गायत्री हसबनीस स्त्री-पुरुष समानतेचा विचार आपण प्रत्यक्ष कृतीत आणला पाहिजे, हा उद्देश ठेवून शार्दूल कदम या तरुणाने लग्नात मंगळसूत्र घातले. त्याने स्वत: सोशल मीडियावरून आपला यामागचा विचारही मांडला, पण त्याची पोस्ट जितकी व्हायरल झाली तितकाच त्याच्या या कृतीमागचा विचार व्हायरल झाला का? याआधीही अभिनेता सारंग साठय़े याने नथ घालून आपला फोटो सोशल मीडियावर पोस्ट के ला होता. आपण सहजतेने ही कृती के ली आहे, तिला कु ठलंही लेबल लावलं जाऊ नये, असा विचार त्याने मांडला होता. मात्र व्हायरल पोस्ट यापलीकडे ते फारसं पोहोचलं नाही. शार्दूलने केलेल्या पोस्टनंतर त्याला आलेल्या अनुभवांविषयी त्याच्याशी बोलून जाणून घेण्याचा हा प्रयत्न.. माझं स्वत:चं असं एक म्हणणं आहे आणि ते मला माझ्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करायचं आहे. ते लोकांपर्यंत पोहोचलं तर लोक काय म्हणतील? याचा विचार मला करायचा नाही, पण ते त्यांच्यापर्यंत निदान पोहोचावं आणि त्यावर त्यांचे बरे-वाईट जे काही विचार असतील ते लक्षात यावेत, या एकमेव उद्देशाने आजच्या पिढीतील युवक—युवती समाजमाध्यमांवर व्यक्त होतात का? ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे. सध्या समाजमाध्यमांनी सर्वाना व्यक्त होण्याचं आणि आपलं म्हणणं शेअर करण्याचं हक्काचं व्यासपीठ दिलं आहे. त्यातून त्या म्हणण्यावर टीका करणारे असंख्य लोक ही आहेत तसेच त्याचं स्वागत करणारेही तितकेच असतात, पण नक्की त्या व्यक्तीला काय म्हणायचंय हे आपल्याला अनेकदा त्या व्यक्तीशी बोलल्याशिवाय लक्षात येत नाही. मुळात व्हायरल होणाऱ्या गोष्टींची अनेकदा चर्चाच इतकी होते की, कदाचित त्यात त्या घटनेतलं गांभीर्य किं वा त्यामागचा विचार लक्षातच येत नाही. शार्दूलने आपली लग्नातली मंगळसूत्र घातलेली छायाचित्रे पोस्ट के ली, त्याचा विचारही सांगितला; पण त्याचा हा विचार आजच्या तरुणाईला पटणारा आहे का? या प्रश्नावर आपल्याला चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया मिळाल्याचे तो सांगतो. ‘व्यावहारिक आयुष्यात आपण बऱ्यापैकी स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करतो, त्याबाबतीत प्रयत्नशील असतो, कामही करतो. मग आपण लग्नातल्या विधींमध्येही तोच विचार अनुसरला तर काय हरकत आहे? या विचारातून मी तसाच काहीसा प्रयत्न के ला,’ हे सांगणाऱ्या शार्दूलला मुळात ही प्रेरणा आपल्या विचारात आणि समाजात वावरताना दिसलेल्या प्रथा-कृतींच्या विसंगतीतून मिळाली. ‘आजूबाजूला मित्र-मैत्रिणींचे लग्न समारंभ पाहताना त्यातल्या बऱ्याच गोष्टी खटकत होत्या,’ असं शार्दूल सांगतो. लग्नसोहळ्यात पत्नीला मंगळसूत्र घालण्याच्या विधीमागचा समाजमान्य विचार काय हे जेव्हा त्याच्या लक्षात आले तेव्हा त्याच्या मनात विचारचक्र सुरू झाले. ‘मंगळसूत्र मुलीच्या गळ्यात असेल तर ती विवाहित आणि नसेल तर अविवाहित हा शिक्का मला पटला नाही. तेव्हा मी ठरवलं की, माझी बायको जर मंगळसूत्र घालणार असेल तर मीही ते घातले पाहिजे. अर्थात मंगळसूत्र घातलंच पाहिजे असं काही बंधन मी ठेवलेलं नाही आणि मी घातलं म्हणून दुसऱ्या कोणी ते घालावं असाही माझा आग्रह नाही,’ असं शार्दूलने स्पष्ट के लं. ‘जेव्हा मी ही संकल्पना माझ्या अकाऊंटवरून शेअर केली तेव्हा ती माझ्या जवळच्या आणि आजूबाजूच्या मित्र-मैत्रिणींना दिसत होती. अर्थात त्यांच्यापैकी ज्यांना ती संकल्पना आवडली नाही त्यांनी त्यावर कमेन्ट करणं टाळलं; पण एकूणच मला सकारात्मक प्रतिसादही खूप मिळाला,’ असं तो सांगतो. मात्र त्याच्या एका मैत्रिणीने दिलेली टिप्पणी त्याला खास लक्षात राहिली, असे तो म्हणतो. ‘जेव्हा पुरुष असे काही धाडस करतो किंवा पुढाकार घेऊन वेगळेपणा करतो तेव्हा ते समाजात स्वीकारले जाते; पण जेव्हा एखादी विवाहित स्त्री मंगळसूत्र घालत नाही तेव्हा बऱ्याचदा तुझ्या नवऱ्याला चालतं का? असा प्रश्न तिला विचारला जातो,’ हा माझ्या मैत्रिणीचा अनुभव तिने मला सांगितला. त्यामुळे समाजात स्त्री-पुरुष समानतेचा विचार प्रत्यक्षात आणणे किती कठीण आहे, कारण वैचारिकदृष्टय़ा समाजात किती मतभेद आहेत हे जाणवल्याचं त्याने सांगितलं. ‘तू मंगळसूत्र घातलं म्हणजे तू स्त्रियांप्रमाणे राहणार का?’ असेही प्रश्न विचारले गेल्याचे शार्दूलने सांगितलं. तू मंगळसूत्र घातलं म्हणजे तू काय आता साडी घालणार का? वगैरे असे अनेक प्रश्न मला विचारले गेले ज्यात काहीच अर्थ नाही; पण मी मंगळसूत्र घातल्याने माझं पुरुषत्व नक्कीच कमी होणार नाही, हे मात्र मी त्यांना आवर्जून सांगू इच्छितो. आपण इथेच गोंधळ करतो असं मला वाटतं. आपण एखाद्या लिंगाचा सामाजिक दृष्टिकोन हा त्याच्या जैविक दृष्टिकोनाशी जोडू पाहतो. माझ्या या संकल्पनेला बऱ्याच लोकांनी विरोध केला आहे, तर अनेकांनी आम्हीही असं करून पाहू, अशी सकारात्मकताही दाखवली आहे,’ असं तो म्हणतो. त्याने मांडलेल्या विचारामुळे किमान स्त्री-पुरुष समानतेच्या संकल्पनेबद्दल चर्चा तरी झाली याचेही समाधान वाटत असल्याचे त्याने सांगितले. लग्नानंतर शार्दूल ‘आद्या’ या नामवंत ब्रॅण्डने डिझाईन के लेले मंगळसूत्राचे ब्रेसलेट घालतो आहे. दैनंदिन आयुष्यात वावरताना मंगळसूत्र हातात ब्रेसलेटप्रमाणे घालून स्त्री-पुरुष समानतेची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न तो करतो आहे. मात्र संसारात ही समानता कशी साधता येईल? याबद्दल त्याचा विचार मांडताना तो म्हणतो, लिंगभेद संपेल तेव्हा ही संकल्पना खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात येईल. स्त्रीने अमुक एक काम करावं आणि पुरुषांनी तमुक एक काम करावं अथवा तेच त्यांचे काम आहे, असे कामाच्याच काय कोणत्याही बाबतीत निकष लावणं योग्य नाही. आपल्या आवडीचं काम आपण करावं. शार्दूलने पत्नीला ही संकल्पना सांगितली तेव्हा तिने पाठिंबा दिलाच, पण यावर ठाम राहा, हा तिचा आग्रह असल्याचेही त्याने सांगितले. सोशल नेटवर्किं गवर प्रचंड सक्रिय असणाऱ्या तरुणाईकडून शार्दूलच्या या वेगळ्या विचाराला संमिश्र प्रतिसाद मिळत असला तरी यामध्ये नकारात्मक प्रतिक्रियांची संख्या अधिक असल्याचं दिसून येत आहे. काहींनी या अशा गोष्टी मटेरियलिस्टिक असल्याची टीका के ली आहे, तर काहींनी त्याला ट्रोल केलं आहे. मात्र शार्दूलला ओळखणाऱ्यांच्या मते त्याने आपल्या पद्धतीने त्याचे विचार कृ तीत आणण्याचा एक प्रयत्न के ला आहे आणि या प्रयत्नाला त्यांनी दाद दिली आहे, काहींनी पाठिंबाही दिला आहे. समानतेचा विचार हा के वळ बोलण्याच्या उपचारापुरता असू नये. शार्दूलसारखा एखादा तरुण त्या दिशेने प्रयत्न करत असेल तर त्यातून अनेकांना प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही समाजात व्यक्त झाला आहे जो पुरेसा बोलका आहे. viva@expressindia.com