मुंबईवर दहशतवादाची टांगती तलवार कायम असून गेल्या काही महिन्यांत इंडियन मुजाहिदिन या दहशतवादी संघटनेकडून हल्ल्याची जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती उघड झाली आहे. मुंबईतील ज्यू समाजाची प्रार्थनास्थळे यावेळी प्रामुख्याने लक्ष्य करण्यात आली आहेत. त्यामुळे या स्थळांबाहेरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. याशिवाय मुंबईतील संवेदनाक्षम स्थळांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला आहे.
२६/११ नंतर मुंबईत १३ जुलै २०११ रोजी बॉम्बस्फोट घडविणारी इंडियन मुजाहिदिनच यामध्ये आघाडीवर असल्याचे यासिन भटकळ आणि असदउल्ला अख्तर या दोघांच्या जबाबातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी राज्याच्या दहशतवादविरोधी विभागाने तयार केलेल्या अहवालात मुंबईतील ११ ठिकाणांची रेकी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या ठिकाणांची माहिती या अहवालात देण्यात आली असून हा अहवाल राज्याचे पोलीस महासंचालक, गुप्तचर यंत्रणा आणि मुंबई पोलिसांना देण्यात आल्यानंतर संबंधित संवेदनाक्षम ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
दहशतवादी हल्ल्याची संभाव्य ठिकाणे
मुंबई पोलीस आयुक्तालय, झव्हेरी बाजार, मंगलदास मार्केट, काळबादेवी, लोहार चाळ, क्रॉफर्ड मार्केट, मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, मुंबई सेंट्रल बस आगार, मुंबादेवी मंदिर आणि भायखळा, आग्रीपाडा, डोंगरी आणि पायधुनीतील ज्यूंची चार प्रार्थनास्थळे