नव्या पिढीचा गायक, संगीतकार, हरहुन्नरी युवा कलाकार सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट! कल भी तो कुछ ऐसा ही हुआ था नींद में थी तुमने जब छुआ था गिरते गिरते बाहों में बची मैं सपने पे पाँव पडम् गया था सपनों में बहने दो प्यासी हूँ मैं, प्यासी रहने दो रहने दो ना. . पंचम-गुलजार जोडीबद्दल काय बोलायचे? हे दोघे एकत्र आल्यावर संगीताची पातळीच बदलून जाते. आपण जमिनीवरून दोन फुटांवर तरंगत आहोत असा भास होतो. २७ जूनच्या आरडी बर्मन अर्थात पंचमदांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांची प्ले लिस्ट तयार केली होती. पण पंचम- गुलजार जोडीसाठी सेपरेट प्ले लिस्ट हवीच. रहावतच नाही त्यांची गाणी ऐकल्याशिवाय.. जसे हे गाणे - ‘आज कल पांव जमी पर नहीं पडते मेरे..’ हे गाणे सलग तीन वेळा ऐकावेच लागते. एकदा लता दीदी, एकदा पंचमदा आणि एकदा गुलजारसाहेबांसाठी. नींद सी रहती है, हलकासा नशा रहता है, रात दिन आँखों में एक चेहरा बसा रहता है परलगी आँखों को देखा हैं कभी उडम्ते हुए याला काय म्हणावे? किती मस्त सुख आहे हे.. आणि ती ‘रे..हे..ता..है’ ची जागा..अहाहा! ‘घर’मधली सगळीच गाणी मस्त आहेत. ‘आप की आँखों में कुछ’ आणि मला खूपच आवडणारी दोन गाणी म्हणजे ‘फिर वोही रात है’ ज्यात किशोरदांचा आवाज फारच मधुर लागला आहे. ‘तेरे बिना जिया जाए ना हे’ मागल्या आठवडय़ात उल्लेख केलेल्या राहुलदांच्या कडव्यात विषयांतर करण्याच्या खोडीचे सर्वोत्तम उदाहरण. एक तर शब्द गुलजारसाहेबांचे, पुन्हा दिग्दर्शकही तेच. म्हणजे वेगवेगळ्या प्रयोगांसाठी खुली प्रयोगशाळाच. या प्रयोगशाळेनेच आपल्याला ‘मेरा कुछ सामान’सारख्या मुक्तछंदातील कवितेचे सुंदर गाण्यात रूपांतर होताना दाखवले. ‘प्यासी रेहने दो’ असे म्हणणारी प्रेमिका दाखवली, त्याच गाण्यात आशाबाईंच्या ओळींवर आशाबाईंचीच पुढची ओळ (ओव्हरलॅप) असा अभिनव प्रयोग झाला. काळजात घर करणारी आशाताईंची आर्त आणि तितकीच चंचल गायकी दिली. जे ‘इजाझत’चे, तेच ‘किनारा’चे. ‘एक ही ख्वाब कई बार देखा है मैने’ या वाक्याचे गाणेच बनवून टाकले राहुलदांनी! त्यातून भूपिंदरसाहेबांचा वेगळ्याच ठेवणीचा आवाज..वाहवा! भूपिंदरसाहेबांचेच लता दीदींबरोबरचे याच चित्रपटातले ‘नाम गुम जाएगा’ तर कहरच! ‘आँधी’ हेसुद्धा याच प्रयोगशाळेत निर्माण झालेले रसायन. ‘इस मोड से जाते है..’, ‘तुम आगये हो नूर आगया है’, ‘तेरे बिना जिंदगी से कोई..तुम जो कह दो तो आज की रात चांद डूबेगा नहीं, रात को रोक लो..’ किशोर, लता आणि सतार.. केवळ कमाल. ‘मासूम’ हासुद्धा याच प्रयोगशाळेतला आल्बम. ‘हुझुर इस कदर भी ना’, ‘तुझसे नाराज नही’, ‘दो नैना..’ ही गाणी म्हणूनच कधीही ऐकावी अशी. ‘परिचय’मधल्या ‘मुसाफिर हूं यारों’ गाण्यात असलेल्या ‘बस्स’ या शब्दावरून पंचम-गुलजार यांच्यात वाद झाला होता म्हणे. हा असा मधूनच आलेला शब्द गाण्यात बसत नाही असे पंचमदांचे म्हणणे होते. पण नंतर हा शब्द त्या गाण्यात कसा चपखल बसला आहे ते आपल्यासमोर आहेच. परत एकदा लता -भूपेंदर जोडीचे ‘बिती ना बितायी रैना..’ आणि अतरंगी प्रयोगांची परंपरा जपणारे ‘सा रे के सा रे..’ हे सरगमचा वापर करून लिहिलेले गीत आणि त्याच सरगमचा चालीत झालेला मस्त वापर. ‘खुशबू’मधले ‘ओ माझी रे’, आणि ‘बेचारा दिल क्या करे’ ही गाणीसुद्धा याच फॅक्टरीमधली. गुलजार -पंचम जोडीची मला खूप आवडणारी अजून काही गाणी म्हणजे ‘रोज रोज आँखों तले’ (जीवा) , ‘सीली हवा छू गयी’ (लिबास), ‘आनेवाला पल’ (गोलमाल), ‘कोई दिया जले कहीं’ (आल्बम - दिल पडोसी है)..गेल्या २७ जूनला गुलजारसाहेबांनीसुद्धा हीच गाणी ऐकत दिवस घालवला असेल, नाही? हे ऐकाच.. : गुलजार रिमेम्बर्स आर बर्मन काय काळ असेल ना तो.. गुलजारसाहेब आणि पंचमदा एकत्र कसला कल्ला करत असतील ना? याच कल्लय़ाच्या आठवणी गुलजारसाहेब आपल्या कवितांमधून मांडताना ऐकायचे असेल तर ‘गुलजार रिमेंबर्स आर बर्मन’ हा अल्बम ऐकण्यावाचून गत्यंतर नाही. त्यात अनेक गाण्यांच्या सुरुवातीला खुद्द राहुलदांच्या आवाजातील गाणी बनवतानाची रेकॉर्डिग्स आहेत. त्यांनी गुणगुणलेल्या धून आहेत. सोनेपे सुहागाच! आरडी बर्मन गेल्यावर लगेचच निघालेल्या या अल्बममध्ये त्यांच्या आठवणींनी बेचैन झालेल्या गुलजारसाहेबांची तळमळ दाखवणाऱ्या कविता ऐकून डोळ्यांत पाणी आले नाही तरच नवल. जसराज जोशी - viva.loksatta@gmail.com