अक्कलकोट येथे विवाह सोहळा उरकून सोलापूरकडे परत येत असताना मोटारसायकलवरील तिघा तरुणांना एसटी बसने ठोकरल्याने घडलेल्या अपघातात तिघा तरुणांचा जागीच अंत झाला. सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास तोगराळी गावाजवळ हा अपघात झाला.
रसूल फरीदसाहेब शेख (वय २२), सुलतान रशीद शेख (वय १५) व लक्ष्मण नारायण हंचाटे (वय २२, तिघे रा. भारतरत्न इंदिरानगर, सत्तर फूट रोड, सोलापूर) अशी तिघा मृतांची नावे आहेत. भारतरत्न इंदिरा नगर भागात राहणारे सरदार कोळी यांच्या कन्येचा विवाह सोहळा अक्कलकोट येथे आयोजिला होता. या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून रसूल शेख, सुलतान शेख व लक्ष्मण हंचाटे हे तिघे मोटारसायकलवर बसून सोलापूरकडे निघाले होते. सोलापूरच्या अलीकडे १७ किलो मीेटर अंतरावर तोगराळी (ता.दक्षिण सोलापूर) येथे सदर मोटारसायकलला समोरून येणाऱ्या शिवछत्रपती रंगभवन ते अक्कलकोट या एसटी बसची (एमएच ०७ सी ७९०९) जोरदार धडक बसली. यात मोटारसायकलवरील तिघे जण जागीच मरण पावले. एसटी बसचालकाला एसटी बससह वळसंग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दुर्घटनेमुळे भारतरत्न इंदिरा नगर परिसरात शोककळा पसरली होती.