दिवाळीत सुगंधी तेलाने अंगमर्दन करून उटण्याने अभ्यंगस्नान केलं जातं. पण हे उपचार केवळ सणापुरते चार दिवस करून उपयोग नाही. आयुर्वेदिक अभ्यंगाने शरीराची शुद्धी होत असते. हे उपचार नेहमीच केले पाहिजेत.आयुर्वेद हा मुळातच एक गहन विषय आहे. मनुष्यप्राणी आणि निसर्ग यांच्यामधले तत्त्वज्ञान यामध्ये उलगडून सांगण्याचा प्रयत्न आहे. पूर्वीच्या काळात ऋषीमुनींच्या अनुभवातून काही गोष्टी आपल्याला कळल्या आहेत. परंतु त्याला शास्त्रशुद्ध जोड नाही असं आपल्याला वाटत असतं. खरं तर आयुर्वेद हे एक वैद्यकशास्त्रच आहे. परंतु ते आपल्याला पूर्णपणे समजत नाही. किंवा आपण त्यासाठी प्रयत्नपण करत नाही. त्याला अनेक कारणेही आहेत. अमुक वनस्पतीचा पाला आरोग्याला किंवा एका विशिष्ट रोगावर खाल्ला म्हणजे आपण बरं होतो. आयुर्वेदाचा आवाका हा एवढाच मर्यादित नाही. निरोगी जीवन जगण्यासाठी आपली दिनचर्या कशी असावी, आपले आचार-विचार, शुद्धीकरण, मानसिक, शरीरिक आरोग्य कसे संतुलित ठेवावे, याचा अभ्यास म्हणजे आयुर्वेद होय.आयुर्वेदात अभ्यंगाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. शरीरशुद्धीसाठी ते आवश्यक आहे. आंतर्बाह्य़ शरीरशुद्धी आयुर्वेदात अपेक्षित असते. बाहय़शुद्धीसाठी अभ्यंग आवश्यक आहे. कुणी कुठला मसाज घ्यावा?* पित्त असणाऱ्या व्यक्तीची त्वचा निस्तेज होते, भूक न लागणे, अंग गार पडणे, व ढेकरा देणे ही लक्षणे दिसून येतात. हृदयाचे ठोके वाढणे असे दोष आढळून येतात.* पित्त प्रकृतीच्या लोकांनी खोबरेलतेल, तूप, ब्राह्मी किंवा आवळा या तेलाने मसाज केल्यास फायदा होतो. वातासाठी राईचे तेल, बदाम तेल, त्रिफळा चूर्ण यांचा मसाज उपयुक्त ठरतो.* मसाज करताना वात प्रकृतीच्या व्यक्तींनी तीळाचे तेल, नारायण तेल, महानारायण तेल वापरावे.* त्वचा मुलायम होण्यासाठी तसेच मानसिक ताण दूर करण्यासाठीही आयुर्वेदिक आवळा, बदाम तेलांचा वापर उपयुक्त ठरतो. अभ्यंग स्नान, उत्सर्जन, वाफ घेणे, फेसपॅक लावणे, तेलांचा मसाज घेणे या उपचाराने सौंदर्यवृद्धी होऊन त्वचेला जीवन मिळते व त्वचा टवटवीत राहते. वार्धक्य लांबते, मानसिक तणाव दूर होते. तसेच त्वचेची आद्र्रता वाढते, त्वचा उजळते, चेहऱ्यावरचे सौंदर्य खुलते आणि आत्मविश्वास वाढतो. उत्साहदेखील वाढतो.कमीतकमी वर्षांतून एकदा तरी शरीराची आतून स्वच्छता होणे आवश्यक आहे. त्यासाठी आयुर्वेदात काही उपाय सांगितले आहेत. पंचकर्मातून ते साधता येते. वमन म्हणजे विशिष्ट पद्धतीने उल्टी केली जाते. त्यामुळे जुनी सर्दी, स्थूलता, त्वचेचे रोग आटोक्यात राहतात. विरेचन ही दुसरी क्रिया पित्तदोषासाठी अतिशय फायदेशीर आहे. बस्ती ही तिसरी पद्धत. आधुनिक उपचारपद्धतीत याला अॅनिमा म्हटले जाते. योग्य आहार-विहार व औषधोपचार यांची सवय लावून निरायम जीवन जगणे व शरीरात रोग उद्भवूच नयेत म्हणून प्रयत्न करणे आयुर्वेदामध्ये सांगितले आहे. रोगमुक्तीचे नियम आयुर्वेदामध्ये बघायला मिळतात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांचे शरीरावर वर्चस्व असते. पृथ्वी म्हणजे कठीपणा, दृढता दर्शवतो. अस्थी, स्नायू, केस, रक्तवाहिन्या यांच्यावर पृथ्वीतत्त्वाचा प्रभाव असतो. जल म्हणजे शरीराला थंडपणा देणारे स्वरूप. रक्त, लाळ, मूत्र, स्वेद, वीर्य, लसिका यांवर जलतत्त्वाचा प्रभाव असतो. तेज म्हणजे अग्नी, दाह. भूक लागणे, गती उत्पन्न करणे यावर या तत्त्वाचे वर्चस्व असते. आकाश म्हणजे पोकळी, आपल्या पोटातील पोकळीतील क्रिया, प्रक्रिया यांवर याचे वर्चस्व असते.या शिवाय पंचमहाभूतांमुळे शरीरात काही दोषही निर्माण होतात. वातदोष, पित्तदोष व कफदोष हे प्रमुख दोष आहेत. वात, पित्त व कफ या त्रिदोषांमुळे मानवाला अनेक व्याध्यींची उत्पत्ती होत असते. वातदोष असणाऱ्या व्यक्तीला चक्कर येणे, मानसिक तणाव, कुठल्याच कामात लक्ष न लागणे, हे पोट फुगणे, खूप बडबड करणे ही लक्षणे दिसून येतात.