मी पदवी परीक्षा पास झालीय, जस्ट मास्टर्सला अ‍ॅडमिशन घेतलीये. माझ्या घरात आई, पपा, दादा, माझी बहीण अशी फॅमिली आहे. पपा रिटायर झालेत आणि मी त्यांची खूप लाडकी आहे. कारण घरी अजून लहान कोणीच नाही. मी सगळ्या गोष्टी माझ्या ताईशी शेअर करते. माझं एका मुलावर खूप प्रेम आहे. पण त्याला आता माझ्याशी लग्न करायचं नाही आहे. काहीतरी त्याची मजबुरी आहे. पण त्यानं मला ती सांगितली नाही, फक्त ‘समजून घे’ म्हणतो. हे ऐकून मला तर काहीच सुचत नाही. खूप स्वप्नं पाहिली होती मी. आता खूप टेन्शन आलंय. विचार करून करून डिप्रेशन आलंय. दादा विचारत राहतो काय झालंय म्हणून. घरच्यांना काय सांगू? माझा अभ्यास पण होत नाही या टेन्शनमुळे.
 -धनश्री
हाय धनश्री,
तुला नाही वाटत तू खूप लकी आहेत असं? आई-बाबांची लाडकी, जिच्याशी तू शेअर करू शकतेस अशी ताई, काळजी करणारा दादा! पण आता तू मोठी झालीयेस. निसर्गनियमाप्रमाणे या सगळ्या प्रेमाच्या बंधनातून तू आता बाहेर पडायला बघतेस. जोडीदार, लग्न या सगळ्याची स्वप्नं पाहतेयस. अनफॉच्र्युनेटली, ज्याच्याशी ही स्वप्नं तू जोडली होतीस, तो यातून काही कारणानं माघार घेतोय. त्यामुळे या चित्राला तडा गेल्यासारखं झालंय.
प्रेम म्हटलं की काहीतरी काव्यमय, तरल, स्वप्निल अशी भावना मनात येते. पण या प्रेमात एक मेख असते. यात दोन व्यक्ती इन्वॉल्व झालेल्या असतात. या दोघांच्या परस्परसंबंधांतून किंवा इन्टरडिपेन्डसमधून ते बहरतं, वाढतं आणि टिकतं. नॅचरली या दोघांपैकी एक जरी घटक डळमळीत असला तरी या नात्याला हादरे बसतात, मग ते वाढण्याची आणि टिकण्याची बातच सोडा. धनश्री तुमच्या रिलेशनशिपमध्ये या घडामोडी झाल्यात हे आपल्याला अ‍ॅक्सेप्ट करायला लागेल. तुला काही अशी घटना आठवतेय का जी याला कारणीभूत ठरली असण्याची शक्यता आहे? तुझ्या ताईशी तू शेअर केलंयस का हे?
त्याच्या तुझ्यापासून दूर जाण्याची अगदी साधी ते बऱ्यापैकी गंभीर अशी अनेक कारणं असू शकतील. पण त्याच्या स्वीकार किंवा अस्वीकारावरून तुझी किंमत कमी-जास्त होणार नाहीये, नाही का? धनश्री नावाची मुलगी आहे तीच आणि तशीच रहाणार आहे, त्याच्या निर्णयाप्रमाणे ती चांगल्याची वाईट किंवा वाईटाची चांगली अशी बदलणार नाही.
आणखी एक गोष्ट तुझ्या सगळ्या मागण्या तू लाडकी असल्यानं बिनबोभाटपणे पुऱ्या होण्याची तुला कदाचित सवय असेल. त्यामुळे हा नकार पचवणं तुला जड जात असणार. पण तुझी स्वप्न खरं करण्यासाठी त्याच्यावर जबरदस्ती तर करता येणार नाही. तू प्रयत्न करून पाहा त्याच्या निर्णयामागचं कारण जाणून घेण्याचा. पण नाहीच समजलं तरी त्याच्या निर्णयाला रिस्पेक्ट कर. कुणाशी लग्न करावं हे ठरवण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे. प्रेमात फक्त स्वत:चं सुख न पाहता दुसऱ्या व्यक्तीच्या सुखाचा विचार करणं याला जास्त महत्त्व असतं असं म्हणतात. प्रत्येक नात्याची आपल्या आयुष्यात आपापली एक जागा असते. शेवटी तुझा काहीही निर्णय झाला तरी या नात्याच्या मधुर आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेव. त्या कडवट होऊ देऊ नकोस. एकदा का निर्णय घेऊन तो अ‍ॅक्सेप्ट केलास की तुला तुझ्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करणं सोपं जाईल.
If you love something, let it go. If it comes back to you, it’s yours, if it doesn’t, it never was, and it’s not meant to be.

तरुणपणात निसर्गनियमाप्रमाणे प्रेमात पडायला होतंच. अर्थात ओघानं प्रेमभंगही आलाच. नवीन नाती, नवीन अभ्यासक्रम, नवीन जॉब आणि त्यांमधल्या गुंतागुंती. शरीराविषयी शंका, निर्णयांविषयी शंका असं खूप काही मनात सुरू असतं. खरं तर शंका खूप जेन्युईन असते पण ऐकणारा काय म्हणेल, हसेल की काय असं वाटतं. कुणाला विचारावं हेही कळत नाही. तुम्हाला वाटतंय असं काही? मग हा कॉलम आहे खास तुमच्यासाठी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांना वाट देण्यासाठी. इथे तुम्हाला वाटणाऱ्या शंकेला कुणी नाकं मुरडणार नाहीये की फालतू म्हणून त्या निकालात काढणार नाहीये. बिनधास्तपणे त्या शेअर करा. viva@expressindia.com या आयडीवर. सब्जेक्टलाईनमध्ये ओपन अप असं लिहायला विसरू नका.