आसिफ बागवान

गेल्याच आठवडय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारलेला हा प्रश्न समाजमाध्यमांवर अजूनही गाजतो आहे. ‘परीक्षा पे चर्चा’ या विद्यार्थी आणि पालकांशी संवाद  साधणाऱ्या कार्यक्रमात एका विद्यार्थ्यांच्या आईने आपला मुलगा अभ्यासात अजिबात लक्ष देत नाही. सतत मोबाइलवर गेम खेळत असतो, अशी तक्रार केली असता, पंतप्रधानांनी ‘पब्जीवाला है क्या?’ अशी विचारणा केली. त्यावर सभागृहात हशा पिकलाच पण त्यानंतर ‘पब्जी’वाला है क्या’ फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर ‘मेम’चा विषय बनला. या निमित्ताने ‘पब्जी’ हा गेम न खेळणाऱ्यांमध्येही त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. एरवी लोकल ट्रेनमध्ये, रेल्वे स्थानकात, बिल्डिंगच्या पायऱ्यांवर किंवा पॅसेजमध्ये, कॉलेजच्या कट्टय़ावर किंवा वायफाय ‘फ्री’ मिळत असेल तिथे घोळके करून मोबाइलमध्ये गुंतलेली मुले पाहिली की, यांचं कसलं ‘चॅटिंग’ चाललंय, असा प्रश्न पाहणाऱ्याच्या मनात येत असे. पण ही मुलं प्रत्यक्षात ‘पब्जी’त रमलेली असतात, हे आता लक्षात येऊ लागलं आहे.

‘पब्जी’ धोकादायक आहे का, खरंच तो मुलांवर मानसिक परिणाम करतो का, मोबाइलमध्ये गुंगवून ठेवण्याइतकं सामर्थ्य या गेममध्ये आहे का, या साऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याआधी आपण हा गेम नेमका काय आहे, ते पाहू. ‘प्लेअर अननोनस् बॅटलग्राऊंड’ हा ‘पब्जी’चा फुलफॉर्म. एकमेकांना ओळखतही नसलेली शंभर मंडळी या गेमच्या मदतीने एकमेकांना भिडतात, हा या गेमचा सारांश. पॅराशूटमधून एका प्रदेशात उतरल्यानंतर या प्रदेशात वेगवेगळय़ा ठिकाणी दडवून ठेवलेली शस्त्रं, साधनं, संरक्षक कवच पटकावत समोर दिसेल त्या प्रतिस्पध्र्याचा त्या शस्त्रांनिशी खातमा करणं आणि शेवटपर्यंत टिकून राहणं, हे या  गेममधील प्रत्येक खेळाडूचं ध्येय असते. यादरम्यान त्या भूप्रदेशावरील ‘सेफ एरिया’ आक्रसत जातो आणि त्या ‘सेफ एरिया’त राहण्याचे प्रयत्न प्रत्येक खेळाडूला करावे लागतात. असा एकूण ‘पब्जी’चा पसारा.

अशीच संकल्पना असलेले अनेक गेम याआधीही आपल्या पाहण्यात, खेळण्यात आले असतील. पण ‘पब्जी’ भारतात लोकप्रिय होतोय, याची दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे, हा गेम पूर्णपणे मोबाइलवर खेळता येतो. अगदी दहा हजार रुपयांच्या स्मार्टफोनवरही ‘पब्जी’ खेळता येणं शक्य आहे. भारतात अजूनही ‘प्ले स्टेशन’ किंवा ‘एक्सबॉक्स’सारखी गेमिंग उपकरणं रुजलेली नाहीत. कॉम्प्युटरवरील गेमचा अजूनही प्रसार झालेला नाही. अशा परिस्थितीत कोणाच्याही हातात असलेल्या मोबाइलमध्ये उपलब्ध झालेला ‘पब्जी’ लोकप्रिय होणार नाही, तर नवलच.

दुसरं कारण म्हणजे, या गेमच्या भारतात दाखल होण्याचं टायमिंग. भारतात मोबाइल इंटरनेट कवडीमोल दरात मिळण्यास सुरुवात झाल्यानंतर दिवसाला मिळालेल्या एक-दोन जीबी  डेटाचं करायचं काय, या ‘विवंचने’त असलेल्या तरुणाईला ‘पब्जी’ने मार्ग दाखवला. अतिशय कमी डेटाचा वापर करूनही आकर्षक ग्राफिक्स, उत्कंठावर्धक टप्पे आणि एकाच वेळी अनेकांसोबत गेम खेळण्याची संधी यामुळे अल्पावधीतच ‘पब्जी’ लोकप्रिय झाला. आज जगभरात ४० कोटी ‘पब्जी’चे खेळाडू आहेत. भारतात मोबाइल किंवा ऑनलाइन गेम खेळणाऱ्यांमध्ये ‘पब्जी’वाल्यांचं प्रमाण ७० टक्के आहे. यावरून या खेळाच्या लोकप्रियतेची किंवा वेडाची व्याप्ती लक्षात येते. आता तर हा केवळ खेळ उरलेला नाही तर, ‘पब्जी’ खेळणाऱ्यांच्या व्यावसायिक स्पर्धा आता भारतात आयोजित होऊ लागल्या आहेत. लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसं असलेल्या या स्पर्धेसाठी मुलं एखाद्या ऑलिम्पिकसाठी करावा तसा कसून सराव करत आहेत. आणि या बक्षिसांच्या लोभापायी ‘पब्जी’वाल्यांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडते आहे.

कोणत्याही गोष्टीचं अतिकरण धोकादायक असतं. आज ‘पब्जी’चंही तेच होऊ लागले आहे. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात पंतप्रधानांसमोर आपली व्यथा मांडणारी ‘ती’ माता एकटीच नाही. आज १२ ते १८ वयोगटातील कोणत्याही मुलामुलींच्या पालकांसाठी ‘पब्जी’ हे संकट बनू लागलं आहे. आपला मुलगा मोबाइलवर ‘चॅटिंग’ किंवा ‘भलतंसलतं’ पाहात बसत नाही, या समाधानातून त्याला गेम खेळण्यास मुभा देणारे पालक आज ‘पब्जी’बद्दल तक्रार करीत आहेत. मध्यंतरी ‘पब्जी’ आणखी मोठय़ा आणि वेगवान मोबाइलवर खेळता यावा, यासाठी नव्या मोबाइलची मागणी करणाऱ्या मुलाने हट्ट पूर्ण न झाल्याने आत्महत्या केल्याची घटना मुंबईत घडल्याची चर्चा आहे. ही कितपत खरी, हे अद्याप स्पष्ट नाही. पण ‘पब्जी’ खेळत रात्रभर जागणाऱ्या मुलांमुळे त्यांच्या पालकांचीही झोप उडाली आहे, हे निश्चित.

पण मुद्दा केवळ ‘पब्जी’चा नाही. लहान मुलं आणि तरुण पिढीवर होत असलेला ऑनलाइन, मोबाइल, व्हिडीओ, प्लेस्टेशन अशा गेमचा मारा आणि या गेममधील हिंसाचार या दोन्ही गोष्टी घातक आहेत. जागतिक आरोग्य संघटनेकडून दरवर्षी आंतरराष्ट्रीय आजारांची वर्गवारी (आयसीडी) जाहीर करण्यात येते. या वर्गवारीमध्ये ‘गेमिंग डिसऑर्डर’चा मानसिक आजारात समावेश करण्यात आला आहे. गेमिंगचं व्यसन तरुणांचं मानसिक संतुलन खराब करू शकतो, हे दाखवणाऱ्या अनेक घटना आजवर समोर आल्या आहेत. ‘प्रतिस्पध्र्याला ठार करण्यासारख्या आक्रमक गेमचं व्यसन तरुणांना अधिक लागतं,’ असं मानसोपचारतज्ज्ञही सांगतात. पण यातून उद्भवणाऱ्या मनोविकारावर मानसोपचारतज्ज्ञांकडेही उत्तर नसल्याचं सांगण्यात येत आहे. ‘स्ट्रेस बस्टर’ किंवा मानसिक ताणमुक्तीसाठी मोबाइल गेम खेळणं चांगलं असं म्हटलं जात होतं. पण आता असे गेमच मानसिक आजारांना निमंत्रण देऊ लागले आहेत.

राहता राहिला मुद्दा ‘पब्जी’वरील बंदीचा. मुलांमध्ये व्यसन लागत असल्याच्या कारणावरून गुजरात सरकारने ‘पब्जी’वर आधीपासूनच बंदी आणली आहे. तर, मुलं अभ्यास करत नाहीत, म्हणून जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थी संघटनेने या गेमवर बंदी आणण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. पण वरील समस्यांचं समाधान या बंदीतून होईल, अशी शक्यता नाही. ‘पब्जी’चा जन्म तर वर्षभरापूर्वीचा. पण त्याआधी स्नेक, टेम्पल रन, कॅण्डी क्रश, सबवे सर्फर, काउंटर स्ट्राइक, चिकन डिनर अशा असंख्य गेमनी आबालवृद्धांना वेड लावलं होतं. त्यामुळे आज जे गारूड ‘पब्जी’ने निर्माण केलं आहे, ते उद्या आणखी एखादा गेम निर्माण करणार नाही, याची हमी देणं कठीण आहे.

गेम कोणताही असो, त्यात यश आलं की, माणूस उत्साहात त्यातून बाहेर पडतो. पण त्यातून येणाऱ्या अपयशाची सल त्याला स्वस्थ बसू देत नाही व तो पुन:पुन्हा तो गेम जिंकण्यासाठी प्रयत्न करतो. यातूनच मग चिडचिड, नैराश्य, आत्मविश्वास कमी होणे, एकलकोंडेपणा अशा समस्या निर्माण होतात. या अपयशावर मात करणं शिकवता आलं तर अशा समस्याच निर्माण होणार नाहीत. यासाठीच मैदानी खेळांपासून दुरावलेल्या तरुण पिढीला मैदानात उतरवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. खऱ्याखुऱ्या मैदानात शारीरिक व मानसिक क्षमतांचा कस लागेल तेव्हाच ‘पब्जी’चं मैदान (ग्राऊंड) मुलांना खुणावणार नाही.

viva@expressindia.com