मृण्मयी पाथरे

मंदारचा त्याच्या आजीवर फार जीव होता. लहानपणापासून आईबाबा ऑफिसला जात असल्याने त्याची आजीनेच काळजी घेतली. अगदी मोठा झाल्यावरही भले आईबाबांना काही सांगितलं नाही, तरी त्याच्या आयुष्यातील सगळय़ा घडामोडी आणि गुपितं तो आजीला येऊन सांगायचा. ‘मंदार दुसऱ्या शहरात नोकरीला लागला, तरीही मला सगळय़ा बातम्या पुरवतो, इतक्या लांब असूनही माझी विचारपूस करतो, माझ्या वाढदिवसाला गिफ्ट्स पाठवतो किंवा सरप्राइज द्यायला येतो’, ही भावनाच आजीला सुखावणारी होती. मंदारच्या कुटुंबीयांनी आजीची नुकतीच शंभरी साजरी केली होती. पण कालांतराने वार्धक्यामुळे आजीचं निधन झालं. वयानुसार माणूस कधीतरी जाणार हे अटळ आहे, हे मंदारला माहिती होतं. पण आपली बेस्ट फ्रेंड आपल्याला आता परत भेटणार नाही, मायेने डोक्यावरून हात फिरवणार नाही, गॉसिप विचारणार नाही ही कल्पनाच त्याला करवत नव्हती.

loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
Priyadarshni Rahul
हुंड्याविरोधात असाही लढा! लग्न मोडल्यानंतर तिने घडवली ‘अशी’ अद्दल, कायद्याचा अभ्यास अन् १४ वर्षे लढा!
uddhav thackeray nitin gadkari
उद्धव ठाकरेंच्या ‘ऑफर’वर नितीन गडकरींची मिश्किल टिप्पणी; म्हणाले, “कदाचित त्यांच्या मनात…”

आयेशा आणि अजय यांचे धर्म वेगवेगळे असले, तरी त्यांच्या नात्यामध्ये त्यामुळे कधीच फरक पडला नाही. एकमेकांना डेट करून पाच-साडेपाच वर्षे झाल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांना त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं. सध्याच्या आंतरधर्मीय नात्यांच्या आणि हिंसाचाराच्या बातम्या दर आठवडय़ाला ऐकून त्यांच्या पालकांनी आधीच धसका घेतला होता. त्यात आपली मुलंपण आंतरधर्मीय नात्यात आहेत हे ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांच्या नात्याला सरळ नकार दिला. ‘तुमच्या निर्णयाचे पडसाद तुम्हाला आता कळणार नाहीत, पण आम्ही या नात्याला कधीच स्वीकारू शकत नाही. आणि भले, आम्ही स्वीकारलं, तरी कुटुंबातील आणि समाजातील इतर लोकं नेहमीच तुमच्याकडे तिरक्या नजरेने पाहतील. तुमचं लग्न कोणत्या धर्मानुसार होणार? तुमच्यापैकी कोणी एक जण धर्मातर करणार का? पुढे तुम्हाला मुलं झाली, तर त्यांना कोणत्या धर्मानुसार वाढवणार? त्यांना कोणते संस्कार देणार?’, असे एक ना अनेक प्रश्न आयेशा आणि अजयला विचारले गेले. ‘तुम्ही लग्न केलंत, तर आम्हाला विसरून जा. आमच्यापैकी कोणीही तुमच्याशी संबंध ठेवणार नाही’, असा अल्टिमेटमसुद्धा देण्यात आला. आयेशा आणि अजय यांना एकमेकांशी ब्रेकअप करणं किंवा कुटुंबीयांपासून दुरावणं असे दोनच पर्याय दिसू लागले.

आभा अगदी लहान असल्यापासूनच तिच्या कुत्र्याशिवाय – शेरलॉकशिवाय तिचं पानही हलायचं नाही. ती शाळेत किंवा कॉलेजला गेली तर शेरलॉक तिला बसपर्यंत सोडायला जायचा. ती परत यायची वेळ झाली की पंधरा मिनिटं आधीच तो बसची वाट पाहायला घराबाहेर पडायचा. ती परत आल्यावर तिच्याशी खेळायला शेपटी हलवून नुसतं मागेपुढे करायचा. आभाला भूक लागली, तर तिला किचनमधून खाऊचे पॅकेट्स आणून द्यायचा. आभासुद्धा त्याला दिवसभरातल्या सगळय़ा घडामोडी येऊन सांगायची. तोही आपल्याला सारं कळतंय अशा डोळय़ांनी तिच्याकडे पाहत, कान टवकारून सगळं ऐकायचा. कधी आभाचा मूड ठीक नसेल, तर मागच्या दोन पायांवर उभं राहून तिच्या अवतीभवती उडय़ा मारायचा. आभा आणि शेरलॉकमधलं प्रेम भावंडांपेक्षा कमी नव्हतं. पण कुत्र्यांच्या आयुर्मानानुसार शेरलॉकचं बारा-तेरा वर्षांनी निधन झालं आणि आभावर जणू दु:खाचा डोंगर कोसळला. ‘कधी ना कधी हे होणारच होतं. आपण दुसरा कुत्रा पाळूया’, असं तिच्या पालकांनी सुचवून पाहिलं. पण दुसरा कुत्रा आणला, तरी शेरलॉकला विसरणं इतकं सोपं नाही, हे आभा जाणून होती.

आपण सगळेच जण आपल्या आयुष्यातील जवळच्या व्यक्तींना आणि प्राण्यांना कधी ना कधी गमावतो. मग त्यांचं निधन झालेलं असू देत किंवा एखाद्या कारणामुळे ते आपल्यापासून दुरावले गेले असू देत, त्यांची कमी आपल्याला केव्हा ना केव्हा जाणवतेच! पण आजकाल ते दु:ख (grief)) व्यक्त करावं की न करावं, केलं तर कसं व्यक्त करावं यावरही इतर लोक निर्बंध घालताना दिसतात. एखाद्या व्यक्तीने विशिष्ट वय पार केलं असेल, तर त्यांचं जाणं कितीही अपेक्षित असलं तरी मन ती पोकळी स्वीकारायला तयार नसतं. तरीही नव्वदी पार केलेल्या व्यक्तींबद्दल कित्येकदा ‘पुरे झालं की एवढं आयुष्य! मुलाबाळांचं सारं काही करून झालं. नातवंडं, पतवंडांना खेळवलं. नंतर व्याधींनी ग्रस्त होऊन दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा वेळीच मरण आलेलं बरं’, असंही काही जण सहजपणे बोलून जातात. हे बोलणं सोपं असतं, पण त्या व्यक्तीच्या पश्चात राहिलेल्या मंडळींचं दु:ख मात्र अनेकदा याने हलकं होणार नसतं.

एखाद्या व्यक्तीच्या निधनाव्यतिरिक्त त्यांच्या पाळीव प्राण्यांचा मृत्यू, जोडीदारासोबत झालेलं ब्रेकअप, घटस्फोट, कुटुंबीयांसोबत किंवा मित्रपरिवारासोबत दुरावलेले संबंध, स्वप्नभंग, गर्भपात, कॅन्सरसारख्या दीर्घकालीन आजारांचं निदान यांसारख्या अनेक गोष्टीही दु:खद असतात. पण त्याविषयी आपण सहसा फार बोलत नाही. साधारणत: काही महिने किंवा एखादं वर्ष सरलं की शोकाकुल व्यक्तींना फारसं कोणी विचारत नाही. कारण कालांतराने त्यांचं दु:ख नाहीसं होतं असा अनेकांचा समज असतो. पण हे दु:ख फार क्वचितच पूर्णपणे नाहीसं होतं. किंबहुना, ते बऱ्याचदा दैनंदिन जीवनात डोकवायचा प्रयत्नही करतं. या दु:खाला सामोरं जाण्यासाठी कित्येक जण वेगवेगळय़ा पद्धती वापरतात. कुणी स्वत:ला कामाच्या गराडय़ात झोकून देतं, तर कुणी मित्रमंडळींपासून स्वत:ला दूर ठेवतं. कुणी आठवणींच्या शिदोरीवर जगतं, तर कुणी याच आठवणींमुळे ट्रिगर होऊ नये यासाठी पूर्वीचे फोटोज किंवा व्हिडीओज पाहणं, त्यांच्या आवडत्या जागी जाणं किंवा विशिष्ट खाद्यपदार्थ खाणं टाळतं, अथवा व्यसनांकडे वळतं. काही जण खूप शांत होतात, अलिप्त राहतात, तर काही जणांचा चिडचिडेपणा वाढतो. काही जण ढसाढसा रडतात, तर काही जण इतरांना सावरायचं म्हणून स्वत: न रडता आपल्या भावना आतल्या आत दाबून ठेवतात. जे स्वत:हून त्यांच्या भावनांबद्दल बोलत नाहीत, त्यांनी मूव्ह ऑन केलं असं समजून आपणही त्यांना फारसं काही विचारत नाही.

अखेरीस, जरी प्रत्येकाची शोक आणि दु:ख व्यक्त करण्याची पद्धत निराळी असली, तरी सगळय़ांनाच केव्हा ना केव्हा आधार हवा असतो. मग हा आधार मानसिक असो, कामाला हातभार लावण्यासाठी असो किंवा आपला एकटेपणा दूर व्हावा म्हणून केवळ आपल्या आजूबाजूला असण्यासाठी असो. असं असलं, तरी आपल्यालाही आधाराची गरज भासू शकते हे स्वीकारणं बऱ्याच जणांना जड जातं. काही जण संकोचून उगाच आपल्यामुळे इतरांना त्रास कशाला असा विचार करून गप्प बसतात. यामुळे केवळ मानसिक नव्हे, तर शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो. मग आपण कितीही तरुण असलो, तरी पचनक्रियेत अडथळे, ब्लड प्रेशर, हृदयविकार अशा अनेक व्याधींना अनायसे आमंत्रण मिळण्याचा चान्स वाढतो. त्यामुळे एकटं आतल्या आत घुसमटण्यापेक्षा आजूबाजूच्या व्यक्तींची किंवा मानसशास्त्रज्ञांची मदत घेतलेली बरी. शेवटी डंबल्डोर म्हणतात त्याप्रमाणे – हेल्प इज ऑलवेज गिव्हन टू दोज हू आस्क फॉर इट.

viva@expressindia.com