वेदवती चिपळूणकर

फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनिखड’, ‘शेर शिवराज’ असे प्रेरणादायी आणि ऐतिहासिक चित्रपट देणारा दिग्दर्शक म्हणजे दिग्पाल लांजेकर. विनय आपटे, स्मिता तळवलकर, संजय सूरकर अशा दिग्गजांकडे दिग्पालला शिकण्याची संधी मिळाली. शाळेत असल्यापासूनच आवडत असलेल्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा आणि त्याच वेळी आलेली घरचा कर्ता होण्याची जबाबदारी यातून मार्ग काढत दिग्पालने त्याच्या या क्षेत्रातल्या करियरला आकार दिला आहे. गणपती उत्सवात लेखन करणं, एकांकिका करणं अशा गोष्टींमधून त्याची आवड निर्माण झाली आणि लेखन कौशल्यसुद्धा विकसित होत गेलं.

Loksatta vasturang Lessons from redevelopment buildings Layout of flats
पुनर्विकासाचे धडे : कौटुंबिक अवकाश जपू या!
Pune Police Big Decision On Transgender
पुणे: ट्रॅफिक सिग्नलवर बळजबरीने पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर पोलिस करणार कारवाई
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

ज्युनिअर कॉलेजला असताना वाचलेल्या कोंडाजी फर्जंद यांची गोष्ट कधी तरी कलेतून लोकांसमोर मांडण्याची इच्छा दिग्पालला तेव्हापासूनच होती. मात्र त्याचा मनोरंजन क्षेत्रातला प्रवेश मात्र फार वेगळय़ा पद्धतीने रंगला. तो सांगतो, ‘विनय आपटे सरांची एक मालिका दूरदर्शनवर लागायची. मला त्यातला एक भाग आवडला नाही आणि मी त्यांना तसं लिहून कळवलं. मी लिहिलेलं पत्र वाचून त्यांनी मला भेटायला बोलावलं आणि त्यांच्यासोबत काम करण्याची संधी दिली. ती माझ्यासाठी खूप मोठी संधी होती. त्यानंतर स्मिता तळवलकर यांच्या ‘अस्मिता चित्र अकॅडमी’मध्ये त्यांनी मला बोलावून घेतलं. माझं पुढचं काम, अनुभव आणि शिक्षण तिथे झालं. त्यानंतर संजय सूरकर यांच्याकडे मला काम करायला मिळालं. त्यामुळे एखाद्या मोठय़ा दिग्दर्शकाच्या कामाला नापसंती दाखवून त्याच दिग्दर्शकाने मला इंडस्ट्रीमध्ये पहिली संधी देणं हाच मोठा क्लिक पॉइंट होता.’ शाळेपासूनच भाषा, साहित्य अशा विषयांमध्ये रुची असलेल्या दिग्पालने अकरावीला मात्र सायन्स निवडलं. लवकर सेटल होण्याच्या दृष्टीने तोच सगळय़ात चांगला पर्याय होता आणि बारावीला त्याला अत्यंत उत्तम मार्क्‍सही मिळाले. घरच्यांच्या अपेक्षेप्रमाणे तो सहज इंजिनीयर होऊ शकला असता. मात्र त्या वेळी त्याने स्वत:च्या आवडत्या शिक्षणासाठी सायन्स सोडून आर्ट्स घेतलं, इंग्रजीमधून बी. ए. केलं आणि संस्कृतमधून एम. ए. केलं. ‘एकीकडे घराची स्टेबिलिटी खुणावत होती तर दुसरीकडे स्वप्नं खुणावत होती. माझ्या घरच्यांच्या दृष्टीने माझ्या मताला आणि निर्णयालाही आमच्या गरजेइतकंच महत्त्व होतं. त्यामुळे कोणीही मला अडवलं वगैरे नाही, उलट या मोठय़ा निर्णयात मला पूर्ण साथ दिली’ , असे तो म्हणतो.

दिग्पालच्या दृष्टीने श्रमाची तयारी असलेल्या माणसाला कधीही अपयश येत नाही. पूर्ण मनापासून शंभर टक्के श्रम केले तर अपयश, त्रास, असुरक्षितता, ताण यातलं काहीही होत नाही. दिग्पालची संपूर्ण टीम रोज सलग अठरा ते वीस तास काम करते तर तो स्वत:देखील अठरा तास काम करतो. तो सांगतो, ‘मी जेव्हा पूर्णपणे या क्षेत्रातच स्वत:ला वाहून घ्यायचं ठरवलं तेव्हा माझ्या घरच्यांशी मी हे स्पष्ट बोललो होतो की आता मेलो तरी याच क्षेत्रात मरेन, पण तिथेच काम करत राहीन. याच निर्धाराने काम करावं लागतं तरच यश पदरी पडतं. आपल्याकडे संधी येत असतात, मात्र त्या घ्यायला आपण तयार आहोत का हा कळीचा मुद्दा असतो’. अचानक एखादी संधी मिळाली आणि तो रातोरात स्टार झाला ही भ्रामक कल्पना तो खोडून काढतो. ‘आपला सतत रियाज चालू असावा लागतो. इतर सिनेमांच्या शैलींचा अभ्यास करावा लागतो, त्यातून आपल्याला कोणती आवडतेय, भावतेय, जमतेय, त्यानुसार विचार करावा लागतो. सतत काहीतरी पाहत, वाचत आणि ऐकत राहावं लागतं. आपण एखाद्या कलाकृतीमधून जे सांगू पाहतोय ते आणि जे प्रत्यक्ष पोहोचतंय ते.. या दोन्ही गोष्टी एकच आहेत ना याची खातरजमा करून घ्यावी लागते. आपला हेतू पूर्णपणे क्लिअर आहे ना हे पुन्हा पुन्हा तपासून पाहावं लागतं. या सगळय़ाला रियाज म्हणतात. तो केला तरच आपण कायम सज्ज असतो आणि आपल्याकडून होणारं काम चांगलं असतं’, असे स्वानुभवाचे परखड बोल तो ऐकवतो.

आपण करत असलेल्या कामाची कोणी तरी मनापासून स्तुती केली अथवा कौतुक केलं तर ते वेगळीच उभारी देणारं ठरतं. अशाच कौतुकाच्या अनुभवाबद्दल दिग्पाल सांगतो, ‘२००६ साली मी एक महानाटय़ केलं होतं. त्याची तालीम आणि प्रत्यक्ष नाटक पाहायला दिग्दर्शक राज दत्त स्वत: आले होते. ते नाटक गोळवलकर गुरुजींच्या आयुष्यावर बेतलेलं होतं. नाटक झाल्यानंतर राज दत्त साहेबांनी मला मिठी मारली. मला म्हणाले की मी आतापर्यंत मोठय़ा पडद्यावर हिंदूत्व दाखवलं, संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला. पण ते इतकं जिवंत करून दाखवणं, सादर करणं आजपर्यंत मलाही माझ्या आयुष्यात जमलं नाही. ती शाबासकी माझ्यासाठी खूप मोठी होती आणि माझा उद्देश, हेतू सफल झाल्याची ती पोचपावती होती’. असाच काहीसा वेगळा अनुभव त्याला ‘पावनिखड’ या चित्रपटानंतर आला. त्याबद्दल तो सांगतो, ‘ठाण्याच्या एका पोलिस अधिकाऱ्याने मला फोन करून हा किस्सा सांगितला. ते तुरुंग अधिकारी होते आणि त्यांनी त्यांच्या तुरुंगातल्या आठ ज्युविनाईलना हे तिन्ही चित्रपट दाखवले. ‘पावनिखड’ बघितल्यावर त्या मुलांना रडायला आलं, एकेकाळी लोक किती मोठा विचार करत आणि आपण काय करतो आहोत या विचाराने त्यांना थोडंसं वाईट वाटलं. त्यानंतर त्यातल्या काहींनी ग्रॅजुएशनला प्रवेशही घेतला आणि आता ती सर्व मुलं कष्ट करून स्वत:चं पोट भरायचा प्रयत्न करत आहेत. हे ऐकून मला समाधान वाटलं की आपण सांगत असलेल्या गोष्टींतून काहीतरी सकारात्मक परिणाम मोजक्या लोकांवर का होईना, पण होतो आहे.’

नवीन मुलांनी सोशल मीडियाच्या प्रसिद्धीच्या मागे हरखून जाऊ नये आणि केवळ ग्लॅमर आहे म्हणून या क्षेत्रात येऊ नये असं दिग्पालला वाटतं. आपल्या पूर्वसुरींनी काय काम केलं आहे ते वाचणं, पाहणं, समजून घेणं, त्याचा अभ्यास करणं असं सगळं करून मगच या क्षेत्रात पूर्ण अभ्यासानिशी प्रवेश करा, असा दिग्पालचा सगळय़ा नवीन येऊ घातलेल्या पिढीला संदेश आहे.

viva@expressindia.com