मुंबईबाहेरच्या बहुतेकांच्या दृष्टीने मुंबईचा स्पेशल पदार्थ म्हणजे वडापाव आणि पावभाजी. पण मुंबईच्या माटुंगा परिसरात फेरफटका मारलात तर खाण्यापिण्याच्या बाबतीत साक्षात दक्षिण भारतच अनुभवायला मिळेल.

मुंबईकरांच्या सुपरफास्ट जीवनात इडली, वडा, डोसा या पदार्थानी अढळपद प्राप्त केलेले आहे. मुंबईकरांची ही गरज ओळखून मुंबईत अनेक साऊथ इंडियन हॉटेल्स उभी राहिली. मुंबईभर पसरलेली उडपी हॉटेल्स इडली-डोसे खिलवता-खिलवता काळानुरूप बदलत गेली. त्यात पंजाबी, चायनीज इत्यादी पदार्थही राजरोसपणे दिसू लागले आणि त्यांच्या सांबर-चटणीची अस्सल चव हरवली. तरी आजही मुंबईत काही अस्सल साऊथ इंडियन रेस्टॉरंट अजूनही टिकून आहेत.

अस्सल साऊथ इंडियन हॉटेलचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे त्याच्या काऊंटरवर पांढरी लुंगी (हल्ली पँट) आणि शर्ट घालून, कपाळावर भस्माचा आडवा पट्टा किंवा टिळा लावलेला आणि तोंडात पानाचा तोबारा भरून बसलेला मॅनेजर, हॉटेलमध्ये न मागता सढळ हस्ते मिळणारी सांबार-चटणी आणि तिथे मिळणारे साऊथ इंडियन पदार्थ. (आजकाल गल्लोगल्ली उभे राहून इडली-वडय़ाची प्लेट चटणी सांबाराच्या चिखलात बुडवून पेपरावर देणाऱ्यांना आपल्या या यादीत स्थान नाहीये.) असे अस्सल साऊथ इंडियन पदार्थ खाण्यासाठी माटुंगा गाठण्याशिवाय पर्याय नाही. ब्रिटिश काळात मुंबई शहराची वाढ होताना वेगवेगळी पॉकेट्स तयार झाली. त्यातील माटुंगा परिसरावर दाक्षिणात्यांचा प्रभाव राहिला. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक अशा विविध भागातून आलेल्या लोकांनी इथे वस्ती केली. त्यांच्या सांस्कृतिक आणि खाद्य परंपरेची छाप या परिसरावर पडणे अटळ होते. दाक्षिणात्य शैलीतील मंदिरे, मठ, शंकर मठमसारखी वेद पाठशाळा, तेलंग रोडच्या कोपऱ्यावरचा फूलबाजार त्यात मिळणारे दाक्षिणात्य पद्धतीचे हार, गजरे. रामा नायक ते मणीज, मद्रास कॅफे इत्यादी हॉटेल्स असा छोटासा दक्षिण भारतच माटुंग्यात वसलाय.

माटुंगा स्थानकात पूर्वेकडे उतरल्यावर स्टेशनच्या बाजूलाच डाव्या हाताला रामा नायक यांचे ‘श्रीकृष्ण बोर्डिग’ आहे. येथे दक्षिण भारतीय पद्धतीचे उत्तम जेवण मिळते. सांबार, रस्सम, भात, चटणी, भाजी, पापड, लोणचे आणि स्वीट डिश असे जेवण अनेक पिढय़ांना माफक दरात खाऊ घालत रामा नायक अनेक वर्षे आपला आब राखत उभे आहे. हौशी माणसांसाठी केळीच्या आडव्या पानावरही याच जेवणाचा आस्वाद घेता येतो.

southindian-dishes
रामा नायकपासून पुढे जाऊन रस्ता ओलांडल्यावर ‘शारदा भुवन’ आपले स्वागत करते. इथले अँटिक फर्निचर आणि आजही पांढऱ्या शुभ्र लुंगीतले वेटर्स आपल्या सेवेला हजर असतात. इडली, वडा, विविध प्रकारचे डोसे, केळा भजी असे असंख्य प्रकार इथे खायला मिळतात. पण इथली खासियत म्हणजे सोमवारी मिळणारा अडाई डोसा. मिश्र डाळींपासून बनवलेला हा डोसा खाल्ला की पूर्ण नाश्ता होतो. शुक्रवारी मिळणारी पाणपोळी (पानगी) केळ्याच्या पानात गुंडाळून येते. शारदा भुवनवरून पोदार कॉलेज ओलांडून पुढे गेल्यावर रुईया कॉलेजच्या बाजूला ‘मणीज’ नावाचे छोटंसं हॉटेल आहे. आपल्या कॉलेज जीवनात अनेकांनी पहिल्यावहिल्या अस्सल साऊथ इंडियन चवीचा आस्वाद याच ठिकाणी घेतला आहे. इथे बसायला कमी जागा असल्यामुळे हॉटेलच्या बाहेर कट्टय़ावर बसून किंवा गाडीत बसून खावे लागते, तरीही इथे कायम गर्दी असते. इथे मिळणारी इडली-चटणी, वडा-चटणी आणि त्याबरोबर कॉलेज जीवनातल्या आठवणी एकदम लाजवाब कॉम्बिनेशन आहे.

माटुंग्याला उतरून रुईया कॉलेजकडे न जाता विरुद्ध बाजूस गेल्यावर भांडारकर रोडच्या कॉर्नरवर राम आश्रय आहे. इथे मिळणारा म्हैसूर मसाला डोसा आणि त्याबरोबर मिळणाऱ्या विविध प्रकारच्या चटण्या मस्तच. या ठिकाणी रस्सम-वडाही उत्तम मिळतो. राम आश्रयवरून पुढे गेल्यावर डाव्या हाताला फुलांचे सुंदर हार बनवणारी दुकानं दिसतात. त्याचा मंद सुगंध वातावरणात पसरलेला असतो. येथे डावीकडे जाणारा रस्ता शंकर मठम् या वेद पाठशाळेकडे जातो. येथे ‘मणीज’ आहे. वडा-सांबार-चटणी; डोसे, दुपारी आणि रात्री मिळणारे साऊथ इंडियन पद्धतीचे जेवण आणि स्टीलच्या ग्लास-वाटीतून येणारी कॉफी (उच्चार काफी) इथली खासियत आहे.

मणीजच्या बाजूलाच फुटपाथवर एक टपरी आहे. पूर्वी नव्वदच्या दशकात इथे फक्त उथ्थप्पेच मिळायचे, पण आता सर्व साऊथ इंडियन पदार्थ मिळतात. इथला म्हैसूर मसाला डोसा आणि पायनॅपल शिरा अप्रतिम. मुंबईतल्या सर्व टपऱ्यांवर मिळणाऱ्या सांबार-चटणीचा दर्जा हा चिंतेचा विषय आहे. याला ही टपरीही अपवाद नाही. पण बाजूला मणीज असूनही या टपरीवर नेहमी गर्दी असते. मणीजवरून भाऊ दाजी रस्त्यावर गेल्यावर मद्रास कॅफे आहे. इथली इडली-चटणी, नीर डोसा अप्रतिमच. पुढे किंग्ज सर्कलला म्हणजे आजच्या महेश्वरी उद्यानला रामा नायक यांचं ‘उडपी विहार’ हे एसी रेस्टॉरंट आहे. एसी असल्याने माटुंग्यातील इतर साऊथ इंडियन रेस्टॉरंटच्या तुलनेत महाग आहे. गंमत म्हणजे हे रेस्टॉरंट इथल्या सँडविचसाठी प्रसिद्ध आहे. उडपीच्या बाजूला शारदा भुवन आहे, तर समोरच्या फुटपाथला रामा नायक यांचं ‘इडली हाऊस’ आहे. याशिवाय भांडारकर रोडवरच ‘अंबा भुवन’ही आपली चव राखून आहे. तिथे मिळणारा कढी-वडा लाजवाब. मिरची, कडीपत्त्याची फोडणी दिलेल्या गरमागरम आंबट-तिखट कढीसोबत वडा खाणं हा तृप्त करणारा अनुभव आहे. म्हैसूर कॅफेत फणसाच्या पानात बनवलेली ‘फोटो इडली’ हा हटके पदार्थ खायला मिळतो. त्याचबरोबर इथे मिळणारा नीर डोसा आणि पायनॅपल शिराही उत्तम असतो.

माटुंग्याच्या पुढे सायनला एकमेव साउथ इंडियन हॉटेल आहे. सायन स्टेशनकडून पूर्व महामार्गाकडे चालत जाताना उजव्या बाजूला ‘मणीज लंच होम’ आहे. फक्त जेवणाच्या वेळातच उघडय़ा असणाऱ्या या हॉटेलात अस्सल साऊथ इंडियन जेवण मिळते.

माटुंग्यानंतर अस्सल साऊथ इंडियन खाण्याकरिता मुंबई गाठण्याशिवाय पर्याय नाही. मुंबई सीएसटी स्थानकात उतरून जीपीओसमोरील मिंट रोडने चालायला सुरुवात केल्यावर ‘आनंद भुवन’ नावाची तीन हॉटेल्स एकापाठोपाठ एक लागतात, जाणकारांनाच त्यातील फरक कळतो. पहिला ‘न्यू आनंद भुवन.’ हे रोटी, पंजाबी, चायनीज इत्यादींमुळे आपल्या कॅटॅगरीत बसत नाही. त्याच्या बाजूचे ‘न्यू स्पेशल आनंद भुवन’ नावाचे हॉटेल आहे. आत्ता आत्तापर्यंत केवळ साऊथ इंडियन पदार्थ देणारे हे हॉटेलही आता बाटलंय. तरीसुद्धा आजही इथे दररोज एक अस्सल साऊथ इंडियन पदार्थ मिळतो. निअप्पम, पानपोळी, सुगियम, पायसम इत्यादी पदार्थ खाण्यासाठी इथे जायला हरकत नाही. तिसरे म्हणजे बॅलार्ड पिअरजवळच ‘न्यू स्पेशल आनंद भुवन’. हे अजून साऊथ इंडियन चव राखून आहे. इथे प्रथेप्रमाणे सांबार, चटणी आग्रहाने वाढतात. या हॉटेलच्या बाजूलाच ‘उडपी बोर्डिग’ नावाचे साउथ इंडियन जेवण देणारे केवळ आणि केवळ जेवणाच्या वेळेतच उघडे असणारे हॉटेल आहे. उडपी भवनच्या विरुद्ध बाजूच्या फुटपाथवरील एका बाकडय़ावर गरमागरम डोसे- चटणी उत्तम मिळते.

सीएसटीला आलोच आहोत तर, दोन टपऱ्यांचा उल्लेख टाळता येणार नाही. सीएसटी स्टेशनसमोर कॅनन पावभाजीच्या लाइनीत ‘साउथ कॉर्नर’ नावाची टपरी आहे. इथली खासियत म्हणजे इथे डोसे कोळशाच्या शेगडीवर बनवले जातात. इथली इडली आणि अनेक भाज्या घोकून बनवलेला इथला म्हैसूर मसाला डोसा खासच. मुंबईतल्या इतर टपऱ्यांप्रमाणे इथेही सांबार-चटणीची परिस्थिती चिंतनीय आहे. इथे रस्त्यात उभे राहून लोकांचे धक्के चुकवत खावे लागते. दुसरी टपरी म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटर समोरच्या फुटपाथवरची. इथे बटर डोसा, मसाला उत्तप्पा आणि दाल वडा उत्तम मिळतो. इथे चक्कचटणीही चांगली असते.

मुंबईच्या इतर उपनगरात अस्सल साउथ इंडियन हॉटेल्स जवळजवळ नाहीतच. दोन वर्षांपूर्वी घाटकोपर पूर्वेला आयनॉक्स थिएटरच्या खाली ‘बालाजी’ नावाचे हॉटेल होते. इथे फक्त इडली आणि डोशाचे सतराशे साठ प्रकार मिळायचे. इथे मिळणारा इडली प्लॅटर प्रकार एकदम हटके होता. यात वेगवेगळ्या प्रकारच्या इडल्या वेगवेगळ्या चटणी सांबार आणि टॉपिंग्जसहित एकामागोमाग एक यायच्या. हा प्रकार हॉटेल अचानक बंद झाल्यामुळे मिळेनासा झाला.

माटुंग्यानंतर साउथ इंडियन लोकांची वस्ती असणारे ठिकाण म्हणजे डोंबिवली. राजाजी पथ, डोंबिवली पश्चिम आणि गोग्रासवाडी या भागांत यांची वस्ती आणि देवळे आहेत. पण आज दुर्दैवाने खाण्याची ठिकाणे मात्र नाहीत. इथे दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती रुजली, पण फुलली नाही. काही वर्षांपूर्वी डोंबिवली पूर्वेला बाजीप्रभू चौकात ‘अन्नपूर्णा’ नावाचे अस्सल साऊथ इंडियन हॉटेल होते. डोंबिवलीतील एक खाणारी पिढी या हॉटेलने घडवली. रविवारी सकाळी अण्णूकडे (हे डोंबिवलीकरांनी त्याला ठेवलेलं प्रेमाचं नाव) जाऊन अप्पम, इडली, डोसे खाल्ल्याशिवाय डोंबिवलीकरांचा रविवार सुरू होत नसे. कालांतराने हे हॉटेल बंद पडले. पण आज डोंबिवलीत जागोजागी मिळणारे अप्पम ही याच हॉटेल्सची देणगी आहे. दोनेक वर्षांपूर्वी सारस्वत कॉलनीत पंचायत विहिरीजवळ अन्नपूर्णा हॉटेल परत सुरू झाले, पण आता पहिली चव राहिली नाही.

खरं तर खाण्यात अस्सल आणि नक्कल असं काही नसतं. आई किंवा बायकोने बनवलेली सांबार-चटणी अगदी साउथ इंडियन हॉटेलच्या तोडीची होते. पण या हॉटेलात दरवळणारे सांबार, रस्सम, कॉफीचे संमिश्र वास तिथले वातावरण तिथे वारंवार जाऊन खायला मजबूर करते.
अमित सामंत – response.lokprabha@expressindia.com