जवळपास सर्वच प्रमुख पक्षांनी प्रचारादरम्यान अगदी तरुण कार्यकर्त्यांची फौज कामाला लावली होती. या सामान्य कार्यकर्त्यांना निकालाच्या दिवशी काय वाटतंय? निवडणुकीदरम्यान काय घडलं, काय बिघडलं? एक्झिट पोल ते प्रत्यक्ष निकाल यादरम्यान कार्यकर्ता म्हणून पोटात किती वेळा गोळा येतोय, की रिलॅक्स वाटतंय? तरुण पिढीतल्या, शेवटच्या फळीतल्या कार्यकर्त्यांना बोलतं केलंय भक्ती तांबे आणि सम्जुक्ता मोकाशी यांनी..

‘वन बुथ, टेल युथ’ अजेंडा
एन.डी.ए.चं घवघवीत यश मला अगदीच अपेक्षित आहे. ही सगळी नरेंद्र मोदींची किमया आणि त्यांचा प्रभाव. मी आणि माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या कष्टाचं चीज होतंय. ‘वन बूथ, टेल युथ’ असा आम्हा कार्यकर्त्यांचा अजेंडा होता. तसंच घराणेशाही मोडता येऊ शकते. काम केलं तर तुम्हाला संधी मिळेल असं वातावरण बीजेपीत आहे. त्यामुळे काम करायचा उत्साह होता. अतिरेकी आणि भडक  प्रचार या गोष्टी जरा जास्तच झाल्या हे खरं, परंतु बीजेपीच्या विकासाच्या मॉडेलला लोकांनी पाठिंबा दिला. आता अपेक्षा म्हणजे नेतृत्वाने मूलभूत प्रश्न सोडवले पाहिजेत आणि मोदी हे खरं करून दाखवतील, असा विश्वास मला वाटतो.    
चतन्य बारसवडे, भाजप

मराठी आवाज बुलंद
लोकसभेसाठी प्रचार करताना दिल्लीत मराठी उमेदवार पाठवण्याचंच ध्येय होतं. दिल्लीमध्ये मराठी शिलेदार महाराष्ट्राचा आवाज नक्कीच बुलंद करतील यात शंका नाही. आघाडीला १० वर्षे दिली पण त्यांनी सगळ्याच बाबतीत अपेक्षाभंग केला आहे. आता मात्र सगळे प्रश्न काही प्रमाणात सुटतील याची खात्री आहे आणि ते प्रश्न सुटावेत यासाठी आमचे नेते प्रयत्न करतील, असा विश्वास एक सामान्य कार्यकर्ता म्हणून अभिमानाने वाटतो.
मुकुंद पाबळे, शिवसेना</strong>

योजना पोचवण्यात अपयशी
देशातील काँग्रेसविरोधी वातावरण सतत जाणवत होतं. त्याला प्रत्युत्तर देताना आम्ही कमी पडलो. मतदानोत्तर चाचणीमध्ये त्यांना अपेक्षित जास्त जागा दाखविल्या असल्या, तरी आमचा इतका दारुण पराभव होणं शक्य नाही, असं अजूनही वाटतंय. लोकांना उपयुक्त असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आम्ही कार्यकर्ते कमी पडलो याची खंत आहे. देशातील वातावरण निश्चितच निराशाजनक आहे.
महेश कांबळे, काँग्रेस</p>

आशावाद कायम
‘आप’साठी अजूनही आम्हाला जागांचा एक विशिष्ट आकडाच अपेक्षित आहे. ‘रालोआ’चं यश अपेक्षित होतं, परंतु एक्झिट पोल दाखवताहेत इतक्या जागा त्यांना मिळतील असं वाटलं नव्हतं. आपच्या अपयशाची कारणं माझ्या मते, कॅम्पेिनगला मिळालेला कमी वेळ किंवा काही वेळा झालेले फंिडगचे प्रॉब्लेम अशी असू शकतील. ग्राऊंड लेव्हलला काम करताना आम्हाला तरी ती जाणवली. परंतु पक्षाला मोठं यश मिळालं नाही याचं मला वाईट वाटत नाही. मला स्वत:ला पक्षासाठी काम करून वैयक्तिक समाधान मिळालं. हा माझा.. मला हवा असणारा पक्ष आहे, ही भावना माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या मनात आहे. भविष्यात ‘आप’च्या यशाबद्दल मी खूप आशावादी आहे.
तेजश्री कांबळे, आप

विधानसभा हेच ध्येय
सामान्य कार्यकर्ता म्हणून आता खरं दडपण आलं आहे.  पण आता लक्ष्य विधानसभा हेच ध्येय मनाशी योजले आहे. मनसे आणि शिवसेना यांच्यातील भांडणाचा आम्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर परिणाम झालेला नाही. आमचे नेते राज ठाकरे यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि ते विधानसभा निवडणुकीसाठी योग्य पावले उचलतील यात शंका नाही.
ओमकार चव्हाण मनसे

मार्केटिंगमध्ये कमी पडलो
एक्झिट पोल चे अंदाज खरे ठरले तर हा आमचा साफ पराभव असेल. एक कार्यकर्ता म्हणून मला असं वाटत की, आमच्याकडे भरपूर मुद्दे असूनही आम्ही कॅम्पेनिंग-मार्केटिंग ला कमी पडलो. राष्ट्रवादी आणि काँग्रेस ह्या युतीवर आणि आमच्या पक्षावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. विधानसभेला परिपूर्ण आणि जोरदार प्रयत्न करू. राष्ट्रवादीच्या उज्ज्वल भविष्याबद्दल मला खात्री आहे.
– कमलेश गावडे, राष्ट्रवादी