भक्ती परब, गायत्री हसबनीस

हे वर्ष लोकसभा निवडणुकांमुळे महत्त्वाचे ठरणार असल्याने आजूबाजूला दिवसागणिक घडणाऱ्या घटना महत्त्वाच्या आहेत. या पार्श्वभूमीवर तरुणाई राजकारणाकडे कशी पाहते, त्यांना सक्रिय राजकारणात उतरावेसे वाटते का? त्यांची सामाजिक, राजकीय मते ग्राह्य़ धरली जातात का, अशा प्रश्नांबाबत राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या, अभ्यास करत असलेल्या युवांकडून जाणून घेण्याचा हा प्रयत्न..

‘हाऊज द जोश..?’, असे जोर लावून विचारणारा ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’मधील विकी कौशल आणि त्याला ‘हाय’ सर.. असे तितक्याच जोशात उत्तर देणारे त्याचे सहकारी यांनी वातावरणात तजेला आणला आहे. एकूण मरगळ जाऊन नव्याने येऊ घातलेल्या राजकीय बदलांसाठी तरुणाईचा मूड उत्तम तयार झाला आहे. मात्र तरुणाईचा हा जोश केवळ चित्रपटांपुरता किंवा लांबून पाहण्यापुरताच मर्यादित आहे का?

तरुणाईला नेहमी पटपट कृती करणारी, आपल्या बोलण्यातून त्यांच्या प्रश्नांचं निरसन करणारी व्यवस्था हवी असते. राजकारणाकडेही तरुणाई याच पद्धतीने पाहते. एकूण समाजाचा तरुणाई लेट गो करतेय.. असा समज असला तरी तरुणाईच्या विचारांचे स्फुल्लिंग कुठल्याच काळात मागे पडत नाही. ते काळाबरोबर चालत राहते. त्यांच्या गतीला, त्यांच्यातील चैतन्याला विचारांची दिशा देणारे नेतृत्व त्यांना हवे असते किंवा प्रत्यक्ष राजकीय पटलावर कामगिरी करायची ठरवल्यास घरातून, त्यांनी निवडलेल्या विचारधारेच्या पक्षातून त्यांना योग्य मार्गदर्शन आणि पाठिंब्याची गरज भासते. महाविद्यालयीन पातळीवर पहिल्यांदा निवडणूक या घडामोडीशी तरुणांचा संपर्क येतो. शाळांमध्ये विविध स्पर्धा-उपक्रमांतून त्यांच्या नेतृत्वगुणांचा विकास झालेला असतो. अशी मुले महाविद्यालयीन वळणावर धीटपणे राजकीय घडामोडींशी संदर्भ जोडू लागतात. त्यांनाही प्रत्यक्ष त्यात सहभाग घेऊन काही करावे असे वाटते.. याविषयी एका पक्षामध्ये युवा कार्यकर्ता ते सहसचिव अशा पदापर्यंत पोहोचलेला, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचाराचा पुरस्क र्ता असलेला अभय चव्हाण म्हणतो, ‘मी महाविद्यालयात असल्यापासून माझी राजकारणाविषयीची आवड जोपासत आलो. महाविद्यालयातील सचिवपद ते पदवीधर निवडणूक जिंकण्यापर्यंतचा माझा प्रवास माझ्या मनातील ठाम राजकीय विचारधारेमुळे शक्य झाला. महाविद्यालयात ग्रंथालयाच्या समस्या, विद्यार्थ्यांना त्यांच्या पातळीवर भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर राहिलो. तेच बळ पाठीशी घेऊन मी सक्रिय राजकारणात उतरलो. आज अशी स्थिती आहे की, तरुणांना रोजगार आणि शिक्षण या बाबतीत अनुकूल असलेल्या विचारधारेकडेच ते ओढले जातात. समाजमाध्यमांमुळे त्यांचे एखाद्या राजकीय पक्षाच्या बाबतीत मत पटकन बनते; परंतु ते तितक्याच लवकर बदलूही शकते.’ आजच्या तरुणाईला काळाचे भान आहे, आपल्या आजूबाजूला काय चाललेय याची त्यांना जाणही आहे आणि आपल्या विचारांना कृतीत आणण्याची ताकदही त्यांच्यामध्ये आहे, असे अभय म्हणतो.

‘भारतीय छात्र संसद’मधील आपला अनुभव सांगताना एका तरुणाने सांगितले की, या संघटनेमध्ये येणारे तरुण हे जास्त करून ग्रामीण भागातून आलेले असतात. विशेष करून उत्तर भारत, पूर्वेकडील छोटय़ा-मोठय़ा गावांतून ते येतात. स्थानिक पातळीवर झालेल्या सामाजिक उपक्रमातून त्यांना प्रोत्साहन मिळालेले असते. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर त्यांच्यावर राजकीय घडामोडींचा बराच प्रभाव असतो; किंबहुना एक विशिष्ट प्रकारचे ठाम राजकीय मत असण्यापेक्षा बदलाची अपेक्षा घेऊ न एक विचार मांडण्याचा प्रयत्न ते करताना दिसतात. पाणी, शेती, जमीन, कंत्राट, रस्ते, औद्योगिकीकरणापासून ते अगदी नवे तंत्रज्ञान, बदलते मनोरंजन क्षेत्र आणि त्याचबरोबर स्पर्धा याबद्दल तरुणांमध्ये सध्या खूप जागरूकता असल्याचे त्याने सांगितले.

‘भारतीय छात्र संसद’मध्ये सगळे विचार आणि विषय हे राजकीय विकासाच्या दृष्टीने मांडले जातात. त्यामुळे राजकीय पक्ष, राजकीय नेते यावर बोलण्यापेक्षा राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक विषयांवर देवाणघेवाण करण्यावर इथल्या तरुणाईचा भर असतो. इथे येणारी तरुण पिढी ही मोठय़ा आत्मविश्वासाने हजारो श्रोत्यांसमोर आपले विचार भाषणातून मांडते आणि त्यासाठी दरवर्षी हजारो संख्येने तरुण वक्ते भारतीय छात्र संसदसाठी नोंदणी करतात, अशी माहिती गेली तीन वर्षे तिथे कार्यरत असलेल्या तरुणाने दिली. तरीही राजकारणात तरुणाईचा वावर अजूनही कमीच असल्याचे मत काही युवा राजकारणी व्यक्त करतात.

तरुणाईचा राजकारणातील सहभाग आजही पैसा, वारसा आणि ओळखी यावर अवलंबून आहे. भारतात ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्येचे वय २५ वर्षे आहे. आणि ६५ टक्क्यांच्या आसपास लोकसंख्येचे वय ३५ वर्षांपेक्षा कमी आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणात बदल घडवण्याची ताकद या तरुणाईत आहे हे नक्की. तरीही आपल्याकडे ज्येष्ठ नेत्यांच्या प्रमाणात त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे तरुण नेते नाहीत, हा विरोधाभास अस्वस्थ करणारा आहे. काही तरी वेगळे करण्याची जिद्द असलेली, माहितीचा साठा असलेली, तंत्रज्ञानाबद्दल अपडेटेड आणि कुठल्याही साधनांची कमतरता नसलेल्या या चांगल्या विचारांच्या तरुण पिढीला राजकारणापासून नेमकी कोणती गोष्ट रोखते आहे? त्यांना त्यांच्या मतांसाठी ठाम उभे राहावेसे वाटत नाही का, असा विचार करायचा झाला तर गेल्या वर्षी मराठा क्रांती मोर्चातील तरुणाईची संख्या काही वेगळेच सांगते. भाजपच्या युथ विंगमध्ये कार्यरत असलेल्या रोहित चहल यांच्या मते, भारतात तरुणांची संख्या राजकारणात वाढते आहे. ते नकारात्मक किंवा साशंक वृत्तीने राजकारणात पाऊ ल ठेवत नाहीत. तरुणाई यापूर्वी कधीही राजकीय मंचावर उतरत नव्हती. मात्र आज ठाम विचारांनी राजकारणात उतरणारे तरुण आहेत. तरुण पिढीत जोश आणि (पान ३ वर) (पान १ वरून) होश दोन्ही गोष्टी एकाच वेळी जागृत आहेत. फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी राजकारणातूनच नाही तर तंत्रज्ञान, माहिती, विज्ञान, सामाजिक कार्य, मतदान, सांस्कृतिक योगदान आणि चालू घडामोडींमधून आपला एक वेगळा विचार घेऊन जाण्याची आवश्यकता आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

तरुणाईला आपल्या देशातील समस्या माहिती आहेत. जगभरातील घडामोडींबद्दल ते अपडेट आहेत. त्यांना संधी मिळाल्यास ते राजकारणात चमकू शकतात. परंतु भारतात राजकीय पक्षांमध्ये ज्येष्ठ नेत्यांच्या तुलनेत तरुण नेत्यांचा प्रभाव नसतो. त्यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी पुढाकार घेऊन संघटनेच्या कार्यात तरुणांनाही सहभागी केले पाहिजे, त्यांच्यावर जबाबदारी दिली पाहिजे. तरुणाई प्रत्यक्ष मतदानात सहभाग नोंदवत नाही, हा आरोपही चुकीचा आहे. त्यासाठी राजकीय पक्षांनी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे अशा ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. हे फक्त निवडणूक जवळ आली की करून भागणार नाही, तर वेळोवेळी राजकीय नेत्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी सोडता कामा नये, असे मत आपापल्या परीने राजकारणात सक्रिय असलेल्या तरुणांनी व्यक्त केले. एकंदरीतच राजकारणात येण्याचे पर्याय तरुणाईसमोर खुले आहेत आणि ते निवडण्याची ताकद, विश्वास असलेली ही पिढी आहे. त्यांनी या विश्वासाच्या बळावरच ठाम विचारांनिशी मोठय़ा प्रमाणावर राजकारणात सक्रिय होऊन समाजकारण साधले पाहिजे, असा सूर युवा नेत्यांकडून व्यक्त होताना दिसतो.

राजकारणात येण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध

राजकारणात आता तरुणाईचा सहभाग मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे सकारात्मकरीत्या याकडे करिअर म्हणून पाहणारी तरुण मंडळी वाढतेय. महाविद्यालयीन पातळीवरून त्यांचा प्रवास सुरू होतो. युथ पार्लमेंट, महाविद्यालयीन निवडणुकांच्या माध्यमातून अनेक युवा नेते नंतर प्रत्यक्ष राजकारणात उतरले असल्याने त्यांचा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे. सोशल मीडियाचीसुद्धा राजकीय मंचावर पोहोचण्यासाठी मदतच होते. राजकारणात येण्यासाठीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, फक्त तरुणांनी आपली वैचारिक बैठक निर्माण करून ताकदीने या क्षेत्रात उतरले पाहिजे.

– दर्शन बाबरे, युवा सहमंत्री- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद.

स्वत:चा विचार असणे आवश्यक..

राजकीय पातळीवर स्वत:ची स्वतंत्र मते असण्यापेक्षा ज्या राजकीय नेत्याला एखादी तरुण पिढी फॉलो करते त्या नेत्याचे मत हेच त्यांचे मत बनते. आताच्या घडीला स्वत:चा विचार असणाऱ्या युवा नेत्यांची आवश्यकता आहे. ज्याचे दुर्दैवाने प्रमाण अल्प आहे. कुठल्या नेत्याच्या नेतृत्वाखाली रोजगाराच्या दृष्टीने पुढाकार घेतला जातो आहे, त्यांचा अजेंडा कसा आणि कितपत योग्य आहे, तो तरुणांच्या भविष्याच्या म्हणजेच रोजगाराच्या दृष्टीने खरेच बदल घडवणार आहे का, याची चाचपणी करून योग्य त्यांना निवडून देण्याची जबाबदारी आज तरुणांवर आहे. एखाद्या नेत्याला तुम्ही पाच वर्षांत काय केले, हा थेट प्रश्न तरुण विचारू शकतात. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांच्या एकूणच कार्याचा आढावा प्रत्येक तरुण घेऊ  शकतो, असे आजचे वातावरण आहे.

– तेजस भातंब्रेकर, पदवीधर, राज्यशास्त्र