या न्यू इयर पार्टीला आम्ही सगळे मित्रमैत्रिणी गेलो होतो. जाताना लक्षात आलं की मी आणि माझी एक मैत्रीण, अशा आम्ही दोघीच मागे राहिलो, बाकी सगळ्या त्यांच्या- त्यांच्या बॉयफ्रेंडबरोबर गाडीवर बसून गेल्या. शेवटी एका मुलानं कार आणली होती त्यात आम्हाला अ‍ॅडजस्ट केलं. इट वॉज सो एम्बॅरॅसिंग आणि हीच स्टोरी पार्टीभर रिपीट झाली. अशा वेळी मला बॉयफ्रेंड नाही याचं वाईट वाटतं. मुलांना मी गर्लफ्रेंड मटिरिअल वाटत नसेन का? पण खरं सांगायचं तर मला आत्ता बॉयफ्रेंडची गरजही वाटत नाहीये. बॉयफ्रेंड असायलाच हवा का सगळ्यांना? त्यासाठी मी काय करायला हवं?
-इरा

प्रिय इरा,
हॅपी न्यू इयर! या नव्या वर्षांसारखाच तुझा प्रश्नही एकदम रिफ्रेशिंग आहे. बऱ्याच मुली बॉयफ्रेंड नाही म्हणून चक्क डिप्रेशनमध्ये जातात! किंवा तो मिळविणे हा एकच ध्यास घेतात. म्हणूनच तुझी आत्ता गरज नाही ही अ‍ॅटिटय़ूड रिफ्रेशिंग आहे.
मित्र-मैत्रिणी असायला हवेतच. त्यांच्यामुळे सगळेच प्रसंग नाही म्हटलं तरी सोपे होत जातात. प्रश्न उरतो तो खास मित्र किंवा मैत्रीण असण्याचा म्हणजेच क्ष/ॉ असण्याचा. अशी खास मैत्री का हवीशी वाटते? तुझ्या वयात याला अनेक कारणं असतात. एकतर अनिवार शारीरिक ओढ. टीनएजमध्ये शरीरात वाढलेली हॉर्मोन्स मुलींना मुलांकडे आणि मुलांना मुलींकडे नॅचरली आकर्षित करतात. ‘तू आज छान दिसतेस’ असं मित्रानं सांगणं वेगळं आणि मैत्रिणीनं सांगणं वेगळं. मित्राची कमेंट अर्थातच अधिक थ्रिलिंग वाटते. हॅरी पॉटरच्या जादुई नगरीतलं ‘लव्ह पोशन’ घेण्यासारखा असतो हा हार्मोन्सचा प्रभाव. नक्की काय आणि का वाटतंय आपल्याला हे कळायच्या आधीच गुंतलं जातं. याचमुळे गोष्टी फार पुढे जाण्याचा, शारीरिक संबंधांचा धोका अगदी जवळच घुटमळत असतो.
अनेकदा पीअर प्रेशर म्हणजे आसपासच्या मित्रमंडळींचं प्रेशर मीडियामुळे बॉयफ्रेंड मस्ट वाटायला लागतो. आई-बाबांशी सारख्या लढाया, मैत्रिणी नसणं, नैराश्य, इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स अर्थात नकारात्मक स्वप्रतिमा, अशा काही गोष्टी मन नाजूक, हळवं करतात. अशा वेळी कुणी सिम्पथी दाखवली तर मन लगेच तिकडे ओढ घेते. आपल्याला शारीरिक आकर्षण वाटतंय की, फक्त आधाराची गरज वाटतेय की हे खरंच प्रेम आहे हे स्पष्ट होणं या वेळच्या इमोशनल गोंधळात अवघड असतं. या खास मित्रांकडे मन मोकळं करता येतं, त्याचा आधार वाटतो एवढं खरं. असं वाटायला लागतं की, मला फक्त हाच समजून घेऊ शकतो.
जिथे रिलेशनशिप, तिथे ब्रेकअप आला! तो होतो तेव्हा हे सगळे विचार उलटेपालटे होतात. शिवाय हे सगळं प्रकरण फार खर्चीक असतं, नाही का? कुणीतरी म्हटलंय की, मुलांना खूप पैसे खर्च करायला लागतात आणि मुलींना खूप वेळ! जोक्स अपार्ट, पण नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा लाइफ पार्टनरसारखा महत्त्वाचा निर्णय नीट पारखून, थांबून घेतलेला बरा.
मग मुलांशी मैत्री करायचीच नाही का? असा एकदम टोकाचा निर्णय घेण्यापेक्षा मिक्स ग्रुपमध्ये राहणं, केव्हाही चांगलं. तू आता ज्युनिअर कॉलेजमध्ये आहेस, तुला खूप दूरचा विचार करण्याची किंवा कमिट करण्याची घाई नाही. बॉयफ्रेंड मिळाला किंवा नाही मिळाला यावरून स्वत:ला जज करण्यानं आपण आपल्यालाच कारण नसताना कमीपणा देतो, स्वत:मध्ये काहीतरी दोष आहे असं समजतो. काहीजण तुला सल्ला देत असतील की तू जास्त आकर्षक दिसण्याचा प्रयत्न कर किंवा मुलांना आवडेल असं वाग, पण असं करून मिळालेला मित्र तुला आवडेल का? तू जशी आहेस तसं तुझं असणं अ‍ॅक्सेप्ट करणारा तो असायला हवा असं नाही तुला वाटत? एकूण काय, बॉयफ्रेंड असलाच तर आपल्या सीमारेषा ठरवून ठेवायच्या आणि तो नसेल तरी फारसा फरक पडत नाही, असं मला वाटतं. तुला काय वाटतं?
The perfect boyfriend doesn’t drink, doesn’t smoke, doesn’t cheat… and doesn’t exist!

विचारा तर खरं…
तरुणपणात निसर्गनियमाप्रमाणे प्रेमात पडायला होतंच. अर्थात ओघानं प्रेमभंगही आलाच. नवीन नाती, नवीन अभ्यासक्रम, नवीन जॉब आणि त्यांमधल्या गुंतागुंती. शरीराविषयी शंका, निर्णयांविषयी शंका असं खूप काही मनात सुरू असतं. खरं तर शंका खूप जेन्युईन असते पण ऐकणारा काय म्हणेल, हसेल की काय असं वाटतं. कुणाला विचारावं हेही कळत नाही. तुम्हाला वाटतंय असं काही? मग हा कॉलम आहे खास तुमच्यासाठी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांना वाट देण्यासाठी. इथे तुम्हाला वाटणाऱ्या शंकेला कुणी नाकं मुरडणार नाहीये की फालतू म्हणून त्या निकालात काढणार नाहीये. बिनधास्तपणे त्या शेअर करा. viva@expressindia.com या आयडीवर. सब्जेक्टलाईनमध्ये ओपन अप असं लिहायला विसरू नका.