भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घ्यायची या संकल्पनेचे प्रतीकात्मक सांस्कृतिक रूप म्हणजे रक्षाबंधनाचा सण. श्रावणातल्या या महत्त्वाच्या सणामागे विविध कहाण्या प्रचलित आहेत. प्रदेशागणिक कहाण्या बदलल्या तरी आपल्या माणसाला प्रेमाच्या रेशीमबंधांनी जखडून ठेवायचे, ही कल्पना मात्र सगळीकडे समान आहे. आजच्या व्यवहारी जगात ती समजून घेतली पाहिजे.

‘भया मेरे राखी के बंधन को निभाना’, ‘बेहनोंने भाई की कलाई पे प्यार बांधा है’ लहानपणी अशी जुनी गाणी जेव्हा आकाशवाणीवर लागायची तेव्हा लक्षात यायचे की राखी पौर्णिमा आली आणि मग त्या राखीचे कोडकौतुक सुरू व्हायचे. आई तेव्हा म्हणायची हा उत्तरेतला सण आहे, आपला नाही आणि मग मला प्रश्न पडायचा की, उत्तरेतच हा सण मोठय़ा प्रमाणावर का करतात. मग हळूहळू असे लक्षात आले की, ही फक्त म्हणायची पद्धत आहे. रक्षाबंधन भारतात सर्वत्र साजरा केला जातो.

उत्तर भारतात हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो म्हणून प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन सणाप्रमाणे दक्षिण भारतात कार्तिक महिन्यात काíतकेय सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.

रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पावित्र्य व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे. राखी बांधण्याचा अर्थ आपण त्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वत:ला बांधून घेऊन तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो. राखीबंधनाच्या या सणातून मित्रत्व, स्नेह व परस्पर प्रेम वृिद्धगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे.

श्रावण महिन्यातील पौर्णिमेला ‘पोवती पौर्णिमा’ असेही म्हणतात. कापसाच्या सुताच्या नवसुती करून तिला आठ-बारा किंवा चोवीस गाठी मारतात व त्यांच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश, ओंकार, सूर्य इत्यादी देवतांचे आवाहन करून हे पोवते प्रथम देवास वाहून नंतर तसलीच पोवती कुटुंबातील माणसांच्या मनगटावर बांधली जातात.

रक्षाबंधनाची सुरुवात केव्हा झाली, याबद्दल निश्चित पुरावा नाही; पण त्याविषयी अनेक आख्यायिका आहेत. वैदिक काळात पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळाला व त्याचे गेलेले वैभव प्राप्त झाले. त्या दिवशी श्रावण पौर्णिमा होती. तेव्हापासून त्याची स्मृती म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत सुरू झाली आणि हा रक्षाबंधनाचा सण सुरू झाला असे म्हणतात.

पौराणिक काळातील अशीही एक कथा आहे. दैत्य राजा बलीकडे विष्णू आला तेव्हा शुक्राचार्यानी बळीच्या मनगटावर रक्षासूत्र बांधले. रक्षासूत्रापासूनच पुढे राखीची प्रथा आली असावी.

द्रौपदीने आपला भरजरी पितांबर फाडून कृष्णाच्या करंगळीवर चिंधी बांधली आणि कृष्णाने तिचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले अशी कथा आहे. सुभद्रा ही जरी कृष्णाची सख्खी बहीण असली तरी द्रौपदी आणि कृष्णाचे बंधूप्रेमाचे अप्रूप दिसून येते.

सिकंदर जेव्हा िहदुस्थानावर चाल करून आला, त्या वेळी तो झेलम नदीच्या किनारी पोहोचला. तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता. तेथे झेलम नदीच्या किनारी सावित्री नावाची एक स्त्री राखीची पूजा करून जलदेवतेला अर्पण करीत होती. हे दृश्य पाहून सिकंदर आश्चर्यचकित झाला. त्याने सावित्रीला राखीसंबंधी विचारले. सावित्रीने राखीचे महत्त्व सांगितले आणि त्याच्या मनगटावर बांधली. त्यांचे बहीण-भावाचे नाते निर्माण झाले. पुढे सिकंदराने पोरस राजावर चाल करून त्याला कैद केले. ही घटना पोरसाची सख्खी बहीण सावित्रीला कळताच, ती तत्परतेने सिकंदराकडे आली आणि तिने त्याला रक्षाबंधनाची आठवण करून दिली. सिकंदरला ती पोरसाची बहीण आहे हे कळताच त्याने तिची क्षमा मागितली व पोरसाला कैदेतून मुक्त केले आणि त्याचे राज्य परत दिले.

रजपूत लोक शूर, कडवे म्हणून विशेष प्रसिद्ध. कडवे म्हणजे शब्दास जागणारे. मध्ययुगीन काळात त्यांची साम्राज्ये होती. त्या वेळेपासून हा सण साजरा केला जात आहे. स्त्रिया आपला पती, भाऊ यांच्या मनगटास राखी बांधतात. दोऱ्याचे बंधन घालून स्त्रिया आपली, आपल्या अब्रूचे रक्षण करण्याची जबाबदारी, बंधन तुमच्यावर आहे, असे त्या पुरुषास-भावास सांगतात. त्यामुळे त्या काळात आपल्याला ज्या स्त्रीने राखी बांधली, तिच्या रक्षणार्थ प्रसंगी प्राण द्यायचे ही राजपुतांची नीती होती. याची बरीच उदाहरणे आहेत.

चित्तोडचा राजा राणा संग याच्या मृत्यूनंतर शत्रूच्या आक्रमणामुळे चित्तोडमधील परिस्थिती चिंताजनक बनली. राज्याचे रक्षण करण्यासाठी चित्तोडच्या राणी कर्मवतीने हुमायून बादशहाला बंधुप्रेमाची राखी पाठवून दिली. हुमायून बादशहाने त्या राखीचा आणि राणी कर्णावतीचा आदर राखला आणि बहादूरशहाच्या आक्रमणापासून चित्तोडचा बचाव केला.

या दिवशी बहिणीने आपल्या सख्ख्या भावाच्या हातावर राखी बांधावीच; पण तसा भाऊ नसेल तर नात्यांनी असलेल्या भावाला राखी बांधावी. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन घेणे. भाऊ जर दूर राहत असेल, तर बहीण त्याच्याकडे राखी पाठवून देते. तो जर जवळ राहत असेल, तर बहीण त्याच्या घरी जाऊन त्याला कुंकुमतिलक लावून पवित्र राखी त्याच्या मनगटावर बांधते. राखी बांधताना बहिणीने म्हणावे -येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल:। तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल॥ (दानवांचा राजा बली यांच्या हातात दैत्यगुरू शुक्राचार्य यांनी जशी रक्षा (राखी) बांधली होती तशीच ही राखी मी तुझ्या हातात बांधत आहे.) राखी बांधताना बहीण आपल्या भावाला सुख, शांती, दीर्घायुष्य लाभावे, अशी मनोमन प्रार्थना करते.

रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या उदात्त, पवित्र प्रेमाचा अखंड वाहणारा झरा. काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी वडिलांनासुद्धा राखी बांधते. आपल्यापेक्षा श्रेष्ठ, बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन हीच यामागची भावना आहे.

ही राखी स्त्रिया कलाकुसरीने आकर्षक बनवतात. आजकाल अनेक प्रकारच्या विविधरंगी, विविध कल्पना घेऊन जसे कार्टून्स, लोकप्रिय नायक व सुंदर नक्षीकाम केलेल्या दागिन्याप्रमाणे सजवलेल्या राख्या बनवल्या जातात. राखीबरोबरच औक्षण करण्याचे तबकही आकर्षकरीत्या सजवलेले असते. आजकाल रक्षाबंधन हा सण एक मोठा इव्हेण्ट झाला आहे.

‘राखी’ हा शब्द रक्ष या संस्कृत धातूपासून झाला आहे. याचा अर्थ ‘रक्षण कर’ – ‘राख म्हणजे सांभाळ’. कुठल्याही कर्तबगार, धाडसी शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असहाय, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. हे अभय शास्त्राधारे पौरोहित्य करणारे पुरोहित आपल्या यजमानघरी स्वत: सर्वाना राखीचा रेशीमधागा मंत्रोच्चारांसह बांधून देतात. यातला गíभत अर्थ धर्माचे रक्षण करणे हाच आहे, असे पूर्वी मानत असत. धर्म म्हणजे धारणा करणारा. समाज, देश धारणेसाठी सर्वाचे रक्षण करणे हा याचा अनुस्यूत अर्थ आहे.

पूर्वीपासून सासूरवाशीण मुली सणावारांसाठी माहेरी येत. त्या वेळी माहेरचे बालपण, लाड-प्रेम व सासरचा संसार यांची मनात घालमेल होई, ती आजही होतेच आहे. या मनाच्या खेळात आपला शाश्वत पाठीराखा कोणी असावाच, ही भावना भावाजवळ येऊन थांबते. कोणत्याही क्षणी, प्रसंगी कुठेही हाक मारताच धावून येणारा भाऊ हे बहिणीचे मर्मस्थान असते. भावाला राखी बांधताना तिच्या मनात भीतीचा लवलेश राहत नाही. एक राखी जीवनभर रक्षणाची साथ देते.

सण साजरे करण्यामागे केवळ परंपरा, रूढी असा अर्थ नसून त्याचे जे सामाजिक, धार्मिक, आíथक असे विविध अर्थ आहेत ते समजून घेऊन कालानुरूप सजगपणे सण साजरे केले पाहिजेत. रक्षाबंधन म्हणजे केवळ आपल्याच बहिणीच्या नव्हे, तर समाजातील सर्व स्त्रियांच्या रक्षणाची जबाबदारी असते. आज दुर्दैवाने स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज केवळ स्त्रियांचे भाऊ म्हणून रक्षण करणे पुरेसे नाही तर समाजाची एकूणच मानसिकता बदलणे गरजेचे आहे. स्त्री-पुरुष समानता मानणे, स्त्रियांचा आदर करणे, सर्वाना समान संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

खरे तर समाजातील सर्व दुर्बळ घटकांना विकासाच्या समान संधी निर्माण करणे, त्यांचे रक्षण करणे, परस्पर स्नेहभाव वाढवणे, माणुसकी जपणे आवश्यक आहे. परस्परातील नाती सुदृढ करणे आवश्यक आहे. भारतीय समाजात ऐक्य आणि प्रेमभाव वाढीस लागावा ही या रक्षाबंधन सणाची भूमिका आहे.
प्रतिनिधी – response.lokprabha@expressindia.com