आशीष वेदक

खोकलादेवी हे नावच थोडे विचित्र वाटते. खोकल्यासारखा एखाद्या सामान्य रोगाच्या नावावरून देवीचे नाव कसे असू शकते, हे अतक्र्य आहे. त्याहीपेक्षा अतक्र्य तर मुंबईसारख्या महानगरात आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध असताना विविध जातींमधील, विविध आर्थिक, सामाजिक, वैचारिक स्तरांतील लोकांचा डॉक्टरी उपायांनीही बरा न झालेला खोकला बरा करणारी देवी म्हणून खोकलादेवीवर श्रद्धा असते. ही गोष्टच खोकलादेवीबद्दलची उत्सुकता अधिक वाढवते. त्यातही खोकलादेवी इतर देवतांपेक्षा वेगळी वाटते. कारण तिची कोणत्याच प्रकारची विशिष्ट पूजापद्धती नाही, कर्मकांड नाहीत, तिला कोणत्याही प्रकारचे पशुबळी (कोंबडे, बकरे इत्यादी) दिले जात नाहीत. इतर देवतांसारखे तिचे जत्रोत्सव, सण साजरे होत नाहीत. तिचा कोणत्याही प्रकारचा भक्तसंप्रदाय नाही. फक्त पीठ आणि मीठ यावरच देवी संतुष्ट होऊन ती खोकला बरा करते ही लोकांची श्रद्धा आजही कायम आहे. एकूणच खोकलादेवीचे अस्तित्व हे लोकांची धार्मिक वृत्ती, धर्मावरील श्रद्धा या भक्कम पायावर उभे आहे, मग प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे, धर्म म्हणजे तरी काय?

Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?

धर्म एक संकल्पना

धर्म हा भारतीय समाजरचनेचा अविभाज्य घटक आहे. आदिम अवस्थेतून आजच्या विकसनशील अवस्थेत धर्म या संकल्पनेचा विकास होत आला आहे, ती एक निरंतर विकास प्रक्रिया आहे. धर्माला विविध आर्थिक, सांस्कृतिक, भौगोलिक, राजकीय पलूदेखील आहेत. मुळातच ती एक क्लिष्ट, व्यक्तिसापेक्ष, परिस्थितीजन्य, समाजाच्या सोयीसाठी, विकासासाठी श्रद्धेच्या पायावर उभी असलेली एक उत्तम व्यवस्था आहे.

भारतीय समाजात चातुर्वण्र्य व्यवस्थेनंतर निर्माण झालेल्या जातिव्यवस्थेमध्ये समाजाच्या भौतिक, दैविक, आध्यात्मिक आणि मोक्षप्राप्तीच्या गरजा, संकल्पना बदलल्या, वैदिक काळातील यज्ञहवन यांचे महत्त्व थोडे कमी झाले. ईश्वरप्राप्ती, रोगनिवृत्ती, सर्वागीण प्रगतीसाठी तसेच चतुर्विध पुरुषार्थप्राप्तीसाठी १) परापूजा २) मानसपूजा ३) मूर्तिपूजा अशा तीन पूजनपद्धती निर्माण झाल्या असाव्यात. यातील परापूजा आध्यत्मिकदृष्टय़ा प्रगत व्यक्तीला उपयुक्त तर मूर्तिपूजा सर्वसामान्य लोकांना उपयुक्त आहे, असे आपण म्हणू शकतो. परंतु वैदिक काळापासून ते आजही विविध देवतांचे महत्त्व कमी झाले नाही.

कालखंडानुसार वर्गीकरण

ढोबळ मानाने वैदिक काळापासून आजच्या काळातील देवतांचे वर्गीकरण

१)     वैदिक देवता (वेदात उल्लेख असलेल्या देवता किंवा वैदिक काळातील देवता)

२)     पौराणिक देवता (विविध पुराणांतील देवता)

३)     लोकदेवता (वेद, पुराण यात नसलेल्या परंतु विविध जाती, जमाती, आदिवासी द्वारे पूजनीय देवता)

यात वैजनाथ, सूर्य, धन्वंतरी, आश्विनीकुमार, खोकलादेवी, शीतलादेवी, मरीआई, प्लेगम्मा इत्यादीसारख्या लोकदेवता या रोगनिवारण करणाऱ्या देवता म्हणून ओळखल्या जातात. या सर्व देवतांच्या विविध चमत्कारिक शक्ती, सामर्थ्य, रोगनिवारण क्षमता, धान्य, धन, संतती इत्यादी तसेच इतर आधिभौतिक आधिदैविक, आध्यात्मिक गोष्टी देण्याची क्षमता ही लोकांचा आणि समाजाचा त्यांच्याप्रति असलेला विश्वास आणि श्रद्धा यांवर अवलंबून आहे, असे माझे मत आहे.

मध्ययुगीन मुंबईचा इतिहास, साधारणपणे ११व्या-१२व्या शतकाच्या आसपास सुरू होतो. गेल्याच वर्षी मुंबईत तुभ्रे येथे भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर परिसरात सापडलेला शिलालेख याची पुष्टीही करतो. महिकावतीच्या बखरीतूनही काही प्रमाणात मध्ययुगीन मुंबईची माहिती कळते, त्याचबरोबर ‘मुंबईचे दर्शन’, ‘मुंबई वृत्तांत’ यांसारख्या काही पुस्तकांतून जुन्या मुंबईचे दर्शन घडते. पूर्वी मुंबईचे वातावरण दमट, काहीसे कोंदट होते, सात बेटांच्या मुंबईत तर ओहोटीच्या वेळी खूप चिखल, दलदल होत असे. त्यामुळे डासांची पदास, त्यामुळे होणारे विविध प्रकारचे साथीचे रोग तसेच दमट हवामानामुळे नेहमी सर्दी, खोकला, कफ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच मुंबईचे मूळ रहिवासी असलेल्या कोळी आणि सोमवंशी क्षत्रिय पाठारे (चौकळशी/ पाचकळशी) समाजातील लोकांना, तसेच इतर जाती, धर्मातील लोकांना याचा आरोग्यविषयक त्रास नक्कीच झाला असेल.

पोर्तुगीजांकडून आंदण म्हणून मिळालेल्या सात बेटांच्या मुंबईचे ब्रिटिशांनी जेव्हा विस्तार, विकासकार्य सुरू केले, तेव्हा ब्रिटिश अधिकारी आणि भारतीय कामगारांनी तर मुंबईच्या हवामानास, भौगोलिक परिस्थितीस विविध दूषणे दिली आहेत. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तर मुंबईला नरकाची उपमा दिली आहे. एकदा मुंबईत आलेला मनुष्य जिवंत आपल्या मायदेशी जाऊ शकत नाही अशी मते त्यांनी नोंदवली आहेत. या तसेच अशाच विविध विधानांवरून मुंबई कशी राहण्यास अयोग्य, रोगट हवामानाची होती हे समजते.

त्या काळात तर प्लेग, मलेरिया, देवी, पटकी इत्यादी विविध साथीचे रोग मुंबईच्या पाचवीलाच पुजले होते. दमट हवामानात सर्दी, खोकला, कफ हे सामान्य विकार मुंबईकरांना नेहमीच होत असावेत, त्यासोबतच आपल्या संस्कृतीतील जातिव्यवस्था, (अंध) श्रद्धा, बिकट आर्थिक परिस्थिती, अस्वच्छता, आरोग्यविषयक सुविधांचा अभाव, अनास्था या सर्व गोष्टी खोकलादेवी, शीतलादेवी, मरीआई आणि तत्सम रोगनिवारक देवतांच्या उगम आणि विकासास कारणीभूत झाल्या असाव्यात. (याबाबत इतर तज्ज्ञ, संशोधकांचे वेगळे मत असू शकते). मुंबईसारख्या महानगरात आजही काही समुदायांमध्ये पूजनीय असलेल्या खोकल्यासारख्या सामान्य वाटणाऱ्या रोगास बरे करणाऱ्या ‘खोकलादेवी’ या देवतेविषयी अनेक गोष्टी जाणून घेणार आहोत.

खोकलादेवी नेमकी कोण?

कोणत्याही प्रकारचा खोकला बरे करणारी देवी म्हणजे खोकलादेवी होय. साधा खोकला, ओला खोकला, डांग्या खोकला, दम्याचा खोकला हे सर्व खोकलादेवी बरी करते अशी लोकांची श्रद्धा आजही दृढ आहे. डॉक्टरी इलाजांनी बरा न झालेला खोकला, खोकलादेवी बरा करू शकते असा लोकांना आजही विश्वास वाटतो. महाराष्ट्रात तिला खोकलादेवी, दक्षिण भारतात खोकलम्मा तर गुजरात राज्यात तिला रुकडादेवी असे म्हणतात.

याचबरोबर वसई येथेदेखील खोकलादेवीचे मंदिर आहे, तर बाबुलनाथजवळ एक रुकडादेवीचे मंदिर आहे.आपण इथे मुंबईतील खोकलादेवीबद्दल जाणून घेणार आहोत.

केदारेश्वर मंदिर (वरळी ) सन १८३२ साली सोमवंशी क्षत्रिय पाठारे समाजातील श्री त्रिंबक भिवजी म्हात्रे यांनी बांधले. मंदिर परिसरात खोकलादेवीचे लहान पण स्वतंत्र मंदिर आहे. तसेच केदारेश्वर, गणपती, हनुमान, शीतलादेवी यांचीदेखील मंदिरे आहेत. येथील खोकलादेवीस चार हात असून देवीच्या हातात कमळ, गदा, पुस्तक असून एक हात वरद मुद्रेत आहे. येथील नित्य पूजा करणाऱ्या केळकर गुरुजींच्या मतानुसार हे देवीचे सात्त्विक रूप असून, सरस्वतीच्या रूपाशी मिळतेजुळते आहे, आणि खोकलादेवीची मूर्ती ही पुरातन आहे

नीलकंठेश्वर मंदिरातील खोकलादेवी एक देवकोष्ठात असून देवी द्विभुज आहे, तिच्या एका हातात डमरू तर दुसऱ्या हातात अक्षमाळ (किंवा पात्र) आहे. मंदिर आवारात एक जीर्ण गधेगळ आहे. त्यावरील मजकूर संपूर्ण नष्ट झाला आहे, परंतु मंदिर पुरातन काळापासून असावे असे सिद्ध करते. मंदिराचे ट्रस्टी, उदय मंत्री यांच्यानुसार सध्याच्या मंदिराचा जीर्णोद्धार सन १९११ ला केला गेला. खोकलादेवीसोबत येथे, नीलकंठेश्वर, दत्त, हनुमान, ब्रह्मा, सूर्य, राधा कृष्ण, विठ्ठल रुख्मिणी यांचीदेखील मंदिरे, मूर्ती आहेत.

प्रभादेवी मंदिर मध्ययुगीन काळातील असावे असे विविध तज्ज्ञांचं मत आहे, तसा एक शिलालेख तेथे उपलब्ध आहे, सध्याचे मंदिर कीर्तिकर फॅमिली ट्रस्टचे असून येथे प्रभादेवी, चंडिका, कालिका, लक्ष्मीनारायण, शीतलादेवी, हनुमान आणि खोकलादेवी यांची मंदिरे आहेत. येथील खोकलादेवीला चार हात असून दोन हातात कमळे, तर दोन हात अभयमुद्रेत आहेत, आणि खोकलादेवीच्या गळ्यात साधा परंतु मोठा हार आहे. येथील पुजारी जयवंत जोशी यांनी सांगितले की पूर्वी श्रावण महिन्यात शुक्ल आणि कृष्ण चतुर्दशीला दोन वेगळ्या समाजातील तेलगु भाषिक लोक (कदाचित साळी /पदमशाली समाजातील) शीतलादेवी आणि खोकलादेवीच्या दर्शनास येत, आणि देवीस जेवणाचा नवेद्य दाखवत, परंतु सध्या काही कारणास्तव ते लोक श्रावणातील कोणत्याही रविवारी, त्यांच्या सोईनुसार देवीच्या दर्शनासाठी येतात.

माटुंगा येथील सातीआसरा मनमाला देवी मंदिरात असलेलं खोकलादेवी मंदिर माधुरी साळवी यांचे पणजोबा सावंत यांनी बांधले आहे.

माहीम येथील गौड सारस्वत ब्राह्मण समाजाच्या शीतलादेवी मंदिर परिसरात खोकलादेवीचे लहानसेच संगमरवरी पण घरासारखे दिसणारे मंदिर आहे, येथे शीतलादेवीच्या नित्य पूजा करणाऱ्या भमिनी म्हात्रे यांनी सांगितल्याप्रमाणे आजही लोकांची खोकलादेवीवर श्रद्धा आहे. येथील खोकलादेवीची मूर्ती ध्यानधारणा करण्यात मग्न असल्यासारखी दिसते. (कदाचित सध्याची मूर्ती ही अलीकडच्या काळातील असावी असे वाटते) मुंबई दर्शन (१८६३) आणि मुंबई वृत्तांत (१८८९) यांसारख्या १९ व्या शतकात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात मुंबईतील फक्त याच खोकलादेवीचा उल्लेख आढळतो तो असा ‘माहिमास खोकलादेवी आहे. तिची खोकला बंद करण्यावर प्रसिद्धी आहे’ यावरून येथील खोकलादेवी कदाचित मुंबईतील प्राचीन असावी.

मालाड, सोमवारी बाजार परिसरात असलेल्या पाटलादेवी मंदिरात, पाटलादेवी, खोकलादेवी आणि शीतलादेवीच्या मूर्ती आहेत, हे मंदिर पाचकळशी समाजाचे असून, सन १९११ मध्ये गणपत महंत यांनी त्याचा जीर्णोद्धार केला. मंदिरातील देवीचे भोपे अशोक नलावडे यांनी सांगितल्याप्रमाणे मालाड परिसरातील कोळी, कुंभार तसेच गुजराती भाषक काठियावाडी लोक, तसेच सफाई काम करणाऱ्या समुदायाचे लोक खोकलादेवीच्या दर्शनास येतात. कोळी, कुंभार लोक सुंठोडा देवीच्या नावाने प्रसाद म्हणून वाटतात. तर काठियावाडी लोक देवीस फरसाण अर्पण करतात.

एरंगळ गावातील खोकलादेवी मंदिर गावाच्या वेशीवर आहे. मुख्य म्हणजे देवीस चार हात आहेत आणि देवीच्या मागील हातात शूल आणि त्रिशूळ आहे आणि दोन हात मांडीवर आहेत. या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट अशी की प्रत्येक मंदिरातील खोकलादेवीच्या मूर्ती एकमेकींपेक्षा पूर्णत वेगळ्या आहेत. तसेच खोकलादेवीस कोणताच प्राणी वाहन म्हणून दिसत नाही.

मूर्तीलक्षणशास्त्रानुसार (Iconography) कोणत्याही देवतेची बाह्य़लक्षणे, शस्त्र, वाहन, इत्यादी ही वैदिक किंवा पौराणिक काळातील ठोकताळ्यानुसार निश्चित असतात, कालपरत्वे, स्थानपरत्वे बाह्य़ सजावटीत थोडा बदल केला जाऊ शकतो, परंतु कोणत्याही देवतेच्या सर्व मूर्तीमध्ये त्यांच्या मुख्य लक्षणात समानता राखण्यात येते. (याला काही मोजके अपवाद असूही शकतात)

परंतु खोकलादेवीच्या बाबतीत मात्र मूर्तीलक्षणशास्त्रानुसार कोणत्याच प्रकारचा विशिष्ट नियम किंवा साम्य दिसून येत नाही. तर खोकलादेवी ही कोणताही वैदिक, पौराणिक उल्लेख नसलेली परंतु विविध जाती-समुदायांत आजही (अल्पप्रमाणात) पूजनीय अशी लोकदेवता आहे. काही ठिकाणी तिला चार हात आहेत, काही ठिकाणी दोन, कधी तिच्या हातात कमळ आहे. अक्षमाळा पुस्तक, पानपात्र, गदा तर काही ठिकाणी कोणा पुरुषसमान दिसणाऱ्या मूर्तीस, किंवा मंदिराच्या स्तंभास देवत्व प्राप्त करून दिले आहे.

तरीदेखील वरील सात मंदिरांपैकी दोन मंदिरांतील खोकलादेवीच्या हातात कमळ पुष्प आहे, भारतीय संस्कृतीत कमळास उत्पत्तीचे प्रतीक मानले जाते, त्याच बरोबर आयुर्वेदातील पुष्पौषधी या शाखेनुसार विविध प्रकारच्या फुलांचा औषध म्हणून किंवा औषधांबरोबर वापर करतात त्यात कमळपुष्पात औषध घालून रोग्यास दिले जाते. त्यामुळे खोकलादेवी आणि कमळपुष्प यांचा रोगनिवारण पद्धतीत संबंध असू शकतो का ते शोधणे महत्त्वाचे आहे.

खोकलादेवीच्या संबंधित कथा :

खोकलादवी लोकदेवता असल्यामुळे कोणत्याही महत्त्वपूर्ण वेद, पुराण, उपनिषद यात तिच्या कथा नाहीत, परंतु तरीही खोकलादेवीच्या काही मनोरंजक, तिची महती सांगणाऱ्या गोष्टी खोकलादेवीच्या काही मंदिरात मौखिक परंपरेने पिढय़ान्पिढय़ा ऐकायला मिळाल्यात त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे-

एरंगळ गावात कशी आली?

एरंगळ गावातील खोकलादेवीच्या नित्य पूजा करणाऱ्या रतन पाटील यांनी खोकलादेवी एरंगळ गावात कशी आली त्याची एक कथा सांगितली. या कथेनुसार खोकलादेवी देवी आणि तिच्या सहा बहिणी आणि भाऊ (हरबादेवी, हिरडादेवी, हिरादेवी, हिंगलादेवी, शीतलादेवी, मोतमाऊली आणि भाऊ वेताळ) बोटीने समुद्रप्रवास करत असताना त्याची बोट एरंगळजवळच्या किनाऱ्याजवळ फुटली आणि ही भावंडे एकमेकांपासून दूर झाली आणि वेगवेगळ्या गावांत पोहोचली. त्यांचा भाऊ वेताळ खांदेरी बेटावर पोहोचला आणि एक बहीण वांद्रे येथे मोतमाऊली (माऊंट मेरी) झाली, बाकी सगळ्या बहिणी एरंगळ आणि आजूबाजूच्या गावांत पोहोचल्या आणि लोकांनी त्यांची तिथेच स्थापना केली. तसेच एरंगळ गावातील रहिवासी विल्सन कोळी, दर्शन निळा यांनी यावर असे सांगितले की, आजही आश्विन नवरात्रात खोकलादेवीची बहीण हरबादेवीकडून खोकलादेवीला मानाची ओटी येते.

लोकांचे प्रश्न कसे सोडवते?

माहीम येथील शीतलादेवी मंदिरातील शीतलादेवीची नित्य पूजा करणाऱ्या भामिनी म्हात्रे यांनी, एरंगळ येथील खोकलादेवीची एक लहान गोष्ट सांगितली.

आश्विन नवरात्रमध्ये एखादी व्यक्ती कुठूनही गर्दीतून वाट काढत, परंतु जोरजोरात खोकत धावत खोकलादेवीच्या मूर्तीजवळ येते आणि उपस्थित लोकांच्या समस्या सोडवते, असे मानले जाते.

सातीआसरा मनमालादेवी मंदिराच्या देखरेख करणाऱ्या माधुरी साळवी यांनी त्याच्या आजीने त्यांना खोकलादेवीची सांगितलेली कथा सांगितली. या कथेनुसार, मनमालादेवी आणि खोकलादेवीसहित एकूण सात बहिणी आहेत (मनमालादेवी, खोकलादेवी, जरीमरी, केवडादेवी, चम्पावतीदेवी, शीतलादेवी, गावदेवी) या सर्व देवी पूर्वी मध्यरात्री मंदिर परिसरात असलेल्या विहिरीत स्नान करत. त्याचबरोबर माधुरी स्वत नऊ-दहा वर्षांच्या असताना त्यांना खोकला झाला. तो बरा झाल्यावर त्यांच्या आईने खोकलादेवीला मीठ आणि पीठ वाहिले होते असे त्यांनी सांगितले. साळवी यांच्याशी बोलत असताना माटुंगा परिसरात राहणाऱ्या विभा आपटे यांनीदेखील खोकलादेवीच्या कृपेने खोकला बरा होऊ शकतो अशी श्रद्धा असल्याचे सांगितले.

मुंबईचे मूळ रहिवासी असलेले कोळी, सोमवंशी क्षत्रिय पाठारे (चौकळशी/ पाचकळशी) ज्ञातीतील लोक खोकलादेवीची विशेषत पूजा करताना आढळतात. वरीलपैकी चार मंदिरांची मालकी सोमवंशी क्षत्रिय पाठारे, (चौकळशी/ पाचकळशी) पाठारे प्रभू समाजातील कुटुंब किंवा ट्रस्टची आहे, तर उरलेली तीन मंदिरे प्रत्येकी  गौड सारस्वत ब्राह्मण, ९६ कुळी मराठा, तसेच शेषवंशी भंडारी समाजाच्या खासगी किंवा ज्ञातीच्या ट्रस्टच्या मालकीची आहेत. परंतु असे असूनही विविध जातीतील आणि विविध भाषा बोलणाऱ्या लोकांची खोकलादेवीवर श्रद्धा आहे, असे दिसून येते. या भाविकांमध्ये ब्राह्मण, मराठा, चौकळशी, पाचकळशी, कोळी, भंडारी, कुंभार, इत्यादी मराठी भाषक लोक, तेलगू भाषक पद्मशाली (साळी) समाजातील लोक, त्याचबरोबर गुजराती भाषक कुंभार, कठियावाडी सफाई काम करणारे अशा वेगवेगळ्या जातींतील लोकांचा समावेश आहे. हे लोक खोकलादेवीची पूजा करतात.

(वरील सर्व निरीक्षणे काही लोकांच्या प्रत्यक्ष भेटी आणि मुलाखती दरम्यानची आहेत)

खोकलादेवीला पीठ-मीठ!

लोक खोकलादेवीला पीठ आणि मीठ वाहतात. त्यापैकी पीठ हे तांदूळ, गहू, ज्वारी, किंवा बाजरी यापैकी कशाचेही असू शकते, त्यासोबत साधं मीठ अर्पण करतात. त्याशिवाय लोक श्रद्धेने देवीची खणानारळाने ओटी भरतात. इतर वस्तू अर्पणही करतात, देवीमुळे खोकला बरा झाला अशी श्रद्धा असते, तेव्हा मात्र फक्त पीठ आणि मीठच वाहतात. त्याशिवाय काही ठिकाणी (कोळी, कुंभार समाजातील लोक) सुंठोडा (सुंठ + साखर/गूळ) देवीचा प्रसाद म्हणून दिला जातो.

परंतु इतर गुजराती भाषक लोक, खोकलादेवीला फरसाण, शेव, गाठिया, चणे, गुळ वाहतात. तसेच ज्यामुळे खोकला होऊ शकतो असे विविध प्रकारचे तेलकट पदार्थ देवीला वाहतात. त्यामागे त्यांची अशी श्रद्धा आहे की खोकला होणारे पदार्थ अर्पण केल्याने देवी खोकला दूर करते, तर तेलगू भाषक लोक तिला जेवणाचा नवेद्य दाखवतात. परंतु पीठ आणि मीठ देवीला अर्पण करण्याचा सर्वत्र प्रघात आहे. यातील सुंठवडा हा तर खोकला बरा व्हावा म्हणून केला जाणारा सामान्य, सर्वज्ञात आयुर्वेदिक उपचार आहे तर पीठ आणि मीठ यातील मीठ तर घसा खवखवत असेल तर गुळण्या करण्यासाठी वापरले जाते.

लोकांच्या श्रद्धेनुसार अर्पण करण्यात आलेले पीठ आणि मीठ रुग्णाचा खोकला सोबतच घेऊन जाते, त्यामुळे काही मंदिरातील पुजारी ते पीठ आणि मीठ समुद्रात किंवा खाडीत विसर्जति करत असत, परंतु आजकाल काही मंदिरातील पुजारी लोक ते पीठ आणि मीठ गरजू गरीब लोकांना देतात.

व्यवसाय आणि खोकलादेवी

आज समाजात वैद्यकीय प्रगती झाली आहे. त्याचबरोबर खोकला हा तसा सामान्य रोगप्रकार वाटत असल्यामुळेच कदाचित खोकलादेवीच्या भक्तांची संख्या घटली असेल, त्यामुळेच लोक खोकलादेवीला अल्प प्रमाणात पुजत असतील. तरीसुद्धा खोकलादेवीचा आणि काही जातींच्या परंपरागत व्यवसाय किंवा उदरनिर्वाहाचे साधन, कामाची ठिकाणे यात नक्कीच विशेष संबंध आहे. कोळी बांधव नेहमीच मासेमारीसाठी समुद्राच्या, खाडीच्या जवळपास वस्ती करून राहतात. त्यामुळे समुद्राच्या खारट, दमट हवामानामुळे त्यांना सर्दी-खोकला होण्याची शक्यता जास्त. त्याचबरोबर कुंभार समाजातील लोक तसेच साळी (विणकर) लोकांचा माती आणि सुताच्या सूक्ष्म कण किंवा धाग्यांशी नेहमीच संबंध येतो. त्याचबरोबर सफाई कामगारांचा नेहमी कचरा आणि धूळ यांच्याशी संपर्क येतोच. त्यामुळे खोकला, दमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधुनिक वैद्यकशास्त्र त्याची पुष्टीही करते.

खोकल्याद्वारे पसरणारे इतर रोग कोणते ते पाहू या. यात देवी, (मोठय़ा बाया) गालगुंड, गोवर, इन्फ्लुएन्झा- बी, डांग्या खोकला हे काही रोग साध्या खोकल्यामुळे पसरू शकतात असे आजचे वैद्यकीयशास्त्र म्हणते. त्यामुळेदेखील लोकांच्या दृष्टीने खोकलादेवी महत्वाची ठरते.

खोकलादेवीचे भविष्य

एकूणच मुंबईतील सध्या अस्तित्वात असलेल्या हिंदू मंदिरांना फार तर ३००-३५० वर्षांचा इतिहास असेल. खोकलादेवीच्या मूर्ती या मूर्तिविज्ञानशास्त्राप्रमाणे प्राचीन नसतीलही, तसेच आजच्या वैद्यकीयदृष्टय़ा विकसित समाजात खोकलादेवीसारखी देवी केवळ लोकांची श्रद्धा आणि मौखिक इतिहासाद्वारेच येणाऱ्या पिढय़ांना ज्ञात आहे. उद्या कदाचित तिचा धार्मिक, सामाजिक संदर्भदेखील बदलू शकतो, तसेच इतर काही देवतांसारखी ती विस्मृतीतदेखील जाईल. तरीदेखील मुंबईसारख्या महानगरात, मुंबईच्या जडणघडणीत खोकलादेवीचे स्थान आणि अजूनही अल्प प्रमाणात का असेना, तिचे लोकांच्या स्मृतीत असलेले अस्तित्व हे मुंबईच्या भूतकाळाचे आणि इतिहासाचे, धार्मिक जीवनाचे, सामाजिक रचनेचे यथार्थ दर्शन घडवते. त्यामुळेच खोकलादेवी मुंबईसाठी महत्त्वाची ठरते. अजून एक महत्त्वाची लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, सात बेटांच्या मुंबईत (पूर्वीच्या) फक्त माहीम आणि वरळी बेटांवर खोकलादेवीची पाच मंदिरे आहेत. आणि हे दोनही विभाग पूर्वीच्या गिरणगावालगतचेच आहेत. त्यामुळे पूर्वीच्या कापड गिरण्या, मिल कामगार, त्यांच्या श्रद्धा, समजुती आणि खोकलादेवी यांचा काही संबंध आहे का, यावर संशोधन सुरू आहे.  दरम्यान, खोकलादेवीच्या या शोधादरम्यान असे लक्षात आले की काही ठिकाणी मंदिराचा स्तंभ तर काही ठिकाणी बुद्धप्रतिमेची पूजादेखील खोकलादेवी म्हणून केली जाते.