कोलेस्ट्रॉल असलेले पदार्थ खाऊ नयेत. यामुळे हृदयविकाराचा धोका असतो. हे आहारशास्त्रातलं अर्धसत्य आहे. कोलेस्ट्रॉल शरीराला आवश्यक आहे. ते मिळालंच नाही, तर ‘ड’ जीवनसत्त्व शोषलंच जाणार नाही. सध्या अनेक तरुणांमध्येदेखील ‘व्हिटॅमीन डी’ची कमतरता आढळते. अनेक दिवस आपण चुकीच्या समजुतींना शरण जात कोलेस्ट्रॉलचा बागुलबुवा निर्माण केला आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (यूएसएफडीए) आपली कोलेस्ट्रॉलबाबतची चूक गेल्या वर्षी कबूल केली. कोलेस्ट्रॉलसंदर्भात आम्ही चुकीचे होतो. आहारातल्या कोलेस्ट्रॉलमुळे शरीराला त्रास होत नाही.. असं त्यांनी जाहीर केलंय.
आपल्याकडचे डॉक्टर इतकी र्वष काजू, खोबऱ्यासारख्या स्थानिक पदार्थामध्ये वाईट कोलेस्ट्रॉल आहे, असं कसं काय सांगतात याचं नवल वाटतं. याला कुठलाही आधार नाही. शाकाहारी पदार्थामध्ये वाईट कोलेस्ट्रॉल असूच शकत नाही. माझ्या मते, मराठी माणसाच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे हे न्यूनगंडातून कुरवाळलेले समज आहेत. नारळ, काजू महाराष्ट्रात पिकतात. पण ते चालत नाहीत. उलट बदाम आणि अक्रोड मात्र रोज खाल्ले पाहिजेत. ऑलिव्ह ऑइल चालतं, पण घाण्याचं शेंगदाणा तेल आणि साजूक तूप चालत नाही. हे फॅड आहे. कोलेस्ट्रॉलचा बागुलबुवा मुद्दाम निर्माण करण्यात आला आहे. मराठी लोकांनी तो अज्ञानातून आणि न्यूनगंडातून फॉलो केला आहे. खरं तर स्थानिक शेतकऱ्यांनी पिकवलेले पदार्थ हे त्या भागात राहणाऱ्यांसाठी पूरक असतात. निसर्गातच ही पूरकता आहे. पण स्थानिक पदार्थ सोडून परकीय पदार्थ चांगले ठरवताना आपण स्थानिक अर्थकारणही मारत असतो आणि ते पर्यावरणालाही सुसंगत नसतं.  आंबा, फणस खाऊ नका.. परदेशी फळं खा. ज्वारी- बाजरी नको ओट्स चालतील या समजुतीही त्यातल्याच. त्या शरीराला बाधक आहेत. स्थानिक अन्नाचा समावेश आहारात केल्यानं आपल्या शेतीचं अर्थकारणही सुधारणार आहे, पर्यावरणही आणि त्यातून आपल्याला शारीरिक-मानसिक स्वास्थ्य लाभणार आहे.
शब्दांकन : अरुंधती जोशी