गायत्री बर्वे-गोखले डाएट हा आज सगळ्यांसाठीच परवलीचा शब्द झाला आहे. दररोज उपलब्ध होणारे नवनवीन डाएट प्रकार करायचे, अनुभव घ्यायचा आणि नाही जमलं तर गाडी मूळ पदावर अशी कित्येकांची खास करून तरुणाईची अवस्था असते. चमचमीत खाणं आणि डाएट या दोन शब्दांची सांगड घालत आपला दैनंदिन आहार कसा सांभाळायचा हे चटकदार गणित क्लिनिकल डाएटिशियन म्हणून १३ वर्षे कार्यरत असलेल्या डॉ. गायत्री बर्वे-गोखले ‘डाएट डायरी’ या सदरातून जमवून देणार आहेत. ठाण्यातील ‘राईट बाईट’हा हेल्थ कॅ फे भागीदारीत चालवणाऱ्या डॉ. गायत्री काही चटपटीत डाएट रेसिपीजही शेअर करणार आहेत. गेल्या काही वर्षांत ‘फास्ट फू ड’ ही शहरी भागात झपाटय़ाने फोफावत गेलेली इंडस्ट्री आहे. कोणताही आर्थिक वर्ग असो, फास्ट फूडने सगळ्यांनाच भुरळ पाडलेली आहे. विशेष करून तरुण वर्ग फास्ट फूडकडे जास्त आकर्षित झालेला दिसून येतो. ‘फास्ट फूड’ म्हणजे काय, तर असे अन्नपदार्थ जे चटकन बनवून पटकन सव्र्ह केले जातात आणि ते खाताना विशेष कटलरी / क्रोकरी म्हणजेच डिश, चमचे यांची फारशी गरज भासत नाही. ज्याला ‘फिंगर फूड’ असंही संबोधलं जातं. आपल्याकडचा वडापाव हे याचं उत्तम उदाहरण. पण याच बरोबर गेल्या काही वर्षांत फ्रँकी, बर्गर, चिकन नगेट्स, फ्रेंच फ्राईज, गाडीवर मिळणारे मंच्युरियन हे सुद्धा तरुणांच्या ‘हिट लिस्ट’मध्ये समाविष्ट झालेलं दिसून येतंय. परदेशी कंपन्यांनी फास्ट फूड्सचे विविध पर्याय तरुणांसाठी उपलब्ध करत भारतात त्यांच्या ब्रॅण्ड्सचे घट्ट पाय रोवलेले आहेत. तरुण मुलं-मुली, विशेषत: कॉलेजमध्ये जाणारी मुलं आणि शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने घरापासून लांब एकटी शहरात राहायला आलेली मुलंमुली फास्ट फूडचा पर्याय निवडताना दिसतात. यामागे अनेक कारणं आहेत. सर्वसाधारणपणे उपलब्ध असणारे फास्ट फूडचे सर्व पर्याय हे चटकदार असतात, जे नेहमीच्या पोळीभाजीपेक्षा तरुणाईला जास्त आवडतात. दुसरं म्हणजे आधी म्हटल्याप्रमाणे फास्ट फूड हे खायला सोप्पे, पटकन विकत घेऊन अगदी प्रवासात सुद्धा सहजपणे खाता येऊ शकतं त्यामुळे वेळ वाचतो, तसंच इतर पदार्थापेक्षा हे तुलनेने स्वस्त आणि सहज उपलब्ध असल्यामुळे साहजिकच तरुणाई फास्ट फूडचा पर्याय निवडताना दिसून येते. कधीतरी फास्ट फूडचा आस्वाद घेण्यात काहीच गैर नाही पण याआधी केल्या गेलेल्या अनेक सव्र्हेज आणि रिसर्च अंती असं अनुमान निघालेलं आहे की कित्येक कॉलेज स्टुडन्ट्स हे आठवडय़ातून ४-५ दिवस जेवणाला पर्याय म्हणून फास्ट फूडची निवड करताना दिसतात जे भविष्यात त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे, बाहेर मिळणाऱ्या फास्ट फूड पदार्थांची न्यूट्रिशनल व्हॅल्यू ही खूपच कमी असते, म्हणजेच हे पदार्थ आपल्या शरीराला एनर्जी/ऊर्जा देत असले तरी बाकी कोणत्याही प्रकारची चांगली पोषक तत्त्वं या फास्ट फूडमधून मिळत नाहीत. याउलट बरेचसे फास्ट फूड पदार्थ हे तळलेले किंवा मैद्यापासून बनलेले असल्याने त्यांच्या वारंवार सेवनाने शरीराला त्रास होऊ शकतो. गेल्या काही वर्षांत फास्ट फूड खाण्यामुळे तरुण वयातच 'ओबेसिटी'सारख्या समस्यांना तोंड द्यावं लागत असल्याची कित्येक उदाहरणं डोळ्यासमोर दिसतात. याचप्रमाणे या पदार्थामध्ये मोठय़ा प्रमाणात सोडियम, कृत्रिम खाद्यरंग, निकृष्ट दर्जाचं तेल यांचा वापर केला जात असल्याने उच्च रक्तदाब, अॅलर्जी, पॅल्पिटेशन यासारख्या समस्या कमी वयात उद्भवण्याची भीती असते. शिवाय ज्या ठिकाणी हे अन्नपदार्थ बनवले जातात त्या ठिकाणची स्वछता, बनवणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक आरोग्य हा लक्षात घेण्यासारखा महत्त्वाचा मुद्दा आहे. अस्वच्छ ठिकाणी बनवल्या गेलेल्या आणि सर्दी/खोकला झालेल्या व्यक्तीच्या हातचे पदार्थ खाल्यामुळे सौम्य ते गंभीर स्वरूपाचे आजार/रोग होण्याची शक्यता असते. पण घरापासून दूर राहणाऱ्या तरुण वर्गाकडे कधी कधी फास्ट फूड खाण्यावाचून पर्याय नसतो तेव्हा हे सर्व टाळण्यासाठी तरुण वर्गाने फास्ट फूड पदार्थांची निवड करताना विशेष काळजी घ्यायला हवी. फास्ट फूड खाताना शक्यतो त्या ठिकाणची स्वछता लक्षात घेऊन तसेच योग्य ठिकाण निवडावे. आपण कोणते पदार्थ खातोय याचा नीट विचार करावा. शक्यतो कमी तेलातले पदार्थ खावेत. एग रोल किंवा व्हेज फ्रँकी हे पदार्थ ‘फ्रेंच फ्राईज’ना एक उत्तम पर्याय ठरू शकतात. कारण फ्राईज तळलेल्या असून त्यातून काबरेहायड्रेट्स व्यतिरिक्त विशेष काहीच अन्नघटक मिळत नाहीत. याउलट एग रोलमधून अंडय़ातील प्रोटिन्स, किंवा व्हेज रोलमधून थोडय़ा प्रमाणात का होईना फायबर, व्हिटामिन्स् शरीरात जातील. शिवाय हे पदार्थ तळलेले नसल्याने ते शरीरास कमी घातक आहेत. बर्गर ऐवजी सॅलड्स, रॅप्स या पर्यायांची निवड करावी. फास्ट फूड ऐवजी आपले पारंपरिक पदार्थ जे हल्ली बाहेर सहज मिळतात जसे उपमा / पोहे / शिरा यांची निवड तळलेल्या पदार्थापेक्षा कधीही योग्य ठरेल. तळलेले पदार्थ वारंवार त्याच तेलात तळत असल्याने ट्रान्स फॅट्स शरीरात जातात जी शरीरास हानिकारक असतात म्हणून असे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. याउलट ताजी फळं, सीझनमध्ये असणाऱ्या भाज्या, जसं आत्ता हिवाळ्यात मिळणारी लाल गाजरं, काकडी, संत्री, बोरं, पेरू हे पदार्थ सहज सोबत घेऊन जाता येऊ शकतात आणि ते कुठेही खाण्यास सोपे शिवाय शरीराला पोषक आहेत. अशा पर्यायांचा तरुण मुलामुलींनी नक्की विचार करायला हवा. याशिवाय उकडलेली अंडी, खजूर, बदाम, चणे-कुरमुरे हे पदार्थसुद्धा डब्यात नेणे आणि भूक लागेल तेव्हा खाणे, जेणे करून बाहेरचे पदार्थ कमीत कमी पोटात जातील यासाठी प्रयत्न करायला हवेत. शिवाय हे सर्व पदार्थ सोबत ठेवण्यासाठी ‘कुकिंग’ यायलाच हवं किंवा त्यासाठी वेळ मिळत नाही या सबबीसुद्धा ग्राह्य ठरत नाहीत. घराजवळ किंवा दूर राहून शिक्षण घेणं किंवा नोकरी करणं यापैकी काहीही करत असलो तरी आपल्या आरोग्याची काळजी ही आपणच घ्यायला शिकलं पाहिजे. कारण उतार वयातलं आपलं आरोग्य हे तरुण वयातल्या आपल्या ‘चांगलं’ खाण्याच्या सवयींवर अवलंबून असतं, तेव्हा नव्या वर्षांचा नवा संकल्प म्हणा किंवा भविष्यासाठीची चांगल्या आरोग्याची इन्व्हेस्टमेंट म्हणून म्हणा फास्ट फूडकडे वळणारी पावलं थोडी ‘स्लो’ करू या आणि हेल्दी पर्याय निवडायचा प्रयत्न करू या. viva@expressindia.com