उन्हाळ्याच्या झळा वाढू लागल्यात तसा वातावरणातला ताप वाढतोय, पण त्याबरोबर एक्झ्ॉम फीवरसुद्धा सध्या चढलेला आहे. वर्षभर शिकलेल्या ज्ञानाची कसोटी या काळात लागते.
या काळात आरोग्य टिकवून ठेवणं फार महत्त्वाचं. कारण तब्येत चांगली असेल तरच अभ्यासावर लक्ष केंद्रित होईल आणि परीक्षा मनासारखी पार पडेल. तब्येत ठणठणीत ठेवण्याचा महत्त्वाचा मार्ग म्हणजे योग्य आहार. अर्थात डाएट.
परीक्षेच्या काळात योग्य आहार घेण्यास सगळ्यात मोठा अडथळा ठरतो तो म्हणजे तणाव- टेन्शन! परीक्षेच्या टेन्शनचा आणि आहाराचा काय बरं संबंध? खरंतर त्यावरच सगळं काही अवलंबून आहे. टेन्शनमुळे आपल्या मनाची अवस्था वेगळी होते. त्याचा थेट परिणाम भुकेवर होतो. हा परिणाम व्यक्तिगणिक बदलत जातो. म्हणजे काहींची भूक वाढते, तर काहींना सतत काही ना काही खायला लागतं. काहींना दिवसभर भूकच लागत नाही.
या दोन्ही अवस्थांमध्ये शरीराला योग्य आहार मिळू शकत नाही. कारण सतत काहीतरी खात राहावेसे वाटते, त्या प्रत्येक वेळी आपण हेल्दी पदार्थच खातो असं नाही. शिवाय परीक्षा असल्यानं या काळात आपला व्यायाम कमी किंबहुना अजिबातच होत नसल्यानं वजन वाढण्याची शक्यता असते. याउलट, ज्या वेळी भूक लागत नसते, त्या वेळी अन्न कमी गेल्यामुळे शरीराची कॅलरीजची गरज भागली जात नाही आणि हळूहळू अशक्तपणा जाणवू लागतो. थोडय़ा वाचनानंतर थकवा जाणवू लागतो. अभ्यास करण्याची इच्छा असते, पण अशक्तपणामुळे तो करता येत नाही. मग चिडचिड होणे, आत्मविश्वास कमी होणे, नकारात्मक भावना निर्माण होणे अशा तक्रारी वाढतात. या सगळ्याचा विपरीत परिणाम परीक्षेवर होतो.
म्हणूनच परीक्षेदरम्यान योग्य आहार घेणं महत्त्वाचं आहे. या काळात शरीराच्या गरजा वाढलेल्या असतात. त्या योग्य आहारानं पूर्ण करणं गरजेचं असतं.

डाएट टिप्स
* आहार पौष्टिक आणि सकस असावा. जेवणामध्ये कोशिंबिरी, पालेभाज्या यांचा समावेश अवश्य असावा. दूध, दही, ताक, उसळी, अंडी यांनी प्रथिनांची गरज भागवली जाते.
* मधल्या वेळच्या खाण्यामध्ये एखादा गोड पदार्थ असावा. कारण मेंदूला त्याच्या कार्यासाठी ग्लूकोजची आवश्यकता असते, जी फक्त साखरच भागवू शकते.
* परीक्षेच्या काळात बऱ्याचदा रात्रीच्या वेळी जागरण होत असतं. अशा वेळी रात्रीच्या जेवणानंतर थोडय़ा थोडय़ा वेळानं काहीतरी खात राहावे. उदाहरणार्थ- फळं, दूध, पेढा, बर्फी असं काही थोडं थोडं खावं.
* आहारात भरपूर फळांचा समावेश असावा. कारण त्यामुळे तंतुमय पदार्थ मिळतात आणि या घटकामुळे पोट साफ होण्यास मदत होते. या दिवसांत पाणी भरपूर प्यावं आणि बाहेरचे, उघडय़ावर ठेवलेले पदार्थ खाणं टाळावं.