माधव गवाणकर
अनादि वासना अशा वेगळ्या रूपात, निराळ्या समकामी अंगाने उभी राहते, तेंव्हासुद्धा माणसाला जगण्याचा अधिकार, सन्मानाने आपला कल जोपासण्याचा हक्क मिळायलाच हवा.

नदीकिनारी कुणी नव्हतं आणि तरी ‘खूप जण’ होते. वनस्पती सुगंधी श्वसन करत होत्या. लाजरा ‘श्याम’ कुणाला दिसणार नाही अशा बेताने त्याचं गाणं गातच होता. प्रत्येक पाखरू आपली हद्दही सांगत असतं. दुष्काळ नसेल तर ते घरटं बांधून संसाराला लागतं.

नदीकाठी उघडय़ा अंगावर कोवळी उन्हं घेणाऱ्या चंद्रहासला कळत नव्हतं की, आपण नक्की कसं सेटल व्हायचं? आपली पदवी हा एक निर्थक कागद आहे की, धनकुंडली आहे? चंद्रहास मास मीडियाचा पदवीधर होता. स्थानिक दैनिक त्याला दरमहा चार हजार रुपयांवर बोलवत होतं. पण एकदा असं कमी वेतनाचं काम करत गेलो की, तीच फाटकी जीवनशैली बनते हा सावधगिरीचा इशारा त्या मुलांना मुंबईच्या पाहुण्याने दिला होता. मुख्य अतिथी म्हणून प्रसन्न दामले आले होते. त्यांचं भाषण चंदूने कानांत, मनात भरून घेतलं. रोज शिकवणाऱ्या माईणकर बाईंपेक्षा प्रसन्न खूपच वेगळं, नवं काही सांगत होते. त्यांना काही पुस्तकी पोर्शन पूर्ण करायचा नव्हता. ते व्यवसायातला व्यवहार सांगून गेले.

बहरत गेलेली चमकदार मुंबई चंद्रहासला गाठायची होती. कपाळ कोरलेलं असतं, सगळं आधीच ठरलेलं असतं हे त्याला अजिबात मान्य नव्हतं. घरातल्यांचा ‘डिग्री मिळवलीस आणि तरी घरी बसून आहेस,’ असा तक्रारीचा सूर होता. ते खोटं नव्हतं, पण किडलेल्या व्यवस्थेतून वाट काढणं अवघड आहे हे कॉलेजचं तोंड कधीही न पाहिलेल्या घरच्या मंडळींना कसं सांगायचं, कोणत्या शब्दात पटवायचं ते चंद्रहासला कळत नसे. तो तसा मोठा नव्हता! आपलं लहानपण परिस्थितीने मारून टाकलं, याची जाणीव त्याचं मन कुरतडत राहायची. चिंता-काळजीचे काही उंदीर स्वप्नात चावायचे. मग चंद्रहास झोपेतून दचकून उठायचा! काही स्वप्नं तो डायरीत लिहूनही ठेवायचा. सगळीच स्वप्नं लेखी मांडावीत अशी नसत. काही मोहोर गळतो, तशी नुसतीच गळून जात. देहाचं म्हणून एक जंगल असतं. तिथं त्या स्वप्नांचा उग्र तरीही मोहक गंध त्याला जाणवत राहायचा. चंद्रहासच्या आसपास, शेजारीपाजारी वाचनसंस्कृती हा शब्द कुणाच्या गावीही नव्हता. केबल टीव्हीला चंदू बातम्या वाचायचा, पण तो तिथे रमला नाही. तिथे मानधन मिळायलाही खूप वेळ लागला. मालक टाळाटाळच करत होता. खरं तर त्या लोकल चॅनलला बातम्या दिल्यामुळे पोरींचे बरेच फोन चंद्रहासला आले. पण ‘इतक्या पोरी काय करायच्या आहेत,’ असं मनात म्हणत चंदू हसला. गालाला खळी पडली. ललाला त्याच्या गाली पडणारी खळी जाम आवडायची. ‘पुरुषाच्या गालालाही खळी शोभते बरं का!’ असं तिचं मत होतं. ही पोरं वृत्तपत्रातही वाचकांच्या पत्रव्यवहारात त्यांची मतं ठामपणे मांडू लागली होती. इंदुलकर तर आठवडय़ाला एखादं तरी पत्र वृत्तपत्रात लिहायचा. ‘फक्त पत्रांवर थांबून नकोस’ असं त्याला कार्यकारी संपादक मानकर म्हणाले. मग तो काही ‘ऑफ बीट’ बातम्याही पाठवू लागला. मानकरांचा मेसेज आला. ‘सोबत फोटो असेल तरच बातमी पाठव! विषयाचा पुरावा हवा.’ काल्पनिक लेखनाला तर मानकरांचा विरोधच होता. ‘आम्ही वर्तमानपत्र चालवतो. साहित्यपरिषद नाही,’ असं ते तोंडावर सांगायचे. ‘कृपया कविता पाठवू नये’ची सूचना रविवार पुरवणीत छापलेली असायची. त्यामुळे कवडे लोक तो पेपर घेत नसत. ‘हे लोक कवी आहेत असं फक्त त्यांना स्वत:ला वाटतं,’ असं म्हणत मानकर गडगडाटी हसायचे. त्यांचं बोलणं ऐकायलां चंदूलाही आवडायचं, पण नोकरीचा विषय निघाला की ते विषय बदलत. मोडक म्हणाला, ‘मानकर जॉब देण्यासाठी भरपूर कॅश घेतो. आपल्याकडे पैसे नाहीत हे तो ओळखून आहे.’ त्याचा हा शोध चंद्रहासला पटला नाही, पण त्याने वादही घातला नाही. आपल्या रक्तपेशींमधली खुमखुमी हळूहळू कमी होतेय हे त्याला जाणवलं.

‘वाळू उपसा करणाऱ्याला धमकी देऊन पाटकरने ५० हजारांचं पाकीट घेतलं’ असल्या वाऱ्यावरच्या वार्तावर चंदूचा विश्वास नव्हता, पण हळूहळू त्याला वाटू लागलं, अशा बातम्या खऱ्या असतील? असंच काही आपल्यालाही करावं लागेल का?  पिवळ्या पत्रकारितेला भवितव्य ते काय?..

विचारांचा गुंता वाढत जायचा. आपण एका व्हर्लपूलमध्ये गरगरतोय असं वाटू लागायचं. क्रूर व्यवस्था आपल्याला भोवळ आणेल अशी भीतीही वाटायची. ‘भीतीलाच आपण नीती म्हणतो’ असंही वहीत त्याने नोंदवलं होतं. आपला हा भयाचा फील कुणाला सांगावा, असा प्रश्न त्याला पडायचा.

‘सौरभ’ नावाचं साप्ताहिक संपादकाने स्वत:च्याच नावाचा उपयोग करून सुरू केलं होतं. सौरभ भुवड त्याला म्हणाले, ‘चंदू, तू एक प्रश्न, एक उत्तर असा वाचकांना सल्ला देणारा कॉलम ठोकत राहशील काय? पॉकेटमनी देईन तुला. ‘दादाचा सल्ला’ म्हणू कॉलमला!’ मग हातखर्चाला पैसे सुटावेत म्हणून भुवडसाठी चंदू ‘दादाचा सल्ला’ तयार करून पुरवू लागला. चहा-पाण्याची सोय झाली. तो अजून सायकलच वापरत होता. मैदानातून जाताना तर वाळवंटातून जातोय असं वाटत होतं. झाडांचे इतके ‘खून’ झाले होते की, जिकडेतिकडे रखरखाट होता. सपाटीकरण, वाळवंटीकरण हे विषय अभ्यासक्रमातही होते, पण अभ्यासू माणसाला किंमत नव्हती. कुणाला थोपवण्याची हिम्मतही नव्हती. कोकणात ही दहशत प्रचंड आहे. मोठय़ा विचारवंतांचे खून मोठय़ा श्हरांत झाल्यावरही चंदूने ‘महाराष्ट्रात आता कशासाठी राहायचं?’ अशा आशयाचं पत्र दोन दैनिकांना पाठवलं, पण दोघांनाही दहशत असते का, असं त्याला वाटत राहिलं.

पाऊस न पाडणारे ढग सरकत जावेत तसा कोरडा, बेकार काळ चंद्रहास अनुभवत होता. त्यातच ललाचं लग्न ठरलं. तो शेतकी विषयातला प्राध्यापक होता. साठ हजार रुपये मासिक वेतन म्हणजे सुखच सुख! लला एकदाच रस्त्यात भेटली. म्हणाली, ‘चंद्या, तुला डी. जे. आवडत नाही हे ठाऊक आहे मला. वरातीत येऊ नकोस, पण दुपारी जेवायला तरी ये ना! उगाच भाव नको खाऊस’.. पण चंद्रहास गेला नाही. उत्साहच नव्हता.

आपलं एकेक माणूस कायमचं दूर जातंय. ललासुद्धा आता परकी झाली ही जाणीव चंद्रहासच्या मनावरचा दाब वाढवू लागली. त्याने पेपर चाळताना त्याच्या राशीचं त्या दिवशीचं भविष्य वाचलं. ‘भरभराट होईल’ असं छापलेलं होतं. चंदू जोरात हसला.

‘एक दिवस वेडा होशील हो! स्वत:शीच हसतोय मेला!’ मम्मी करवादून बडबडली. घरच्या माणसांपासूनही आपण मनाने दूर सरकतोय याची जाणीव चंद्रहासला हल्ली वारंवार होऊ लागली.

लग्न करून, आपल्यासारखं दिसणारं, ‘बघा, बघा, मी बाप झालो. मी ‘पुरुष’ आहे हो’ असा अप्रत्यक्ष गाजावाजा करायला लावणारं मूल जन्माला घालून आपण काय साधतो? ललासारखी हुशार पोरगीही घरातच सासरी चेपली जाणार ना, असं काय काय मनात उसळत राहायचं. नदीकाठचा एकान्त बरा वाटायचा. पण मूलबाळ नसलेली हिरू तिथे येऊन नको तेवढं लगट गोड बोलणं करू लागली, तेव्हां चंदू सावध झाला.

तिचा नवरा भलताच भांडग्या, तापट तात्या होता. त्यामुळे हिरगी नदीवर जायची, ती वेळ चंदू टाळू लागला. एखाद्या सैल, उनाड बाईला आपलं शरीर वापरू देणं हे त्याला कमीपणाचं वाटत होतं. त्याचा एखादा क्लासमेट त्याच्या जागी असता, तर त्याला मोठेपणा वाटला असता. संसार करणाऱ्या कोकणातल्या बायका काही सरसकट गैरवर्तनी नसतात, पण अपवाद होतेच! ते असतातच! ‘बायकांची लैंगिक उपासमार आपण लक्षातच घेत नाही. कधी कधी तर त्यांचं लग्नही मनाविरुद्ध झालेलं असतं.’ हे चंद्रहास योगेनकडे बोलून गेला. योगेन पालेकर आखाती देशात जायला निघाला होता. मोबाइल टॉवर्स बांधण्याची कंत्राटं घेणाऱ्या कंपनीत त्याला त्याच्या काकांच्या ओळखीवर चांगला जॉब मिळाला होता. पालेकर तसा रफटफ, पण देश सोडताना हळवा झाला. म्हणाला, ‘चंदू, मी नीट सेट झालो की, तुलाही बोलावतो आमच्या कंपनीत. मराठी माणसाने मराठी माणसाला हात दिला पाहिजे यार! आपण भांडत बसतो. भेदभाव करतो. हा कोकणी, तो घाटी असले फरक मराठी माणसातच करतो. चुकीचं आहे हे. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये रहा. गल्फला जातोय म्हणजे काही चंद्रावर नाय जात. मी तुमचाच आहे!..’ पालेकर परदेशी गेल्यावर मात्र त्याचा कोणताही संपर्क चंदूशी राहिला नाही. नव्या व्यवसायात तोच कदाचित अडचणीत असेल, असं मनाचं समाधान चंद्रहासने करून घेतलं. दिपोली हे चंदू राहायचा ते तालुक्याचं गाव. त्याला मात्र सावरी गाव अधिक आवडायचं. खरं कोकण वाटायचं ते. हिरवीपोपटी निसर्गसृष्टी एकेका नर्सरीच्या रूपात तिथं उभी होती. त्या रोपवाटिकांच्या संगतीत चंदूला वाटायचं, आपणही एक मिशीवालं फुलपाखरू आहोत! आपल्या मनाला पंख फुटले आहेत. पूर्वी सुचत नव्हत्या अशा कल्पना आपल्याला हल्ली सुचताहेत. ही कल्पकता बातम्यांसाठी उपयोगी नाही. आपण सावरी गावात भटकताना जे सौंदर्य अनुभवतो, ते ललित लेखनासाठीच उपयोगी आहे.

मग मानकरांना त्याने कॉलमबद्दल विचारलं. ते ढग गडगडावेत तसे पुन्हा हसले. ‘आमचे नोटेड रायटर्स ठरलेले आहेत. त्या टीममध्ये तुला कसं घेणार? तुझ्या नावावर एखादं गाजलेलं पुस्तक आहे का?’ हे ऐकल्यावर चंद्रहास हिरमुसला झाला. ‘आम्हाला संधी तर द्या!’.. हे म्हणणं त्याच्या मनातच राहिलं. मानकरांनी त्याला प्रेसजवळच्या गुऱ्हाळात उसाचा रस पाजला. बाकी कसलंही आश्वासन दिलं नाही. तेवढय़ात मानस दिसला. उन्हात लालबुंद झाला होता. त्याला टी. वाय. ला के.टी. बसली होती. शिवाय त्याची फॅकल्टी वेगळी होती, पण तो नेहमी चंदूशी बोलायचा. आग्रह करून करून त्याने चंद्रहासला आपल्या घरी नेलं. ‘चांदोबा, तू खूप छान आहेस रे. आवडतोस मला,’ असं मानस म्हणाला. तेंव्हा चंदू थोडा गोंधळला. एखादी प्रेमळ मुलगीच आपल्याशी बोलतेय असं त्याला वाटलं.

मानसचं घर म्हणजे भाडय़ाच्या दोन खोल्या होत्या पण बंगल्यातल्या होत्या. अभ्यासाला एकान्त चांगलाच होता. ‘इथे नीट अभ्यास होऊ शकतो, मग तुला के.टी. कशी?’

‘माझं शिक्षणात लक्षच लागत नाही रे. आपलं कुणी आहे असं वाटतंच नाही.’

‘म्हणजे? मी समजलो नाही’.

‘आमच्यासारख्या पोरांची बाजू घेणारं कोण आहे या देशात? आणि पालकर गेला तसं परदेशातही जाता येणार नाही मला. अर्थात तो आमच्यातला नव्हताच’..

‘म्हणजे? ‘कास्ट’बद्दल बोलेतो आहेस का तू?.. प्लीज.. मी जातपात मानत नाही.’

‘मी तरी कुठं मानतो?.. पण आमची कम्युनिटी वेगळी आहे चंद्या’.. चंद्रहासच्या डोक्यात आता हळूहळू प्रकाश पडू लागला. ‘एलजीबीटी’चा विषय अभ्यासक्रमातच होता. कलम ३७७ वर टीपही लिहायला आली होती.. म्हणजे हा मानस ‘गे’ तर नसेल?.. तसं चंदूने थेट विचारलं. त्याने जराही अस्वस्थ न होता होकार दिला. मानसच्या मुलीसारख्या वागण्याचा, बोलण्याचा, प्रेमळ दृष्टीचा, मुलांबद्दल ओढ वाटण्याचा एकेक संदर्भ आता लागू लागला. मानसच्या आणि चंदूच्या मैत्रीत एकच समान धागा होता. दोघेही देव न मानणारे होते. एथिस्ट सेंटरची कल्पना मानससमोर चंद्रहासने मांडली. ‘सध्या आपल्याकडे वेळ आहे. ताकद आहे. आपण केंद्र चालवू शकतो. भाविकांसाठी देवळं असतात. देव न मानणाऱ्यांसाठी एखादं सेंटर का नसावं? आपल्यासारखे इतर निरीश्वरवादी तिथं चर्चा करायला जमतील. एक सपोर्ट ग्रुप तयार करू. इंटरनेट आहेच त्यासाठी!’ मानसला हे पटलं आणि दोघेही त्या तयारीला लागले. हल्लीच प्रकाशित झालेलं ‘श्रद्धा विसर्जन’ हे पुस्तकही मानसने मुद्दाम मागवलं. पहिल्याच छोटय़ा सभेला जिल्ह्यतून सात-आठ जण आले. गणपत तर अगदी छोटय़ा गावातला कलिंगडांची बाग सांभाळणारा बागायतदार, पण तोही, हजर होता. तो म्हणाला, ‘आपल्या या केंद्राबद्दल बातम्या आल्या तर त्रास होऊ शकतो.’ चंदूच्या मते नास्तिकता आपल्यापुरती जपण्यात बेकायदेशीर काहीच नाही.

‘मग टरकायचं कशाला? जे आधीपासून नास्तिकच आहेत, त्यांना आपण बोलावतोय, गप्पा करतोय, पाठिंबा देतोय. हे काही नास्तिक बनवण्याचं, नास्तिकता शिकवायचं केद्र नाही.’.. चंदूच्या घरच्या मंडळींना नास्तिकांच्या केंद्राची, अशा मंडळाची कल्पना आवडली नाही. स्थानिक दैनिकात असं मंडळ सुरू झाल्याची बातमी आल्यावर एक शॉर्ट मॅसेजही आला. ‘धर्मबुडव्यांनो, तुम्हाला धडा शिकवायला एक दिवस पुरेसा आहे.’ मानस त्याच्या स्त्रण वृत्तीमुळे थोडा घाबरला. चंदू मात्र बिनधास्त होता. मानसची आई म्हणाली. ‘या उद्योगांपेक्षा पास हो नीट. के. टी. मिळालीय. त्याची लाज आहे का नाही?’..

मानसला चंद्रहासने आणखी एक महत्त्वाचं सांगितलं. तो म्हणाला, ‘तू स्वत:ला एकटा, वेगळा समजू नकोस. तुझी गे आयडेंटिटी बाजूला ठेव. इट इज युवर कप ऑफ टी. करियर महत्त्वाचं असतं. ते सोडू नकोस. आपण सगळी माणसं आहोत. माणसाचे म्हणून प्रश्न असतात. ते सोडवायचे आहेत आपल्याला. पॉइंट कळला ना? मानस चंदूकडे एकटक बघत होता. त्याला वाटलं, चंद्रहास आपल्या कम्युनिटीतला असता, तर त्यालाच जीवनसाथी म्हणून निवडलं असतं. त्याचे माझे विचार जुळतात. त्याचं अस्तित्व, त्याची सोबत हा एक मोठा दिलासा आहे, पण करियर करण्यासाठी मराठी माध्यमात शिकलेल्या मुलांसाठी अशा किती आणि कोणत्या संधी आहेत? कसं करणार आम्ही करियर?.. बेकारीचा नाग समोर फणा काढून उभा आहे, असा आभास मानसला झाला. ‘लिंगलंबक’ या कवितेबद्दलचा दीडशे रुपये मानधनाचा चेक मानसला आला होता. बाहेरचा चेक असल्याने त्यातही पुन्हा पैसे कट होणार होते. अशा आर्थिक दु:स्थितीत कवी जगत असतो. कोण साहित्याकडे वळेल? उपासमार घडवणारा उद्योग असेच सगळे म्हणणार. वृद्ध साहित्यिकांना सरकारकडून मिळणाऱ्या दया दानाचा आकडा ऐकून तर त्याने कपाळावर हातच मारला होता. भाषा, साहित्य, कला हे खास मानवी प्रज्ञा-प्रतिभेचे आविष्कार आहेत. त्यांना इतकं किमान महत्त्व देणारा हा देश-प्रदेश शेतकऱ्यासारखंच साहित्यिकालाही पूर्णवेळ आत्महत्येलाच प्रवृत्त करेल, असंही मानसच्या मनात आलं. घरी निघालेल्या चंद्रहासच्या आकृतीकडे मानस बघत राहिला. जाणवणारी अंगातली कणकण मानसिक आहे की, खरोखर आपल्याला बारीक बारीक ताप येतो ते मानसला अजून ठरवता आलं नव्हतं. अंगात थोडी कसर होतीच, पण आपल्यामुळे खर्च नको. म्हणून तो डॉक्टरकडे न जाता काटकसर करत होता.

प्राचीने निरोप पाठवून का बोलावलं ते कळलं नाही. तशी ती आता तिच्या कामातून मुक्तच झाली होती. नक्षत्रसुंदर रूपामुळे सावरीसारख्या छोटय़ा गावात ती उठून दिसायची. चंदू दिसला की, खूप जुनी ओळख असल्यागत हसायची. भरपूर पैसा राखून होती. मुख्य म्हणजे मुंबईतल्या मीडियाची सारखी नसलेली पाच बोटं तिला नीट ठाऊक होती. पहिल्या निरोपाला चंद्रहास गेलाच नाही. एकटी राहणारी बाई, तिच्याकडे जायचं तो टाळत होता. पुन्हा निरोप आला. चंद्रहास जरा नाराज मनानेच निघाला. एक बाई म्हणून प्राची खूपच आकर्षक, नखरेल होती. चंद्रहासला तिची तरबेज नजर तपासत राहिली. त्यालाच संकोच वाटला. ‘काही खास काम होतं का माझ्याकडे?’ त्याने विचारलं. त्याच्यावर खिळलेली नजर हटवत, सौम्य होत प्राची म्हणाली ‘अरे, एक जॉब आहे. तू मीडियाचा कोर्स केलास ना? तुझ्यासाठीच आहे. नेहमी तू दिसतोस. रिकामाच असतोस म्हणून तुला बोलावलं.’

‘पण कसला जॉब?’

‘मी टेलिव्हिजन केला, सिनेमात होते. रेडिओ सांभाळला.. पण लिखाण नाही जमत मला. माझे अनुभव, आठवणी सगळं आकर्षक भाषेत लिहून काढायचंय. आवडेल का तुला? मी स्वत:च ते पुस्तक प्रकाशित करणार आहे. तू शब्दांकन करायचं! मानधन मी स्वत: देईन तुला. अ‍ॅडव्हान्ससुद्धा देईन, पण रोज तू जे काही लिहून आणशील, ते मला दाखवायचं. तपासून घ्यायचं. तू हे काम सुरू केलंस याचा गाजावाजा करायचा नाही. पुस्तक प्रकाशित करताना प्रेसवाल्यांना बोलावू आपण. माझं मुंबईचं फिल्मी मित्रमंडळही येईल.’ प्राचीचं बोलणं अडवून चंद्रहासने विचारलं, ‘हे.. म्हणजे असं आत्मकथनात्मक लिहिणं, मला सांगणं जरा लवकर होत नाहीये का? पन्नाशीनंतर वगैरे’..

‘तेवढा वेळ नाही माझ्याकडे! मी इथं कोकणात का आले असं वाटतं तुला? आय वॉज सफरिंग फ्रॉम कॅन्सर. सध्या काही त्रास नाहीये, पण या रोगाचा नेम नाही. पुन्हा उद्भवला तर? मला जे सांगायचंय, म्हणायचंय, जे खदखदतंय, जे मी उधळत आलेय, जे मी गमावलंय, जे जे कमावलंय.. सगळी बेरीज – वजाबाकी मला मांडायचीय.’.. ‘किती मानधन मिळेल म्हणून त्यातून?’ किंचित घाबरत चंद्रहासने विचारलं. ‘तुला तसं नाव नसलं, तरी तुझे लेख आवडतात मला. तुला दहा हजार रुपये मानधन देऊ शकते मी.. आणि हे काम नीट केलंस तर मुंबईत माझ्या ओळखीवर मीडियात नोकरीही देईन!’.. या आश्वासनामुळे चंद्रहासला अचानक तरतरी आली. ‘तसं असेल तर हे काम मी नक्की करीन,’ तो चटकन उत्साहात बोलून गेला. ती हसली. अधिकच मोहक दिसली. ते तिचं होऊन गेलेलं दुखणं गोऱ्यापान देहावर कुठे जाणवत नव्हतं. श्रीमंत बायका स्वत:ला छान मेंटेन करतात हे चंदूला ठाऊक होतं. एक अनुभवी बाई तिचं चकाकलेलं प्रकाशित आयुष्य त्याच्यासमोर मांडत जाणार होती.. आणि अंधारातले काही स्वप्निल क्षणही हळूवारपणे त्याच्या ओंजळीत देणार होती. तिच्या आयुष्यात येऊन गेलेले उनाड, उथळ पुरुषही नाही म्हटलं तरी उघडे पडणार होते. ‘नावं बदलू आपण! सेफ करू त्यांना.. पण ओळखणारे ओळखतील,’ असंही नंतरच्या भेटीत प्राची म्हणाली. हे सगळं आव्हान चंद्रहासच्या अजून कोवळेपण न हरवलेल्या मनाला जरा अवघडच वाटत होते, पण दहा हजार एका बेरोजगार पोरासाठी बरी रक्कम होती. शिवाय, मुंबईत ओळखीवर जॉब मिळण्याची आशा छान फुलू लागली होती. तो निघण्याच्या बेतात असताना प्राची अचानक बोलून गेली ‘तू बोल्ड आहेस. वाचकांना सल्ला देणारं सदर सांभाळतोस. तुझ्यापासून मी काही लपवणार नाही. तुझ्यासारख्या तरुण मुलांच्या सहवासात मी पुन्हा कॉलेज कुमारीच बनते.. मनाने!’.. ‘बाई’चं पुन्हा अवखळ मुलगी होणं, अल्लड बनणं हे बरोबर की चूक? की फार सुंदर असलेल्या बाईला सगळंच क्षम्य असतं? घरी परतताना चंद्रहासचं नीट काही ठरेना. तो गोंधळला होता, पण घाबरला नव्हता. ‘दहा हजाराची कमाई होणार आहे,’ हे त्याने ऐटीत घरी सांगून टाकलं.

मानसला मात्र त्याने प्राची मॅडमकडे रोज जावं हे अजिबात आवडलं नाही. ‘मीपण येऊ का तुझ्याबरोबर रोज? नुसतं ऐकत जाईन ती काय बोलते ते,’ मानसने विचारलं. त्याला दुखावणं चंद्रहासला नको वाटलं. तो इतकंच म्हणाला, ‘मॅडमना विचारावं लागेल; मला वाटत नाही त्या हो म्हणतील’..

‘तुला एकटय़ाला रोज भेटण्यात आणखी काही वेगळा हेतू नाही ना रे तिचा?’ मानसने कपाळाला आठय़ा घालत विचारलं. त्याचा हा प्रश्न चंदूला आवडला नाही. ‘असे प्रश्न पोरी विचारतात. तू मित्र आहेस माझा. मित्रासारखा रहा. संशयी बायकोसारखं काही करू नकोस.’

चंद्रहासच्या बोलण्यात थोडी जरब आली. मानस नव्‍‌र्हस झाला. नंतर त्याचं त्यालाच वाटलं, कोणत्या हक्काने आपण चंदूला ‘तो’ प्रश्न विचारला? चुकलंच आपलं. शेवटी ती एक नटी आहे. नक्की कसं वागेल, काय करेल सांगता येत नाही. माझ्या या मित्राचीच निवड तिने का केली? इतके नामवंत लेखक आहेत. पुण्यातून वगैरे एखादा प्रोफेशनल लेखक मिळाला असता की!.. चंद्या तिला भलत्या बाबतीत साथ देईल असं वाटत नाही.. पण काय सांगावं? शेवटी तो तरुण आहे. पुरुष आहे. ती वयाने जरा मोठी असली, तरी तशी वाटत नाही.. आणि मुख्य म्हणजे एक ‘बाई’ आहे!.. मी अस्वस्थ का होतोय? चंदूने रोज एखादी नोकरी करावी तसं त्या बाईकडे जाणं मला का इतकं खटकतंय? मी चंद्रहासवर हक्क सांगू लागलोय? चंदू माझा जिवलग जोडीदार बनू शकत नाही हे मी का स्वीकारत नाही?.. मानस स्वत:वरच चिडला, चरफडला आणि अधिकच निराश झाला. चंदूबद्दलची आपली ही भावना आपल्याला आवरता आली नाही तर?.. आहे ती मैत्रीही तुटेल या भावनेने मानस अस्वस्थ होत गेला. रात्री झोप लागेना. ‘त्या’ नटीबद्दल चंदू खूप उत्तेजित होऊन बोलतो याचा विलक्षण संताप आता त्याला येऊ लागला होता. ‘मी कुणासाठी आणि कशासाठी जगतो आहे? माझ्यासारखी ‘गे’ माणसं मुळात जन्माला तरी कशाला येतात? आणि तशी ती येणारच असतील, तर त्यांची काही कायदेशीर, नीट सोय लावायला नको? कोणत्या बेटावर, कुठल्या ग्रहावर वस्ती करायची त्यांनी?.. ठणकणारे नेक विचार मानसच्या एकाकी मनाला यातना देत राहिले. ताप त्या रात्रीही होताच मध्यरात्रीनंतर त्याला विलक्षण तहान लागली. ताप वाढला असावा आणि मग पहाटे त्या ज्वराच्या गुंगीतच कधी झोप लागली ते कळलंच नाही!..

नदीवर येणाऱ्या हिरुला आपण टाळत होतो, तिची लगट आपल्याला आवडली नसती. मग या प्राची मॅमच्या बाबतीत आपण इतके गोड का वागतोय? नोकरीची आशा? सध्या दहा हजारांची असलेली गरज?.. की, प्राचीचं अप्रतिम लावण्य?.. नक्की काय किती किती?.. चंद्रहास स्वत:लाच विचारत होता, पण अचूक उत्तर मिळेना.

पुस्तकाचं काम सुरू झालं. प्राची त्याला म्हणाली, ‘आपल्याला काहीही लपवायचं नाहीये. मी कुणाला घाबरतही नाही. माझा नवरा मला का सोडून गेला तेही मी सांगून टाकणार आहे. मरताना मला कसलंही ओझं नकोय.’

‘मॅम, तुम्हाला काहीही होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. मी आहे ना!’.. चंद्रहास बोलून गेला आणि नंतर त्याचं त्यालाच वाटलं, हे आपण काय बोलतोय! ही कोण लागते? आपली? केवळ पैशासाठी हे काम आपण करतोय..

प्राची काही क्षण शांत होती. मग बोलू लागली ‘तुझ्या पद्धतीने तू लिहीत जा. जे खरं आहे तेच मी सांगणार आहे. मला माझ्यापेक्षा वयाने लहान असलेले तरुण आवडतात हे अगदी खरंय. माझा नवरा मला सोडून गेला त्याचं कारण हेच असेल, नव्हे आहेच की, मी कॉलेजवयीन पोरांशी मैत्री करते. माझ्या घरात अशा मुलांचा अड्डाच असायचा..’ हे असं बोलणं चंद्रहासला अपेक्षित नव्हतं. ‘ही विकृती नाहीय. चंदू! वेगळी आवडनिवड म्हण हवं तर. पण माझी, ही इच्छा मी कधी आवरू शकले नाही.’

‘पण मॅडम, लग्नाआधी तुमच्या हे लक्षात आलं होतं?’

‘आलं होतं, पण मला वाटलं होतं, लग्नामुळे मी बदलेन, सुधारेन स्वत:ला.. पण तसं झालं नाही. शिवाय अशी रिलेशन्स, अशी कनेक्शन्स असूनही मला कधी तृप्ती मिळाली नाही. एखाद्या होमोसेक्शुअल पुरुषासारखी मी अशांत, असमाधानीच राहिले’..

‘तुम्ही स्वत:ला दोषी मानता?’

‘नाही मानत! का मानावं? माझ्याकडे पैसा आहे. ग्लॅमर तर होतंच. माझी हौस मी पुरवत गेले. तरुण मित्र मिळत गेले. मला नवरा दूर गेल्याचा पश्चात्ताप नाही. अगदी खरं सांगू, मला तो आवडत नव्हता. मला केसाळ पुरुष नाही आवडत! ओंगळ अस्वलं वाटतात ती..’

‘हे पण लिहायचं पुस्तकात!’

‘ते तू ठरव. तुझा हक्क आहे तो. मी सक्ती करणार नाही, पण जे खरं आहे ते लिहावं!’

चंद्रहासला जाणवलं, हे सगळं मनात आणि पुस्तकाच्या पानात भरून घेताना आपण हळूहळू मॅडमच्या जवळ चाललो आहोत असं म्हणायला हरकत नाही. आकर्षणाचे सुगंधी कण असतात का? मॅम अगदी जवळ बसलेल्या असतात, तेव्हा एका अंगभूत सुगंधाने दरवळत असतात. स्त्रीच्या देहाचा हा नैसर्गिक मादागंध पुरुषाला भुरळ घालतो. मॅडम मलाही थेट न बोलता भूल घालू लागल्या आहेत. यातून पुढे काय घडेल? मॅम कोणत्याही तरुणात गुंतून पडत नाहीत. केवळ त्याला वापरतात. एखादा बॉडी स्प्रे असावा तेवढंच मूल्य त्या नराला असतं.. पण मी तर माझा असा वापर कुणी करू नये म्हणून म्हणायचो. मग आता उपभोगासाठी उत्सुक का झालो? आमचं दोघांचंही चुकतंय का? खरं तर मॅम अजून प्रत्यक्ष मला काहीच बोललेल्या नाहीत आणि तरी मला ठामपणे वाटतय की, त्या माझ्यावर झेपावणार आहेत. हा माझा भ्रम तर नाही ना? मानसला विचारण्यात अर्थ नाही. मी बाईमाणसाशी रिलेशन ठेवणं हेच त्याला पसंत नाहीये. अर्थात त्याच्या जागी दुसरा कुणी बायल्या असता, तरी असंच वागला असता. मानसचं मन मुलीचं आहे. मानस मरू दे, पण मॅम ही एक लालबुंद ज्वाला आहे. तिच्या मिठीत तीव्र कळा येतील? दाह होईल? मॅम अनुभवी असल्यामुळे वरचढ बनतील? हळूहळू मला पूर्णपणे झाकोळून टाकतील? पिळून घेतील? हवं तेव्हा राबवतील?.. रात्री उशिरापर्यंत चंद्रहास जागत आणि विचार करत राहिला. मॅडमने अजून त्याला स्पर्शही केला नव्हता. सगळं आपलं स्वप्नरंजन नाही ना? पण मुळात वयाने लहान असलेले पुरुष आवडतात हे मला सांगण्याचं कारण काय? म्हणजे नक्कीच त्यांना मी आवडलोय.. चंद्रहासच्या विचारांत अजूनही कोवळेपण आणि बालिशपणाची झाक होतीच. तरीही इतर अल्लड पोरांच्या तुलनेत विचार करण्यात तो अधिक रसरशीत आणि उजवा होता. शेवटी लेखक होता.

दोन – तीन दिवस तो मुद्दामच मॅमकडे गेला नाही. कारण कळवलं नाही, तर मॅडम त्याच्या घरीच येऊन थडकल्या. त्याला किंचित संकोच वाटला. कणभर रागही आला. तरीही आनंदाची एक लाट कळत – नकळत अंत:करणात फुटलीच. ‘मॅम, तुम्ही कशाला आलात? फोन करायचा..’ ‘लागत नव्हता. मला वाटलं तुला बरं नाही की काय! माझा लेखक, आजारी पडून कसं चालेल? है ना?..’ असं म्हणत मॅम गोड हसल्या. ‘सॉरी मॅडम, मी कळवायला हवं होतं.’.. त्याने दिलगिरी व्यक्त केली.

खरं तर चंदूला बघायचं होतं की, मॅडम आपल्याला कितपत महत्त्व देतात! त्या स्वत: आपल्याकडे आल्या, म्हणजे त्यांच्याही मनात आपल्याबद्दल ओढ आहे असं जाणवून चंद्रहासच्या मनातला जवान पुरुष सुखावला! दुसऱ्याच दिवशी त्याने अधिक जोरात लेखनाचं काम सुरू केलं. एकदा तर रात्रीचे दहा वाजले. मॅम म्हणाल्या, ‘तू आता कशाला घरी जातोस? फोन करून कळव ना उद्या येतो म्हणून! घरी कोण तुझी एवढय़ा आतुरतेने वाट बघतंय! बायको अजून यायचीय!..’ त्या हसत हसत बोलत होत्या. त्यांचा पदर ढळला होता आणि त्याने रात्री राहावं हाच उद्देश या नखऱ्यामागे आहे असं त्याला खात्रीने वाटलं, पण त्याने मोह आवरला. खरं तर तो घाबरला. घरचे लोक भडकतील, त्या एकटय़ा बाईकडे तू राहिलास कसा असं म्हणतील. मानसला कळलं तर तो घरी जाऊन आगीत तेल ओतेल. अशा विचारांमुळे तो इतकंच म्हणाला, ‘मॅम, आज नको. सायकल आहेच माझ्याकडे! जाईन मी घरी.. पण कधीतरी मुद्दाम येईन राहायला. आय मीन वस्तीला’ हे चंद्रहास बोलला आणि त्याने मॅमची प्रतिक्रिया काय होतेय त्याचा कानोसा घेतला. मॅडम हसत म्हणाल्या, ‘काफी समझदार हो!..’

कापूसकोंड नावाचा एक अगदी निर्जन भाग सावरी गावात होता. तिथं चंदू एकटाच जाऊन बसायचा. स्वत:शी काही क्षण बोललं पाहिजे, मनातल्या लाटांची गाज ऐकली पाहिजे असं त्याला प्रामाणिकपणे वाटायचं. ही प्रगल्भता आणि त्या जोडीला रसिकता आपल्याला आणि आपल्यासारख्या काही जणांनाच कुणी दिली? या एकूण विश्वयंत्रणेचा कुणी केअरटेकर असेल आणि त्याला खऱ्या कार्यकर्त्यांप्रमाणे अज्ञात अदृश्यच राहायचं असेल तर? इतक्या प्रेरणा, अशा भावना, पुष्कळसे विचार, तितकेच विकार ही सगळे निर्मिती, हा खळखळाट, झरे, नद्या आणि समुद्र.. यामागे नैतिक अशी योजना तर दिसत नाही, पण मग इतकी सुसंगती, नकाशा भरावा तसं नियोजन, प्रत्येकाची पाहिलेली सोय, एकमेकांवर अवलंबून असणं हे सारं कसं काय?.. ‘ये कौन चित्रकार है? ये कौन चित्रकार? गाणं शिकवणाऱ्या शिगवण सरांची चंदूला अचानक खूप आठवण आली. ते आता या जगात नव्हते. म्हणजे कुठेच नव्हते. फार छान गायचे. त्यांची कला जगाला कधी कळलीच नाही. कोकणातले कितीतरी कलाकार वेगळं काही पोटापाण्यासाठी करत राहतात. कलावंत म्हणून पुढे येत नाहीत. चित्रकलेचा हात असलेल्या मुलांना तरी कोण हात देतं? संगीत कलेचंही तेच!

कापूसकोंडाच्या निर्मळ एकांतात चंद्रहासने हे सगळं लिहून ठेवलं. ‘देव नाही या सत्यावर मी ठाम आहे. पण देव असायला हवा होता. देवाची गरज आहे. आजकालचा धर्म म्हणजे फक्त राजकारण वाटतं. खरा देवधर्म वेगळाच असतो असेही त्याच्या हातून लिहून झालं. खटय़ाळ वाऱ्याने लिखाणाचे काही कागद इकडे तिकडे उडवले. ते त्याने मित्राला द्याव्या तशा प्रेमळ शिव्या वाऱ्याला घालत गोळा केले. माणूस आयुष्यभर काही ना काही गोळा करतो आणि अचानक बंद पडतो. मग त्या संग्रहाचं काय करायचं, हा प्रश्नच असतो. प्राध्यापक लोक इतकी पुस्तकं जमवतात. कपाटात छान रचून ठेवतात. त्या विषयात विशेषत: वाङ्मयात त्यांच्या, घरच्या लोकांना, सायन्सवाल्या मुलांना रस नसतो. पुस्तकं वाळवीकडे सोपवली जातात.. परतीच्या वाटेवर बऱ्याच लहरी लाटा चंद्याच्या मनात फुटत राहिल्या. मनातला हा समुद्र मावत नाही, त्याला कुणाचं भय नाही की, बंधन नाही असं तो स्वत:शी म्हणत असतानाच मानसने त्याला हाक मारली. तो टवटवीत, उत्तेजित दिसत होता. ‘गे प्राइड मार्च’ला जाऊन आला होता. न विचारता तेच सगळं सांगत सुटला. खूप उत्साहात बोलत होता. मनातला सागर हा पोरगा गढूळ बनवतोय का? समलैंगिकता हे नैतिक प्रदूषण मानायचं का? पण नीती म्हणजे भीती असेल, तर ‘आपण त्यातलेच नाहीना’ हे भय तर समलिंगी लोकांचा तिरस्कार करण्यामागे नसेल, असंही चंदूने रात्री डायरीत लिहून ठेवलं.

मानस म्हणाला होता. ‘गे प्राइड मार्चला’ हजारो लोक जमले होते. मीडियावाले तर होतेच. पण ते फक्त शूट करत होते. आमच्या बाइट्स घेत होते. चंदू, आम्ही पण मतदार आहोत. आम्हाला नकाराधिकार का वापरायला लावता? आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. नुसतं कलम ३७७ हटवून चालणार नाही. समाजाने आमचा स्वीकार करायला हवा. यू ऑल्सो लुक डाऊन अपॉन गेज.. असं म्हणत मानसने अचानक चंदूचा हात हातात घेतला.

मानसने अचानक चंदूचा हात हातात घेतला. मानसचा स्पर्श मुलीसारखा वाटतोय.. आकर्षणाचा कोणताही धागा घर्षणातून बांधला जाऊ नये म्हणून चटका बसल्यावर करतात तसं चंद्रहासने हात काढून घेत मानसला पुन्हा नाराज केलं. अंगचटीला जाणारे पुरुष त्याला कधीच आवडले नाहीत. पुरुषाने बाईचा कितीही आव आणला तरी बाई ती बाईच असं त्याचं ‘स्ट्रेट’ मत होतं. तरीही माणुसकीने सगळ्यांशी वागलं पाहिजे. सर्वाना मनासारखं जगण्याचा हक्क आहे याबद्दल तो ठाम होता.

‘काय म्हणतेय तुझी मॅडम?’ या मानसच्या प्रश्नाचा मात्र चंदूला राग आला ‘इट इज नन ऑफ युवर बिझनेस.’ ‘तिच्या पैशाच्या जोरावर तू काही बिझनेस थाटणार आहेस का? मला पण ठेव तुझ्या दुकानात केर काढायला! नाही तरी आमच्या कम्युनिटीला कचराच समजता तुम्ही

‘काय म्हणतेय तुझी मॅडम?’ या मानसच्या प्रश्नाचा मात्र चंदूला राग आला ‘इट इज नन ऑफ युवर बिझनेस.’ ‘तिच्या पैशाच्या जोरावर तू काही बिझनेस थाटणार आहेस का? मला पण ठेव तुझ्या दुकानात केर काढायला! नाही तरी आमच्या कम्युनिटीला कचराच समजता तुम्ही सो कॉल्ड स्ट्रेट लोक..’ मानसचं मन तापलं होतं. वाफ जाणवत होती. ‘मानस, माझ्या डोक्यात जाऊ नकोस. तुझ्या हद्दीत राहा!’ चंदू खेकसला. ‘माणूस कधी चिडतो? शेपटीवर पाय पडला तर! मनालाही एक शेपूट असते..’ असं म्हणत मानस हसू लागला. भांडण खवळता खवळता निवळले. पुरुष डोक्यात राख घालतो तेंव्हा बाई असंच करते का हे मनात आणतानाच ‘बाई’ची प्रचंड ओढ आपल्या तहानलेल्या मनाला लागलीय ही तीव्र जाणीव चंदूला झाली. मनाला लागलेली ती कळ त्याच्यासाठी तरसणाऱ्या मानसला चंद्रहास सांगू शकला नव्हता. दुधाची तहान मानसने पुढे केलेल्या ताकाच्या भांडय़ावर भागवण्यात त्याला काही रस नव्हता. पण अशा लोकांचंही काही लैंगिक व्यवस्थापन आता व्हायला हवं हे मात्र, चंदूला पटत होतं. ‘तुझं त्या बाईमुळे नास्तिक केंद्राकडे लक्ष नाहीय.’ हे मानसचं मतही चंदूला मान्य होते. पण प्राची ही विजेसारखी सळसळणारी चमक घेऊन वावरत होती. तिच्या आकाश वारुळात चंदूला आता वाव होता. वावर तर रोजचा होताच. विजेवर स्वार होणारा ओलाचिंब ढग संभावतो का? घनदाट उपभोगासाठी, जंगली प्रणयासाठी चंद्रहास आता अधीर झाला होता.. आणि एका उष्ण, ढगाळ रात्री प्राची म्हणाली, ‘घरी जा तू आत्ता, पण उशीर होईल एवढं तरी कळव. तुझ्या मनात काय आहे ते मी ओळखलंय! माझं मन मी आधीच मोकळं केलंय. माझं पुस्तक आता तूच आहेस. माझं पुस्तक मला अगदी उराशी कवटाळायचं आहे. आपल्याला कोण अडवणार आहे? इथं आपण दोघंच तर आहोत. तू इतकं घाबरतोस कशाला?’..

‘मी कधीच कुणाला घाबरत नाही’ चंदूच्या मनातला कोवळा पुरुष फणा काढू लागला. त्याचा क्लासमेट बिपीन म्हणायचा. डर के आगे जीत है ‘मला खात्री आहे की, तू डरपोक नाहीस. समाजाच्या जागी समाज असतो. असू दे की.. पण आता आपण जाणार आहोत ती माझी बेडरूम आहे! तिथं आपलं खासगीपण आपण मस्त फुलवायचं. घमघमली पाहिजेत फुलं.. है ना?’ असं म्हणत ‘बाई’ने ‘पुरुषाला’ एकान्तात नेलंच! नरुला, ललितला, ओंकारला कितीतरी जणांना तिने असेच खेळवलं, लोळवलं असेल, पण त्या क्षणी तिच्या आधीच्या दोस्तांचा विचार करण्याइतपत वेळ चंदूकडे नव्हता. तो आपोआप प्राचीच्या ताब्यात गेला.

त्या रात्री जो खेळ रंगला, भोगाचा जो झुला झुलला, त्याची वर्णनं कागदोपत्री करावी किंवा चकाटय़ा, बढाया म्हणून कुणाला सांगावी असं मात्र चंद्रहासला वाटत नव्हतं. कामजीवनालाही काही गुणवत्ता देता आली पाहिजे. नाजूक गुंत्यालाही एक दर्जा असला पाहिजे असं त्याचं प्रांजळ मत होतं.

त्याचं राजबिंडं रूप, त्याचं राजस व्यक्तिमत्त्व प्राची मॅमने अंगात भिनवून, रुतवून घेतलं. त्या मधुर सुखाच्या यातना सहन करण्याचीही मॅमची तयारी होती. या सगळ्या खेळखेळीत खेळीमेळीच होती. दोघंही निसर्गधर्मच पाळत होते. लाडीगोडी, गोडीगुलाबी ही पहिली पायरी असते. शय्यासोबत आणि नंतरची तरल गुंगी अनुभवताना चंदूला वाटलं, स्वर्गसुख हा शब्दही अपुरा पडतोय! भयगंड, न्यूनगंड यातून मराठी पोरगं वाढत जातं. पण पहिलाच कामसामना असून आपण बाजी मारली. मॅमच्या चेहऱ्यावर तृप्ती ठळकपणे जाणवत होती. ‘भारी आहेस तू’ एवढंच त्या म्हणाल्या, त्यात सगळं सार आलं होतं.

अधूनमधून आता ही क्रीडा घडत राहणार हे उघडच होतं. त्या बाईंना हा प्रकार म्हणा, कामविकार म्हणा नवा नव्हता. ‘परि’पूर्ण समाधान मिळाल्यासारखं वाटतं, पण तरीही एक शून्य पोकळी उरतेच असं त्या बोलून गेल्या होत्या. तेही पुस्तकात येणार होतं. काहीच लपवायचं नव्हतं. अचाट, अफाट खोल दर्यासारखं हे आयुष्य आणखी कशाकशांत बुडी मारायला लावणार त्याचा अंदाज येत नव्हता.

समुद्र संपणारा नव्हता. एखादी यक्षलाट आपल्याला गुदमरवून बुडवणार तर नाही, असंही मनात आलं. बाईनी समग्र पुरुष खूप सूक्ष्मपणे अभ्यासला होता. पुरुषाचं एक उत्तेजना केंद्र कानाच्या पाळीशी असतं. हलका चिमणीचावा घेतला तर नराला तेही भावतं हे त्यांनीच प्रॅक्टिकली चंदूला सांगितलं. ‘मॅम, तुम्ही या पुस्तकाचं लेखन स्वत: केलं असतं, तर तुम्हाला जमलं असतं.’, असं चंद्रहास त्यांना म्हणाला. त्या किणकिणत हसल्या आणि हळुवारपणे म्हणाल्या, ‘मग हे तुझं मिशीवालं फुलपाखरू या फुलराणीपाशी कसं आलं असतं?..’ त्या फुलाची प्रत्येक पाकळी चंदूला आवडली होती. पुरुषाला मनापासून आवडणारी स्त्री ही अशीच रूपसुंदर, स्वप्नगंधा असते. तो व्यवहारात बायकोचा स्वीकार करतो. पण त्याच्या मनात दुसरी एखादी सुरेख स्त्री प्रतिमा असतेच. कधी दुरून, कधी संधी मिळाली तर जवळून तो तिच्यावर भाळतो, पाघळतो.. मग त्यातून कामलळीत घडत जातं. रात्रीचा दिवसही केला जातो. प्रणयात घामाचीही फुलं होतात. समभोग दवात भिजतो. पावसाचा सौरभ मातीला मिळतो. नंतर आठवण झाली तरी मदनमस्त तंद्री लागते.. ‘ज्याने कामजीवन अनुभवलेलं नाही तो लेखन करू शकणार नाही. मग विवाहित की, अविवाहित हे महत्त्वाचं नाही. हल्ली सगळं सारखंच ठरतं’ हे मात्र चंदूने डायरीत नोंदवलं!

परत परत बोलल्यावर चंद्रहास मधूनच कधीतरी वाङ्मय परिषदेच्या कार्यालयात जायचा. अपरान्त वाङ्मय परिषदेचं ते ऑफिस

डॉ. अण्णा भुसाणेंच्या घरातच होतं. दरवेळी आपल्याच खिशातले पैसे काढून उपक्रम नावाचं काही स्वत:ची पाठ थोपटणारं रसगुऱ्हाळ चालवावं हे चंदूच्या मनाला पटत नव्हतं. ते उपक्रम म्हणजे कुणाचं तरी गाणं बजावणं, ज्यांच्या कविता चांगलं मासिक छापणार नाही, त्यांचं काव्यवाचन कॉलेजमधला एखादा वर्ग सक्तीने पकडून त्यांना ऐकवणं, मुंबई – पुण्यातला पाहुणा बोलावून त्याचं ‘वाङ्मयीन प्रवचन’ मुकाटय़ाने ऐकून घेणं आणि त्याला फक्त एस.टी.चं जाण्या-येण्याचं भाडं देणं, लहान पोरांना मास्तर लोकांनी सुधारून दिलेल्या किंवा त्यांच्याच मम्मी पप्पांनी खरडलेल्या यमक्या कविता म्हणायला लावून त्या शब्दांच्या ढकलगाडय़ांना बक्षीस वगैरे देणं असे किरकोळ होते.

डॉ. अण्णा भुसाणे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पक्षांत होते. त्यांनाच त्यांची नेमकी पार्टी सांगता आली नसती. स्वत:ची सात-आठ पुस्तकं त्यांनी प्रकाशकाला पैसे पुरवून छापून आणली होती. या परिषदेकडून मराठी साहित्यात मोलाची भर पडणं ही अशक्य गोष्ट आहे हे चंद्रहासच्या चतुर मनाने लगेच ओळखलं. केवळ मनोरंजन म्हणून तो परिषदेकडे बघत होता. चारोळ्या करणारे तिथले कवडे ‘काय कवी’ म्हटलं की, चहा पाजायचे! वाङ्मयीन हानी घडवणाऱ्या गोष्टींचा चंद्रहासला रागच येऊ लागला होता. चंदू आणि मानस दोघेही चांगल्या कविता करतात आणि तितक्याच छान परफॉर्म करतात हे ठाऊक असूनसुद्धा रेडिओ स्टेशनवर नोकरी करणाऱ्या परिषदेतल्या कार्यकर्त्यांने त्यांना एकदाही रेडिओ वाहिनीवर बोलावलं नव्हतं. बातमीत नाव येणं हे साहित्यिकांचं सार्थक कसं काय असू शकतं? अण्णा एकदा किंचित रागानेच चंदूला विचारू लागले, ‘तुम्ही लोक नक्की लेखक की, पत्रकार?’ ‘नक्की सांगायचं तर पत्रकारिता करू शकतील असे लेखक!’ चंद्रहास म्हणाला.

पालेकरच्या अपघाताची बातमी अचानक येऊन थडकली! आघातच होता तो. पालेकरच्या वाटय़ाला आता अपंगत्व येतं की काय अशी भीती वाटत होती. चंद्रहास पक्ष्यांचे फोटो काढायला गेला होता. मळीतली मगर जबडा उघडून बसते. खंडय़ा पक्षी तिचे दात साफ करतो. ते मांसाचे अडकलेले कण खातो. त्या वेगळ्या दृश्याचं छायाचित्र मगरीने काढू दिलं. तो हिरो खंडय़ाही उडून गेला नाही. चंद्रहास तो फोटो मिळवताना त्या मगरीच्या जवळ गेला होता, पण तिचं पोट आधीच भरलेलं असावं. ‘भूक ही एक भयानक गोष्ट आहे. भुकेलं शरीर काहीही करायला धजतं. वासना हीसुद्धा भूकच!’.. रात्री चंदूच्या डायरीचं पान भरलं.

पालेकर घायाळ झाला होता आणि इस्पितळही त्याला वाचवू शकलं नाही. सामना खेळताना जड चेंडू रपकन् बसावा तसं योगेन पालेकरच्या मरणामुळे चंदूला वाटलं. तो सुन्न झाला! मोठी स्वप्नं रंगवत भरारी घेणाऱ्या पोराला असं अपघाती मरण येतं. त्याच्या अस्तित्वाचा अर्थ- अनर्थ काय लावायचा?

जगाला नियंत्रक नसल्याचीच ही निशाणी ना? हे चंदूने फक्त डायरीत लिहून ठेवलं नाही. मानसशीही त्याचं बोलणं झालं. मानस म्हणाला, ‘लोक  देवाचं नसणं मान्य करत नाहीत. ते आघात, अपघात पूर्वजन्माशी जोडतात. पाप-पुण्य अशी ‘बालकथा’ सांगतात. जगात काहीही घडू-बिघडू शकतं. मी माझी होमोसेक्शुअ‍ॅलिटी मागून घेतली होती का? मग मला तुरुंगात वगैरे टाकायची भाषा कायदा कशी काय करू शकतो?..’ मानसची गाडी पुन्हा आपोआप त्याच्या विषयाकडे आली. तेव्हा आधी काही ठरवलेलं नसताना चंदूने मानसला विचारलं, ‘मी प्राचीकडे जातो याचा तुला राग येतो? खरं सांग..’ काही क्षण पोकळ शांततेत गेले. मग मानस म्हणाला, ‘राग नाही, पण चिंता वाटते.’

‘कशाची काळजी करतोस तू?’

‘तुझी काळजी वाटते. तिने उद्या तुलाही नाकारलं तर?’

‘प्राची काही माझी बायको नाही.’

‘पण हातरुमालासारखं तिने तुला का मळवावं?.. मानसने टोकदार प्रश्न फेकला. चंदू हुशार असून गडबडला. ‘ते तुला कळायचं नाही’ असं म्हणाला. ‘कळत नाही म्हणूनच विचारतोय’.. मानस थोडा हट्टालाच पेटला. ‘तिचा नकार मला पचवता येईल. मी तिच्या प्रेमात पडलेलो नाही. मौजमस्ती म्हणजे प्रेम नाही. कदाचित मी कुणाच्याच प्रेमात पडणार नाही. प्रेम ही कल्पना कदाचित देवाइतकीच निर्थक असेल.’ चंद्रहास बोलत राहिला. दोघे तोडीस तोड होते.

‘श्यामची आई पुस्तक अजून वाचलं नाहीस ना तू? वाचून बघ एकदा. तुझं जग बदलू लागेल..’ मानसने वेगळाच विषय काढला. ‘गुरुजींनी आत्महत्या केली होती ना?’ चंदूने थोडं पेचात टाकणारा सवाल केला. ‘त्यामुळे गुरुजींचं कार्य, आयुष्य याचं महत्त्व कमी होत नाही. त्या काळातला समाजच गुरुजींच्या आत्महत्येला जबाबदार आहे असं मी मानतो,’ मानस गुरुजींची बाजू घेत म्हणाला. ‘फार जुन्या गोष्टी आहेत या.’ मानस हार मानत नव्हता.

कापडी पिशवीतून आणलेली ‘श्यामची आई’ची प्रत त्याने बळेबळेच चंद्रहासच्या हाती सोपवली.

चंदू रात्री उशिरा मॅडमच्या पुस्तकाचं काम करत पडवीत जागायचा. दूर कोल्हेकुई ऐकू यायची. पडवीतल्या दिव्याच्या प्रकाशाच्या दिशेने एक जहरी घोणसही सरपटत आला होता. रात्रीचं जगच वेगळं होतं. पुस्तकाचं काम आज करायचं नाही असं ठरवून चंद्या ‘श्यामची आई’ वाचू लागला. एक अदृश्य वत्सल हात आपल्या पाठीवरून फिरतोय असा ‘फील’ आला. काही वेगळंच हळवं, ओलं रसायन त्या पुस्तकात होतं. कोकणमातीचा, संस्कृतीचा अस्सल गंध होता. धडपडणाऱ्या हट्टी मुलाची ती अस्वस्थ करणारी सत्यकथा होती. गुरुजींनी तुरुंगात असताना रात्री जागून हे अमृत निर्माण केलं हे चंदूला ठाऊक होतं. खरं तर कॉलेजातली मुलं गुरुजींबद्दल फार बरं बोलत नसत. त्या पोरांनीही ‘श्यामची आई’ हे पुस्तक वाचलं नसावं. रात्रभर जागून चंद्रहासने ‘श्यामची आई’ पुस्तक वाचलं. आपल्याला गहिवरून का आलं, आपण असे कसे जुन्या पुस्तकात गुंतत गेलो. गुरुजींच्या मनात जो उचंबळणारा दर्या होता, त्या लाटा आपल्या मनात शिरल्या का?.. त्याला काही कळेचना. त्याने पहाटे पहाटे मानसला मेसेज पाठवला. ‘साने सर वॉज ग्रेट. थँक्स फॉर सच अ लव्हली बुक’.. प्रेमळपणाचा जो पदर ‘श्यामची आई’ला लाभलाय तो विशुद्ध ममतेचा आहे. वासनेचा नाही. मॅम आई होऊ शकल्या नाहीत, म्हणून अशा भरकटल्या का? मानसलाही कोणताही यार दोस्त, परिपूर्ण पुरुष मूल देऊ शकणार नाही. स्त्रीशी समरस होणंही मानसला आवडणार नाही, त्यामुळे तो असा अधुरा, अस्वस्थ वाटतो का? मी मॅमना त्यांचं आईपण मिळवून दिलं तर?.. पण एकदा कॅन्सर होऊन गेल्यावर आता ती नवी जबाबदारी त्या घेणारही नाहीत आणि कदाचित आई होण्यात त्यांच्या आणखीही अडचणी, समस्या असतील. बाई आपल्याला आवडते. पण ती समग्र अशी समजते कुठे?.. ‘श्यामची आई’ची जादू काही उतरेना! जागरपणाने थकल्यागत वाटलं तरी नवं, अनोखं काही प्राप्त झालं असं चंद्रहासला वाटलं. समुद्राच्या पाण्यातलं प्रदूषण कमी होऊन तो निळा जांभळा, लखलखीत वाटू लागावा तसं आज चंद्रहासला स्वच्छ, प्रकाशित वाटत होतं.

मॅमच्या गढूळ जीवनाचा सगळा चित्रपट शब्दबद्ध झाला होता. पुस्तकाचं काम आता संपणार होतं. ते अश्लील पुस्तक आता मिटायला हवं, फार झाल्या उनाडक्या, हे मनातून कोण बोललं तेच चंदूला कळेना, पण कुणीतरी बोललं खरं! ती कुणाची आई मनातून असं बोलत होती? की, पूर्ण पुरुषाच्या काळजातही अस्तित्वात असलेला तो स्त्रीत्वाचा अंश होता? मॅममुळे माझं नाही म्हटलं तरी अध:पतनच झालं. पण ही अधोगती थांबवण्याची शक्तीही स्त्रीमध्येच असते ना? ‘श्यामची आई’ ज्या ताकदीने परिस्थितीच्या भोवऱ्यात उभी राहिली. तोच तिचा असाधारण गुण ना? हळूहळू गुरुजीच ‘माऊली’ बनत गेले! मग मी मानसमधला जरा अधिक असलेला स्त्रीगुण नाही म्हटलं तरी तुच्छ का मानतो? मी त्याला कमी लेखतो. तो नसताना ‘आज बायल्या आला नाही’ असे म्हणतो. स्त्री हीच आम्हा पुरुषांना कमीपणाची, केवळ वापरायची गोष्ट वाटते की काय? प्राची मॅमनी वर्चस्व निर्माण करत मला वापरलं, आमिष दाखवलं म्हणजे त्या पुरुष ठरल्या आणि मी देखणी बाई! स्त्री म्हणजे काय? पुरुष म्हणजे कोण? केवळ शुक्रजंतूंची नळी आहे आणि देशाची लोकसंख्या वाढवतोय तो पुरुष?.. डायरीत शब्दांचा इतका गुंता होऊ लागला की, मॅमचा फोन वाजतोय तिकडेही लक्ष गेलं नाही. एसएमएससुद्धा बाईंकडूनच आला. ‘व्हेअर, आर यू मॅन? व्हॉट आर यू डुइंग?.. त्याने उत्तर दिलं नाही. फोनही केला नाही. आपण प्राची मॅमवर नाराज आहोत की, स्वत:वर? तेही त्याला नीट कळत नव्हतं. ‘श्यामची आई’ने त्याचं लहान मूल करून सोडलं होतं. मॅमकडे, पुस्तकाचा अखेरचा भाग सोपवण्यासाठी त्याला जावं लागलं, पण त्या भगभगीत दुपारी त्याने प्रणयाला साफ नकार दिला. ‘झालंय काय तुला?’ प्राचीने विचारलं. ‘सगळं मानधन मिळालं. आता गरज संपली, असंच ना?’ चंद्रहास काहीच बोलला नाही. शिक्षा केलेल्या मुलासारखा गप्पच राहिला. ‘तुला मुंबईला जायचंय ना राजा? मी आहे तुझ्याबरोबर..’ प्राचीने पुन्हा गळ टाकला. ‘मला कुठेही जायचं नाहीये आणि खरं सांगू, मला आता आपल्या या खेळाचाही कंटाळा आलाय. मला आता एखादी चांगली मैत्रीण बघून लग्न करायचंय’.. मला माझ्या बायकोला आई बनवायचंय.. एक खूप सज्जन, प्रेमळ आई.. माऊली’.. हे आपण काय आणि कसं बोलून गेलो तेही चंदूला समजेना. प्राची बघतच राहिली. कुचेष्टेने हसलीसुद्धा. ‘प्राची, यानंतर आपण भेटायचं नाही. माझं नावही नको पुस्तकावर. तूच स्वत: लिहिलंस असं दाखवू आपण. मला ‘घोस्ट रायटर’ राहू दे.. शब्दांकन कुणाचे ते कळता कामा नये’ अशी अटच चंदूने घातली.

‘समजा, तुझ्या मैत्रिणीला आपली ही दोस्ती मी सांगितली तर?’.. प्राचीने पवित्रा बदलला.

‘परी आहेस तर सुंदर परीसारखं वाग. चेटकीण होऊ नकोस. तुझ्या आधी मीच सांगून टाकणार आहे जी मुलगी आवडेल तिला. तू माझं लग्न थांबवू शकणार नाहीस.’ चंदूने मॅमना झटकून टाकलं. संबंध सुरू झाल्यापासून तो मॅमना प्राची अशीच एकेरी हाक मारत असे. ‘तुझ्यासारखा दुसरा कुणीही मिळेल मला. तुझ्यावाचून माझं अडेल असं वाटलं की काय?’ मॅडम आता भांडणाच्या मूडमध्ये होत्या. ड्रिंक तर त्या रोज घ्यायच्याच. ‘गुडबाय मॅम, पुन्हा आता कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही मला चांगला मोबदला दिलात, पण हे इथेच थांबलं पाहिजे. काही खेळी करायला जाऊ नका. प्रॉब्लेम होईल तुम्हालाच! माझ्यावाचून तुमचं अडेल असं मी कधीच म्हटलेलं नाही.. पण इतके जवान पोरगे तुम्ही खेळवलेत तरी आई होऊ शकला नाहीत.. आई झाला असतात. तर कदाचित नीट वागला असतात.. आईने वागायला हवं तसं!’

हे ऐकल्यावर मात्र प्राची मनातून थोडी ओशाळली. ढासळलीच. त्याने वर्मावरच घाव घातला. आपण ‘निम्फोमॅनिया’च्या पेशन्ट आहोत, अतिरेकी कामांधतेची शिकार आहोत, अपसामान्य अतृप्तीचा बळी आहोत हे त्यांना माहीत होतं. डॉक्टरांनी त्या असमाधानीपणाचं कारण सांगितलं होतं. निदान केलं होतं.

जाळ्यात गुरफटलेल्या माशाला बाहेर पडून मुक्तपणे पोहताना वाटेल तेच आता चंदूला वाटत होतं. त्याने मानसला सगळं सांगून टाकलं. ऐकताना मानसच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते. ‘पुन्हा अशा चुका करू नकोस’ असं तो कळकळीने म्हणाला, तेव्हा बाईमाणूस आस्थेने बोललं असं चंदूला वाटलं. मानस फार सुरेख नृत्य करायचा. पण पोरांनी कुचेष्टा करून, रॅगिंग करून त्याला नाचाच्या बाबतीत नाउमेद करून टाकलं होतं. त्याच्या कविता तर मानधन देऊन छापून येत होत्या. संपादक गोडकर तर म्हणाले, ‘काव्यसंग्रहासाठी मी प्रकाशक सुचवतो. वेळ लागेल, पण ते काढतील संग्रह त्यांच्या खर्चाने. बापूसाहेबांची प्रस्तावना घेऊ’ बापू तांबे कोकणातले एक उत्तम कवी होते. अनेक नवोदित त्यांची प्रस्तावना मागत असत, पण कविता आवडल्या तरच ते प्रस्तावना देत. मुंबईतल्या कवींप्रमाणे वाट्टेल त्याला प्रोत्साहन आणि आशीर्वाद देत नसत. तांबे म्हणत ‘सुमार दर्जाचं काव्य रचणारा कवी असेल तर प्रस्तावनेमुळे तो शेफारतो. खोटंनाटं प्रास्ताविक लिहू नये. त्या नवोदिताचं नुकसान होतं. प्रस्तावना कुणी लिहिली आहे तेच तो सांगायला लागतो. मानसच्या वृत्तपत्रातल्या कविता वाचून मात्र बापूंनी त्याला स्वत:ला प्रशंसा करणारं पत्र लिहिलं होतं. ‘लिंगलंबक’ कविता प्रसिद्ध झाल्यावर तर बापू म्हणाले. ‘मी तुझ्यावर कसला आरोप करत नाही. पण मराठीत अशा गे साहित्याचं स्वतंत्र दालन असायला हरकत नाही.’

एखाद्या व्यसनाच्या विळख्यातून सुटावं आणि तरी अचानक, ध्यानीमनी तेच व्यसन डुलू लागावं तशी प्राचीच्या मनमोहक देहाची, त्या उत्कट कामक्रीडांची याद येऊन रात्री चंदू अस्वस्थ व्हायचा. आपण प्राचीला ठोकर मारली खरी, पण या अफाट संसारात कुणाचा तसा आधार, मदत नसताना आपण किनारा कसा गाठणार? मुंबईत आपल्याला कोण विचारणार? पर्मनंट नोकरी कधी लागणार? महागडय़ा सिटीत पगारातलं काय उरणार? स्वत:ची जागा नसताना पोरगी कशी पटणार? बायको कशी गावणार? दहा – बारा हजाराची नोकरी आहे, तरी आपलाच गाववाला महेश कर्जबाजारी झाला. व्यसनही वाढलं. मॅमशी थोडं वाकडं घेऊन आपलं चुकलं का?.. अशांत मनाने चंद्रहास विचार करत राहिला. त्याने मानसलाच फोन लावला. ‘मला खूप अस्वस्थ वाटतंय. तू ये गप्पा करायला.. आत्ताच ये. वस्ती कर माझ्याकडे. प्लीज.. फोनवर नाही सांगता येणार सगळं. रात्रभर जागू आपण. हळू आवाजात बोलू. म्हणजे घरच्यांना त्रास नाही.’ आज्ञाधारक पत्नी माहेर सोडून परत सासरी ये, असा सांगावा आला की ‘आजच, आत्ताच निघते’ म्हणते तसा मानस आला. ज्याचे आपण अपमान करायचो, त्याच मित्राचा आपल्याला दिलासा, आधार का वाटतोय ते चंदूला कळेना. पुरुषच पुरुषाला समजून घेऊ शकतो का? समलैंगिक असला, तरी मानस शेवटी पुरुषच आहे. .. तो आल्यावर चंद्रहास म्हणाला, ‘मानू, मी एका झटक्यात प्राचीला तोडलं – सोडलं, पण आता मला व्यसनी माणसाला अशांत, अस्वस्थ वाटतं तसं वाटतंय. काल प्राची स्वप्नातही आली होती. हे फक्त तुला म्हणून सांगतो.

मानसने प्रथमच चंद्रहासच्या कुरळ्या केसांवरून हळुवारपणे हात फिरवला. त्यानेही तो फिरवू दिला. त्यात त्याला वासनेचा अंश जाणवला नाही. अतूट अशी माया मात्र होती. कदाचित सहानुभूतीही मिसळलेली असेल. ‘मानू, मी काय करू? मुंबईच्या स्पर्धेत माझं काय होईल? गॉडफादर कुणीच नाय आपला.. आणि उनाड बाईने जी चटक लावली, त्याचं काय? लग्न करावे तर अजून कशात काही नाही. बाहेर कुठे फ्लेश मार्केटला जावं तर रिस्की वाटतं. तू सांगशील तसं करेन मी. बोल ना मानू’.. मानसला हा मित्र आता अगदीच पोरकट शाळकरी वाटू लागला. जणू एक बछडा, एक बच्चा. वाट चुकलेलं कोकरू. वाया जाऊ पाहणारं लेकरू.. त्याने चंदूच्या पाठीवर हलकेच थोपटत म्हटलं, ‘तू शहाणा आहेस की वेडा? बी अ गुड बॉय! धीर धरायला शिक. त्या प्राचीकडे आता पुन्हा अजिबात जायचं नाही. माझी कसम आहे तुला. हाच क्षण असतो मोहाचा धोक्याचा.. आता परत जाऊन पाय धरणार आहेस का त्या नटीचे? की, बाई माझी भूक मला आवरत नाही. मला लाथाडू नको. पलंगावरची माझी खादाडी मला करू दे. तुला हे शोभत नाही चंद्रा..’

मानस आपल्यापेक्षा खूप मोठा आहे आणि आपल्याला कडय़ाच्या टोकावरून मागे खेचतोय, खऱ्या मित्राचा, आईपणाचा, मायाळू गुरुजीपणाचाही हा अंश ना? हेच देवत्व असेल का? देवपण म्हणजे तरी काय? चांगुलपणाच ना? माझा हा मित्र चांगलाच आहे. किती प्रेम आहे त्याचं माझ्यावर आणि ते वासनेच्या अंगाने जाता कामा नये हे या गे पोराला समजावल्यावर, बजावल्यावर त्याने त्याची तहान आवरली हे सुद्धा कौतुकास्पदच आहे. मानूला माझ्याबद्दल प्रचंड आकर्षण होते, पण त्याच्या मनातल्या बाईपेक्षा आईपणाची भावना आता आकाश भरून यावं तशी भरून राहिलीय! रात्रभर अगदी जवळ निजूनसुद्धा मानसच्या वासनेने फडा काढला नाही. चांदणं झिरपावं, शीतल चंद्रप्रकाशात निर्धास्त व्हावं तसे ते दोघे रात्रभर एकमेकांचं हितगुज ऐकत, सांगत राहिले. रात्रभर संचार करणारं गूढ पाखरू तेवढं वाऱ्यावर अधूनमधून कुजबुज करत होतं. बाकी अवघा सन्नाटा होता. या दोघांचे मैत्रीत चिंब झालेले शब्द उठत होते, मिटत होते. पहाटे चंद्रहासला झोप लागली. मानस न सांगताच निघून गेला. स्वप्नात आलेलं आपलं माणूस अदृश्य व्हावं तसा!

खूप उशिरा चंदू जागा झाला. त्याच्या उघडय़ा अंगावर मऊ पांघरूण घालून आणि उशीपाशी पिवळ्या गुलाबाचं फूल ठेवून मानस निघून गेला. येताना असं काही फूल वगैरे तो कधी आणत नसे. त्यामुळे हे जरा वेगळं अजब वाटलं चंदूला.

दुपारी टपाल घेऊन पोस्टमन आला. एकच लखोटा होता, पण फार महत्त्वाचा. रेडिओ चॅनलकडून चंद्रहासचं सिलेक्शन झालं होतं. ट्रेनी म्हणून काम करून नंतर तिथेच नोकरी करायची होती. चॅनलचे लोक कॉलेजमध्ये ‘कॅम्पस इंटरव्ह्य़ू’ घ्यायला आले होते तेंव्हा त्याने बिनधास्तपणे मुलाखत आणि आवाजाची चाचणीही दिली होती. खरे तर त्याच्या बॅचच्या अनेक मुलामुलींनी ती दिली होती. खासगी चॅनल असलं, तरी खूप लोकप्रिय होतं. मुलींचे गोड गोड फोन आणि गाण्यांची लाघवी फमाईश हा तर मस्तच मामला होता.

आर. जे. ला एखाद्या स्टारसारखं महत्त्व येऊ लागतं, त्याची एक प्रतिमा निर्माण होऊ लागते आणि त्याला बघण्यासाठी, भेटण्यासाठी त्याच्या आवाजाच्या प्रेमात पडणाऱ्या पोरीबाळी तरसू लागतात हे चंदू जाणून होता. मुंबईच्या प्रचंड महासागरात केवळ गुणवत्तेवर आपण आता पोहू लागणार या जाणिवेने त्याचा आत्मविश्वास दुणावला. धीर देणाऱ्या मानसला ही खबर दिलीच पाहिजे आणि आपल्याला विटाळणाऱ्या त्या प्राचीला अजिबात द्यायला नको असं चंद्याला वाटलं, पण मानूचा फोन बंद होता.

रेडिओवाल्यांनी चंद्रहासला बोलावलं. आता तो मुंबईतच राहणार ही खबर वाडीत लगेच पसरली. दोन तीन बडबडय़ा, चंदूच्या आईच्या शब्दात चोंबडय़ा पोरी हे काम तातडीने करत. हवं तर कर्ज काढू पण तुझं मुंबईतल्या खोलीचं भाडं भरू. तुझ्या त्या रेडिओ केंद्राच्या आसपास बोरिवलीतच शोध रूम. लोकलची रोजची भानगड नको.. असा उत्साह चंद्रहासच्या घरात दिसू लागला. निघण्याची इतकी घाई, गडबड झाली की, खोली मिळेपर्यंत कौस्तुभ नातूकडे राहायचं त्याने ठरवलं. कौस्तुभ त्याचा गाववाला. त्याने उपनगरातच गोरेगावला फोटो स्टुडिओ थाटला होता. भाडय़ाची खोली घेतली होती. घरावर पत्रा होता, पण आसरा तर होता! तिथं राहायचं नक्की झालं. कौस्तुभ म्हणाला, ‘ये रे तू बिनधास्त! मी आहे ना! मुंबईकरच झालोय मी आता. तुझी नाइट डय़ुटी असेल तरी हरकत नाय! एक चावी तुझ्याकडे देऊन ठेवेन. डोन्ट वरी..’ कोकणी माणूस मुंबईतही आपलं गाव, गाववाले जपतो याचा छान अनुभव आता येऊ लागला होता. जॉब मिळवण्यासाठी कुठलंही वंगाळ काम करण्याची आता गरजच नव्हती, क्वालिटी महत्त्वाची होती. प्राचीला कळल्यावर तिलाही आश्चर्य वाटलं असतं की, चंदूचा सितारा रेडिओवर न दिसताही चमकू लागला.

चंदू अगदी एसटीत बसायच्या वेळी मानसला कुणी तरी चंद्रहास मुंबईला जॉबसाठी निघालाय हे सांगितलं. तो धावतपळत घामाघूम होऊन स्टॅण्डवर आला. चंद्रहास रिक्षेतून उतरत होता. एस. टी. स्टॅण्डवर येऊन उभीच होती. मानसशी धड बोलताही आलं नाही. ‘फोन करतो नंतर. अचानक पत्र आलं सिलेक्शनचं. आता मुंबई सोडणार नाही मी. काय पण होऊ दे. टिकणार मी मोठय़ा स्पर्धेत! मुंबईच्या स्मार्ट पोरी, चॅटिंग करतील आता माझ्याशी..’ असं, इतकंच खेळीमळीत बोलणं झालं आणि बस सुटली. मानसचे डोळे डबडबले होते. चंद्रहास, त्याचा जिवलग मित्र आता रोज भेटणार नव्हता. दिसणारही नव्हता. मानसच्या मनातली मुलगी टिपं गाळत होती. त्या प्रेमाची बिलंदर दुनियेला जरासुद्धा किंमत नव्हती. ‘हा कोण रडतोय बायल्या’ अशी तुसडी तुच्छता मात्र होती. पुरुषाला रडण्याचाही हक्क नव्हता. समलैंगिक हा पुरुष असूनसुद्धा त्याला ‘मर्द’ मानायला जग तयार नव्हतं.

चंद्रहास फार लवकर मुंबईला सरावला. रेडिओवरून शब्दांशी खेळत गेला. मीडियात रुळत गेला. इतर तरुण सहकारीही त्याला गावाकडचा न समजता छान सांभाळून घेत होते. तोही त्यांच्याशी चांगलंच वागत होता. कुठं काही उणं नव्हतं. मुंबईला ‘गुड मॉर्निग’ करत चंदू आपल्या चटपटीत गप्पा सुरू करायचा. मोसम असेल, त्याला अनुरूप गाणी वाजवायचा. रेडिओचं गारूड त्याला नव्याने उमजत होतं. ट्रेनिंगचा ऋ तू असूनही त्याचा बॉस अनुप त्याला भरपूर वाव देत होता. अनुप देशमुख जणू माझा मोठा भाऊच आहे, असं चंदू घरी, गावी कळवायचा. मानसचा मात्र एकदाच फोन आला. तोही ब्रॉडकास्ट सुरू असताना श्रोत्याचा येतो तसा नाही. चंदू घरी असताना रात्री आला. त्याने फक्त गोरेगावचा चंद्याचा म्हणजे त्या स्टुडिओवाल्या खातूचा पोस्टल पत्ता मागून घेतला.

‘कधी – येणार असशील गोरेगावला तर कळव,’ असंही चंदू म्हणाला. मानस स्वत: आला नाही. त्याचं पत्र बंद पाकिटातून आलं आणि विजेचा शॉक बसावा तसं चंद्रहासला वाटलं. घरच्या लोकांनी मला हे कळवलं कसं नाही? की, हा सगळी थट्टा करतोय?.. चंदूने लगेच घरी फोन केला. तो लागेना. मग कांचन सावंतला केला. ‘तुला कधी कळलं? खरी आहे बातमी. मानस इज नो मोअर! समुद्रात जीव दिला त्याने.’ .. आत्महत्या करण्यापूर्वी मानसने ते पत्र चंदूच्या मुंबईच्या पत्त्यावर पाठवलं होतं. थरथरत्या हातांनी चंद्रहास पत्र वाचू लागला.

जिवलग मित्रा,

मी या क्रूर जगाचा निरोप घेतोय. मी कुठंच असणार नाही. कधीही दिसणार नाही. आपण चार्वाक मानतो. आपण चार्वाकाचीच पिल्लं आहोत. भूतप्रेत, पुनर्जन्म असलं काही आपण मानत नाही. पण चंद्रा, मी तुलाच माझ्या स्वप्नांचा राजकुमार मानत आलो. तू मला झिडकारलंस. तुझ्या हद्दीत राहा म्हणालास. तू लग्न  करणार, बायको आणणार, संसारात रमणार.. पण मग माझं कोण? माझ्यासाठी या समाजाने, या देशाने कोणती स्पेस ठेवलीय? मी कुणासाठी जगायचं? मान्य की आपल्यात कधीही लैंगिक संबंध प्रत्यक्षात नव्हते. जे घडायचं ते फक्त माझ्या स्वप्नात; पण यार, तू निदान रोज दिसत होतास. समोर वावरत होतास. भांडत होतास. सोबत होतास आणि तुझा सहवास होता. आता खूप एकटा पडलो रे मी. तुला मुंबईचा महासागर मिळाला याचा आनंदच आहे रे मला. चांदोबा, तुझी सगळी स्वप्नं पूर्ण होऊ देत.. पण मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. मुंबईत येऊन तुझ्याबरोबर राहिलो, स्ट्रगल केला तरी तू मला खऱ्या अर्थाने लाभणार नाहीस. तू माझ्या पंथातला नाहीस. पण तुला खरं खरं ते सांगतो. मी दुसऱ्या कुठल्या पुरुषाचा आता विचारच करू शकत नाही. मी मनातून तुलाच वरलं होतं.. आणि त्यातलं काही तुला शक्य नव्हतं. सक्ती करण्याचा तर प्रश्नच येत नाही. ही एकतर्फी आसक्ती होती. तळमळत, तडफडत, दुरावा किंवा विरह सोसत, एकतर्फी प्रेम करत झुरण्यापेक्षा मी आपला दोघांचा आवडता समुद्र जवळ करतोय. मी पाण्यात नाहीसा झालो तरी माझ्या जिवलगा, तुला किनारा लाभावा! त्या रात्री मी तुझ्याकडे वस्तीला होतो. तेंव्हा तुला फक्त धीर हवा होता, मित्रत्वाचं मार्गदर्शन हवं होतं. तुला मी अधोगतीपासून वाचवलं. नाही तर तू प्राचीच्या जाळ्यात कायमचा पुन्हा फसला असतास. त्या रात्री मी फक्त तुझा मित्र होतो आणि आता एकतर्फी प्रेम करणारी तुझी ही प्रेयसीसुद्धा तुझ्या आयुष्यातून कायमची निघून जातेय. पण चंदू, माझं प्रेम मुलीइतकंच प्रामाणिक आणि उत्कट होतं.. बघ, होतं म्हणून मी स्वत:ला सागरात बुडवून टाकलं. मी भूतकाळ बनलो. माझ्या चंद्रहासला उज्ज्वल भविष्यकाळ मिळो. मला कधी विसरू नकोस.

तुझा,

मानस

चंदूला अनेक गोष्टी आता जाणवत राहिल्या. ‘आपण पुन्हा हे पत्र वाचायचा प्रयत्न करतोय पण अक्षर दिसत नाहीय. कारण डोळ्यांतून समुद्रच ओघळू लागलाय. माणसाने माणसाला किती दु:खी करून ठेवलंय! मानसच्या कोमल दु:खाला एक प्रकारे मीच जबाबदार नाही का? माझा तसा काही दोष नाही, पण तो तसा वेगळा होता त्यात त्याचा तरी काय दोष होता? त्याचं ते अथांग प्रेम शारीरिक अंगाने मी स्वीकारलं नाही म्हणून तो निराश होत गेला. ज्याला अशा गोष्टींत रस नाही उपजत आवडच नाही त्याच्यासाठी तडफडत राहणं ही चूकच नाही का? ते काहीही असलं, तरी मानस मला हवा होता. मानू, तू स्वत:ला का नाहीसं केलंस? मला सावरण्यासाठी, आवरण्यासाठी तू हवा होतास!

मी सेटल झालो की तुला मुंबईत बोलावून घेतलं असतं. तुझं ‘मानस’शास्त्र मला नीट कधी कळलं नाही. बराचसा महासागर अज्ञातच राहतो रे.. काय काय असतं समुद्राच्या पोटात! ऑक्टोपसचे छद्मी रंगखेळ असतात. दीर्घ कथेसारखं आयुष्य जगणारी संथ कासवं तिथेच राहतात. मदन सुंदर पण विषारी सर्प मृत्यू बनून येतात. गाणाऱ्या निळ्या देवमाशाची तर शिकारच होते. एकाच पद्धतीची विचार न करणारी, सहज जाळ्यात गावणारी जीवनशैली हजारो माश

मी सेटल झालो की तुला मुंबईत बोलावून घेतलं असतं. तुझं ‘मानस’शास्त्र मला नीट कधी कळलं नाही. बराचसा महासागर अज्ञातच राहतो रे.. काय काय असतं समुद्राच्या पोटात! ऑक्टोपसचे छद्मी रंगखेळ असतात. दीर्घ कथेसारखं आयुष्य जगणारी संथ कासवं तिथेच राहतात. मदन सुंदर पण विषारी सर्प मृत्यू बनून येतात. गाणाऱ्या निळ्या देवमाशाची तर शिकारच होते. एकाच पद्धतीची विचार न करणारी, सहज जाळ्यात गावणारी जीवनशैली हजारो माशांच्या झुंडी दाखवत असतात. काही चमकते मोती कायम शिंपलीतच बंद राहतात. उथळ पाण्यात उतरलेल्या सज्जनांना दंश करतात. खोल पाण्यात हल्ली फार कुणी उतरत नाही. सगळा वरवरचा फेसबुकचा फेसच दिसतो. मानस, मी तुला विसरणं शक्यच नाही! आपल्या नास्तिक केंद्रालाही मी तुझं नाव देणार आहे. मी केंद्राकडे लक्ष देत नाही, बाईच्या नादी लागतो म्हणून तू नाराज होतास ना? ‘नेट’च्या मदतीने आपलं केंद्र आपण जोरात चालवू! केंद्राचं नाव ‘निरीश्वरवादी मानस केंद्र’.. आक्रोश करणारं, मित्राला हाक मारणारं चंदूचं मन रात्री डायरी लिहीत गेलं.

मानसने आत्महत्येचं कारण कुणालाच सांगितलं नव्हतं. फक्त जिवलगाला कळवलं होतं. अनादि वासना अशा वेगळ्या रूपात, निराळ्या समकामी अंगाने उभी राहते, तेंव्हासुद्धा माणसाला जगण्याचा अधिकार, सन्मानाने आपला कल जोपासण्याचा हक्क मिळायलाच हवा. पुढारलेले, सुधारलेले देश तो देतही असतात. आपण अशा वेगळ्या माणसांना माणूस म्हणून कधी समजून घेणार हा खरा सवाल आहे.

रेडिओतलं कर्तव्य संपलं की, चंदू मुंबईच्या समुद्रावर जाऊन एकटाच शांतपणे बसतो. समोरच्या समुद्राचं अमर्याद, सर्वदूर पसरलेलं रूप पाहतो. नदी जशी समुद्राला, तसा हा दर्या महासागराला जाऊन मिळतो असे त्याला वाटतं. मानसची आठवण आली की, भरून आलेले डोळे चंदू पुसतो. नाव नसलेला एखादा तारा समुद्रात पडताना दिसतो. अगदी मनासारखा!

अधुरा!!

(सर्व नावे आणि संदर्भ काल्पनिक)