विपाली पदे

चीन, इटली, अमेरिका करता करता करोना भारतातही पोहोचला आणि मग इतक्या मोठय़ा रोगाशी लढताना ज्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात, त्याचीच अंमलबजावणी देशभर सुरू झाली. अनेक गोष्टींवर निर्बंध आले. त्यात पहिला फटका बसला आहे तो शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना.. त्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या, मनोरंजनाची साधनं बंद झाली आणि घरच्या घरी लॉक्ड झालेल्या या मुलांसमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो या सुट्टीचं करायचं काय?

राज्यात अनेक ठिकाणी करोनाची लागण झालेले रुग्ण आढळले. त्यामुळे या व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सगळ्या शाळा आणि कॉलेजेसना दोन आठवडे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांची लेक्चर्स कॅन्सल झाली, परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या. अनेक कॉलेजेसमध्ये तरुणांच्या लाडक्या आणि ज्याची ते संपूर्ण वर्षभर वाट बघतात अशा सो कॉल्ड आयव्ही रद्द केल्या, तर जवळपास सगळ्याच ठिकाणी तरुणांना हॉस्टेल सोडून दोन आठवडय़ांसाठी घरी राहायला जाण्याची परवानगीदेखील देण्यात आली आहे. त्यामुळे आता आपापल्या घरी परतलेल्या या मुलांना करायचं काय, हा प्रश्न सतावतो आहे.

सुट्टी मिळाली की अगदी साहजिकपणे मित्रमैत्रिणींना भेटून पार्टी करणं, चित्रपट पाहायला जाणं, मॉल्समधली शॉपिंग किंवा हॉटेलमधली खादाडी या तरुणाईच्या आवडीच्या आणि ठरलेल्या मनोरंजनाच्या गोष्टी आहेत. मात्र सध्या त्यावरच निर्बंध आले आहेत. जिथे लोकांची गर्दी जास्त असते अशा ठिकाणांमध्ये मोठमोठे मॉल्स, सिनेमागृहे, नाटय़गृहे या जागा सरकारने दोन आठवडय़ांसाठी बंद ठेवल्या आहेत. दादर चौपाटी, मरिन ड्राइव्हसारख्या जागांवरही फार काळ बसू देत नाहीयेत आणि मुंबईच्या बाहेरदेखील जी काही पर्यटनाची ठिकाणे आहेत तिथेही जाण्यास बंदी असल्यामुळे आऊटडोअर फिरायला जाणेदेखील आता त्यांना शक्य नाहीये. मॉल्स बंदच आहेत, पण ऑनलाइन खरेदीचीही त्यांना भीती वाटायला लागली आहे, कारण आपण मागवलेली एखादी गोष्ट जगाच्या कुठल्या भागातून येईल आणि त्यामुळे करोनाचा संसर्ग तर होणार नाही ना, या विचाराने धास्तावलेली तरुण मंडळी ऑनलाइन शॉपिंगचे नाव काढेनाशी झाली आहे. जिममध्ये जाणं नाही, त्यामुळे रोजचा फिटनेस नाही, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या या तरुणाईला सध्या त्रासदायक वाटत आहेत. अनेक तरुण आजकाल स्वत:चे ऑनलाइन छोटेखानी व्यवसाय करतात. त्यांनासुद्धा याचा फटका बसला आहे. मार्केटमध्ये आपले प्रॉडक्ट्स विकणे आणि अगदी उत्पादनातही अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यातही ऑनलाइन साइट्स म्हणजे यूटय़ूब चॅनेल्सचा वापर करून शॉर्ट स्टोरीज, डॉक्युमेंट्रीज, फुडब्लॉग, ट्रॅव्हलब्लॉग बनवतात त्यांना त्यांच्या नवीन प्रोजेक्ट्सबद्दल माहिती कशी गोळा करायची, त्या ठिकाणांना भेट कशी द्यायची, अशा अनेक अडचणी समोर आहेत. व्यवसाय आणि वैयक्तिक पातळीवरच्या या अडचणींमुळे बोअरडम आणि स्ट्रेस या दोन्हीची लागण तरुण पिढीला होणं साहजिक आहे.

रिकाम्या वेळेत बोअरडम मुलांच्या मनात लगेच घर करतो. त्यामुळे त्यातून बाहेर पडण्यासाठी काही टास्क या काळात मुलांनी स्वत:च स्वत:ला द्यायला हरकत नाही, असं मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वैशाली देशमुख सांगतात. काही टास्क जसं आज माझ्या तोंडून ‘बोअर’ हा शब्द बाहेर पडणार नाही, असं ठरवा. असे छोटे-छोटे टास्क तुमच्या मनातील मरगळ, निगेटिव्हिटी घालवायला नक्कीच मदत करू शकतील, असं त्या सांगतात. करोनामुळे ‘सोशल डिस्टन्सिंग’ ही नवीच संकल्पना अनेकविध मार्गानी सोशलच राहणाऱ्या या पिढीवर येऊन आदळली आहे. हे सोशल डिस्टन्सिंग किती दिवसांचे असेल, याची स्पष्ट कल्पना आपल्याला नाही. मात्र अशा वेळी अचानक हातात आलेल्या या वेळेचा सदुपयोग मुलांना करता येईल, असे मत ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मनोज भाटवडेकर यांनी व्यक्त केले. ‘आता मला पॉझिटिव्ह काय काय करता येईल? असा प्रश्न स्वत:लाच विचारा. त्यातसुद्धा डोक्यातील क्रिएटिव्ह विचारांना प्राधान्य द्या. तुमच्यातल्या सुप्त कलागुणांना वाव द्या. मित्रमैत्रिणींना जरी भेटता येत नसले तरी फोन हे माध्यम तुमच्याजवळ आहेच. त्यामुळे वेळेचा योग्य वापर करा, असं त्यांनी सांगितलं.

तर मुलांसाठी ही लाइफस्टाइल बदलवून टाकणारीच संधी आहे. आत्तापर्यंत ज्या गोष्टी त्यांच्या रुटीन बनल्या होत्या, त्यापासूनच त्यांना दूर राहायचं आहे, त्यामुळे याचा नीट विचार त्यांनी केला पाहिजे, असं वैशाली देशमुख सांगतात. परिस्थितीचा फायदा घेत मुलांनी पहिल्यांदा सोशल मीडिया डिटॉक्स केलं पाहिजे, कारण आता ते कुठेही बाहेर जात नाही आहेत. ग्रुपबरोबर- पार्टी काहीच शक्य नसल्याने त्याची छायाचित्रे टाकणं, संदेश देवाणघेवाण असे काहीच करता येणार नाही. सोशल मीडियापासून ठरवून दूर राहणं सहज शक्य आहे. त्यामुळे सोशल मीडियावरून करोनासंदर्भात जी चुकीची माहिती, मीम्स वगैरे शेअर केले जातात आणि एक ताण सगळ्यांवर येतो त्याला आळा बसू शकेल. आपल्याकडे वेळ हातात असला की पहिल्यांदा मोबाइलवर सोशल मीडियावर आपण जास्त सक्रिय होतो, तर कामापुरता त्याचा वापर करून इतर गोष्टींसाठी त्याचा वापर टाळला पाहिजे. यानिमित्ताने मुलं काही गोष्टी स्वत:साठी, काही कुटुंबीयांसाठी आणि काही आपल्या सोसायटीसाठीही नक्कीच करू शकतील, असं त्यांनी सांगितलं.

रिकाम्या वेळेमुळे मनात रिकामपणा येऊ द्यायचा नसेल, तर अनेक गोष्टी ज्या एरव्हीच्या धावपळीत करता येत नाहीत अशा सकारात्मक, तुम्हाला नवं काही शिकण्याचा, विचार करण्याचा आनंद मिळवून देणाऱ्या गोष्टींनी हे मन भरून टाका. त्यातून आनंदही मिळेल आणि हा रिकामा वेळ सत्कारणीही लागेल. ते नकारी विचारांचं घर बनणार नाही आणि हळूहळू करत हीच सकारात्मकता तुमच्या मनापासून समाजापर्यंत पोहोचेल, असा विश्वास मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

या काळात नेमकं काय करता येईल?

* जिम बंद असल्या तरी फिटनेस तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे घरच्या घरी व्यायाम करणं नक्कीच शक्य आहे. यात सूर्यनमस्कार, दोरीच्या उडय़ा, जिन्यावरून चढउतार, योगा किंवा गर्दी नसेल अशा ठिकाणी मॉर्निग वॉक करणं या गोष्टी शक्य आहेत. ‘झुम्बा’सारखे फिटनेस नृत्य प्रकारही इंटरनेटच्या मदतीने घरच्या घरी करता येतील.

* दुसरं आपले जे छंद आहेत ते पूर्ण करता येतील. त्यासाठी आपल्याला काय आवडत आहे किंवा ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत आणि वेळच मिळत नाही, अशी तक्रार आपण करत होतो, ते आठवून लिस्ट करता येतील. रांगोळी, चित्रकला, कुकिंगसारख्या काही गोष्टी शिकता येतील. मुलामुलींनी एखादा पदार्थ बनवायचा आहे तर त्याच्या तयारीपासून शेवटच्या सफाईपर्यंत सगळं करत रोजचा एखादा पदार्थ बनवला तर त्यांना ते कुकिंगचे धडे पुढेही उपयोगी पडतील आणि घरच्यांनाही त्यातून चेंज मिळेल.

* स्वत:चा कॉम्प्युटर ऑर्गनाइझ करता येईल. अनेकदा लॅपटॉपमध्ये फोटो, व्हिडीओजची गर्दी झालेली असते. त्यातला काही भाग क्लाऊडवर सेव्ह करायचा असेल, काही फोल्डर-फाइल्स बनवून ते ऑर्गनाइझ करणं, डिक्लस्टर करणं ही कामं हातावेगळी करता येतील.

* अनेक मुलांना परीक्षांनंतर वेगवेगळ्या विद्यापीठांच्या प्रवेशासाठी बायोडेटा पाठवावे लागतात. ते ऑनलाइन कशा पद्धतीने अपडेट करायचे हे शिकून घेऊन ते काम करता येईल.

* तुमच्या अभ्यासक्रमाचा भाग नसलेले, पण तुम्हाला करण्यात इंटरेस्ट आहे असे छोटे छोटे ऑनलाइन कोर्स या काळात शिकता येतील.

* स्वत:ची एक टु डु लिस्ट करायला हरकत नाही, ज्यात मित्र-नातेवाईकांना फोन करण्यापासून, कपाट आवरणं, आपली खोली नीटनेटकी करणं अशा अनेक राहून गेलेल्या गोष्टी असू शकतील.

– डॉ. वैशाली देशमुख