मी अमित, माझं शिक्षण बी कॉम प्लस झालंय. सध्या मी एका सी ए जवळ ज्युनियरशिप करतोय. मी आज जो आहे त्याचं श्रेय आर्थिकरित्या माझ्या आईवडीलांना देतो पण हे शिक्षण घेताना जे प्रोत्साहन आणि शैक्षणिक मदत मिळाली ती माझ्या प्रेयसीकडून. माझा खूप रागीट स्वभाव, पण तिनं खूप सहन केलंय. बीकॉमच्या फर्स्ट इयरपासून आम्ही लाईफ पार्टनर बनायचं ठरवलं पण काही दिवसांनी मला तिच्याबद्दल खूप अनएक्स्पेक्टेड ऐकायला मिळालं. ती मुलगी चांगली नाही वगैरे. पण तिच्या वागण्यातून मला तसं नाही वाटलं. हळूहळू माझा पझेसिव्हनेस वाढत गेला. मग राग, भांडण. कुणाशीही बोललो नसेन इतक्या खालच्या तऱ्हेनं बोलायला लागलो. आज चार वर्ष झाली, आमचं रिलेशन आहे पण प्रेम खूप कमी झालं आहे. एकीकडून तिनं माझ्यासाठी केलं ते अनमोल वाटतं पण दुसरीकडे तिचा बदललेला स्वभाव आणि बोलणारे लोक यामुळे माझ्या मनाची कोंडी झालीये. आता तिच्याशी लग्न करणं मला ठीक वाटत नाहीये. मी काय करू, प्लीज हेल्प मी.
-अमित

हाय अमित, तुझं मुद्देसूद आणि छान शब्दांत लिहिलेलं पत्र वाचून बरं वाटलं. पत्र लिहिताना जर तू इतका व्यवस्थित विचार करू शकतोस, तर तुझे अकाऊन्ट्स मधले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करणंही नीट जमत असेल तुला.
अमित, माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे म्हणतात, सोशल अ‍ॅनिमल.
आपल्याला नाही एकटं रहायला आवडत. कोणीतरी आपल्या जवळचं, समजून घेणारं, मदत करणारं असावं असं वाटतं आपल्याला. कैद्यांना एकांतवासाची शिक्षा देतात बघ, कारण उपाशी ठेवण्यापेक्षाही एकांतवास जास्त भयानक असतो. म्हणूनच आपण वेगवेगळी नाती तयार करतो. त्यानं जगणं सुसह्य़ होतं.
तरूणपणातल्या नात्यांवर रोमँटीक छाप असते. या वयात माणूस लाईफ पार्टनर शोधत असतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा कुठलाही पैलू आवडला तरी ‘प्रेमात पडलो’ असं वाटतं. एखाद्याचं दिसणं, कुणाचा आवाज, हास्य, बुद्धीमत्ता, स्वभाव, काहीही. खरंतर लग्न झाल्यावर या अशा क्वालिटीज क्वचितच कामाला येतात. तेव्हा गरज असते ती समजूतदारपणा, अ‍ॅडजस्टमेंट, मदत, आधार, अर्निग, इतकंच नव्हे तर स्वयंपाक करणे, मुले सांभाळणे अशा टोटली अनरोमँटीक गोष्टींची. अनेकदा प्रेमात पडलेल्यांचा लग्न झाल्यावर भ्रमनिरास होतो तो याचमुळे. एखादी मुलगी खूप सुंदर आहे दिसायला पण घरी तिचे कपडे, सामान अस्ताव्यस्त पसरलेले असतील, किंवा एखादा मुलगा खूप पॉप्युलर आहे पण त्याला नोकरी-व्यवसाय काही जमत नाही तर कसं व्हायचं? आपण इमॅजिन करू शकतो.
गर्लफ्रेंडकडून असणाऱ्या अपेक्षा आणि बोयकोकडून असणाऱ्या अपेक्षा यात खूप अंतर असतं. लग्नापूर्वी एखादीच्या सेक्सीनेसवर फिदा झालेली मुलं लग्नानंतर मात्र बरोबर याच गोष्टीला आक्षेप घेतात. तसं काही तुझं झालंय का? तिच्याकडे होणारी बायको म्हणून पहायला सुरुवात केल्यावर तिच्यातल्या आधी न खटकणाऱ्या काही गोष्टी तुला आता खटकायला लागल्या आहेत का?
तुझ्या सांगण्यावरून मला असं वाटतंय की या सर्व आरोपांची शहानिशा करून न घेताच तू आपलं मत बनवलं आहेस. ती बदलली आहे म्हणजे कोणत्या बाबतीत? कुणीतरी आपल्यावर सारखा संशय घेतंय, घालूनपाडून बोलतंय असं सारखंच व्हायला लागलं तर त्या व्यक्तीचा अ‍ॅटीटय़ूड कदाचित बदलत असेल. तिनं तुला केलेल्या मदतीबद्दल तू ऋणी आहेस हे तिच्यापर्यंत कितपत पोचतंय? की फक्त तुझा राग, तुझा संशय हेच पोचतंय?
तिच्याबद्दल वाटणारी ग्रॅटीटय़ूड जरा बाजूला ठेव आणि तुझ्या तिच्याकडून बायको म्हणून नक्की काय अपेक्षा आहेत हे ठरव. तिच्याही तुझ्याविषयी नवरा म्हणून काही अपेक्षा असतील याची जाण ठेव. फक्त लोकांच्या बोलण्यावर जाऊन मनात संशय ठेवून वागू नकोस. तिला न दुखवता तिच्याशी स्वत: बोलून तुझ्या मनाची खात्री करून घे. रिलेशनशिप्स खूप कष्टानं जोपासायला लागतात. संशय, संतापीपणा या गोष्टी कुठल्याही रिलेशनशिपला मारक असतात. त्यामुळे तुझा राग कंट्रोल करायला शीक. हवं असेल तर एखाद्या मॅरेज काऊन्सेलरची मदत घे. आणि मग फायनल डिसिजन घे. एकदम तोडून नको टाकूस.
Go as far as you can see, and when you get there, you will always be able to see further.- Zig Zigler

विचारा तर खरं…
तरुणपणात निसर्गनियमाप्रमाणे प्रेमात पडायला होतंच. अर्थात ओघानं प्रेमभंगही आलाच. नवीन नाती, नवीन अभ्यासक्रम, नवीन जॉब आणि त्यांमधल्या गुंतागुंती. शरीराविषयी शंका, निर्णयांविषयी शंका असं खूप काही मनात सुरू असतं. खरं तर शंका खूप जेन्युईन असते पण ऐकणारा काय म्हणेल, हसेल की काय असं वाटतं. कुणाला विचारावं हेही कळत नाही. तुम्हाला वाटतंय असं काही? मग हा कॉलम आहे खास तुमच्यासाठी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांना वाट देण्यासाठी. इथे तुम्हाला वाटणाऱ्या शंकेला कुणी नाकं मुरडणार नाहीये की फालतू म्हणून त्या निकालात काढणार नाहीये. बिनधास्तपणे त्या शेअर करा. viva@expressindia.com या आयडीवर. सब्जेक्टलाईनमध्ये ओपन अप असं लिहायला विसरू नका.