वेदवती चिपळूणकर‘कॉफी आणि बरंच काही’ मधल्या चॉकलेट हिरोपासून ते ‘पॉण्डिचेरी’मधल्या मिस्टेरियस मॅनपर्यंतच्या त्याच्या सर्व भूमिका मराठी प्रेक्षकांनी आवडीने पाहिल्या आहेत. ‘बाजीराव मस्तानी’मधून चिमाजी आप्पांच्या भूमिकेतही तो सर्वाना भावलेला आहे. शाळेत असतानाच ज्याने आपल्या करिअरची ही वाट निवडली आणि त्यासाठी संपूर्ण शक्तिनिशी प्रयत्न केले असा अभिनेता म्हणजे वैभव तत्त्ववादी. वैभव शाळेत असताना स्पोर्ट्स आणि नाटक दोन्हीमध्ये अत्यंत आवडीने सहभागी व्हायचा. तो म्हणतो, ‘मी बॅडिमटन खेळायचो. स्टेट-लेव्हलला खेळायचो. मला त्यात करिअर करायचं होतं, पण मला त्यात कधी हरलेलं आवडायचं नाही. जेव्हा मी मॅच हरायला लागलो तेव्हा मला हे कळलं की मी जिंकत होतो तोपर्यंतच मला बॅडिमटन आवडत होतं. पण नाटकाच्या बाबतीत तसं नव्हतं. संपूर्ण थिएटरमध्ये कोणीही नसलं तरी मला कधीच काही वाटलं नाही, मी माझं काम तितक्याच इंटरेस्टने करतो. मी कायम आवडीने थिएटरमध्ये स्टेजवर असतो हे मला लक्षात आलं,’ आपला कल कुठे आहे हे लक्षात आल्यानंतर वैभवने करिअरचं क्षेत्र निश्चित केलं खरं.. पण तेव्हा त्याचं वय काय होतं हे कळल्यावर नवल वाटल्याशिवाय राहत नाही. ‘साधारण इयत्ता आठवीत असताना माझं हे ठरलं होतं की मला अभिनय क्षेत्रातच करिअर करायचं आहे,’ असं वैभवने सांगितलं. लहान वयात स्पोर्ट्स आणि अभिनय दोन्ही आवडत असताना वैभवने अभिनयाची निवड करिअर म्हणून केली होती. ‘आपण एखाद्या रस्त्यावर चालतोय आणि मध्येच धडपडलो किंवा खाली पडलो. तर आपण उठून पुन्हा चालायला लागतो. मग असाच रस्ता निवडावा ज्यावर पडल्यावर रस्ता बदलण्याची इच्छा होणार नाही, तर त्याच रस्त्यावर कितीही वेळा पडलं तरी चालत राहायची तयारी आणि जिद्द कायम असेल,’ अशा शब्दांत त्याच्या निर्णयामागचा विचार वैभव उलगडून सांगतो. इतक्या अनिश्चित क्षेत्रात पूर्णवेळ करिअर म्हणजे रिस्कच! आणि म्हणूनच घरच्यांच्या म्हणण्यानुसार वैभवने कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची ठरवली आणि इंजिनीअिरगचं शिक्षण आधी पूर्ण केलं. पदवी झाल्यानंतर लगेचच त्याला पहिलं प्रोजेक्ट मिळालं. तो सांगतो, ‘पहिल्याच प्रोजेक्टला काहीही फारसं यश मिळालं नव्हतं. त्यामुळे आपली सुरुवातच एकदम भारी झाली आहे, वगैरे असं काही नव्हतं. मात्र त्याच्या नंतरचं दुसरं प्रोजेक्ट म्हणजे ‘तुझं माझं जमेना’ ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच्या नंतरचं केलेलं काम म्हणजे ‘कॉफी आणि बरंच काही’. त्यालाही प्रेक्षकांनी चांगला रिस्पॉन्स दिला होता. त्यामुळे त्यानंतर मात्र मला आत्मविश्वास मिळाला.’ त्याच्या करिअरच्या या सुरुवातीच्या काळाबद्दल तो सांगतो, ‘पुण्यात इंजिनीअिरग करून मी मुंबईत आलो. सुरुवातीचे काही महिने असे गेले की काहीच काम नव्हतं. उत्पन्न नव्हतं, खर्च मात्र होता. मुंबईच्या प्रवासात वेळ आणि शक्ती दोन्ही जायची. तुम्ही स्क्रीनवर काम करणार म्हणजे अपेक्षित असतं की तुम्ही जिम वगैरे करत असाल, पण मुंबईच्या वेगात मला अजिबात स्वत:ला अॅडजस्ट करून घेता येत नव्हतं आणि या सगळय़ासाठी वेळही काढता येत नव्हता. असं वाटून गेलं की पुण्याच्या वातावरणाला सरावलो होतो तर तिथेच राहायला हवं होतं, नाटक तर तिथेही करता येत होतं.’ प्रवासाबरोबरच तांत्रिक शिकण्याचा भागही अवघडच होता, असं तो म्हणतो. ‘स्टेजवरून स्क्रीनकडे वळल्यामुळे कॅमेरा, त्या कामाचे तांत्रिक भाग या सगळय़ासाठीसुद्धा खूप स्ट्रगल करावं लागत होतं. मात्र ज्यासाठी इथे आलो आहे, ते करायची हीच संधी असताना मला परत जायचं नव्हतं. आणि म्हणून मी जुळवून घेत प्रयत्न करत राहिलो. आता ते दिवस आठवले की वाटतं की ते सगळं स्ट्रगल आज फुलफिलिंग ठरलं,’ अशी भावना त्याने व्यक्त केली. स्वत:वर सतत काम करत राहाणं, हेच पुढे जाण्याचं आणि आपल्याला हवं ते अचिव्ह करण्याचं सिक्रेट असल्याचं वैभव सांगतो. ज्या वेळी आपल्या हातात काम नाही आहे, रिकामपण आलं आहे असं वाटेल, तेव्हा स्वत:साठी तो वेळ वापरायचा, असा त्याचा दृष्टिकोन आहे. स्वत:वर सतत घेत असलेली मेहनत आपल्याला कायम रिलेव्हन्ट ठेवते आणि मग कितीही अवघड काळाला आपण सामोरे जाऊ शकतो, असं वैभव म्हणतो. रीमा लागू, नाना पाटेकर, संजय लीला भन्साळी अशा मोठमोठय़ा कलाकारांच्या शाबासकीने त्याला प्रेरणा दिली आहे. मात्र तो म्हणतो, ‘शेवटी सगळय़ात महत्त्वाची पावती असते ती प्रेक्षकांची! त्यांच्या प्रतिक्रिया कायम सगळय़ात जास्त महत्त्वाच्या असतात. काहीशी वेगळय़ा धाटणीची असणारी वेबसीरिज ‘निर्मल पाठक की घरवापसी’ हीसुद्धा प्रेक्षकांनी छान रिसिव्ह केली.’ प्रेक्षकांनी पाठीवर दिलेली कौतुकाची थाप यालाच सर्वाधिक महत्त्व देणाऱ्या वैभव तत्त्ववादीची प्रत्येक कलाकृती ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही.viva@expressindia.com