क्रीडा क्षेत्रामध्ये महिलांनी मुसंडी मारणे यात तसे नवीन काहीच नाही. पण गेली काही दशके केवळ पुरुषांचाच आणि पुरुषी  खेळ म्हणून  मानल्या गेलेल्या क्रीडा प्रकारात उतरून पुरुषांच्या संघात खेळून स्वत: ठसा उमटवणे मात्र क्रीडा क्षेत्रातील िलगसमानता अधोरेखित करते. अलीकडच्या दोन घटना त्याचेच प्रतीक आहेत. यातील एक घटना इंग्लंडमधील तर दुसरी भारतातील आहे. या निमित्ताने क्रीडा क्षेत्रातील या िलगसमानतेचा ‘टीम लोकप्रभा’ने घेतलेला हा आढावा…

सबरीमला मंदिर समितीच्या प्रमुखांनी केलेले स्त्रियांसंदर्भातले विधान असो की नुकतीच घडलेली शनी शिंगणापूर इथली घटना असो, स्त्रिसंदर्भातली शतकानुशतकांची मानसिकता बदलत नाही हेच वास्तव आहे.

‘ओसामा’ नावाचा एक सिनेमा आहे. अफगाणिस्तानात तालिबान्यांची सत्ता आल्यानंतर तिथे सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचं काय झालं, यावर हा सिनेमा भाष्य करतो. घरात पुरूष नाही. आई आणि बारा-तेरा वर्षांची मुलगी अशा दोघीच जणी आहेत. तालिबान्यांच्या राजवटीत स्त्रियांना घराबाहेर पडायला, काम करायला परवानगी नसल्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह होणं कठीण होऊन बसलं आहे. अशा वेळी आई आपल्या मुलीला मुलाचे कपडे घालून एका चहाच्या ठेल्यावर कामाला पाठवते. तो चहावाला ओळखीचा असल्यामुळे त्याला त्यांची परिस्थिती माहीत आहे. तोही त्या मुलीला काम देतो. तिचं नाव ओसामा असल्याचं सगळ्यांना सांगितलं जातं. एक दिवस तालिबानवाले येऊन सगळ्या लहान मुलांना प्रशिक्षणासाठी घेऊन जातात. तिथे अनेक मुलं असतात. पण त्यात लवकरच ही मुलगी असल्याचं उघड होतं. हा तालिबान्यांच्या लेखी मोठा गुन्हा असतो. तिला शिक्षा फर्मावण्यासाठीच्या चौकात आणलं जातं. तिथं अनेकांना शिक्षा सुनावली जात असते. आणि त्या शिक्षेची तिथल्या तिथे चारचौघांसमोर अंमलबजावणी होत असते. या मुलीला ठार करण्याची शिक्षा सुनावली जाते. तेवढय़ात एक जख्ख म्हातारा माणूस पुढे येतो आणि सांगतो की,  हिला सोडा, मी लग्न करतो हिच्याशी. तो त्या भागातला कुणीतरी स्थानिक मोठा माणूस असल्यामुळे त्याचं म्हणणं मान्य करून त्या मुलीला त्याच्या ताब्यात दिलं जातं. तिला घेऊन तो घरी येतो. मोठं घर, बऱ्याच महिला असं तिथे असतं. तिथे त्या मुलीला तो एका खोलीत एका कपाटाजवळ नेतो. त्या कपाटात वेगवेगळ्या प्रकारची कुलपं असतात. तो त्यातलं एक कुलूप निवडायला तिला सांगतो. इथे सिनेमा संपतो. म्हणजे तिला ज्या खोलीत ठेवलं जाणार असतं, त्या खोलीला कुलूप कुठलं असेल ते निवडायचं स्वातंत्र्य त्या मुलीला दिलं जातं.

स्रीला किती क्रूरपणे वागवलं जाऊ शकतं याचं भेदक चित्रण या सिनेमातून दिसतं. एरवीही कमी-जास्त फरकाने जगभरातल्या वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये स्त्रियांना याच प्रकारची वागणूक दिली गेली आहे. दिली जाते आहे. कपडे कुठले घालायचे, कुठे जायचं, कुठे जायचं नाही, कुणाशी लग्न करायचं, कुणाशी नाही, अशा गोष्टींवर नेहमीच बंधनं असतात. शिक्षणाच्या संधी नाकारल्या जातात, अर्थार्जनाच्या संधी नाकारल्या जातात. आपल्याला विशिष्ट वेळी मूल हवं आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकारदेखील तिला असतोच असं नाही. धर्मसत्ता, राजसत्ता आणि पुरुषसत्ता अशा तीन सत्ता एकाच वेळी तिच्यावर अधिकार गाजवत असतात. या तिघांमध्ये आता अप्रत्यक्षपणे यंत्रसत्तेची भर पडली आहे. अर्थात ही यंत्रसत्ताही पुरुषसत्तेच्याच हातात आहे.

शारीरिक चिकित्सेसाठी सोनोग्राफी मशीन्स आली. गर्भाशयातल्या बाळाची वाढ, त्याच्या हालचाली जाणून घेण्यासाठी ही मशीन वरदानच होती. पण गेल्या काही वर्षांत आपल्याकडे या मशीन्सचा उपयोग गर्भलिंगचिकित्सेसाठी व्हायला लागला आणि बघताबघता ते स्त्रीभ्रूणांच्या हत्येसाठीचं जणू हत्यारचं ठरलं. या मशीन्समधून तपासणी झाल्यावर मुलीचा गर्भ असल्याचं कळलं की गर्भपात करण्याचं प्रमाण एवढय़ा प्रचंड प्रमाणात वाढलं की स्त्री-पुरुषांच्या नैसर्गिक प्रमाणात मोठा फरक दिसायला लागला. शेवटी सरकारला गर्भलिंगचिकित्सेवर बंदी घालावी लागली. पण अशी बंदी आली की अशा उघड गोष्टी छुपेपणाने सुरू होतात. केरळमधल्या सबरीमला मंदिरातल्या देवास्वम समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष यांना त्यांच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत या मंदिरात महिलांना प्रवेश केव्हा दिला जाणार असा प्रश्न विचारला गेला. त्यावर त्यांनी अशाच आणखी एका यंत्रसत्तेचं सूतोवाच केलं आहे. ते म्हणतात, मंदिरात जाणाऱ्यांकडे काही छुपी शस्त्रास्त्रं आहेत का हे पाहण्यासाठी त्यांचं बॉडी स्कॅनिंग केलं जातं. आता स्त्रियांचं स्कॅनिंग करून त्यांनी मंदिरात जायची योग्य वेळ आहे की नाही (थोडक्यात त्या दिवशी त्यांची मासिक पाळी सुरू नाही ना) हे ठरवायची मशीनही येऊ शकतील. तो दिवस दूर नाही. अशी मशीन येतील तेव्हा त्यांना मंदिरात प्रवेश द्यायचा विचार केला जाईल. त्यांच्या या वक्तव्यामुळे गदारोळ उडाला. निक्की आझाद नावाच्या हरियाणातल्या वीस वर्षीय मुलीने त्याविरोधात सोशल मीडियातून ‘हॅपी टू ब्लीड’ हे कॅम्पेन सुरू केलं. त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला वगैरे तपशील सगळ्यांना माहीतच आहे. केरळ मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनीही नंतर आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याची नेहमी सगळेच करतात तशी सारवासारव केली असली तरी मुळात मासिक पाळी सुरू असताना एखादी स्त्री मंदिरात प्रवेश करते आहे का, याचा यंत्राद्वारे तपास करायचा असा विचार करणं हेच धक्कादायक आहे.

मासिक पाळी हा स्त्रियांचा नैसर्गिक शरीरधर्म. या चार दिवसांच्या काळात होणाऱ्या रक्तस्रावामुळे थकवा येतो, त्यामुळे त्यांना विश्रांती मिळावी या हेतूने पूर्वीच्या काळी या चार दिवसांत स्त्रियांनी रोजच्या रुटीनपासून बाजूला होऊन विश्रांती घेण्याची पद्धत रूढ झाली. काळाच्या ओघात तिचं मूळ विसरलं गेलं आणि जणू स्त्रीच अस्पृश्य ठरली. सगळ्यापासून बाजूला होऊन तिला विश्रांती हा हेतू बाजूला पडून या काळात ती अपवित्र म्हणून ती बाजूला असा समज रूढ झाला. मग या अपवित्रतेचं प्रतिबिंब रोजच्या वावराच्या सगळ्याच ठिकाणी पडत गेलं. या काळात तिला धार्मिक गोष्टी वज्र्य ठरल्या. देवळात जाणं नाकारलं गेलं.

आता काही प्रमाणात स्त्रियांनी हे नाकारायला सुरुवात केली आहे. मासिक पाळीच्या काळात स्त्री अपवित्र कशी, आपल्याकडच्या सगळ्या देवींना पाळी येतच असणार ना, मग तुम्ही त्यांनाही अपवित्र मानणार का, मासिक पाळीत होणारा रक्तस्राव अपवित्र कसा, असे प्रश्न विचारले जायला लागले. काही जणी पाळीचं स्तोम न माजवता देवळात जातात. धार्मिक कार्यक्रमांना हजेरी लावतात. व्यवस्थेला मारल्या जाणाऱ्या या धडका इतक्या सहजासहजी स्वीकारल्या जाणार नाहीत हे तर स्पष्टच आहे.

मासिक पाळीच्या काळात स्त्रीला अपवित्र मानणं ही तर भयंकर गोष्ट आहेच, पण तिची पाळी सुरू असेल आणि त्या काळात ती मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असेल तर तिला रोखण्यासाठी स्कॅनिंग मशीनचा वापर करण्याची कल्पना करणं हेच किती भयंकर आहे. सोनोग्राफी मशीन्स आली तेव्हा त्यांचा वापर स्त्री-भ्रूणहत्येसाठी केला जाईल असा विचार कुणी स्वप्नातही केला नसेल. तसाच स्कॅनिंग मशीन्सचा वापर असा होऊ  शकेल असंही कधी कुणाच्या डोक्यातही आलं नसेल. माकडाच्या हातात कोलीत दिलं तर ते जसं सगळीकडे आग लावत जाऊ  शकतं, तसाच हा प्रकार झाला. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या वाटचालीची, प्रगतीची प्रक्रिया आपल्याकडे आपल्या समाजातून उगवून आली नाही. या वाटचालीदरम्यान जी घुसळण होते, ती झाली नाही. विज्ञान-तंत्रज्ञान आपण थेट आयात केलं, पण ते स्वीकारण्याची मानिसकता आयात करता येत नाही. ती उगवूनच यावी लागते. ती नसल्यामुळे यंत्रं म्हणजेसुद्धा आपल्याला जे घडायला हवं आहे ते घडण्यासाठी देवानं दिलेलं वरदानच आहे, असं वाटायला लागतं. त्यातून असे प्रकार घडतात. त्यातला धोका असा की, आज काय स्त्रीची मासिक पाळी सुरू असताना ती मंदिर प्रवेश करते आहे का, हे तपासण्यासाठी मशीन वापरण्याची मुभा घेऊ  दिली तर उद्या एखादी स्त्री कुमारिका (व्हर्जिन) आहे की नाही हे तपासण्यासाठीचंही मशीन येऊ  शकतं आणि लग्न करण्याआधी त्यातून तपासणी करू आणि मगच लग्न करू अशीही मागणी येऊ  शकते. तसेही संशयाच्या भोवऱ्यातून डीएनए टेस्टचा वापर संबंधित मूल आपलंच आहे की नाही ते तपासण्यासाठी करणारे महाभाग आहेतच. स्त्रीला स्वतंत्र माणूस समजायला नकार देणाऱ्या मानसिकतेचे हे सगळे बळी आहेत. समजा, मंदिर सुरक्षेचे व्यवस्थापन एखाद्या पोलीस अधिकारी स्त्रीकडे असले तर तिलाही अशा स्कॅनिंगला सामोरं जावं लागणार का.. देशाच्या किंवा केरळच्या राज्यव्यवस्थेतील उच्च पदावर समजा, पंतप्रधान किंवा मुख्यमंत्रिपदावर उद्या एखादी महिला असेल आणि तिला सबरीमला मंदिरात जायचं असेल तर तिलाही अशाच स्कॅनिंगला सामोरं जावं लागणार का.. या देशात धर्मसत्ता आणि तिच्याआड असलेली पुरुषसत्ता मोठी की स्त्री-पुरुषांना समान संधी देणारी राज्यघटना मोठी? आधीच धर्मसत्ता, राजसत्ता आणि पुरुषसत्ता हातात हात घालून स्त्रीचं शोषण करत आली आहे. त्यात आता यंत्रसत्तेची भर पडते आहे. माहितीच्या विस्फोटानंतर, समाजमाध्यमांचा आवाका एवढा वाढला की त्यामुळेच आता असं मानलं जातं की, यापुढच्या काळात एखादी व्यक्ती नव्हे तर तंत्रज्ञान समाजमनावर राज्य करेल. फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ते प्रत्ययाला येतंच आहे. अशा वेळी स्त्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी धर्मसत्ता-पुरुषसत्ता याच तंत्रज्ञानाचा वापर कसा करू शकते हे या एक-दोन उदाहरणांमधून प्रत्ययाला येतं आहे. निक्की आझाद आणि इतर काही जणींनी हॅपी टू ब्लीड हे कॅम्पेन करून फेसबुकच्या माध्यमातून या सबरीमलाच्या पदाधिकाऱ्यांच्या भंपक विधानाला उत्तर दिलं असलं तरी ते तेवढय़ाने भागणार नाही. कारण ही लढाई तिथेच सुरू होणारी आणि तिथेच संपणारी नाही. मासिक पाळीच्या बाबतीतले पारंपरिक समज दूर करण्यासाठी शालेय पातळीवरून प्रयत्न करावे लागतील. शाळेत मुलींना त्याबाबतची शास्त्रीय माहिती देऊन सजग केलं जातं. त्या प्रक्रियेत मुलांनाही सहभागी करून घेतलं पाहिजे. मुलींची मासिक पाळी, त्यातून त्यांच्या शरीरात होणारे बदल, त्यामागची नैसर्गिकता, त्याबाबतचा अपावित्र्याचा टबू हे सगळं सबरीमला मंदिराचे पदाधिकारी शाळेतच शिकले असते तर कदाचित त्यांच्या मनात आजचे धक्कादायक विचार रुजले नसते.

या सगळ्या प्रकाराला हॅपी टू ब्लीड हे उत्तरही यापुढच्या काळातल्या चळवळी कॅम्पेन कशी चालवली जाणार हे उत्तर आहे.

आपण समाज म्हणून कुठे आहोत?

सबरीमला मंदिर पदाधिकाऱ्यांचं वक्तव्य, निक्की आझाद आणि मुलींचं हॅपी टू ब्लीड हे कॅम्पेन हे सगळं सुरू असताना महाराष्ट्रात शनिशिंगणापूरला त्याहून धक्कादायक प्रकार घडला. कडय़ा-कुलपं नसलेल्या शनिशिंगणापूरला शनीच्या चौथऱ्यावर एक महिला चढली. त्यामुळे तो चौथरा अपवित्र झाला म्हणून त्याला दुधाने अभिषेक करून त्याचे शुद्धीकरण केलं गेलं. असं सांगितलं जातं की, या चौथऱ्यावर ठेवलेली शिळा हजारेक वर्षांपूर्वी जवळच्या नदीत सापडली. ती शिळा आणून तिच्यासाठी चौथरा बांधला गेला. गावात शनिदेवांचं लक्ष आहे म्हणून कडय़ाकुलपं लावणं बंद झालं. या सगळ्याबरोबरच शनीच्या त्या चौथऱ्यावर स्त्रियांनी जायचं नाही असाही नियम झाला. तशा पाटय़ाही तिथे लावल्या गेल्या आहेत. ही स्त्रीच्या घटनादत्त अधिकारावर गदा आहे, म्हणून त्याविरोधात आवाज उठवला गेला आहे.

आताच्या प्रकारात स्थानिक पत्रकारांच्या माहितीनुसार कुटुंबाबरोबर तिथे आलेली तरुणी त्या चौथऱ्यावर चढली आणि तेवढय़ात कुणाच्या तरी लक्षात आल्यामुळे तिला ताबडतोब खाली बोलावलं गेलं. त्या वेळी तिथे फारशी गर्दी नव्हती. तीही काही सेकंदांसाठी त्या चौथऱ्यावर होती. मंदिर व्यवस्थापकांनी तिची चौकशी केली, त्यात ती अनवधानाने तिथे गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. पण नंतर ते गावभर पसरलं आणि गावाच्या स्थानिक राजकारणातून वाढवलं गेलं. दुधाने अभिषेक करून चौथऱ्याचं शुद्धीकरण वगैरे फोकनाड प्रकार केले गेले. सगळा गाव त्यात सहभागी झाला. मुळात एखाद्या महिलेमुळे एखादी गोष्ट अपवित्र होते असं मानणं हेच मध्ययुगीन आहे. आणि असं एकटय़ादुकटय़ाला नव्हे तर सगळ्या गावाला वाटतं? म्हणजे माणसापेक्षा दगडाच्या मूर्तीची शुद्धता जास्त महत्त्वाची? स्त्रियांनी  समाज म्हणून आपण कुठे आहोत?

वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com