सौरभ करंदीकर

ब्रिटिश विज्ञानकथा लेखक ई. एम. फॉर्स्टर (१८७९-१९७०) यांनी १९०९ साली ‘द मशीन स्टॉप्स’ नावाची एक लघुकथा लिहिली होती. या लघुकथेत अशा भविष्याची कल्पना होती ज्यात पृथ्वीचा पृष्ठभाग प्रदूषणाने ग्रस्त होतो, वन्यजीवन नष्ट होतं आणि मनुष्य भूगर्भात छोटय़ा छोटय़ा खोल्यांमध्ये राहू लागतो. या साऱ्या खोल्या जोडणारं एक ‘मशीन’ मनुष्याच्या प्रत्येक गरजा भागवू शकतं. ते मशीन मनुष्यांनीच निर्माण केलेलं असलं तरी आता ते जणू काही सर्वाच्या देवस्थानी असतं. या कथेचा नायक आणि त्याची आई एकमेकांपासून दूर राहात असतात आणि मुलगा आपल्या आईला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा व्यक्त करतो. मशीनच्या साहाय्याने जगातला प्रत्येक जण एकमेकाला गोलाकृती तबकडय़ांच्या माध्यमातून पाहू, ऐकू शकतो, गप्पा मारू शकतो, व्याख्यानं आणि मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करू शकतो, त्यांचा प्रेक्षक म्हणून आस्वाद घेऊ  शकतो, मात्र आपापल्या छोटेखानी गुहेतूनच. सर्वाची प्रत्यक्षात प्रवास करायची, एकमेकांना भेटायची, पृथ्वीच्या पृष्ठभागावर फिरायची सवयच मोडलेली असते. कथेचा नायक पुढे आपल्या कृत्यांनी ते मशीन बंद पाडतो आणि मानवाला पुन्हा एकत्र आणतो इत्यादी घटना गोष्टीला पुढे नेतात.

बारकाईने पाहिलं तर या कथेत वर्तमान परिस्थितीच्या पाऊलखुणा आढळतात. साऱ्या जगाला जोडणारं, नवमाध्यमं (सोशल मीडिया) धारण करणारं आजचं ‘मशीन’ म्हणजे इंटरनेट. ही कथा लिहिली गेली त्या काळात इंटरनेट सोडा, साधा कॉम्प्युटरदेखील कुणी पाहिलेला नव्हता. पर्यावरणाचा समतोल बिघडवणारं मानवनिर्मित प्रदूषण नुकतंच जाणवू लागलं होतं. ग्लोबल वॉर्मिग मानवी जीवनासाठी धोक्याचं ठरेल ही कल्पना नुकतीच मांडली गेली होती (संदर्भ: स्वीडिश शास्त्रज्ञ स्वान्त अरिनियस – १८९६ यांचं संशोधन). आता गूगलसारख्या बलाढय़ कंपनीला आजच्या जमान्यातील सर्वव्यापी, सर्वदर्शी भगवंतच म्हणावं लागेल! ‘मशीन’शिवाय जनजीवन अशक्य आहे अशी अवस्था या कथेत झालेली दिसते. इंटरनेटशिवाय आज आपलं पानदेखील हलणार नाही हे वेगळं सांगायची गरज नाही. ज्यांचं काम, उद्योगधंदे थेट इंटरनेटसंबंधी नसले तरी बँका, वाहतूक, वैद्यकीय क्षेत्र या साऱ्यांचा आधार प्रत्येकाला घ्यावाच लागतो आणि या व्यवस्था या ना त्या पद्धतीने संगणकीकरण आणि पर्यायाने इंटरनेटवर अवलंबून आहेत. फॉर्स्टरच्या कथेत जसं ते मशीन बंद पडतं आणि उभी मानवजात हादरते, तसंच काहीसं इंटरनेटविना होईल हे उघड आहे.

फॉर्स्टरच्या कथेत मनुष्याला एकमेकांपासून दूर ठेवणारी समाजव्यवस्था दर्शवली आहे. सध्याच्या करोना विषाणूच्या जागतिक संकटावर एक उपाय म्हणून ‘आयसोलेशन’ म्हणजेच एकमेकांच्या संपर्कात न येणं, याचा पाठपुरावा केला जातो आहे. एकमेकांच्या संपर्कात न राहता आपलं काम ई-मेल, लॅपटॉप, घरातला डेस्कटॉप नाही तर चक्क मोबाइल फोनद्वारे करा, असा सल्ला अनेक संस्थांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिला आहे. हा बदल तात्पुरता असला तरी आपला समाज कदाचित यानिमित्ताने आपल्या कामाच्या पद्धतीत बदल घडवेल असा अंदाज आहे. देशात निश्चलनीकरण जाहीर झाल्यानंतर आपण सारे मोबाइल पेमेंट्स करू लागलो ते आठवा. आज जवळपास सव्वा तीन वर्षं लोटली तरीही आपण मोबाइल पेमेंट्स केवळ ‘सोयीची पद्धत’ म्हणून वापरत आहोत. याचप्रमाणे आपल्या सेवेस असलेल्या तंत्रज्ञानाचा कसा वापर करावा ते हा काळ आपल्याला शिकवेल हे नक्की.

‘वर्क फ्रॉम होम’ असा सल्ला अनेक कंपन्यांनी दिलाय खरा, परंतु यामुळे एक धोका उद्भवतो. कंपनीच्या कार्यालयात असणाऱ्या सायबर-सिक्युरिटी प्रणाली, फायरवॉल इत्यादींच्या बाहेर जाऊन कर्मचारी माहितीची देवाणघेवाण आणि आर्थिक उलाढाली करणार आहेत. सायबर गुन्हेगारांना मोकळं रान मिळणार आहे. याबद्दल जरूर ती काळजी घेतली गेली पाहिजे.

अनेक विज्ञानकथा लेखकांनी पृथ्वीवरचं जनजीवन एक तर प्रदूषणाने किंवा कुठल्याशा विषाणूंच्या प्रादुर्भावाने विस्कळीत झालेलं दाखवलं आहे. तसे अनेक चित्रपटही पाहावयास मिळतात. यापैकी काही विज्ञानकथांचा शेवट ‘मनुष्यजात नष्ट होते’, ‘मनुष्य पृथ्वीपासून दूर निघून जातो’ या स्वरूपाचा असतो, तर काहींचा शेवट ‘संकटांवर मात करून मनुष्यजात पुन्हा नव्याने बहरू लागते’ असादेखील असतो.

प्रसिद्ध विज्ञानकथा लेखक आर्थर सी. क्लार्क यांच्या १९५५ साली प्रकाशित झालेल्या ‘इट्स सच अ ब्युटिफुल डे’ या लघुकथेत प्रत्येक घराला दोन दरवाजे असतात. एक नेहमीचा – जो कुणीही वापरत नसतं आणि दुसरा – जो आपल्याला हव्या त्या ठिकाणी टेलिपोर्ट करतो! म्हणजे बाहेरच्या हवेत श्वासदेखील घेणं कुणाला नको असतं! (असे ट्रान्सपोर्टर अजून तरी निर्माण झालेले नाहीत.) या कथेत एक छोटा मुलगा, पालकांचं लक्ष नसताना, निरागसपणे चुकीचा दरवाजा उघडून शाळेत चालत जातो असा प्रसंग आहे. अनेक वर्षांच्या ‘सोशल आयसोलेशन’नंतर वातावरण निवळलेलं असतं, धोका संपलेला असतो, परंतु बाहेर जाण्याचं धाडस मात्र कुणाकडे नसतं.

फॉर्स्टरच्या कथेच्या शेवटी ‘पृथ्वीचं वातावरण आपल्याला घातक आहे’, असं सांगणारं मशीन बंद पडतं आणि त्यानंतरच मनुष्यजात पृथ्वीच्या पृष्ठभागावर परतते. आपणही आजच्या परिस्थितीवर मात करू यात शंका नाही; परंतु भीती आणि अंधविश्वास या दोन्हीपासून आपण दूर राहण्याची गरज आहे. या दोन सुपर – व्हायरसचा मुकाबला करायचा तर शास्त्रीय दृष्टिकोन जोपासायला हवा. सोशल मीडियातील भाकितं आणि सत्य यांच्यातला फरक आपण जितक्या लवकर ओळखायला शिकू तितक्या लवकर आपण योग्य तीच पावलं उचलून या संकटातून मुक्त होऊ .

फॉर्स्टरच्या कथेत मनुष्याला एकमेकांपासून दूर ठेवणारी समाजव्यवस्था दर्शवली आहे. सध्याच्या करोना विषाणूच्या जागतिक संकटावर एक उपाय म्हणून ‘आयसोलेशन’ म्हणजेच एकमेकांच्या संपर्कात न येणं, याचा पाठपुरावा केला जातो आहे. एकमेकांच्या संपर्कात न राहता आपलं काम ई-मेल, लॅपटॉप, घरातला डेस्कटॉप नाही तर चक्क मोबाइल फोनद्वारे करा, असा सल्ला अनेक संस्थांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिला आहे. हा बदल तात्पुरता असला तरी आपला समाज कदाचित यानिमित्ताने आपल्या कामाच्या पद्धतीत बदल घडवेल असा अंदाज आहे.