मालमोटारीची जोराची धडक बसल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोघे जागीच ठार झाले. श्रीरामपूर-नेवासे रस्त्यावर टाकळीभान (ता. श्रीरामपूर) येथे मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत प्रत्यक्षदर्शीकडून समजलेली माहिती अशी, की नेवासेकडून श्रीरामपूरकडे जात असलेल्या मालमोटारीने (एमएच ४१ जी ६४१५) श्रीरामपूरहून औरंगाबाद येथे जात असलेल्या मोटारसायकलला (एमएच २० बीएफ ४४१६) समोरून जोराची धडक दिली. त्यात मोटारसायकलवरील मुजाईद शेख (वय १८, रा. पढेगाव, औरंगाबाद) व राजू रहेमान शेख (वय २८, रा. खंडाळे, ता. श्रीरामपूर) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात एकाच्या पोटावरून तर दुस-याच्या डोक्यावरून मालमोटारीचे चाक गेल्याने पोटाचा व मेंदूचा चेंदामेंदा झाला. तसेच मोटारसायकलचाही चक्काचूर झाला. घटनेनंतर मालमोटारचालकाने ती दोनशे फूट अंतरावर उभी करून तो पसार झाला. घटनेच्या वेळी स्थानिक पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी हजर नव्हता. एक तासानंतर पोलीस घटनास्थळी आले. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. तासभर मृतदेह घटनास्थळी पडून राहिल्याने येथे मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अज्ञात मालमोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. हवालदार कैलास भांगे, पोलीस नाईक पवार अधिक तपास करीत आहेत.