तुम्हाला राजेशाही अनुभव घ्यायचा आहे, तर चिंता नको. आता तुम्ही १२ लाखात रेल्वेच्या प्रवासात हा राजेशाही थाट अनुभवू शकता. राजेशाही अनुभव देणारा महाराजा एक्सप्रेसचा हा प्रवास भारतातील सर्वात महागडा रेल्वे प्रवास ठरणार आहे.

आयआरसीटीसी म्हणजेच इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने या राजेशाही प्रवासाची प्रत्येकी २२,००० डॉलर इतकी किंमत निश्चित केली आहे.या राजेशाही पॅकेजमध्ये आठ दिवस संपूर्ण देशातील सांस्कृतिक आणि पर्यटन स्थळांना भेट देण्याची सोय केली आहे. डिलक्स खोलीसाठी चार दिवसांचे कमीत कमी ३,५८० डॉलर म्हणजेच १.९ लाख रुपये तर आठ दिवसांसाठी ३.९ लाख ते ३.५ इतकी किंमत मोजावी लागणार आहे, असे आयआरसीटीसीच्या अधिकारयांनी सांगितले.

येत्या सिझनमध्ये या रेल्वेचे पाच नवीन प्रवास हे चार मार्गांवरुन जाणार आहेत. त्यात प्रत्येकी चार दिवसांचे दोन प्रवास असतील जे स्वस्त असतील. रेल्वेचा आठ दिवसांचा प्रवास हा याच्या तुलनेत स्वस्त असेल,असेही त्यांनी सांगितले.

आयआरसीटीसीच्या अधिकारयांच्या मते खासकरून भारतीय लोक़ लहान प्रवासात प्रसिद्ध स्थळांना भेटी देण्याच्या पर्यायाला पसंती देतील. ह्या रेल्वे प्रवासात आता नवीन स्थळांनाही भेट दिली जाणार आहे. ज्यात युनेस्कोने सांस्कृतिक दर्जा दिलेली अजिंठा लेणी, डायनासॉरचे अवशेष सापडलेले गुजरात मधील बालसिनोर या स्थळांचा समावेश असणार आहे.

महाराजा एक्सप्रेसचे वैशिष्ट्य म्हणजे यात डिलक्स,जुनियर आणि राजेशाही अशा खोल्यांची वर्गवारी करण्यात आली आहे. सर्व खोल्या मनोवेधक देखाव्यासहित मोठ्या खिडक्यांनी सज्ज असतील. तसेच गाडीच्या प्रत्येक बोगीतील तापमान हवे तसे नियंत्रणात ठेवता येणार आहे. प्रवाशांच्या मनोरंजनासाठी अत्याधुनिक अशा वाय-फाय,टिव्ही, डीव्हीडी प्लेअर्सच्या सोयी सुविधा सज्ज असतील. गाडीत सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा बसविण्यात आले आहेत. तसेच धूम्रपान अलार्म, छोटं स्वयंपाकघर,सेवेसाठी एक सेवक या सोयीही पुरविण्यात येणार आहेत.