उत्तरखंडात यात्रेला गेलेले जिल्ह्य़ातील ३३१ यात्रेकरू तिकडेच अडकले असले तरी ते सर्व सुखरूप असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी आज सांगितले. या सर्व गटांशी हस्ते, परहस्ते जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाला असून ते उत्तरखंडातच असले तरी परतीच्या प्रवासाच्या तयारीत आहेत अशी माहिती देण्यात आली.
गावपातळीवर यंत्रणा कार्यान्वित करून जिल्हा प्रशासनाने या ३३१ यात्रेकरूंची माहिती मिळवली असून ट्रॅव्हल कंपनी, बस, रेल्वे व खासगी वाहनाने हे यात्रेकरू गटागटाने उत्तराखंडात गेले आहेत. या प्रत्येक गटातील कोणाशी ना कोणाशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाला आहे.     
सोनई, राहुरी कारखाना भागातील ५० यात्रेकरू सुखरूप असल्याची माहिती शनैश्वर देवस्थानचे माजी कोषाध्यक्ष पंढरीनाथ शेटे व केदारेश्वर ट्रॅव्हल्स कंपनीचे चालक काका जोशी यांनी मोबाइलद्वारे दिली. ते स्वत: यात्रेत आहेत. आमच्या बससह ५० यात्रेकरू सुरक्षित ठिकाणी असल्याचे त्यांनी कळवले आहे. हे सर्व सध्या हरिद्वार, हृषीकेशला सुखरूप आहेत.
जिल्ह्य़ातील ३३१ यात्रेकरूंचा जिल्हा प्रशासनाने दिलेला तपशील पुढीलप्रमाणे आहे. चौधरी यात्रा कंपनी- १२ यात्रेकरू- (संपर्क झालेली व्यक्ती- भाऊसाहेब पाटील-०९७६३२४१७८२, राजलक्ष्मी दुस्सा- ०९४२२६८८४८४), यांच्याशी आज सकाळी संपर्क झाला, ते डेहराडूनकडे निघाले आहेत.
गुरुदत्त ट्रॅव्हल्स- ६७ यात्रेकरू- (संपर्क झालेली व्यक्ती- विजय विठ्ठल चौधरी- ०९६६५८३८३३७), या गटाशी आज सकाळी संपर्क झाला, ते दंनखल येथे आहेत, खाली हरिद्वारकडे निघण्याच्या तयारीत होते. चैतन्य ट्रॅव्हल्स- १० यात्रेकरू- (संपर्क झालेली व्यक्ती- गोरख मोहिते- ०९८५०९२५६२३, ससे महाराज- ०८६३७३३६२७१), यांच्याशी काल (बुधवार) सायंकाळी संपर्क झाला, ते कुरुक्षेत्र येथे सुरक्षित आहेत. अंबिका ट्रॅव्हल्स, श्रीरामपूर- ३७ यात्रेकरू- (संपर्क झालेली व्यक्ती- अनंत कुलकर्णी- ०९४२२२२२५७४), यांच्याशी आज सकाळी संपर्क झाला, ते गौरीकुंड येथे सुरक्षित आहेत, त्यांना डेहराडूनला हलवण्यात येणार आहे. साई गोरक्षनाथ ट्रॅव्हल्स, कोपरगाव- ९ यात्रेकरू- (संपर्क झालेली व्यक्ती- चिलिया हनमंता जावळे- ०९८६०४७५२६६), काल (बुधवारी) सायंकाळी यांच्याशी संपर्क झाला, परतीच्या प्रवासात ते अयोध्येत होते. नागनाथ ट्रॅव्हल्स, श्रीगोंदे- ५८ यात्रेकरू- (संपर्क झालेली व्यक्ती- राम साळुंके- ०९४२०६३४२१८), यांच्याशी आज सकाळी संपर्क झाला, सर्व यात्रेकरू गौरीकुंड येथे सुखरूप असून हेलिकॉप्टरने त्यांना हलवण्यात येणार आहे. साईनाथ यात्रा कंपनी- १४ यात्रेकरू- (संपर्क झालेली व्यक्ती- संजय खुळगे- ०९८२२८२८६८५, मारुती शिरोळे- ०७७०९२०४६१०), यांच्याशी आज सकाळी संपर्क झाला, सर्व सुरक्षित आहेत, सोनप्रयाग येथून पुढच्या प्रवासाला निघाले आहेत. खासगीरीत्या गेलेले राहुरी येथील १० यात्रेकरू- (संपर्क शालेली व्यक्ती- डहाळे- ९९७०२७३१३१), आज सकाळी संपर्क झाला, सर्व परतीच्या प्रवासात मथुरा येथे आहेत. पडवळ यांची यात्रा- १५ यात्रेकरू- (संपर्क झालेली व्यक्ती- नारायण दगडू पडवळ- ०८४२१५४६११४), काल (बुधवार) सायंकाळी कंपर्क झाला, उत्तर काशी येथे सुरक्षित होते. साईलीला ट्रॅव्हल्स, माहेगाव देशमुख, कोपरगाव- ४१ यात्रेकरू- (संपर्क झालेली व्यक्ती- शंकरराव गोंदकर- ०९७६६२००१२२), काल रात्री संपर्क झाला, सर्व सोनप्रयाग येथील मंगल कार्यालयात सुखरूप आहेत. अनुराधा ट्रॅव्हल्स- ३८ यात्रेकरू- (संपर्क झालेली व्यक्ती- वसंतराव गोंदकर- ०९९२२३६४१३६), काल (बुधवार) रात्री संपर्क झाला, सर्वजण हरिद्वार येथे सुखरूप आहेत. बोरकर व अन्य सहा यात्रेकरू (संपर्क झालेली व्यक्ती- सुभाष बोरकर- ९०११९११९४१) यांच्याशी आज संपर्क झाला, सर्व हरिद्वार येथे सुखरूप आहेत.
पुष्पाताई काळे सुरक्षित
कोपरगावचे शिवसेनेचे आमदार अशोक काळे यांच्या पत्नी पुष्पाताई अन्य कुटुंबीयांसमवेत (१६ यात्रेकरू) उत्तराखंडात गेल्या आहेत. त्या गुप्तकाशी येथे सुरक्षित असून आज त्यांना अन्यत्र हलवण्यात येणार होते असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.  
 तनपुरे महाराजांचा मठ खुला
जिल्ह्य़ातील बद्रिनाथ तनपुरे महाराज यांचा श्रीक्षेत्र बद्रिनाथ येथे भक्तनिवास व मठ आहे. हा मठ आपतग्रस्तांसाठी खुला करण्यात आल्या असून, तेथे आपत्कालीन व्यवस्थाही करण्यात आली आहे. पंढरपूर येथील चारोधाम ट्रस्टचे अध्यक्ष बद्रिनाथ तनपुरे महाराज यांनी याबाबतच्या सूचना तिकडे दिल्या असून पंढरपूर येथील व्यवस्थापक अरुण तनपुरे यांना या व्यवस्थेसाठी तिकडे पाठवले आहे.