viva@expressindia.com सध्याच्या समाजमाध्यमांच्या कल्लोळात तुमच्यापर्यंत पोहोचायचा मार्ग म्हणजे हटके काही तरी करणे. म्हणून मी तुम्हाला खुले पत्र लिहिण्याचा मार्ग अवलंबला आहे. ते केवळ लाइक, शेअर न करता त्यातला विचार जरूर सबस्क्राइब करा, ही कळकळीची विनंती. प्रिय तरुणाईस, व्हॉट्सअॅप? तुमच्या भयंकर व्यग्र जीवनातून हे पत्र वाचायला (मग ते छापील वृत्तपत्रातले असेल, अॅपवरचे असेल किंवा कोणत्या समाजमाध्यमावर शेअर केलेले असेल) तुम्ही वेळ काढलात त्याबद्दल सर्वप्रथम आभार. हो अलीकडे सुरुवातीलाच आभार मानायची प्रथा सुरू होते आहे. म्हणून मीही तसे केले. ना ना. मी अजिबात बोअर करणार नाही तुम्हाला. कारण तुम्हाला मी काय हो वेगळे सांगणार. तुम्हाला तर सगळे माहितीच असते. दुनिया तर तुमच्या एका क्लिकवर चालते. पण तरीही तुमच्यापेक्षा चार पावसाळे मी अधिक पाहिलेत, याचा फायदा घेऊन दोन-चार गोष्टी शेअर करणार आहे. म्हणजे बघा की, नवीन वर्ष सरताना हाती आलेल्या छापील किंवा डिजिटल दिनदर्शिकेत जानेवारी महिन्यातली लाल रंगातली २६ तारीख तुमच्यापैकी अनेक जण सवयीने शोधतात. ती वीकएण्डला आली असेल तर जोडून सुट्टय़ा मिळाल्याचा आनंद लगेच त्यांच्या चेहऱ्यावर झळकतो आणि महिनाभर आधीच त्या सुट्टीची आखणी होते. बहुतेकांना या दिवसाचे महत्त्व आणि माहात्म्य माहिती नसते. अनेकांना २६ जानेवारीला काय असते हे माहिती नसते. कुणाला प्रजासत्ताक म्हणजे काय हे माहिती नसते, तर कुणी स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यांच्या तारखांची हमखास गल्लत करतात. फार कमी जणांना २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन असतो, हे माहिती असते. ते फक्त हातात आयती पडलेली माहिती, फोटो, व्हिडीओ न वाचता शेअर करायचे काम प्रामाणिकपणे करतात. अनेक ठिकाणी दरवर्षी सत्यनारायण, जेवणावळींसह दिवसभर देशभक्तीपर गीतांच्या रेकॉर्डचा कल्ला केला जातो. त्यातल्या मूठभरांना २६ जानेवारीची सखोल माहिती असते. तरी उरलेल्या अनेकांसाठी ट्विटर स्टाइलने सांगतो की, भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताची राज्यघटना संविधान समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारली आणि ती २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. क्या, रहेगा अब याद? काहींना या दिवशी ध्वजवंदन केले जाते हेही सुदैवाने माहिती असते. शैक्षणिक संस्था, कार्यालये, सहनिवास, शहरातील महत्त्वाचे चौक आदी ठिकाणी झेंडावंदन केले जाते. काही जण फक्त त्यांचा स्टेटस अपडेट करतात की ‘वॉचिंग परेड ऑन डी डी नॅशनल चॅनल.’ तो टाइप करून त्याला लाइक मिळाले की त्यांचे काम फत्ते. खरी परेड कोण बघतो? फार कमी जण थेट टीव्हीवर आणि काही जण समाजमाध्यमांवर थेट दिल्लीत होणारे संचलन पाहतात. संचलनाच्या आधी ‘अमर जवान ज्योती’ या अनाम सैनिकांच्या स्मारकापाशी पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहतात. त्यानंतर ते राष्ट्रपती आणि प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करतात. मग ध्वजारोहण केले जाते. त्यानंतर अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या वेळी राजपथावर होणाऱ्या संचलनात तिन्ही सेनादलांचे विविध विभाग सहभागी होतात. त्यांची मानवंदना राष्ट्रपती स्वीकारतात. विविध राज्यांच्या संस्कृतीची झलक दाखवणाऱ्या चित्ररथांच्या सादरीकरणांच्या चुरशीत महाराष्ट्राला अनेकदा मानाचे स्थान मिळाले आहे. तुम्हाला सांगतो, स्वातंत्र्य, बंधुत्व, स्त्री-पुरुष समानता ही मूल्ये भारतीयांनी स्वीकारली आणि जोपासली. त्यामुळे प्रजासत्ताक लोकशाही राष्ट्र म्हणून आपल्या देशाचा नावलौकिक जगभर झाला. जगातील सर्वात मोठी लोकशाही राजव्यवस्था म्हणून भारत देशाचा उल्लेख होतो. आता तुम्ही म्हणाल ओके. मग? यात आम्ही काय करायचे आता? बॉस तुमचा सवाल शंभर टक्के खरा आहे. मी म्हणतो, येस. तुम्ही काहीच करू नका. करेक्ट आहे. पण पूर्वसुरींनी जे चांगले केलेले आहे ते तरी फॉलो करा. किमान शालेय जीवनात शिकलेल्या नागरिकशास्त्रातले धडे प्रत्यक्षातही आचरणात आणायला शिका. त्यात काही चांगल्या गोष्टींची भर घालता आली तर बघा. समाजमाध्यमे जरूर वापरा आणि त्याचा सकारात्मक गोष्टींसाठी नक्कीच वापर करा. खरे तर तसे करणारे तुमच्यापैकी मूठभर का होईना आहेतच की आत्ताही. या गोष्टीचा प्रत्यय कोविडकाळात अनेकांना आला. तर त्यांना या गोष्टीसाठी जरूर फॉलो करा. देश, देशप्रेम, देशाविषयीची मूल्ये आणि निष्ठा, आदी गोष्टींचा मनापासून विचार करायला लागा आणि त्या रोजच्या जीवनात आचरणात आणायचा प्रयत्न करा. मग बघा, पुढल्या वर्षी मला असे काही पत्रबित्र लिहायची वेळच येणार नाही. सुज्ञांस अधिक काय सांगावे. कळावे, ओळख झाली आहे आणि आता लोभ वाढेल अशी आशा आहे. धन्यवाद. तुमचाच विश्वासू, भारतीय प्रजासत्ताक दिवस