वेदवती चिपळूणकर 

करोना काळात एकमेकांच्या जास्त संपर्कात यायचं नाही, या भयाने दैनंदिन व्यवहारांपासून ते नोकरी – व्यवसायापर्यंत आणि रोजच्या खाण्यापिण्यापासून ते स्पेशल पार्टीपर्यंत सगळय़ाच गोष्टी आॉनलाईन झाल्या. अवघं आयुष्यच डिजिटली अनुभवताना आपण अनेक जुन्या, हव्याहव्याशा गोष्टींना कायमचा निरोप दिला. तर काही गोष्टी नव्याने शिकलो. सरत्या वर्षांच्या अखेरच्या दिवशी या बदलांच्या अनेक गंमतीदार आठवणींची ही लुटालूट..

गेल्या वर्षभरात प्रत्येक व्यक्ती अनेक नवीन गोष्टी शिकली आहे. एकटी राहणारी तरुणाई घरातली कामं करायला शिकली, अख्खं घर स्वत:च्या जबाबदारीवर सांभाळायला शिकली, व्हर्च्युअल मिटींग्जमध्येही कामाची एफिशियन्सी कायम ठेवायला शिकली. या काळात तरुणाईचं सोशल लाईफ खरंतर खूप अधांतरी झालं आणि अनिश्चित झालं. दर वीकएंडला भेटणारा ग्रुप काही महिने एकमेकांना भेटला नाही. कपल्सना एका शहरात राहून लॉन्ग-डिस्टन्स रिलेशनशिप सांभाळण्यासाठी कसरत करावी लागली. एरवी ज्या नातेवाईकांचा तरुणाईला कंटाळा यायचा त्यांना इतक्या काळात भेटता न आल्यानेही चुकल्या-चुकल्यासारखं वाटलं. बििल्डगमधले, आसपासच्या एरियामधले रोज दिसणारे लोक, संध्याकाळी गार्डनमध्ये रोज भेटणारे पेट्स, रस्त्यावर रोज दिसणारा एखादा ठरावीक पाणीपुरीवाला इथपासून ते स्वत:च्या अगदी जवळच्या नातेवाईकांपर्यंत सगळय़ांना आपण ‘मिस’ केलं. याच काळात आपण खूप साऱ्या अ‍ॅडजस्टमेंट्स करायला शिकलो, प्रत्येक दुराव्यातून मार्ग काढायला शिकलो आणि यातूनच आपले आई-बाबा, आजी-आजोबा, काका-काकू असे सगळेजण स्मार्टफोन किंवा लॅपटॉप वापरायला शिकले. व्हिडिओ कॉल रिसिव्ह करणं जमायला लागलं आणि स्वत:हून डायलही करता यायला लागला. एरवी नातेवाईकांचा फोन घ्यायला कंटाळा करणारे आपण सगळे अगदी उत्साहाने त्यांना नवनवीन गोष्टी शिकवायला लागलो, समजावायला लागलो. थोडक्यात सांगायचं तर आपलं सोशल लाईफ या काळात बिघडता बिघडता खरं तर सुधारलं.

पूर्वी ठरवून आपण एखाद्या ठिकाणी भेटत होतो. आता मात्र या भेटीगाठी प्रत्यक्ष होण्याऐवजी ऑनलाइन व्हायला लागल्या. कॉलेजच्या फेअरवेल पार्टीज ऑनलाइन झाल्या. एकाच वेळी सगळय़ांनी थीमनुसार ड्रेसअप व्हायचं, थीमनुसार अ‍ॅक्सेसरीज घालायच्या, आपापल्या घरी डेकोरेशन करायचं, आपापले स्नॅक्स घेऊन स्क्रीनसमोर बसायचं आणि पार्टी एंजॉय करायची असे मार्ग शोधून काढले गेले. या पद्धतीने बॅचलर पार्टीपासून ते बर्थडे पार्टीपर्यंत सगळय़ा पाटर्य़ा रंगल्या. हळदीकुंकू, डोहाळेजेवण, केळवण हे पारंपरिक प्रसंगही ऑनलाइन पार पडले. इतकंच काय तर मित्रमैत्रिणींची लग्नही अनेकांनी ऑनलाइन पद्धतीने अटेंड केली. घरातल्या नव्याने प्रवेश केलेल्या लहान बाळालाही ऑनलाइन बघावं लागलं आणि आजारी असलेल्या नातेवाईकांनाही ऑनलाइनच धीर द्यावा लागला. परदेशात असलेल्या नातेवाईकांना तर भेटतासुद्धा आलं नाही. बाप्पाचं दर्शन व्हिडिओ कॉलवर घेतलं गेलं आणि आरतीला टाळय़ासुद्धा व्हिडिओ कॉलवर वाजवल्या गेल्या. सगळे सण-समारंभ ऑनलाइन साजरे झाले. पण नुसतं ऑनलाइन कॉलिंग किंवा व्हिडिओ कॉल एवढाच भाग त्यात नव्हता, तर अगदी गिफ्ट्सही डिजिटली दिली गेली. ऑनलाइन खरेदी करून लोकांच्या घरी डिलिव्हरी देण्याऐवजी थेट गुगल पे, डिजिटल व्हाऊचर्स, कसल्या कसल्या ऑफर्सची गिफ्ट कार्डस, डिस्काऊंट कूपन्स अशा गोष्टींची खरेदी गिफ्ट म्हणून झाली. इतकंच नव्हे तर नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन अशा ओटीटीची सबस्क्रिप्शन्सही गिफ्ट म्हणून एकमेकांना दिली गेली. स्विगीवरून जवळपासच्या मित्रमैत्रिणी, भावंडांसाठी स्पेशल फूड ऑर्डर करून, थेट त्यांच्या घरी डिलिव्हर करून पार्टी देण्याची नवीन आयडिया याच काळात जन्माला आली.

केवळ सेलिब्रेशन नव्हे तर दैनंदिन जीवनातल्या अनेक गोष्टी आता आपल्यासाठी डिजिटाईज झाल्या आहेत. सगळय़ात आधी आपण अभ्यास ऑनलाइन करायला सुरुवात केली, मग लेक्चर्स अटेंड करायला सुरुवात केली आणि मग ती आपली सवय बनून गेली. मूव्ही बघण्यापासून ते रोजच्या गरजेच्या वस्तू विकत घेण्यापर्यंत सगळं काही बसल्याजागी करायची सवय अंगवळणी पडली. मग आपण परीक्षाही ऑनलाइन दिली आणि मार्क्‍सही ऑनलाइनच मिळवले. एकमेकांना न भेटता ग्रुप प्रोजेक्ट्स केले, प्रेझेन्टेशन्स केली, रिसर्च पेपर्सवर काम केलं, कॉन्फरन्स केल्या आणि डिस्कशन्सही केली. इंटरव्ह्यू ऑनलाइन दिले आणि नव्या नोकरीचासुद्धा पहिल्या दिवसापासून ‘वर्क फ्रॉम होम’ने श्रीगणेशा केला.

गेल्या वर्षभरात डिजिटाईज झालेलं आपलं जग आपल्या सगळय़ांच्याच खूप सोयीचं ठरलं. स्पर्श नको या भीतीने अगदी भाजीवाल्यापासून ते रिक्षावाल्यापर्यंत सगळेच डिजिटल पेमेंट घ्यायला लागले. एखादी गोष्ट गृहीत धरण्याच्या आपल्या क्षमता आपण याच काळात खूप विस्तारल्या. एखाद्याने पैसे पाठवले म्हटलं की आपण ते गृहीत धरायला लागलो, मीटिंगमध्ये कोणाचे चेहरे दिसत नसले तरी ते ऐकतायत असं आपण समजून घ्यायला लागलो आणि लांब असले तरी प्रामाणिक आहेत असं म्हणून आपण अधिक विश्वास ठेवायला शिकलो. सोशल लाईफमध्ये डिजिटायझेशन झाल्याचा बाकी काही फायदा होवो न होवो, पण हा वृत्तीतला बदल मात्र नक्कीच पॉझिटिव्ह आहे.

viva@expressindia.com