श्रुती कदम ‘‘व्हॅलेंटाईन डे पर हम अपने चाहनेवालों को कई खुबसुरत तोहफे देतें है; पर क्या हो अगर कोई व्हॅलेंटाईन डे पर किसी को लाश तोहफे मे दे?’’ ‘इंडियन मर्डर मिस्ट्री’ हा ‘स्पॉटिफाय’ या ॲपवर प्रसारित होणारा एक प्रसिद्ध कार्यक्रम आहे. या पॉडकास्टच्या माध्यमातून आर. जे. प्रवीण आपल्याला देशभरातील मर्डर मिस्ट्रीच्या सत्यघटना ऐकवत असतो. आर. जे. प्रवीणने सांगितलेली ‘व्हॅलेंटाईन डे मर्डर’ ही सत्य घटना अंगावर शहारा आणणारी आहे. व्हॅलेंटाईन डेची आपल्याकडे खूप क्रेझ आहे. व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करण्यासाठी तरुणाई कायम धडपडत असते. मात्र व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी वा त्यानिमित्ताने असंही काही घडलेलं असू शकतं, याची कल्पनाही आपण केलेली नसते. एखादी व्यक्ती आपल्या प्रियकर वा प्रेयसीसाठी किती वेडी होऊ शकते हे सांगण्याचा प्रयत्न या कथेतून करण्यात आला आहे. त्याचबरोबर गुन्हेगाराने आपला गुन्हा कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात पोलीस यशस्वी ठरतातच. आणि मग अशा गुन्हेगाराला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा ही तितकीच कडक होते हेही या कथेतून समजले. या कथेची सुरुवातच मुळात आर. जे. प्रवीण ‘व्हॅलेंटाईन डे पर हम अपने चाहनेंवालोंको कई खुबसुरत तोहफे देतें है; पर क्या हो अगर कोई व्हॅलेंटाईन डे पर किसी को लाश तोहफे मैं दे? या प्रश्नाने करतो. हा प्रश्न मनात नकळतच भीती निर्माण करतो. मात्र भीती ही एकच भावना नाही. तर मुळात प्रेमाविषयी, एकमेकांच्या नात्याविषयीही अनेक प्रश्न आपल्याला पडत राहतात. त्यामुळेच की काय ‘व्हॅलेंटाईन डे मर्डर’ ही कथा ऐकल्यानंतर वरचं वाक्य अधिक लक्षात राहतं. मी सध्या यूपीएससीची तयारी करते आहे. अभ्यासातून वेळ काढून मर्डर मिस्ट्रीवर आधारित पॉडकास्ट ऐकायला मला आवडतं. मुळात मला सस्पेन्स कथा असलेली पुस्तकं, कादंबऱ्या वाचायला आणि चित्रपट पाहायला खूप आवडायचं. पण आता अभ्यासामुळे मला तेवढा वेळ मिळत नाही. म्हणून मग मी मोकळय़ा वेळात असे पॉडकास्ट्स ऐकते. ‘इंडियन मर्डर मिस्ट्री’ हे पॉडकास्ट ऐकण्याचं कारणही सस्पेन्स कथांची आवड हेच आहे. गुन्हेगार किती सहजपणे गुन्हा करतो. पण त्यामुळे त्याचे किती वाईट आणि गंभीर परिणाम होतात, हे या पॉडकास्टमधील वास्तव घटनांवर आधारित कथा ऐकून समजतं. त्याचबरोबर आपले भारतीय पोलीस हे किती चलाखीने आणि चपळपणे गुन्हेगारांचा माग काढून त्यांना पकडतात हेदेखील समजतं. आर. जे. प्रवीणच्या या कथा ऐकून मला गुन्हेगारांची मानसिकता लक्षात घेत त्यांना शोधून काढण्याची पोलिसांची जिद्द महत्त्वाची वाटते. आपणही अशाच प्रकारे काम करू, असा आत्मविश्वासही वाटतो. अभिज्ञा जगताप (यूपीएससी विद्यार्थी)