* मे महिन्यात मध्य रेल्वेवर २.५७ लाख प्रवाशांना दंड
* गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने वसुली
मध्य रेल्वेवर विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या गेल्या महिन्यात तब्बल अडीच लाखांपेक्षा जास्त नोंदवली गेली. या प्रवाशांकडून रेल्वेला एका महिन्यातच १३ कोटी ७५ लाख रुपयांचा दंड मिळाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत दंडाच्या रकमेतील ही वाढ दुपटीपेक्षा जास्त आहे.
विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न केले आहेत. तरीही विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याकडे रेल्वेने लक्ष दिले आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात १.४० लाख लोकांना विनातिकीट प्रवास करताना पकडण्यात आले होते. त्यांच्याकडून ६.३६ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता.
यंदा मात्र दंडाचा आकडा दुपटीने आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचा आकडा एक लाखाहून जास्त वाढला आहे. यंदा मे महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या २. ५७ लाख प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून १३ कोटी ७५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. गेल्या दोन महिन्यांत तब्बल ४.२४ लाख लोकांना तिकिटाविना प्रवास करताना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून २२ कोटी १५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या वर्षी ही संख्या एप्रिल व मे या दोन महिन्यांमध्ये ३.३० लाख एवढी होती. तर त्यांच्याकडून वसूल केलेल्या दंडाची रक्कम १५ कोटी ४१ लाख होती.