अक्कलकोट येथील वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिराला तिघा अज्ञात तरण भक्तांनी तब्बल एक कोटी १७ लाखांचे गुप्तदान केले. मंदिराच्या दानपेटीत एवढे मोठे घसघशीत गुप्तदान टाकल्यानंतर हे तिघेही भक्त एका क्षणात निघून गेले. मंदिराच्या इतिहासात प्रथमच एवढे मोठे गुप्तदान मिळाल्याचे सांगण्यात आले.सकाळी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी भक्तांची वर्दळ असतानाच तिघा तरुणांनी प्रवासी बॅगांसह मंदिरात प्रवेश केला. श्री स्वामी समर्थ महाराजांचे श्रद्धापूर्वक दर्शन केल्यानंतर लगेचच प्रवासी बॅगांतील संपूर्ण रक्कम जवळच्या दानपेटीत टाकली. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात दानपेटीत गुप्तदान टाकले जात असताना इतर भक्तांनी व मंदिरातील सेवेक -यांनी त्या तिघा तरुण भक्तांना, मंदिराच्या विश्वस्त कार्यालयात येण्याचा व विश्वस्तांची भेट घेऊन त्यांच्याकडून सत्कार स्वीकारण्याचा आग्रह धरला. परंतु हे तिघे तरुण कोणताही प्रतिसाद न देता काही क्षणात मंदिरातून बाहेर पडले. दरम्यान, मंदिराच्या प्रशासकीय यंत्रणेने स्टेट बँकेच्या कर्मचा-यांच्या मदतीने दानपेटी उघडून त्यातील रक्कम मोजली असता त्यात एक कोटी १७ लाखांची रक्कम मिळाली. मंदिर समितीने मंदिर परिसराचा विकास आराखडा यापूर्वीच तयार केला असून यात दर्शन मंडप, ध्यान मंदिर, अभिषेकासाठी बसण्याची जागा या विकास कामे केली जाणार आहेत. त्यासाठी या गुप्तदानाचा उपयोग केला जाणार असल्याचे मंदिर समितीचे विश्वस्त महेश इंगळे यांनी सांगितले.