फूड.मौला : उमंग काळे खाऊनपिऊन सुखी हे धोरण कायम ठेवत सध्या मी गरवारे इथून ‘ट्रॅव्हल आणि टूरिझम’ विषयांत मास्टर्स करतोय. खायची आवड आणि त्याचबरोबरीने पर्यटनाची हौस या दोन्ही गोष्टी मी अगदी मागची चार वर्षे जपतो आहे. तरुणांचे आवडीचे अॅप असलेल्या इंस्टाग्रामवर मी स्वत:चे फूडब्लॉगदेखील लिहितो. अशाच फूडब्लॉगसाठी नवनवीन पदार्थ शोधताना पाहिलेले एक ठिकाण म्हणजे ओडिशा येथील पुरी. आल्हाददायक अशा बंगालच्या उपसागरावर वसलेले पुरी हे शहर. ओडिशातील पुरी म्हणजे सतत लोकांची वर्दळ असलेले अरुंद रस्ते, भडक रंगांनी रंगवलेल्या इमारती आणि जुन्या पद्धतीच्या वसाहती असणाऱ्या इमारतींनी स्वत:चे वेगळेच आकर्षण प्राप्त झालेले शहर आहे. पुरी हिंदू धर्मातील चार धामांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. भारतातील मंदिर परंपरेचा एक उत्तम नमुना असलेले जगन्नाथाचे मंदिरदेखील इथेच आहे. पुरी हे ठिकाण धार्मिकतेच्या दृष्टीने तर प्रसिद्ध आहेच, पण त्याचबरोबरीने तिथली खाद्यसंस्कृतीसुद्धा आस्वाद घेण्याजोगी आहे. समुद्र किनाऱ्याला लागून हे शहर असल्यामुळे तिथले वातावरणदेखील कायम प्रसन्न आणि थंडगार असते. त्यामुळे किनाऱ्याच्या आजुबाजूला असलेल्या रेस्टॉरंटस्मध्ये तोंडाला पाणी सुटेल असे सुंदर जेवण मिळते. पुरी हे असे ठिकाण आहे जिथे तुम्हाला व्हेज, नॉनव्हेज तसेच मोठय़ा प्रमाणात सी फूड खायला मिळते. आणि एवढेच नाही तर लोकल फूडसुद्धा आपण तितक्याच पोटभरीने खाऊ शकतो. खाऊनपिऊन सुखी हे धोरण कायम ठेवत सध्या मी गरवारे इथून ‘ट्रॅव्हल आणि टूरिझम’ विषयांत मास्टर्स करतोय. खायची आवड आणि त्याचबरोबरीने पर्यटनाची हौस या दोन्ही गोष्टी मी अगदी मागची चार वर्षे जपतो आहे. तरुणांचे आवडीचे अॅप असलेल्या इंस्टाग्रामवर मी स्वत:चे फूडब्लॉगदेखील लिहितो. अशाच फूडब्लॉगसाठी नवनवीन पदार्थ शोधताना पाहिलेले एक ठिकाण म्हणजे ओडिशा येथील पुरी. वर्ल्ड हेरीटेज साईट असलेले ‘जगन्नाथ मंदिर’ पहिले बघूया म्हणून तिथे जाऊन पहिल्यांदा मी भगवान विष्णू यांचा अवतार असलेल्या जगन्नाथाचे मनोभावे दर्शन घेतले. त्या मंदिराचे वेगळेपण म्हणजे सर्वोत्तम शिल्पकलेचा आविष्कार असलेली तिथली सुदर्शन चक्राची रचना. हे वाखाणण्याजोगे काम मी अगदी बारकाईने पाहिले. मग मंदिरातच मी ‘खिचडी’ हा ओडिशाचा पदार्थ खाल्ला. मंदिरातील देवाला चढवला जाणारा भोग यामध्ये हा खिचडीचा समावेश आवर्जून केलेला असतो. ही खिचडी मिक्स भात आणि डाळी एकत्र करून तुपात शिजवून बनवली जाते. आणि आणखीन चव वाढावी म्हणून त्यात खोबरं, साखर आणि दालचिनी घालतात. हा पदार्थ मुख्यत्वेकरून पापड आणि दही याच्याबरोबर खातात. पुरीमध्ये पुढे पुढे गेलो की एक व्हीआयपी रोड आहे, नावातच व्हीआयपी असलेल्या या रोडवर ‘दालमा’ हा पदार्थ मिळतो. लोकल फूड म्हणून ओळखला जाणारा हा पदार्थ इतका चविष्ट असतो की आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनीसुद्धा त्यांच्या जेवणात याचा समावेश केला होता. दालमा डाळी आणि भाज्या यांपासून बनवतात. या पदार्थावरूनच एका रेस्टॉरंटला ‘दालमा’ हे नाव मिळालं आहे, तिथे हा पदार्थ हमखास खाऊन बघावा. याच रेस्टॉरंटमध्ये अजून एक लोकल पदार्थ मी खाल्ला त्याचे नाव ‘संतुल’ असे होते. ही व्हेज ‘ओडी करी’ आहे. ही करी तिथे भात किंवा पोळी, ब्रेडबरोबर खातात. सगळ्या भाज्या एकत्र करून कमी तेलात ओडी करी बनवली जाते. हा पदार्थ आपल्याला फ्राइड आणि शिजवून अशा दोन्ही पद्धतीने बनवून आणून देतात. पुरीमध्ये जगन्नाथाच्या मंदिरातच ‘आबाधा थाली’ आपल्याला खायला मिळते. महाप्रसाद असे त्याला म्हणतात. ही थाळी ७० ते १२० रुपयांना मिळते, पण यात बऱ्यापैकी लोकल फू डचा समावेश असतो. पुरीला जाणाऱ्या प्रत्येकाने हा पदार्थ खाऊन बघावाच, त्याच्याशिवाय तुमची पुरीची भ्रमंती पूर्ण होऊ शकत नाही. नॉनव्हेज म्हटलं की पहिले डोळ्यासमोर येतात ते मासे. वाईल्डग्रास रेस्टॉरंटमध्ये ‘माचा चेन्नछेडा’ असा टिपिकल ओडियन पदार्थ मी मागवला. त्याला एक वेगळाच सुगंध आहे आणि उत्तम चव देखील जी जगभरात प्रसिद्ध आहे. हा पदार्थ मासे, भाज्या, चणाडाळ आणि केळी एकत्र करून बनवतात. ओडिशातील लोक हा पदार्थ भाताबरोबरच खातात. ‘चांगुडी मलाई’ हा नॉनव्हेज पदार्थ कोलंबीपासून तयार के ला जातो आणि हा पदार्थ शिजवताना त्यात प्रामुख्याने दूध घालतात. ज्यामुळे एक क्रीमी लेयर त्यावर असते आणि वेगळाच स्वाद त्याला येतो. हा पदार्थ बासमती भाताबरोबर जास्त खाल्ला जातो. जेवढे तिखट पदार्थ तेवढेच खरंतर त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात तिथे गोड पदार्थ चाखायला मिळतात. त्यातला पहिला गोड पदार्थ म्हणजे पर्यटकांनी आवर्जून खावा असा ‘रसगुल्ला’. तिथल्या पूर्वापार चालत आलेल्या महाभोग या प्रसादाच्या संकल्पनेत तो असतोच. हा मुळात बंगाली गोड पदार्थ असला तरी पुरीमध्ये तो अगदी तोंडात टाकल्या क्षणीच विरघळेल असा मला खायला मिळाला. पुढचा गोड पदार्थ जो मला आवडतोच आणि तिथे कोणालाही आवडेल असा ‘मालपोआ’. रोज सकाळी भगवान जगन्नाथाला याचा प्रसाद चढवला जातो. यात मुख्यत्वे केळी, वेलची, दूध, खोबरं यांचे मिश्रण असते. बघूनच तोंडाला पाणी सुटेल असा हा पदार्थ खाऊन बघण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. ‘उखुडा’ हा गोड पदार्थ मी जगन्नाथाच्या मंदिराजवळ असलेल्या मिठाईच्या दुकानात खाऊन पाहिला. याचाही भोग देवाला रोज चढवला जातो असे मला त्या दुकानदाराने सांगितले. तांदूळ फुगवून त्याला गोड चव यावी म्हणून गूळ वापरतात. त्याबरोबर खोबऱ्याचे तुकडेसुद्धा त्यात वापरतात. ‘छेना पोडा’ हा दिसायला केकसारखा दिसणारा पदार्थ तिथे सणासुदीला बनवतात. त्याची चव ही पूर्णपणे घरगुती चीज आणि साखरेचा पाक एकत्रित करून जशी लागेल तशीच असते. असा हा वेगळाच पदार्थ एरवीसुद्धा तुम्हाला मंदिराच्या आजूबाजूला असणाऱ्या मिठाईच्या दुकानांमध्ये मिळतो. ‘पिठा’ हा गोड पदार्थ पूर्णपणे भातापासून बनवला जातो. असं म्हणतात की पूर्वेकडे पिठा जर कुठे चविष्ट आणि अप्रतिम मिळत असेल तर तो पुरीलाच. इथे मी जवळपास पाच ते सहा पिठाचे प्रकार खाल्ले. अरीसा पिठा, इंदूरी पिठा, चाकूली पिठा, काकारा पिठा, मांडा पिठा आणि पोडो पिठा. एवढे प्रकार खाऊ न पण कंटाळा येणार नाही असा हा पदार्थ आहे. आणि अजून एक शेवटचा गोड पदार्थ मी जगन्नाथ मंदिरात खाल्ला तो म्हणजे ‘रासबाली’. घरगुती चीझपासून बनवलेला हा पदार्थ अगदी लाल होईपर्यंत डीप फ्राय करतात. दुधापासून बनलेला हा पदार्थ ५६ भोगांमध्ये गणला जातो. एवढी मोठी खाद्यसंस्कृती असलेले जगन्नाथ पुरी हे ठिकाण धार्मिकदृष्टय़ा तर बघावेच, पण त्याचबरोबरीने जो माणूस खवय्या आहे त्याने तर अगदी आवर्जून पुरीला भेट द्यावी. सगळ्या प्रकारचे पदार्थ इथे मिळत असल्यामुळे पर्यटकांचे पोट तर भरेलच, पण मनही तृप्तीची ढेकर देईल, अशी खात्री आहे. -शब्दांकन : विपाली पदे viva@expressindia.com