहे आणि तो म्हणजे चर्मकार. पण आता चर्मकारांची कला पारंपरिक राहिली नाही. त्यातही बरेच बदल झाले आहेत. नवी पिढी फोरजी युगाशी जुळवून घेत आहेत. त्यांनी नवी दुकाने थाटली आहेत. नाही म्हणायला नाक्यावर चप्पल शिवणारा, बूट पॉलिश करणारा चप्पलवाला अजून उरला आहे. चप्पलवाल्याकडे कोणीही स्वत:हून जात नाही. माणसाचा चालवता धनी म्हणजे चप्पल किंवा बूट माणसाला त्याच्याकडे नेतात. जिथे चप्पल तुटते तिथे हा कधीच बसत नाही. चप्पल तुटलेल्या माणसाला चप्पल हातात घेतल्यावर आपली किंमत कळेल हे तो जाणून असतो. किराणा दुकान चालवणाऱ्याला कोणी उपास केला की भीती वाटते, तसं चप्पल दुरुस्त करणाऱ्याला कोणी अनवाणी चालण्याचा निश्चय केला की भीती वाटते. गिऱ्हाईकाने हातात तुटकी चप्पल आणली की त्याला आपले कसब दाखवता येते. त्याच्या  दुकानात चपला कमी आणि देवांचे फोटो जास्त असतात. प्रत्येक चप्पलवाल्याकडे कोल्हापुरी चपला तयार असतात. भलेही त्याचा कोल्हापूरशी कधीही संबंध आलेला नसो. मराठीमध्ये ‘चांभार चौकशा’ असा शब्दप्रयोग रूढ झाला आहे. पण तो आता खरा नव्हे. कारण आधुनिक युगातील चप्पल दुरुस्ती करणारे चौकशी करण्यासाठी तोंडाचा वापर करत नाहीत, चप्पल शिवण्याआधी त्यांनी पानाचा तोबरा तोंडात भरलेला असतो. मोबाइलवाला, इस्त्रीवाला किंवा एखादा दूधवाला जोडधंदा म्हणून जागेची दलाली करत असतो. पण चप्पल शिवणारा आपल्या धंद्याखेरीज दुसरा कोणताही जोडधंदा करताना दिसत नाही. त्याच्याकडे गिऱ्हाईकांची तासन्तास वाट बघण्याची कला असते, ती दुसऱ्या कोणात क्वचितच आढळते. गिऱ्हाईकांची गरसोय होऊ नये म्हणून तो एक चपलेचा जोड दुकानात ठेवतो. आपली चप्पल शिवायला घेतली किंवा बूट पॉलिश करायला घेतला तर अनवाणी उभं राहायची वेळ येऊ नये म्हणून तो चपलेची सोय करून ठेवत असतो.  हे फक्त चर्मकार नसून कर्मकारही आहे. कर्मावर त्याचा जास्त विश्वास असल्यामुळे नाक्यावर बसून आपला व्यवसाय संभाळण्यावर त्याचा विश्वास दिसतो.

इस्त्रीवाला कधीही सांगितलेल्या वेळेवर कपडे देत नाही आणि आपण बाहेर जायला निघतो तेव्हा हा येऊन टपकतो. दाराला लावलेलं कुलूप परत काढावं लागतं. ऐन शोकसभेत सगळेजण शांत स्थितीत उभे असताना जोरात िशक यावी तसा हा इस्त्रीवाला येतो. तुम्ही त्याला कितीही बोला त्याला आपल्याला उशीर झाला आहे याची जराही लाज वाटत नाही. उलट तुम्ही बाहेर जायला निघाला असला तरी हा इस्त्री करायचे कपडे मागतो. पुढच्या कपडय़ांना इस्त्री व्हावी असं त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला वाटतं. त्यामुळे बंद केलेलं दार पुन्हा उघडून तुम्ही आत जाता आणि धुतलेले कपडे शोधण्यात वेळ घालवता. तुम्हाला सिनेमाला जायला उशीर होतो. तुम्ही त्याला तसं बोलूनही दाखवता. पण त्याने तो सिनेमा आधीच पाहिला असतो. तो सिनेमा कसा टुकार आहे हे तो कथेसह सांगतो आणि तुमची आणखी पाच मिनिटे खातो.

इस्त्रीवाला हा आधी परीट म्हणून परिचित होता, पण विजेची इस्री आली आणि त्याचा कायापालट झाला. अजूनही तो कपडे धुतो. त्याला नव्या युगात लाँड्री नाव पडलं. काहींनी त्यापुढे जाऊन वॉशर नाव घेतलं. ज्याला काळासोबत चालायचं आहे त्याला इस्त्रीचे कडक कपडे घालावे लागतात. मग परीटही काळासोबत पुढे चालणारच.

‘रिकामा न्हावी, िभतीला तुंबडय़ा लावी’ अशी एक जुनी म्हण आहे. पण आता केशकर्तनकार हेअर स्टायलिस्ट किंवा सॅलोन म्हणून ओळखले जातात. ते िभतीला तुंबडय़ा लावत नाहीत, कारण त्यांच्याकडे िभत नसते तर पीओपीची सजावट असते. शिवाय सॅलोनमध्ये एसी लावलेला असतो. हेअर स्टायलिस्टसाठी नुसते केस कापायला आलेला कस्टमर हा खरा कस्टमर नव्हे. पìमग, कलिरग करायला येतो तो खरा कस्टमर. त्यामुळे केशकर्तनकार फक्त केस कापतात असं आता म्हणता येणार नाही. सॅलोनमध्ये नेहमी दर्दभरी गाणी लावलेली असतात. किंबहुना दर्दभरी गाणी ऐकल्याशिवाय हेअर स्टायलिस्ट होताच येत नसावे. शिवाय सॅलोनमध्ये सिनेमाची मासिके असतात. म्हणजे हेअर स्टायलिस्टला फक्त आसपासच्याच नव्हे तर सिनेमाच्याही भानगडी माहीत असतात. भानगडीची चर्चा केल्याशिवाय त्याला वस्तरा चालवताच येत नाही. कोणी किती लाखाची गाडी घेतली, कोणाचं लग्न मोडलं, कोणाचा फ्लॅट किती लाखात गेला आणि ती किंमत कशी कमी आहे हे याला सगळं माहीत असतं. आता समाजमाध्यमे आली आणि सगळेजण सर्व विषयातील जाणकार बनले. कोणी बँकेत क्लार्क असला तरी राजकीय पंडित बनतो, कोणी कुरिअर बॉय असला तरी अमेरिकेने कोणाशी युद्ध केले पाहिजे हे अधिकारवाणीने बोलतो. पण ही कला आधी अस्तित्वात आणली ती सलोनवाल्यांनी. ते सर्व विषयावर बोलतात. पुढचा मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री कोण होणार हे तो सहजपणे सांगतो. राजकारणावर त्याचा गाढा अभ्यास असतो. काही वर्तमानपत्रांच्या भांडवलावर तो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवरही बोलतो. सलमान खान एका सिनेमाचे किती कोटी घेतो आणि शाहरुखचे चित्रपट किती धंदा करतात यावरही तो अधिकारवाणीने भाष्य करतो.

पुरुषांना जशी सलोनची आवश्यकता असते तशी महिलांना ब्युटी पार्लरची. सौंदर्य अंतरंगात असतं असं म्हटलं जातं. पण आजच्या युगात सौंदर्य ब्युटी पार्लरमध्ये जाऊन मिळतं. पार्लर म्हटलं की तिथे स्त्रिया येतात आणि सौंदर्य प्रसाधनांच्या शेकडो बाटल्या असतात. अप्सरेचं रूप मिळावं असं अनेकींना वाटल्यास नवल नाही. बाटलीतल्या भुताकडून इच्छा पूर्ण करून घेतली जाते अशी कथा आहे. पार्लरमध्ये खरोखरच बाटलीमधून इच्छा पूर्ण करून घेतली जात असते.

जो पदार्थ आपण विकतो त्या पदार्थासारखेच कपडे घातले पाहिजे असा काही नियम नाही. पण दूधवाले असे कपडे घालतात की जणू असा काही नियम आहे. दुधवाल्यांचं मन दुधासारखं पांढरंशुभ्र असतं. फक्त तोंडातल्या पानाकडे तुम्ही दुर्लक्ष करायचं. तोंडात पान असतं. कारण ते आलेलेच असतात बनारसहून. मराठी माणूस उद्योगधंद्यात मागे पडतो हा जेव्हा बोलायचं विषय असतो तेव्हा दूधवाल्याचा उल्लेख आल्यावाचून राहत नाही. दूधवाला दुकानवाला असेल तर तो एकवेळ मराठी असतो. मग त्याच्या दुकानात दूध सोडून सर्व विषयांची चर्चा चालते. दूधवाल्याला गल्लीतील राजकारण प्रिय असतं. देशाचा पंतप्रधान कोण हे एकवेळ त्याला माहीत नसतं, पण आपला आणि इतरांचा नगरसेवक कोण हे त्याला चांगलं ठाऊक असतं. त्यात त्याच्या गावाचा नगरसेवक असेल तर हा दूधवाला दुधासोबत त्याचा प्रचारही करत फिरतो.

दूधवाल्याचा पहिला फायदा म्हणजे महाराष्ट्र किंवा भारत बंद असला तरी दूधवाला सुरू असतो. दूधवाला दुकानदार असेल तर तो अत्यावश्यक सेवा या सदराखाली इतर वस्तू विकून स्वत:चे उखळ पांढरे करून घेत असतो. एका अर्थाने दूधवाला हा खरा बलुतेदार आहे. जो अत्यावश्यक सेवा पुरवतो त्याला बलुतेदार म्हणतात. नाहीतर सोनारासारख्या व्यावसायिकाला अलुतेदार म्हणतात. काही वेळा दूधवाला घरी दुधाची पिशवी टाकून जातो, त्यामुळे दूधवाल्याचा बराच काळ आपल्याला चेहरा दिसत नाही. तो महिन्याचे पसे घ्यायला आला की, त्याचे दर्शन होते. रोज वृत्तपत्र टाकणाऱ्यासारखा हा दारातूनच आपलं काम करून निघून जातो. फ्लॅट संस्कृती आली आणि काहीजणांचं दर्शन बंद झालं. बदलत्या काळासोबत बरेच बदल झाले. उद्या कोणी अ‍ॅमेझॉनवरून दूध मागवले तर आश्चर्य वाटायला नको. कारण आता ऑनलाइन खरेदीचे दिवस आले आहेत.

नव्या युगाचा आणखी एक बलुतेदार म्हणजे गॅरेजवाला. भर रस्त्यावरून बाइक घेऊन जो मळक्या कपडय़ात जातो तो असतो गॅरेजवाला. अशावेळी त्याने कोणाचीतरी बाइक दुरुस्तीला घेतली आहे असे ओळखावे. गॅरेजवाला एकदा रस्त्यावर बाइक तपासण्यासाठी निघाला की तो रस्त्यात अजिबात थांबत नाही. रस्त्यात अपघात झाला, भांडण झालं तर पोलीससुद्धा पाहत उभे राहतात. पण बाईकवाला आपलं कर्तव्य सोडत नाही. ऊन असो किंवा पाऊस तो बाइक किंवा कारखाली आपलं काम करत राहतो. कपडे कितीही ग्रीसने भरले तरी त्याला त्याची तमा नसते. उलट एखादा गॅरेजवाला जितका जास्त ग्रीसने भरलेला तेवढा तो चांगला कारागीर समजला जातो. भेळवाला कळकट असेल तर त्याची भेळ लज्जतदार समजावी आणि गॅरेजवाला कळकट असेल तर आपली गाडी नीट दुरुस्त होणार हे जाणावे. आपली गाडी आणि चप्पल यात एक साम्य आहे. जिथे चर्मकार नसतो तिथे चप्पल तुटते आणि जिथे गॅरेजवाला नसतो तिथे गाडी पंक्चर होते. अशा वेळी गाडी ढकलत नेण्याशिवाय पर्याय नसतो.

घरात ज्याची कधीही गरज पडू शकते तो म्हणजे इलेक्ट्रिशियन. हाही बलुतेदार सध्या खूप व्यग्र असतो. त्यामुळे त्याला शोधून काढावं लागते. त्याची वेळ मिळवावी लागते. हा इसम सहसा पांढऱ्या कपडय़ात असतो आणि विजेचे काम करताना स्लीपर घालाव्यात असं जरी म्हटलं जात असलं तरी हा कधीच स्लीपर घालत नाही. अशा वेळी तो खूप धाडसी वाटतो. कितीही उंचावर चढायची वेळ आली तरी तो घाबरत नाही. जेव्हा चाळ संस्कृती होती तेव्हा याची सतत गरज लागत असे. इमारती झाल्या, फ्लॅट संस्कृती आली आणि फक्त गरजेच्या प्रसंगी इलेक्ट्रिशियनची गरज भासू लागली. त्यामुळे आता इलेक्ट्रिशियन आपण किती इमारती पूर्ण केल्या आहेत हे हटकून सांगतो. त्याचा अनुभव बक्कळ असतो. आपल्याशी गप्पा मारणारे बलुतेदार आता कमी झालेत. पण तुम्ही इलेक्ट्रिशियनशी बोललात तर तो गप्पा मारतो. त्याच्या गावाचा विषय निघाला तर भरपूर बोलतो.

लोहार, सोनार असेही बलुतेदार आज टिकून आहेत. कधी कुठे वेिल्डग करून घ्यायचं असेल तर लोहाराची गरज असते. बांधकाम व्यावसायिकांनी बऱ्याच सोयी आधीच करून ठेवल्या असल्यामुळे लोहाराची सामान्य माणसाला फारशी गरज भागत नाही. सोनार मात्र आपलं अस्तित्व टिकवून आहेत. कारण सोन्या-चांदीला भारतीय संस्कृतीमध्ये अजूनही मोल आहे. सणासुदीला सोनाराची दुकाने फुललेली असतात ती त्यामुळेच. कोळी हा बलुतेदारही आता टिकून आहे. पण मासळी बाजारात मिळते, मॉलमध्येही मिळते. त्यामुळे कोळ्याचा सामान्य माणसाशी थेट संबंध येत नाही. बाजारात गेलात तर कोळीण भेटते. कोळणीसह तिची मांजरही खाऊन पिऊन तृप्त असते. मांजरीच्या विश्वातही नशीब असावं. माणूस जसा श्रीमंत घरात जन्माला येणं भाग्याचं समजतात तशी मांजरं मासळी बाजारात जन्माला आली की नशीबवान समजतात.

‘कामाला जायला उशीर झायला, वाट माझी बघतोय रिक्षावाला’ हे गाणं जोरजोरात वाजत असेल तर तिथे रिक्षावाला उभा आहे असं डोळे झाकून ओळखावं. पंजाबमध्ये जशी ट्रक ड्राइव्हरवर गाणी तयार होतात तसं महाराष्ट्रात रिक्षा ड्राइव्हरवर गाणं रचलं जातं. नव्या युगाचा हा बलुतेदार गावागावांत आवश्यक झाला आहे. जग वेगवान झालं आणि रिक्षाची गरज वाढली. खरा रिक्षावाला हा गणवेशावरून ओळखला जातो. कारण त्यांना तशी सक्ती केली आहे. रिक्षावाले दोन प्रकारचे असतात. एक तर नाकासमोर रिक्षा चालवतात आणि दुसरे भराभर कट मारतात. रिक्षावाला आपल्या सीटवर तिरपा का बसतो याला मात्र उत्तर नाही. जाणकारांच्या मते त्यांचा गुरू त्यांना रिक्षा शिकवतो आणि गुरू शिकवून निघून गेल्यावर त्याची रिकामी जागा ते रिकामीच ठेवतात.  रिक्षाचालक आणि वाहतूक पोलिसांचं नातं उंदीर-मांजरासारखं जरी असलं तरी जास्त सीट घेतल्यावर पोलीस कधी पकडतात आणि कधी दुर्लक्ष करतात हे रिक्षावाल्याला बरोबर माहीत असतं.

जेव्हा एखाद्याची पशांची बॅग रिक्षात राहते तेव्हा त्याचा पत्ता शोधून ती बॅग परत करण्याचा प्रामाणिकपणा रिक्षावाले दाखवतात, तेव्हा माणुसकीचं दर्शन होतं. शिवाय अपघातातील व्यक्तींना तात्काळ इस्पितळात पोहोचवण्यासाठी रिक्षावाले मदत करतात. इतकं असूनही रिक्षावाल्यांवर अनेक नियम लादले जातात.

पूर्वी गावागावांत फक्त बारा बलुतेदार होते. आता माणसाच्या गरजा वाढल्या त्यामुळे ही संख्याही वाढत जाते. कोणाला इलेक्ट्रॉनिक्सचा दुकानदार हवा असतो तर कोणाला ज्योतिषी. कोणी लग्नासाठी विवाह नोंदणी संस्थेत जातं, तर कोणाला डॉक्टरची गरज भासते.

पूर्वीचे बारा बलुतेदार काळाच्या पडद्याआड गडप झाले. आता युग इंटरनेटवरून खरेदी करण्याचं आलं. शिवाय, अनेक मॉल्स सजले आहेत. एकाच ठिकाणी सर्व वस्तूंची खरेदी-विक्री होते. त्यामुळे हे नव्या युगातील बलुतेदारही गायब होतील अशी शक्यता आहे. जुन्या युगातील कुंभार, कोळी, गवळी, गुरव, जोशी, धोबी, मातंग, लोहार, सुतार यांचं अस्तित्व नगण्य आहे तर नव्या युगातील नवे बलुतेदार नव्या बाजारपेठेसमोर नगण्य ठरू लागले आहेत. इंटरनेटवर खरेदी होते खरी, पण त्यात माणसं एकमेकांना भेटत नाहीत. एकमेकांना न भेटता, न बोलता व्यवहार होतो. त्यामुळे असे व्यवहार ‘मानवी’ ठरत नाहीत. समोरासमोर व्यवहार करण्यात जी मजा असे, जो आनंद असतो तो नेटखरेदीमध्ये मिळत नाही. ज्यामुळे आधीच एकटा पडत चाललेला माणूस आणखी एकटा पडत चालला आहे. रवींद्रनाथ टागोरांच्या ‘काबुलीवाला’ कथेमध्ये काबुली विकणाऱ्या एका पठाणाचे आणि लहान मुलीचे नाते उलगडले होते. हा पठाण काबूलहून भारतात येतो आणि काबुली विकत असतो. एका घरातल्या लहान मुलीला पाहून त्याला आपली मुलगी आठवत असते. हळूहळू तो या छोटय़ा मुलीवर प्रेम करू लागतो. ही कथा टागोरांनी अत्यंत सर्जनशीलतेने उलगडली आहे. विक्रेत्याचे ग्राहकाशी नाते तयार होते. आपण मोबाइल सेवा घेतो तेव्हा मोबाइल कंपनीच्या कोणत्याही माणसाशी संबंध येत नाही, एटीएममधून पसे काढतो तेव्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क होत नाही. आता विक्रेता समोरच येत नाही. मग असे नाते तयार होणार कसे? बलुतेदारीमध्ये सगळ्या गावाचा एकमेकांशी संबंध येत होता. सुख-दु:ख वाटले जात होते. एकमेकांकडे येणेजाणे होते. महत्त्वाचं म्हणजे माझी कोणाला तरी गरज आहे आणि मलाही दुसऱ्याची गरज आहे या भावनेमुळे समाज बांधला जात होता. हल्ली आसपास गर्दी असूनही माणूस एकटा पडत चालला आहे. बलुतेदारी संपणे हे त्यामागचे मोठे कारण आहे.

‘कालाय तस्मै नम:’ म्हणण्यावाचून हातात काही उरत नाही.

(नोंद : या लेखातील उल्लेख हे जातीवाचक नसून त्या त्या पारंपरिक व्यवसायाचे वर्णन करण्यासाठी केले आहेत.)