तेजश्री गायकवाड

नानाविध संकल्पना, विषय आणि ते घेऊन मनोरंजन करणारे यूटय़मूबर्स, सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर्स , त्यांचे सबस्क्रायबर्स, लाखो—कोटय़वधी व्ह्य़मूजनी बदलणारी ऑनलाइन व्यवसायाची आर्थिक गणितं यामुळे सध्या या विश्वात वेगळीच काटाकाटीची समीकरणं सुरू आहेत. आपल्या चॅनेलला प्रसिद्धी मिळावी म्हणून दुसऱ्याशी एक तर वाद उकरून काढला जातो किंवा त्यांची जाणीवपूर्वक बदनामी केली जाते. मात्र रोजच्या रोज रंगणाऱ्या या वादांमध्ये खरं तर भांडण असं नसतंच, असतं ते फक्त फायद्याचं गणित आणि तोटय़ाचं गणित.

सध्या काही दिवसांपासून भारतात रंगलेल्या टिक टॉक वर्सेस यूटय़ूब या वादामागेही नीट बघितलं तर अनेकांचा फायदा झाला आहे आणि आपण प्रेक्षक किंवा फॉलोअर्स म्हणून आपला काही टक्के  तरी तोटा झाला आहे. एखादी गोष्ट घडली आणि ती जरा जरी चुकीची वाटली की यूटय़ूबवर, सोशल मीडियावर  त्यावर ट्रोल करणारे, रोस्ट करणारे अनेक व्हिडीओ, पोस्ट येतातच. आणि या व्हिडीओच्या खाली कमेंट्समध्ये त्याला समर्थन देणारे आणि न देणारे यांच्यातही वाद रंगतो. हा वाद अनेकदा टोकाला जातो. कमेंटसमधल्या तू तू मै मैची जागा सर्रास शिव्या, वाईट विचारांनी घेतली जाते. त्यामुळे वाद कोणाचा आणि भांडतंय कोण? अशी परिस्थितीच अनेकदा अनुभवायला मिळते. आपण प्रेक्षक म्हणून इतके इन्फ्लूएन्स होतो की, आपण ज्यांचे समर्थन करत नाही त्यांच्या सोशल मीडियावर जाऊन त्यांना आक्षेपार्ह मेसेज क रू लागतो, अनेकदा अशा वादांत धमक्याही दिल्या जातात. या सगळ्यातून आपण सायबर क्राईमचे शिकार होऊ शकतो याचेही भान तरुणाईला नसते. आपण ज्यांचे समर्थन करतो, त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना आपण टीकात्मक मेसेज के ले तर त्यांना छान वाटेल, असे गैरसमज अनेकदा तरुणाईच्या मनात असतात. यूटय़ूबर कॅरीमिनाटी आणि टिक टॉकर आमिर सिद्दिकीचा वाद अशाप्रकारे मोठय़ा प्रमाणात झाला होता. त्या वेळीही समर्थक आणि विरोधकांमध्ये खऱ्या अर्थाने जुंपली होती.

टिक टॉक वर्सेस यूटय़ूब या वादामागेही नीट बघितलं तर अनेकांचा फायदा झाला आहे आणि आपण प्रेक्षक किंवा फॉलोअर्स म्हणून आपला काही टक्के  तरी तोटा झाला आहे. असंच अनेक सोशल वादामुळे होताना दिसतंय. आजचा तरुण इन्फ्ल्यूएन्सर वाहत्या गंगेत हात धुताना सहज दिसतो. जो इंटरनेटवरती हॉट मुद्दा असेल त्यावर अगदी दोन मिनिटांचा जरी व्हिडीओ किंवा एक साधंसं मिम जरी शेअर केला तरी त्यांना फॉलोअर्स, व्ह्य़ुजरूपी फायदा होतो.  एकमेकांवर चिखलफेक करत प्रसिद्धी वाढवण्याचा हा प्रकार इंटरनेटवर अनेकदा होताना दिसतो.  आपल्या समकालीन यूटय़मूबर्सने कशी सबस्क्रायबर्सची दिशाभूल केली आहे, इथपासून ते पेड प्रमोशन करताना चुकीच्या गोष्टी सांगण्यापर्यंत अनेक प्रकार केले जातात आणि आपण प्रेक्षक म्हणून अगदी सहज या गोष्टींना बळी पडून आपला तोटा करून घेतो. अनेक तरुण बाकीच्या गोष्टी सोडून या अशा गोष्टींवर वेळ घालवत आहेत. अशा अनेक भांडणामध्ये तरुणाई स्वत:चं भांडण असल्यासारखा भाग घेते आणि  वेळ घालवते. ज्यातून त्यांना प्रत्यक्षात  काहीही मिळत नाही. उलट याचा फायदा अनेक छोटय़ा, रायझिंग यूटय़ूब किंवा अन्य क्रिएटर्सना होत असतो.

हे इंटरनेटवरचे काही क्रिएटर्स चांगल्या कण्टेण्टच्या नावाखाली निव्वळ टेक्नॉलॉजीचा गैरवापर करताना दिसत आहेत. अनेकदा खूप महत्त्वाचे, नाजूक विषयसुद्धा वाटेल त्या पद्धतीने सोशल मीडियावर ते मांडत असतात. या माध्यमातून सध्या खोटेपणा वाढतो आहे. आपल्यावर झालेला आरोप खोडण्यासाठी त्यांच्याकडून खोटा आशय टाकला जाण्याची किंवा चुकीच्या गोष्टींना समर्थन देण्याचा प्रकार सहज होताना दिसत आहेत. यात कोणी माघारही घेत नाही. कारण या वादामुळेच तर त्यांची प्रेक्षकसंख्या वाढत असते. तरुण पिढी हे वाद आणि त्यातून वाढणाऱ्या लाइक्सकडे  जास्त आकर्षित होताना दिसतेय. अशा वादामध्ये प्रेक्षक म्हणून नाही पडायचं म्हटलं तरी आपण सोशली मागे राहू असा विचार अनेकांच्या मनात येतो. या मागे राहण्याच्या प्रेशरमुळेही अनेक जण काहीही रस नसताना अशा वादांना फॉलो करतात. यात अनेकदा आपल्या चाहत्यांसाठी म्हणून काही क्रिएटर्स अशा

कु रघोडय़ा करताना दिसतात. व्हिडीओ, मिम किंवा साधी रिअ‍ॅक्शन देण्यासाठी अमुक अमुक क्रिएटरला इंटरेस्ट नसतानाही प्रेशरमध्ये येऊन त्यांच्या फॉलोअर्ससाठी काही ना काही कण्टेण्ट द्यावाच लागतो.

एकंदरीत असे  सोशल वाद सकारात्मक होण्यापेक्षा नकारात्मकतेकडे जातानाच जास्त दिसत आहेत. यातून अनेकांना मानसिक त्रासही होतो. एक इन्फ्ल्यूएन्सर म्हणून आणि त्यांना फॉलो करणारे आपण फॉलोअर्स म्हणून नक्की कशाला किती महत्त्व आणि वेळ द्यायचा हे तरुणाईने वेळीच लक्षात घ्यायला हवं. नाही तर दोघांच्या सोशल भांडणात आपला फु काचा बळी जातो आणि त्यातून आपण या जाळयात अधिकाधिकच गुंतत जाण्याची शक्यता असते. म्हणून या सोशल वादांना बळी पडण्यापेक्षा त्याचा सकारात्मक वापर करता आला तर त्यासाठी तरुणाईने अधिक सजगतेने आणि अभ्यासपूर्ण त्याचा वापर करायला हवा.

टिक टॉक वर्सेस यूटय़ूब हा वाद आता निवळला असला तरी यात तरुणाई अधिक काळ रंगली होती. अशा सोशल वादांमध्ये हिरिरीने सहभाग घेणाऱ्या तरुणाईने आपण यात आपला किती वेळ फु कट घालवत आहोत. आपण कोणाचे समर्थन करताना नकळत दुसऱ्यासाठी नुकसानदायी तर ठरत नाही ना.. अशा अनेक गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करायला हवा. या वादांमध्ये सोशल मीडिया व्यवसायाच्या नफातोटय़ाची गणितं दडलेली असतात ती लक्षात घ्यायला हवीत.

viva@expressindia.com